Tag Archive for: चिकाटी

साधना, योग आणि रूपांतरण – २७४

शरीराचे रूपांतरण

व्यक्तिगत अडचणीप्रमाणेच जडभौतिक पृथ्वी-प्रकृतीमध्येही (physical earth-nature) एक सर्वसाधारण अडचण असते. जडभौतिक प्रकृती ही संथ, सुस्त आणि परिवर्तनासाठी अनिच्छुक असते. ढिम्म राहणे आणि अल्पशा प्रगतीसाठी दीर्घ काळ लावणे ही तिची प्रवृत्ती असते. अतिशय दृढ मानसिक किंवा प्राणिक किंवा आंतरात्मिक संकल्पालासुद्धा या जडतेवर मात करणे अतिशय अवघड जाते. वरून सातत्याने चेतना, शक्ती आणि प्रकाश खाली उतरवीत राहिल्यानेच या जडतेवर मात करता येणे शक्य असते. त्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीकडे सातत्यपूर्ण संकल्प व आस असणे आवश्यक असते. आणि शारीर-प्रकृतीने अतीव प्रतिकार केला तरी त्या प्रतिकारामुळे थकून जाणार नाही असा स्थिर आणि चिवट संकल्प असणे आवश्यक असते.

*

गहनतर शांती इत्यादीचा अभाव हे जडभौतिक नकाराचे मूळ स्वरूपच आहे आणि हा जडभौतिक नकारच जगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे अस्तित्व नाकारण्याचा समग्र पाया असतो. जडभौतिकामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्या सर्व गोष्टी चिवट, हटवादी असतात आणि त्यांच्यामध्ये जडत्व आणि नकाराची प्रचंड ताकद असते. त्या गोष्टी जर तशा नसत्या तर साधना अतिशय लवकर पूर्ण झाली असती. शारीर-प्रतिकाराच्या या स्वभावधर्माला तुम्हाला सामोरे जावेच लागते आणि तो प्रतिकार कितीही वेळा उफाळून आला तरी त्याच्यावर पुन्हा पुन्हा मात करावीच लागते. पृथ्वी-चेतनच्या रूपांतरणासाठी ही किंमत मोजावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 359, 360)

साधना, योग आणि रूपांतरण – २७३

शरीराचे रूपांतरण

हट्टीपणा हा शारीर-मनाचा (physical mind) स्वभावधर्म असतो. एकाच गोष्टीची सातत्याने पुनरावृत्ती करत राहण्यामुळे ही शारीर-प्रकृती टिकून राहते. एवढेच की, त्या गोष्टीचे विविध रूपांद्वारे सातत्याने सादरीकरण, प्रस्तुती होत राहते. जेव्हा शारीर-प्रकृती कार्यरत असते तेव्हा, ही हटवादी पुनरावृत्ती हा तिच्या प्रकृतीचा एक भाग असतो, पण ती जेव्हा कार्यरत नसते तेव्हा ती सुस्त, जड असते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला शारीर-प्रकृतीच्या जुन्या वृत्तीप्रवृत्तींपासून सुटका करून घ्यायची असते तेव्हा त्या प्रवृत्ती अशा प्रकारच्या हटवादी पुनरावृत्तीने प्रतिकार करतात. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी व्यक्तीने नकार देण्याच्या बाबतीत खूप चिकाटी बाळगली पाहिजे.

सर्व प्रकारच्या ‘प्रकृती’ प्रमाणे शारीर-‘प्रकृती’चेही व्यक्तिगत आणि वैश्विक असे दोन पैलू असतात. व्यक्तीमध्ये सर्व गोष्टी वैश्विक प्रकृतीकडून येतात. परंतु व्यक्तिगत शारीर-प्रकृती त्यांच्यापैकी काही गोष्टींचेच जतन करते व इतर गोष्टी नाकारते आणि ती ज्या गोष्टी जतन करून ठेवते त्यांना ती वैयक्तिक रूप देते… परंतु व्यक्तीला जेव्हा त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची असते तेव्हा व्यक्ती अंतरंगामध्ये (साचलेले) जे काही असते ते आधी सभोवतालच्या ‘प्रकृती’ मध्ये फेकून देते. आणि तेथून मग वैश्विक ‘प्रकृती’ त्या गोष्टी परत आत आणण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्या जागी तिच्या स्वतःच्या अशा काही नवीन किंवा तत्सम गोष्टी आणते. व्यक्तीला या आक्रमणास सातत्याने थोपवून धरावे लागते, नकार द्यावा लागतो. सतत दिलेल्या नकारामुळे, सरतेशेवटी पुनरावृत्तीची शक्ती क्षीण होते आणि मग व्यक्ती मुक्त होते आणि उच्चतर चेतना व तिच्या गतिप्रवृत्ती शारीरिक अस्तित्वामध्ये उतरवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 361)

साधना, योग आणि रूपांतरण – २७२

शरीराचे रूपांतरण

व्यक्तीला जेव्हा भौतिक जीवनामध्ये काही परिवर्तन करण्याची इच्छा असते, म्हणजे तिला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करायचा असो किंवा स्वतःच्या अवयवांच्या कार्यपद्धतीमध्ये किंवा सवयींमध्ये बदल करायचा असो, व्यक्तीकडे अविचल अशी चिकाटी असणे आवश्यक असते. अमुक एखादी गोष्ट तुम्ही पहिल्यांदा ज्या उत्कटतेने केली होती त्याच तीव्रतेने तीच गोष्ट शंभर वेळा पुन्हा पुन्हा सुरू करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि ती गोष्ट यापूर्वी तुम्ही जणू कधी केलेलीच नव्हती अशा प्रकारे ती पुन्हा पुन्हा करत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. जी माणसं लवकर अस्वस्थ, विचलित होतात त्यांना हे जमत नाही. परंतु तुम्हाला जर हे करता आले नाही तर तुम्ही योगसाधना करू शकणार नाही. किमान ‘पूर्णयोग’ तर नाहीच नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन करता येणार नाही.

व्यक्तीला स्वतःच्या शरीरामध्ये परिवर्तन करायचे असेल तर तीच तीच गोष्ट लाखो वेळा करता आली पाहिजे, कारण शरीर हे सवयी आणि नित्यक्रमाच्या (routine) कृतींनी बनलेले असते आणि हा नित्यक्रम नाहीसा करायचा असेल तर त्यासाठी अनेक वर्षे चिकाटी बाळगावी लागते.

– श्रीमाताजी (CWM 07 : 104)

साधना, योग आणि रूपांतरण – ८९

तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये, स्वतःचे (म्हणजे तुमच्या बाह्यवर्ती प्रकृतीच्या विविध घटकांचे) एकीकरण अधिक दृढपणे केले पाहिजे. तुम्ही जर स्वतःला सतत विखुरत (disperse) राहिलात, आंतरिक वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलात, तर सामान्य बाह्यवर्ती प्रकृतीच्या क्षुद्रतेमध्ये आणि ती प्रकृती ज्याप्रत खुली आहे अशा गोष्टींच्या प्रभावाखाली तुम्ही सतत वावरत राहाल. अंतरंगामध्ये जीवन जगायला शिका. नेहमी अंतरंगात राहून कृती करायला आणि श्रीमाताजींशी सतत आंतरिक संपर्क ठेवायला शिका. ही गोष्ट नेहमी आणि पूर्णांशाने करणे सुरुवातीला काहीसे कठीण वाटू शकेल, परंतु तुम्ही जर तसे चिकाटीने करत राहिलात तर ते करता येणे शक्य असते, आणि असे केले तरच, व्यक्तीला योगमार्गात सिद्धी मिळविणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 227)

सर्वात महत्त्वाचा एक गुण म्हणजे दीर्घोद्योग, प्रयत्न-सातत्य, चिकाटी. एक प्रकारची आंतरिक खिलाडूवृत्ती, जी तुम्हाला नाऊमेद होऊ देत नाही, दुःखी होऊ देत नाही आणि हसतहसत साऱ्या अडीअडचणींना सामोरे जाण्यास मदत करते. इंग्लिशमध्ये ह्याला एक छान शब्द आहे – Cheerfulness. जर तुम्ही अशा प्रकारची आनंदी वृत्ती किंवा खेळकरपणा तुमच्यामध्ये बाळगलात तर तुम्ही, तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखणाऱ्या वाईट प्रभावांशी चांगल्या रीतीने दोन हात करता, तुम्ही त्यांचा चांगल्या रीतीने प्रतिकार करता.

*

(CWM 08 : 23)

गरज पडली तर, एखादी गोष्ट हजार वेळा सुरु करण्याची जरी वेळ आली तरी, ती करण्याचा निश्चय करावयास हवा. माणसं अगदी निराश होऊन माझ्याकडे येतात आणि म्हणतात, ”मला वाटलं होते की, आता सगळं काही झालं आहे; पण आता मला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. ”परंतु जर त्यांना असे सांगितले की, ”हे तर काहीच नाही. तुम्हाला कदाचित तीच गोष्ट शंभर नाही, दोनशे वेळा, कदाचित हजार वेळासुद्धा करावी लागेल. तुम्ही कुठे एक पाऊल पुढे टाकता आणि असे समजायला लागता की, तुम्ही सुरक्षित आहात, परंतु नेहमीच असे काहीतरी असते की, तुम्ही थोडेसे पुढे गेल्यावर तीच अडचण फिरुन परत येते.”

तुम्हाला असे वाटते की, तुम्ही प्रश्न सोडवला आहे, समस्या सोडविली आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा तोच प्रश्न, तीच समस्या सोडवायला लागते. ती दिसायला कदाचित काहीशी भिन्न दिसते पण समस्या तीच असते. अशावेळी “ती समस्या अगदी लाखो वेळा जरी आली तरी मी ती लाख वेळा सोडवेन, परंतु मी त्यातून पार पडेनच,” असा निश्चय जर तुम्ही केलेला नसेल, तर तुम्ही योग करूच शकणार नाही. ही अगदी अनिवार्य अशी गोष्ट आहे.

(CWM 08 : 41-42)

*

व्यक्तीला स्वत:मध्येच एक प्रकारची आश्वासकता वाटली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये, काहीही करावे लागले तरीही ती आश्वासकता व्यक्तीने शेवटपर्यंत कायम राखली पाहिजे. जे चिकाटीने प्रयत्नशील राहतात, त्यांना विजय प्राप्त होतो.

सर्व प्रकारच्या विरोधांमध्येसुद्धा ही चिकाटी टिकवून ठेवण्यासाठी एक अविचल असा आधार आवश्यक असतो आणि असा एकमेव अविचल आधार म्हणजे ती सद्वस्तु, ते परम सत्य होय. दुसरीकडे कोठेही असा आधार शोधणे हे व्यर्थ आहे. ज्याबाबत कधीही निराश व्हावे लागणार नाही असा हा एकमेव आधार आहे.

(CWM 09 : 255)

*

प्रयत्नसातत्याद्वारेच व्यक्ती अडचणींवर मात करू शकते, त्यांच्यापासून पळ काढून नव्हे. जो चिकाटी राखतो, प्रयत्नशील राहतो त्याचा विजय निश्चित असतो. जो प्रयत्नसातत्य राखतो त्याचा जय होतो. नेहमीच सर्वोत्तम करत राहा, त्याच्या फलांची काळजी परमेश्वर करेल.

(CWM 14 : 163)