Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ३०६

अचेतनाचे रूपांतरण

(जुलै १९४८ मध्ये जागतिक परिस्थितीबद्दल खंत व्यक्त करणाऱ्या काही व्यक्तींसंबंधी, एका साधकाला उद्देशून लिहिलेले हे पत्र…)

सध्या गोष्टी काही ठीक चालल्या आहेत असे नाही, त्या दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालल्या आहेत आणि कोणत्याही क्षणी त्या अजूनही वाईट होतील किंवा वाईटाहूनही वाईट असे काही घडणे शक्य असेल तर तसेही घडू शकेल. सध्याच्या अस्वस्थ जगामध्ये, गोष्टी कितीही विरोधाभासी असल्या तरी त्या घडणे शक्य आहे, असे आता वाटू लागले आहे. त्या तुमच्या स्नेह्यांसाठी सर्वोत्तम गोष्ट कोणती असेल तर ती हीच की जे चाललेले होते ते सर्व आवश्यक होते, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. कारण एक नूतन आणि अधिक चांगले जग प्रत्यक्षात येण्यासाठी, काही विशिष्ट शक्यता उदयास येऊन, त्यांच्यापासून सुटका होण्याची आवश्यकता होती. ‘नंतर कधीतरी करू’ असे म्हणून त्या पुढे ढकलता येण्यासारख्या नव्हत्या.

योगामध्ये ज्याप्रमाणे, व्यक्तित्वामध्ये सक्रिय किंवा सुप्त अशा ज्या कोणत्या गोष्टी असतात, त्यांना प्रकाशामध्ये आणून कार्यान्वित करावे लागते म्हणजे त्यांचा सामना करता येतो आणि त्यांना हद्दपार करता येते किंवा तळाशी सुप्तपणे पडून असलेल्या गोष्टींना शुद्धिकरणाच्या हेतुने पृष्ठभागावर आणावे लागते, अगदी तसेच येथेही आहे.

‘उषःकालापूर्वीची रात्र ही अधिक काळोखी असते आणि उषेचे आगमन हे अपरिहार्य असते,’ ही म्हण त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मात्र त्यांनी ही गोष्टदेखील लक्षात ठेवली पाहिजे की, ज्या नवीन जगताचे आगमन आमच्या दृष्टीस (स्पष्टपणे) दिसत आहे ते जगत म्हणजे जुन्याच जगताच्या पोतापासून (texture) बनलेले पण प्रकाराने काहीसे वेगळे असणारे, असे नाही तर, त्या नूतन जगताचा उदय हा अन्य मार्गाने, म्हणजे बाहेरून नव्हे तर, अंतरंगातूनच झाला पाहिजे. म्हणून बाहेर घडणाऱ्या शोचनीय गोष्टींविषयी खूप जास्त चिंतित राहू नये, तर आपण अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहावे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहिल्याने, नवीन जगत, मग ते कोणत्याही रूपात साकार झाले तरी, तुमचे ते (स्नेही) त्यासाठी सज्ज राहू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 691)
*

साधना, योग आणि रूपांतरण – ११६

तुम्ही सतत मनामध्ये कोणत्या तरी गोष्टींबाबत चिंता करत असता, विचार करत असता की, “हे बरोबर नाही, माझ्यातील किंवा माझ्या कामातील ही गोष्ट चुकीची आहे,” आणि परिणामतः “मी कुचकामी आहे, मी वाईट आहे, माझे काहीच होऊ शकणार नाही.” असा विचार तुम्ही सतत करत राहता आणि त्यातूनच, त्याचा परिणाम म्हणूनच तुम्हाला अडचणी येताना दिसतात. उदाहरणार्थ, तुम्ही करत असलेले भरतकाम, तयार करत असता त्या लँपशेड्स इ. गोष्टी खरोखरच नेहमी उत्तम असतात आणि तरीही तुम्ही सतत असाच विचार करत राहता की, “हे काम चांगले झाले नाहीये, ते चुकीचे झाले,” आणि असा विचार करत राहिल्यानेच तुम्ही गोंधळात पडता आणि सारेकाही बिघडते. साहजिकपणेच मग तुम्ही सतत चुका करत राहता; आणि तुम्ही जेव्हा साध्यासरळपणे व आत्मविश्वासाने काम करता तेव्हापेक्षा, जेव्हा तुम्ही काळजी करत असता तेव्हा अधिक चुका करता.

कर्म असो की साधना असो धीमेपणाने वाटचाल करत राहणे अधिक बरे! ‘शक्ती’ला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे आणि तिला तिचे कार्य योग्य रीतीने करता यावे म्हणून, स्वतःला त्रास करून न घेता किंवा पदोपदी सतत अस्वस्थपणे प्रत्येक टप्प्यावर प्रश्न उपस्थित न करता, तुम्ही तुमचे कर्म सर्वोत्तम रीतीने केले पाहिजे. तुम्ही जर ते दोष सतत उगाळत राहिला नाहीत तर, जे कोणते दोष असतील ते यथावकाश निघून जातील; कारण सातत्याने त्या दोषांचा विचार करत राहिल्यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वासच डळमळीत होत आहे. तसेच, वास्तविक जी कायमच तेथे समानत्वाने असते त्या ‘शक्ती’प्रत खुले होण्याच्या तुमच्या क्षमतेवरील तुमचा विश्वासही डळमळीत होत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःहूनच त्या ‘शक्ती’च्या कार्य करण्याच्या मार्गामध्ये अनावश्यक अडथळे निर्माण करत आहात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 284)

सद्भावना – २९

साधे असणे खूप चांगले असते, फक्त सदिच्छा बाळगायची, आपल्याला करता येणे शक्य असेल ती उत्तमातील उत्तम गोष्ट आपण करायची आणि ती गोष्ट शक्य तेवढ्या सर्वोत्तम रीतीने करायची. त्यासाठी फार वेगळे असे काही करण्याची गरज नाही; फक्त प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची. आणि आपण काय केले पाहिजे आणि आपण कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या विश्वातील सारे काही जो जाणतो त्या ‘ईश्वरा’लाच घेऊ द्यायचा, हे किती छान आहे! मग आपल्याला कोणतीच चिंता उरत नाही, आणि मग आपण अगदी पूर्णपणे आनंदी राहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 248)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १६

धम्मपद : स्नेह, प्रेम यामध्ये दुःखाचा उगम होतो, त्यातून भीती उदयाला येते. जो प्रेमापासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याला भीती तरी कशाची?

आसक्तीतून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो आसक्तीतून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

अभिलाषेमधून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो अभिलाषेपासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

श्रीमाताजी : मला नेहमीच असे वाटत आले आहे की, ‘जाणते बना’ असे सांगण्यासाठी जी कारणे सर्वसाधारपणे दिली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात. : “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल, तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” ….परंतु ह्यामुळे जाणीव अधिकाधिक निबर बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदना यांना घाबरत असते.

मला वाटते असे सांगितले गेले पाहिजे की, जाणिवेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये आनंद निर्भेळ असतो, प्रकाश छायेविरहित असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात; अशी स्थिती अभीप्सेने आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती ह्या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात; स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वराला सोपविलेले असते.

स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक असा आनंद आहे, की जो शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. स्वत:बद्दल विचार करीत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, तुमच्यासाठी काय चांगले काय वाईट, कशाला मुरड घालावयाची आणि कशाचा ध्यास घ्यावयाचा, ह्यासारखे विचार सतत करीत बसणे – बापरे ! किती थकविणारे आहे, किती कंटाळवाणे, रटाळ, किती अळणी आहे हे !

त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाश, परम प्रेमासमोर, स्वत:ला अगदी खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारे काही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ शकतो अशा परमेश्वरासमोर स्वत:ला अगदी खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत, ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही?

कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती ते करावयाचे विसरून जाते, जुन्या सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून असते, ती कानात कुजबुजते : “बघ हं ! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.” – आणि तुम्ही एवढे खुळे असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही स्वत:कडे लक्ष पुरवायला सुरुवात करता आणि मग सगळेच बिघडून जाते.

मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि काळजी करू नका, हे शिकवावे लागते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 255-257)