Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२२

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा ‘रूपांतरणा’विषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, म्हणजे जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी, तुमची आंतरिक चेतना ही सत्यामध्ये दृढपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल, किमान आत्ताच्या घडीपुरता तरी तो चरम असेल.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते. चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे दिसत असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णपणे सजीव झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते. चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते.

दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल झालेला नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का उत्कट अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धडका मारत आहात पण ती काही ढासळत नाही. मात्र जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धडका मारण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते – आणि तुम्ही एका अन्य चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

मी असे म्हटले होते की ही मूलभूत समतोलाची क्रांती आहे. म्हणजे त्यामध्ये चेतनेचे संपूर्णतः प्रत्युत्क्रमण होते. लोलकामधून प्रकाश जेव्हा बाहेर पडतो तेव्हा जसे होते तसेच येथे होते. किंवा असे म्हणता येईल की, जणूकाही तुम्ही एखादा चेंडू आतून बाहेर वळवता (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) आणि ही गोष्ट चतुर्थ मितीशिवाय (fourth dimension) शक्य नसते. व्यक्ती येथे सामान्य त्रिमिती चेतनेमधून बाहेर पडून, अधिक उच्च अशा चतुर्थ मितीच्या चेतनेमध्ये प्रवेश करते. व्यक्ती अगणित मिती असलेल्या चेतनेमध्ये प्रवेश करते. हा अनिवार्य असा आरंभबिंदू असतो. जोपर्यंत तुमच्या चेतनेची ही मितीच बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला वस्तुमात्रांविषयीची जी वरकरणी दृष्टी असते त्याच स्थितीमध्ये तुम्ही कायम राहता आणि त्यामुळे तुम्ही त्यांची अगाधता, गहनता गमावून बसलेले असता.

– श्रीमाताजी (CWM 04 : 18-19)

साधना, योग आणि रूपांतरण – २२०

आपल्याला संपूर्ण रूपांतरण अपेक्षित आहे, म्हणजे शरीर आणि त्याच्या सर्व कृती यांचे रूपांतरण आपल्याला अपेक्षित आहे. परंतु अन्य कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी, पहिली पायरी अगदी अनिवार्य असते आणि ती म्हणजे चेतनेचे रूपांतरण. या रूपांतरणासाठी अभीप्सा असणे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प असणे हा अर्थातच आरंभबिंदू आहे, त्याशिवाय काहीच होणे शक्य नाही. परंतु या अभीप्सेबरोबर जर व्यक्तीमध्ये आंतरिक खुलेपणा, उन्मुखता असेल, एक प्रकारची ग्रहणशीलता असेल तर अशी व्यक्ती या रूपांतरित चेतनेमध्ये एका प्रयत्नामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वतःला तेथे सुस्थिर करू शकते. तसे म्हटले तर, चेतनेमधील हे परिवर्तन काहीसे आकस्मिक (abrupt) असते. म्हणजे जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा ते अचानकपणे घडून येते, जरी या परिवर्तनाची पूर्वतयारी ही संथपणे आणि दीर्घकाळ चालू असण्याची शक्यता असली तरीसुद्धा जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा मात्र ते अचानकपणे घडून येते.

मी येथे फक्त मानसिक दृष्टिकोनात होणाऱ्या परिवर्तनाविषयी बोलत नाहीये तर स्वयमेव चेतनेमधील परिवर्तनाविषयी बोलत आहे. हे अगदी संपूर्ण आणि परिपूर्ण असे परिवर्तन असते, म्हणजे त्याच्या मूलभूत अवस्थेमध्येच एक प्रकारची क्रांती घडून येते. एखादा चेंडू आतून बाहेरच्या बाजूस उघडावा तशी ही प्रक्रिया असते. (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) रूपांतरित चेतनेला प्रत्येक गोष्ट नवीन आणि निराळी वाटते; एवढेच नाही तर सामान्य चेतनेला एखादी गोष्ट जशी दिसते त्याच्या जवळजवळ उलट अशा पद्धतीने ती गोष्ट रूपांतरित चेतनेला दिसते. सामान्य चेतनेमध्ये असताना तुम्ही अतिशय संथपणाने, एकापाठोपाठ एक अनुभव घेत घेत, अज्ञानाकडून खूप दूरवर असणाऱ्या आणि बरेचदा संदिग्ध ज्ञानाच्या दिशेने प्रगत होता. परंतु रूपांतरित चेतनेमध्ये मात्र तुमचा आरंभबिंदू ज्ञान हा असतो आणि तुम्ही ज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रगत होत जाता. तथापि, ही केवळ एक सुरुवात असते. कारण आंतरिक रूपांतरणाचा परिणाम म्हणून बाह्यवर्ती चेतना, बाह्यवर्ती सक्रिय व्यक्तित्वाचे विविध स्तर आणि विविध घटक हे संथपणे आणि क्रमाक्रमाने रूपांतरित होतात. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 12 : 80)

साधना, योग आणि रूपांतरण – १९४

‘अतिमानस योग’ (supramental Yoga) म्हणजे एकाच वेळी, ‘ईश्वरा’प्रत आरोहण (ascent) असते आणि ‘ईश्वरा’चे मूर्त प्रकृतीमध्ये अवतरण (descent) देखील असते. आत्मा, मन, प्राण आणि शरीर यांच्या एककेंद्री समुच्चयाच्या ऊर्ध्वमुख अभीप्सेद्वारेच (aspiration) आरोहण साध्य होऊ शकते. आणि समग्र अस्तित्वाने त्या अनंत आणि शाश्वत ‘ईश्वरा’प्रत आवाहन केले तर त्याद्वारेच अवतरण घडून येऊ शकते. जर हे आवाहन व ही अभीप्सा असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने या गोष्टी उदयाला आल्या, त्या सातत्याने वृद्धिंगत होत राहिल्या आणि त्यांनी जर सर्व प्रकृतीचा ताबा घेतला, तर आणि तरच अतिमानसिक उन्नयन आणि रूपांतरण शक्य होते.

आवाहन आणि अभीप्सा या फक्त प्राथमिक अटी आहेत, त्या बरोबरीने आणि त्यांच्या प्रभावशाली तीव्रतेमुळे सर्व अस्तित्वामध्येच ‘ईश्वरा’प्रत उन्मुखता (opening) आणि संपूर्ण समर्पण उदित होणे आवश्यक असते. मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर असणारी व पाठीमागे असणारी आणि मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणारी एक महान दिव्य ‘चेतना’ असते. ती महान दिव्य चेतना, प्रकृतीला तिच्या सर्व भागांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणत्याही मर्यादेविना ग्रहण करता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे ‘उन्मुखता’! या ग्रहणशीलतेमध्ये धारण करण्याची अक्षमता असता कामा नये, किंवा मूलद्रव्यांतरणाच्या तणावामुळे (transmuting stress) शरीर किंवा मज्जातंतू, प्राण किंवा मन, किंवा संपूर्ण व्यवस्थेतील कोणती एखादी गोष्ट कोलमडूनही पडता कामा नये. (म्हणून त्यासाठी) ईश्वरी ‘शक्ती’चे सदोदित बलशाली असणारे आणि अधिकाधिक आग्रही होत जाणारे कार्य धारण करण्यासाठी सतत चढतीवाढती असणारी क्षमता, आणि अपार ग्रहणशीलता असणे आवश्यक असते. अशी ग्रहणशीलता नसेल तर कोणतेच महान आणि चिरस्थायी असे कोणतेही कार्य घडणे शक्य होणार नाही; आणि अशा वेळी ती ‘योगसाधना’ कोलमडून बंद पडेल किंवा जडतायुक्त अडथळा निर्माण झाल्यामुळे बंद होईल किंवा त्या प्रक्रियेमध्येच काहीतरी विनाशक अटकाव किंवा सुस्ती येऊन ती बंद पडेल अशी शक्यता असते; या प्रक्रियेमध्ये अपयश येऊ नये असे जर वाटत असेल तर योगसाधना निरपवाद आणि समग्र असणेच आवश्यक असते.

परंतु कोणत्याही मानवी प्रणालीमध्ये ही अनंत ग्रहणशीलता आणि अमोघ क्षमता नसते, म्हणून ‘ईश्वरी शक्ती’ जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अवतरित होते तेव्हा, ती त्या व्यक्तीची (ग्रहण)क्षमता वृद्धिंगत करत नेते. ईश्वरी ‘शक्ती’ वरून त्या व्यक्तीमध्ये प्रविष्ट होताना, व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कार्य करण्यासाठी ‘सामर्थ्य’ निर्माण करते. ते सामर्थ्य आणि ती ग्रहणक्षमता जेव्हा त्या ईश्वरी शक्तीद्वारे समतुल्य केली जाते तेव्हाच, अतिमानसिक ‘योग’ यशस्वी होण्याची शक्यता असते. आपण ‘जेव्हा आपले अस्तित्व हळूहळू चढत्यावाढत्या समर्पणाद्वारे ईश्वरा’च्या हाती सोपवीत जातो तेव्हाच ही गोष्ट शक्य होते. तेथे एक समग्र आणि अखंडित अशी सहमती आणि कार्यासाठी जी गोष्ट करणेच आवश्यक आहे ती गोष्ट ‘ईश्वरी शक्ती’ला करू देण्याची धैर्ययुक्त इच्छाशक्ती असणेच आवश्यक असते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 12 : 169-170)

अमृतवर्षा ०४

 

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा रूपांतरणाविषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, – अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य म्हणजे, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही ‘सत्या’मध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंत झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते.

चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते. दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही ढासळत नाही. पण जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 18-19]

कर्म आराधना – ३०

‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमातून बाह्यवर्ती जीवनातील गोष्टींमध्ये कार्य करू देण्यासाठी तीन अटी आवश्यक असतात –

०१) अचंचलता, समता : घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त आणि दृढ राखणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टीने पाहणे आणि स्वतः मनाने समचित्त राहणे.

०२) असीम श्रद्धा : जे सर्वोत्कृष्ट आहे तेच घडेल ही श्रद्धा बाळगणे, पण त्याबरोबरच, व्यक्ती जर स्वतःला खरेखुरे साधन बनवू शकली तर, त्याचे फळ ‘कर्तव्यम् कर्म’ अशा स्वरूपाचे असेल. म्हणजे, ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म करण्याची आवश्यकता भासेल तसे, ते कर्म असेल.

०३) ग्रहणशीलता : ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची व तिचे अस्तित्व अनुभवण्याची व त्यामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती अनुभवण्याची ताकद म्हणजे ग्रहणशीलता. तसेच व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याची मुभा त्या ‘ईश्वरी शक्ती’ला देऊन, तिला कार्य करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय. व्यक्तीला जर या शक्तीची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला या घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. (अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबतच असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची सरमिसळ होऊ देता कामा नये.)

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 266]

माझे प्रेम सततच तुझ्या बरोबर आहे. पण जर तुला ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच की, तू ते स्वीकारण्यास सक्षम नाहीस. तुझी ग्रहणशीलता उणी पडत आहे, ती वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुला स्वत:ला खुले केले पाहिजे आणि व्यक्ती स्वत:ला तेव्हाच खुली करू शकते, जेव्हा ती स्वत:चे आत्मदान करते.

तू नक्कीच कळत वा नकळतपणे, शक्ती आणि ईश्वरी प्रेम तुझ्याकडे खेचू पाहत आहेस. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही आडाखे न बांधता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:चे आत्मदान कर म्हणजे मग तू ग्रहणक्षम होऊ शकशील.

(CWM 14 : 148)

प्रश्न : ग्रहणशीलता कशावर अवलंबून असते?

श्रीमाताजी : ती मूलत: प्रामाणिकपणावर अवलंबून असते. खरोखरच व्यक्तीला ईश्वरी शक्ती ग्रहण करण्याची इच्छा आहे का ह्यावर ती अवलंबून असते. मला असे वाटते की, ह्यासाठी प्रामाणिकपणा आणि विनम्रता हे मुख्य घटक आहेत.

आत्मप्रौढीइतकी दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला एव्हढी बंधनात अडकवत नाही. जेव्हा तुम्ही स्व-संतुष्ट असता, तेव्हा तुमच्यामध्ये अशा प्रकारची एक आढ्यता असते की, जी तुमच्यामध्ये काही कमतरता आहे हे मान्य करण्यास तयारच नसते, तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत, तुम्ही अपूर्ण आहात, तुम्ही परिपूर्ण नाही. …अशा कोणत्याही गोष्टी मान्य करण्यास ती तयार नसते. तुमच्या स्वभावामध्ये, प्रकृतीमध्ये असे काहीतरी असते की, जे अशाप्रकारे आडमुठे बनते, त्याला हे मान्यच करावयाचे नसते – आणि तीच गोष्ट तुमच्या ग्रहणशीलतेमध्ये बाधा उत्पन्न करते. वास्तविक, तुम्हीच हा प्रयत्न करून पाहा, अनुभव घ्या.

जर इच्छाशक्तीच्या प्रयत्नाद्वारे, तुमच्या अस्तित्वाच्या अगदी अंशभागाद्वारे जरी तुम्ही हे मान्य करू शकलात की, “अं, हो, मी चुकलो खरा, मी असे करायला नको होते आणि मी असे वागायला नको होते, मला असे वाटायला नको होते, हो, ती चूकच आहे.”

जर का तुम्ही ते मान्य करू शकलात, तर सुरुवाती सुरुवातीला, तुम्हाला वाईट वाटते पण जेव्हा तुम्ही त्यावर ठाम राहता, तेव्हा अगदी ताबडतोब तुमच्यातील आजवर बंदिस्त असलेला तो भाग खुला होतो. तो खुला होतो आणि अगदी विलक्षण रीतीने प्रकाशाचा ओघच जणू आत प्रवेश करतो आणि मग नंतर मात्र तुम्हाला खूप आनंदी वाटते. इतके आनंदी वाटते की, तुम्ही स्वत:लाच प्रश्न करू लागता, ‘हा ओघ थोपविण्याचा वेडेपणा मी इतका काळ का केला होता?”

– श्रीमाताजी
(CWM 06 : 117)

ग्रहणशीलता म्हणजे ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्याची आणि तिचे अस्तित्व अनुभवण्याची शक्ती होय. त्यामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवणे हेही अनुस्यूत आहे. व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य श्रीमाताजींना करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय.

(CWSA 29:266)

मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणाऱ्या आणि मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर व मागेही अस्तित्वात असणाऱ्या अशा महान दिव्य चेतनेला, स्वत:च्या सर्व अंगांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणतीही मर्यादा येऊ न देता, स्वीकारता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे उन्मुखता (opening) होय.

(CWSA 12 : 169)

– श्रीअरविंद