प्रश्न : जर मन, प्राण आणि शरीर हे पुन्हा जन्म घेणार नसतील आणि फक्त चैत्य पुरुषाचाच पुनर्जन्म होत असेल तर, मग आधी केलेल्या प्राणिक वा मानसिक प्रगतीचे पुढील जन्मासाठी काहीच मोल नाही का?
श्रीमाताजी : ही अंगे चैत्य पुरुषाच्या जेवढी निकट आणली असतील तेवढ्याच प्रगतीच्या प्रमाणात त्यांचा उपयोग होतो; म्हणजे, जेवढ्या प्रमाणात अस्तित्वाची ही सारी अंगे हळूहळू, क्रमाक्रमाने चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली आणली असतील तेवढ्या प्रमाणात त्यांचा उपयोग होतो कारण जे चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली असते, चैत्य पुरुषाशी जे एकात्म झालेले असते, तेवढे टिकून राहते व केवळ तेवढेच कायम राहते.
पण जर एखाद्या व्यक्तीबाबत चैत्य पुरुष हा त्याच्या चेतनेचे व जीवनाचे केंद्र झाला असेल आणि जर समग्र अस्तित्वाची जडणघडण या केंद्राभोवतीच झाली असेल तर, मग ते समग्र अस्तित्वच चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली येते, त्याच्याशी एकात्म पावते, आणि मग ते कायम राहू शकते – जर का ते कायम राहणे आवश्यक असेल तर.
खरोखर, जर चैत्य पुरुषाच्या प्रगतीनुसार आणि आरोहणाच्या त्याच्या क्षमतेनुसार जड देहदेखील समान प्रगती करू शकेल तर, त्याचे विघटन होण्याची गरजच उरणार नाही. पण इथेच तर खरी अडचण आहे.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 358-360)