Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२७)

(उत्तरार्ध)

(‘ईश्वरा’प्रति आत्मदान करण्याची प्रेरणा) ही प्रेरणा प्राणिक इच्छा नसते तर ती आत्म्याची प्रेरणा असते; (त्या पाठीमागे) एक तर्कही असतो पण तो मनाचा तर्क नसतो, तर तो आत्म्याचा आणि जीवात्म्याचा तर्क असतो. तेथेही एक मागणी असते, पण ती मागणी म्हणजे प्राणिक लालसा नसते तर ती आत्म्याची अंगभूत अभीप्सा असते. जेव्हा, “मी तुझा अमुक कारणासाठी शोध घेत आहे, मी तुझा त्या करणासाठी शोध घेत आहे,” अशी भाषा जाऊन तेथे, “मी तुझा शोध केवळ तुझ्यासाठीच घेत आहे,” असा बदल घडून येतो; म्हणजे जेव्हा निव्वळ आत्मदान घडून येते तेव्हा अशा प्रकारची अभीप्सा उदयाला येते. कृष्णप्रेम (रोनाल्ड हेनरी निक्सन नावाचे एक ब्रिटिश साधक, यांनी वैष्णव संप्रदायाचा स्वीकार केला.) जेव्हा म्हणतात, ‘ज्ञान नको, हेही नको आणि तेही नको, तर फक्त कृष्णच हवा,” तेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या या अदभुत आणि अनिर्वचनीय केवलाविषयी बोलायचे असते.

‘ईश्वरा’ची ओढ ही खरोखरच एक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आपल्यामधील जीवात्मा ‘ईश्वरा’कडे ओढला जातो कारण त्याला त्या महत्तर ‘आत्म्या’ची अनिवार्य हाक आलेली असते. जीवात्मा आपल्या आराध्य दैवताकडे अनिवार्यपणे ओढला जातो, कारण ‘ईश्वरा’शिवाय त्याचे अस्तित्वच असू शकत नाही. कारण जीवात्मा हा जीवात्मा असतो आणि ‘ईश्वर’ हा ‘ईश्वर’ असतो. ‘ईश्वरा’साठीच ईश्वराचा शोध, अन्य कशासाठीही नाही, असे आम्ही जेव्हा म्हणत असतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे स्पष्ट व्हावे म्हणून, (अर्थात जेवढे स्पष्ट करण्याजोगे होते तेवढे) मी हे सर्व लिहिले आहे. स्पष्टीकरण करण्याजोगे असू देत वा नसू देत, आध्यात्मिक अनुभूतीची ही एक सर्वात प्रभावी वास्तविकता असते. ‘आत्मदानाची प्रेरणा’ ही या वास्तविकतेची केवळ एक अभिव्यक्ती असते.

परंतु याचा अर्थ असा होत नाही की, मी तुमच्या ‘आनंदा’च्या मागणीवर आक्षेप घेत आहे. जोपर्यंत तुमच्या व्यक्तित्वाच्या कोणत्याही एखाद्या भागाला तशी गरज असते, तोपर्यंत तुम्ही खुशाल त्याची मागणी करू शकता, कारण जोपर्यंत आपल्यामध्ये सदोदित असलेली निरपवाद आंतरिक हाक, स्वतःला पृष्ठस्तरावर नेण्यासाठी जोर लावत नाही तोपर्यंत (आनंद, प्रकाश, शक्ती, ज्ञान, शांती इत्यादी) याच गोष्टी व्यक्तीला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाणाऱ्या असतात. आणि ही आंतरिक हाक खरोखरच अगदी आरंभापासूनच असते आणि पाठीशी असते – ती आध्यात्मिक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आत्म्याची ‘ईश्वरा’प्रति असलेली ही निखालस (absolute) गरज असते.

त्या ठिकाणी ‘आनंद’ असताच कामा नये, असे काही माझे म्हणणे नाही. आत्मदान म्हणजेच स्वयमेव एक अपार ‘आनंद’ असतो, आणि जेव्हा ते आत्मदान स्वत:सोबत ‘आनंद’ घेऊन येते, तेव्हा ते एक अनिर्वचनीय ‘आनंद’ जागृत करते आणि इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा, (निःस्वार्थी आत्मदान करणे) या पद्धतीद्वारे हा ‘आनंद’ लवकर गवसतो, म्हणून एखादी व्यक्ती असे म्हणू शकते की, “निःस्वार्थी आत्मदान ही सर्वोत्तम नीती आहे.” अर्थातच केवळ एक ‘नीती’ म्हणून ती व्यक्ती ते आत्मदान आचरणात आणत नाही. ‘आनंद’ हे फल असते, पण या फलासाठी आत्मदान केले जात नाही, तर ते स्वयमेव आत्मदानासाठी आणि साक्षात ‘ईश्वरा’साठीच केले जाते – यामध्ये अगदी सूक्ष्मसा फरक आहे; तो मानसिक आहे असे वाटेल, पण त्यामध्ये खरोखरच फरक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 12-13)