ईश्वरी कृपा – ०४
प्रश्न : ईश्वराचा धावा केला तर ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते का?
श्रीमाताजी : धावा केला असताना? हो. मात्र केवळ त्यामुळेच आणि तेवढ्यासाठीच ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते असे मात्र नाही. पण खचितच, व्यक्तिची जर ईश्वरी कृपेवर श्रद्धा असेल आणि व्यक्ती तशी अभीप्सा बाळगत असेल आणि एखादे लहान मूल आईकडे धावत जाऊन जसे म्हणते की, “आई, मला अमुक अमुक दे,” त्या साधेपणाने जर व्यक्ती धावा करेल, आणि ईश्वरी कृपेकडे वळेल आणि म्हणेल, “मला अमुक अमुक दे,” तर माझा विश्वास आहे की, ती ते ऐकते. अर्थात व्यक्तिने स्वतःसाठी अहितकारक असेल असे जर काही मागितले तर मात्र ती ते ऐकत नाही. व्यक्ती जर काहीतरी घातक किंवा प्रतिकूल अशा एखाद्या गोष्टीची मागणी करेल, तर मग मात्र ती ऐकली जाणार नाही.
प्रश्न : हा धावा आणि त्याच्या परिणामाचे कारण काय?
श्रीमाताजी : कदाचित व्यक्तीने धावा करावा हे विधिलिखित असावे. म्हणजे ‘कोंबडी आधी की अंडे आधी?’ अशा सारखाच हा प्रकार आहे. ईश्वरी कृपेचा धावा करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणारी ‘ईश्वरी कृपा’च असते, का, ईश्वरी कृपेचा धावा केल्यामुळे ‘ईश्वरी कृपा’ होते, हे सांगणे कठीण आहे.
मूलतः श्रद्धेचाच अभाव असण्याची बहुतांशी शक्यता असते. आपल्या विचारांमध्येच एक छोटासा कोपरा असा असतो, की जो शंका उपस्थित करतो, वादविवाद करतो, आणि त्यानेच सारे काही बिनसून जाते. व्यक्ती जेव्हा अतिशय चिंताजनक परिस्थितिमध्ये असते, जेव्हा मनाला जाणवते की, ते काहीही करू शकत नाहीये, अगदी काहीच करू शकत नाहीये, जेव्हा ते अगदी वेड्यासारखे, असमर्थ होऊन चूपचाप उभे राहते, तेव्हा, त्या क्षणी, व्यक्ती जर उच्चतर मदतीसाठी धावा करेल, म्हणजे एखादी व्यक्ती निराशाग्रस्त असताना जसा धावा करते अगदी तेवढ्याच उत्कटतेने व्यक्ती धावा करेल, तर तेव्हा परिणाम दिसून येतो. पण जर का तुमचा विचार युक्तिवादच करत राहिला आणि म्हणाला, “हो, मी आस बाळगली आहे खरी, मी प्रार्थनाही केली आहे पण वेळ आली आहे की नाही देवच जाणे, आणि ईश्वरी कृपा होईल का, आणि ते शक्य आहे की नाही कोण जाणे,” असे झाले तर मग सगळेच संपून जाते, ती (‘ईश्वरी कृपा’) कार्य करत नाही. ही एक अगदी नेहमीच आढळून येणारी गोष्ट आहे.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 366-367)