Posts

सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करता यावी म्हणून ‘ईश्वरी कृपा’ आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी, सर्व परिस्थितीमध्ये साहाय्य करत असते.
*
‘परमेश्वरा’ची शक्ती अनंत आहे, आपली श्रद्धाच कमी पडते.
*
‘ईश्वरा’चे साहाय्य असेल तर अशक्य असे काहीच नाही.

– श्रीमाताजी (CWM 14:86-90)

विचार शलाका – १५

…सर्व दुःखं ही समर्पण परिपूर्ण न झाल्याचे लक्षण असते. मग जेव्हा तुम्हाला तुमच्या आत असा एक ‘आघात’ जाणवतो तेव्हा ‘अरे, हे वाईट झाले किंवा परिस्थिती कठीण आहे’ असे म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणता, “माझे समर्पण परिपूर्ण नाहीये.” तेव्हा ते म्हणणे योग्य ठरेल. आणि मग तुम्हाला ती ‘कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही पुढे मार्गक्रमण करता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता की जी कशानेही क्षुब्ध होऊ शकत नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना अशा स्मितहास्याने उत्तर देता की, जे ईश्वरी कृपेवरील पूर्ण विश्वासामुळे येत असते आणि हाच दु:खांमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असतो, दुसरा कोणताही मार्ग नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)

ईश्वरी कृपा – १३

अज्ञानमूलक चुकांची दुरुस्ती करणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो, पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा लावलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा… असे करणे म्हणजे, अंधाराला हेतुत: परत बोलावण्यासारखेच आहे.

…ज्यांनी स्वतःला सुधारण्याचा निश्चय केलेला असतो त्यांना साहाय्य करण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ नेहमीच उपस्थित असते आणि त्यामुळे, “स्वतःला सुधारण्यासाठी आम्ही खूप कमकुवत आहोत,’ असे ते म्हणू शकत नाहीत. ते फार फार तर असे म्हणू शकतात की, त्यांनी स्वतःला सुधारण्याचा संकल्पच अजून केलेला नाही, म्हणजे त्यांच्या अस्तित्वामध्ये कोठेतरी असे काहीतरी असते की, ज्याने तो संकल्प केलेला नसतो, आणि हे मात्र अधिक गंभीर असते.

कमकुवत असल्याचा युक्तिवाद हे एक निमित्त असते. ज्यांनी संकल्प केलेला असतो त्यांना परमोच्च सामर्थ्य देण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ असतेच.

याचा अर्थ असा की, कमकुवतपणाचा युक्तिवाद हा युक्तिवाद नसतो तर तो अप्रामाणिकपणा असतो. आणि अप्रामाणिकपणा म्हणजे शत्रुसाठी नेहमीच मुक्तद्वार असते; म्हणजे तेथे विपरित गोष्टींबाबतची एक सुप्त सहानुभूती असते आणि ती गोष्ट अधिक गंभीर असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306-307)

ईश्वरी कृपा – ०६

(गूढविद्येचे कोणतेही ज्ञान नसतानादेखील, दूर अंतरावरील एखाद्या गरजू व्यक्तिला मदत किंवा संरक्षण पोहोचविणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला असता, श्रीमाताजींनी त्याचा एक मार्ग सांगितला, तो असा…)

व्यक्तिकडे जर (गूढविद्येचे) कोणतेही ज्ञान नसेल; पण तिचा ईश्वरी ‘कृपे’वर विश्वास असेल, – ईश्वरी ‘कृपा’ नावाची काहीतरी एक गोष्ट या विश्वामध्ये आहे, तीच आपल्या प्रार्थनेला, आपल्या अभीप्सेला, आपल्या हाकेला प्रतिसाद देते, अशी त्या व्यक्तिची श्रद्धा असेल आणि त्यावेळी व्यक्तिने मनोमय रचना करून, जर ती त्या ईश्वरी ‘कृपे’ला अर्पण केली आणि त्यावर विश्वास ठेवला, ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा म्हणून याचना केली आणि ईश्वरी ‘कृपा’ हस्तक्षेप करेलच अशी श्रद्धा बाळगली तर, ती यशस्वी होण्याची दाट शक्यता असते.

प्रयत्न करून पाहा, तुम्हाला खात्रीने त्याचे परिणाम दिसून येतील.

प्रश्न : ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा अशी मनापासून प्रार्थना जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा, तिला एखादा विशिष्ट असा परिणाम अपेक्षित असतो ना?

श्रीमाताजी : ते प्रार्थनेच्या भावार्थावर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तिने ईश्वराला किंवा ईश्वरी ‘कृपे’ला केवळ साद घातली आणि स्वत:ला त्याच्या हाती सोपवून दिले तर, ती व्यक्ती कोणत्याही विशिष्ट अशा फळाची अपेक्षा करत नसते. जर विशिष्ट परिणाम हवा असेल तर, व्यक्तिने स्वत:ची प्रार्थना स्वत:च शब्दबद्ध केली पाहिजे; व्यक्तिने त्यासाठी मागणी केली पाहिजे. तुम्ही जर ईश्वरी ‘कृपे’विषयी तीव्र आस बाळगत असाल, तिला आवाहन करत असाल, तिची विनवणी करत असाल आणि जर कोणतीही ठरावीक अशी तुमची मागणी नसेल तर, तुमच्या बाबतीत काय करायचे, हे ती ईश्वरी ‘कृपा’च ठरवेल, तुम्ही नाही.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 253-254)

ईश्वरी कृपा – ०५

ईश्वरासाठी जो अभीप्सा बाळगत असतो, त्याच्यासमोर नेहमी जी कोणती अडचण उभी राहते तीच स्वयमेव त्याच्यासाठी एक प्रवेशद्वार ठरते; त्या माध्यमातून तो स्वतःच्या व्यक्तिगत पद्धतीने ईश्वराची प्राप्ती करून घेणार असतो; त्याला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत घेऊन जाणारा त्याचा तो विशिष्ट मार्ग असतो.

अशी देखील वस्तुस्थिती असते की, जर एखाद्याला शेकडो अडचणी आल्या तर, त्याला होणारा साक्षात्कारही विलक्षण असतो – अर्थात, हे उघड आहे की, त्याच्यामध्ये जर धीर आणि चिकाटी असेल, आणि ज्या दोषांमुळे अडचणी निर्माण झाल्या, त्या दोषांविरुद्ध अभीप्सेच्या अग्निची ज्वाला जर तो कायम तेवती ठेवेल, तरच त्याला तो तसा साक्षात्कार होईल.

आणि लक्षात ठेवा की : सर्वसाधारणपणे ईश्वराची कृपादेखील तुमच्या अडचणींच्या प्रमाणातच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 :143)

ईश्वरी कृपा – ०४

प्रश्न : ईश्वराचा धावा केला तर ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते का?

श्रीमाताजी : धावा केला असताना? हो. मात्र केवळ त्यामुळेच आणि तेवढ्यासाठीच ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते असे मात्र नाही. पण खचितच, व्यक्तिची जर ईश्वरी कृपेवर श्रद्धा असेल आणि व्यक्ती तशी अभीप्सा बाळगत असेल आणि एखादे लहान मूल आईकडे धावत जाऊन जसे म्हणते की, “आई, मला अमुक अमुक दे,” त्या साधेपणाने जर व्यक्ती धावा करेल, आणि ईश्वरी कृपेकडे वळेल आणि म्हणेल, “मला अमुक अमुक दे,” तर माझा विश्वास आहे की, ती ते ऐकते. अर्थात व्यक्तिने स्वतःसाठी अहितकारक असेल असे जर काही मागितले तर मात्र ती ते ऐकत नाही. व्यक्ती जर काहीतरी घातक किंवा प्रतिकूल अशा एखाद्या गोष्टीची मागणी करेल, तर मग मात्र ती ऐकली जाणार नाही.

प्रश्न : हा धावा आणि त्याच्या परिणामाचे कारण काय?

श्रीमाताजी : कदाचित व्यक्तीने धावा करावा हे विधिलिखित असावे. म्हणजे ‘कोंबडी आधी की अंडे आधी?’ अशा सारखाच हा प्रकार आहे. ईश्वरी कृपेचा धावा करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणारी ‘ईश्वरी कृपा’च असते, का, ईश्वरी कृपेचा धावा केल्यामुळे ‘ईश्वरी कृपा’ होते, हे सांगणे कठीण आहे.

मूलतः श्रद्धेचाच अभाव असण्याची बहुतांशी शक्यता असते. आपल्या विचारांमध्येच एक छोटासा कोपरा असा असतो, की जो शंका उपस्थित करतो, वादविवाद करतो, आणि त्यानेच सारे काही बिनसून जाते. व्यक्ती जेव्हा अतिशय चिंताजनक परिस्थितिमध्ये असते, जेव्हा मनाला जाणवते की, ते काहीही करू शकत नाहीये, अगदी काहीच करू शकत नाहीये, जेव्हा ते अगदी वेड्यासारखे, असमर्थ होऊन चूपचाप उभे राहते, तेव्हा, त्या क्षणी, व्यक्ती जर उच्चतर मदतीसाठी धावा करेल, म्हणजे एखादी व्यक्ती निराशाग्रस्त असताना जसा धावा करते अगदी तेवढ्याच उत्कटतेने व्यक्ती धावा करेल, तर तेव्हा परिणाम दिसून येतो. पण जर का तुमचा विचार युक्तिवादच करत राहिला आणि म्हणाला, “हो, मी आस बाळगली आहे खरी, मी प्रार्थनाही केली आहे पण वेळ आली आहे की नाही देवच जाणे, आणि ईश्वरी कृपा होईल का, आणि ते शक्य आहे की नाही कोण जाणे,” असे झाले तर मग सगळेच संपून जाते, ती (‘ईश्वरी कृपा’) कार्य करत नाही. ही एक अगदी नेहमीच आढळून येणारी गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 366-367)

ईश्वरी कृपा – ०२

‘ईश्वरी कृपे’वरील तुमचा विश्वास आणि श्रद्धा कितीही अगाध असली; प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक क्षणाला, जीवनातील प्रत्येक अवस्थेत ‘ईश्वरी कृपा’च कार्यरत आहे, हे पाहण्याची तुमची क्षमता कितीही महान असली तरी, तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची अद्भुत विशालता, त्या कार्यपूर्तीमधील बारकावा, त्यातील अचूकता समजून घेण्यात कधीच यशस्वी होणार नाही. जगातील परिस्थिती विचारात घेता, ईश्वरी साक्षात्काराप्रत चाललेली वाटचाल ही अधिक वेगवान, अधिक परिपूर्ण, शक्य तेवढी अधिक समग्र आणि सुसंवादी व्हावी या दृष्टीने, ईश्वरी कृपा कुठपर्यंत प्रत्येक गोष्ट करते, सर्व गोष्टींच्या पाठीमागे तीच कशी असते, सर्व गोष्टी ती कशा सुसंघटित करते, त्यांचे संयोजन कसे करते, हे तुम्हाला कधीच समजू शकणार नाही.

मात्र ज्या क्षणी तुम्ही ‘ईश्वरी कृपे’च्या संपर्कात येता, तत्क्षणी अवकाशातील एकेक बिंदू, आणि काळातील प्रत्येक क्षण, तुम्हाला त्या ‘ईश्वरी कृपे’चे निरंतर चालणारे कार्य, ‘ईश्वरी कृपे’ची सातत्यपूर्ण मध्यस्थी (Intervention) नेत्रदीपक पद्धतीने दाखवून देत असतो.

आणि एकदा का तुम्हाला त्याचे दर्शन झाले की, मग तुमच्या लक्षात येते की, तुमची आणि त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मग तुम्हाला कधीही भीती, अस्वस्थता, पश्चात्ताप किंवा संकोच वाटता कामा नये, किंवा अगदी दुःखभोगही जाणवता कामा नयेत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये. व्यक्ती जर या ‘ईश्वरी कृपे’शी ऐक्य पावली, जर तिला ‘ईश्वरी कृपा’ सर्वत्र दिसू लागली की, मग अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्वशक्तिमानतेचे, अपरिमित आनंदाचे जीवन जगू लागेल.

आणि असे जीवन जगणे हाच ‘ईश्वरी कार्या’तील सर्वोत्तम शक्य असा सहयोग असेल.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 250)

प्रश्न : तुम्ही येथे असे सांगितले आहे की, “आपण कर्मबंधनाने बांधले गेलेलो असतो,” पण जेव्हा ईश्वरी कृपा कार्य करते तेव्हा ती कर्माचा निरास करते..

श्रीमाताजी : हो पूर्णपणे, ईश्वरी कृपा कर्माचा पूर्ण निरास करते. सूर्यासमोर लोणी ठेवले तर ते कसे वितळून जाईल तसे होते.

मी आत्ता तेच सांगत होते. जर तुमच्याकडे पुरेशी प्रामाणिक अभीप्सा असेल किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना असेल, तर तुम्ही तुमच्यामध्ये असे ‘काहीतरी’ खाली उतरवू शकता की, ज्यामुळे प्रत्येक गोष्टच, अगदी प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. खरोखर, प्रत्येक गोष्ट बदलून जाते.

म्हटले तर, एक अगदी साधे उदाहरण देता येईल; पण त्यामुळे तुम्हाला मुद्दा नीट समजेल. दगड अगदी यांत्रिकपणे खाली पडतो; समजा एखादी फरशी सैल झालेली आहे तर ती खाली पडेल, हो ना? पण जर समजा, प्राणिक वा मानसिक निर्धार असणारी एखादी व्यक्ती तिथून जात असेल; आणि तिला असे वाटले की, ती फरशी खाली पडू नये, आणि त्या व्यक्तीने जर हात पसरले तर ती फरशी त्या व्यक्तीच्या हातावर पडेल; पण ती खाली जमिनीवर पडणार नाही. तेव्हा, त्या दगडाची वा फरशीची नियती त्या व्यक्तीने बदललेली असते. येथे वेगळ्या प्रकारच्या नियतीवादाचा प्रवेश झालेला आहे. तो दगड आता कोणाच्यातरी डोक्यात पडण्याऐवजी, तो त्या व्यक्तीच्या हातावर पडतो आणि त्यामुळे कोणाचा जीव दगावत नाही.

येथे कमीअधिक अचेतन अशा यंत्रणेमध्ये एका वेगळ्या प्रतलावरील सचेतन इच्छाशक्तीचा हस्तक्षेप घडून आलेला असतो.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 90-91)