Posts

विचार शलाका – १८

चक्रांमधून उन्नत होत होत, कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया आणि चक्रांचे शुद्धीकरण या गोष्टी ‘तंत्रयोगा’तील ज्ञानाचा भाग आहेत. आपल्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोगामध्ये) चक्रांच्या हेतूपूर्वक शुद्धीकरणाची आणि उन्मीलनाची प्रक्रिया अभिप्रेत नसते, तसेच विशिष्ट अशा ठरावीक प्रक्रियेद्वारा कुंडलिनीचे उत्थापन देखील अभिप्रेत नसते. …परंतु तरीही तेथे विविध स्तरांकडून आणि विविध स्तरांद्वारे चेतनेचे आरोहण होऊन, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेशी ऐक्य घडून येते. तेथे चक्रांचे खुले होणे आणि त्या चक्रांचे ज्यांच्यावर नियंत्रण असते त्या (मानसिक, प्राणिक आणि शारीरिक) स्तरांचे खुले होणे देखील घडून येते; त्यामुळे, मी म्हटले त्याप्रमाणे या पूर्णयोगामध्ये रूपांतरणाच्या प्रक्रियेमागे ‘तंत्रयोगा’चे ज्ञान आहे.

*

‘पूर्णयोगा’मध्ये चक्रांचे प्रयत्नपूर्वक उन्मीलन केले जात नाही तर शक्तीच्या अवतरणामुळे ती चक्रे आपोआप खुली होतात. तंत्रयोगाच्या साधनेमध्ये ती ‘मूलाधारा’पासून सुरुवात करून ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात तर, पूर्णयोगामध्ये ती वरून खाली या दिशेने खुली होत जातात. परंतु ‘मूलाधारा’तून शक्ती वर चढत जाणे हे घडून येतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460)

पूर्णयोगामध्ये चक्रांचे संकल्पपूर्वक खुले होणे नसते, तर शक्तीच्या अवतरणामुळे ती आपलीआपण खुली होतात. तांत्रिक साधनेमध्ये ती खालून वर खुली होत जातात, म्हणजे मूलाधार प्रथम खुले होते तर आपल्या पूर्णयोगामध्ये, ती वरून खाली खुली होत जातात, परंतु मूलाधारातून शक्तीचे आरोहण निश्चितपणे होते.

पूर्णयोगामध्ये क्वचितच कधीतरी मज्जारज्जूमध्ये प्रवाहाची जाणीव होते, जशी ती इतर नाडीप्रवाहमार्गांमध्ये किंवा शरीराच्या विविध भागांमध्येही होते. पूर्णयोगामध्ये बलपूर्वक किंवा हटातटाने कुंडलिनी जागृती होत नाही.

ह्या योगामध्ये उच्च स्तरीय आध्यात्मिक चेतनेला जाऊन मिळण्यासाठी, कनिष्ठ चक्रांमधून चेतना शांतपणे वर चढत जाते आणि ईश्वरी शक्तीचे वरून अवतरण होते. ती ईश्वरी शक्ती मन आणि शरीरावर तिचे कार्य करते. त्याची पद्धत व त्याच्या पायऱ्या ह्या प्रत्येक साधकामध्ये वेगवेगळ्या असतात.

दिव्य मातेवर पूर्ण ‘विश्वास’ आणि येणाऱ्या सर्व चुकीच्या सूचनांना व प्रभावांना दूर सारण्यासाठी आवश्यक असणारी ‘सतर्कता’ ह्या गोष्टी पूर्णयोगाचे मुख्य नियम आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460, 462)

तंत्रमार्ग व पूर्णयोग - साम्यभेद

 

आम्ही जी समन्वयपद्धती स्वीकारली आहे, त्यामध्ये तंत्रपद्धतीहून वेगळे तत्त्व आहे; योगाच्या शक्यतांचा विचार वेगळ्या तऱ्हेने करून, हे वेगळे तत्त्व आम्ही उपयोगात आणले आहे. तंत्राचे समन्वयाचे साध्य गाठावयास आम्ही वेदांताच्या पद्धतीपासून प्रारंभ केला आहे. तंत्रपद्धतीत शक्ति ही सर्वाधिक महत्त्वाची मानतात, आत्मा गाठावयास शक्तीचा गुरुकिल्लीसारखा उपयोग करतात; आमच्या समन्वयांत आत्मा हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे; शक्ति उन्नत करावयाचे रहस्य आत्म्याच्या ठिकाणी आम्हाला सापडते.

तंत्रपद्धती तळातून आपल्या कार्याला सुरुवात करते; शिखराकडे ती चढत जाते, व या चढण्यासाठी पायऱ्यांची शिडी करते; ही पद्धती आरंभाला शक्ति (कुंडलिनी) जागृत करण्यावर भर देते, जागृत शक्तीने शरीराच्या नाडीचक्रांतून क्रमश: वर चढावे, ही सहा चक्रे उघडावी यावर जोर देते; ही चक्रे उघडणे म्हणजे आत्म्याच्या शक्तीचे प्रांत क्रमश: खुले करणे असते.

पूर्ण योगामध्ये इतर योगांच्या सामान्य साध्यांत भर घातली जाते. सर्व योगांचे सामायिक साध्य आत्म्याची मुक्ति हे आहे; मानवी आत्मा जो स्वाभाविक अज्ञानात आणि मर्यादित क्षेत्रात पडला आहे, त्याची त्यातून मुक्ति व्हावी, त्याला आध्यात्मिक अस्तित्व लाभावे, त्याची त्याच्या उच्चतम आत्म्याशी अर्थात ईश्वराशी एकता व्हावी, हे सर्व योगांचे सामायिक साध्य आहे; पण त्या योगांमध्ये हे साध्य आरंभीची एक पायरी म्हणून नव्हे तर, ते एकमेव अंतिम साध्य आहे असे मानतात; त्या योगांत आध्यात्मिक अस्तित्वाचा भोग नसतोच असे नाही – तो असतो; पण त्याचे स्वरूप, मानवी व वैयक्तिक अस्तित्वाचे शांत आत्मिक अस्तित्वात विलीन होणे, हे असते किंवा दुसऱ्या उच्च लोकांत आध्यात्मिक भोग भोगणे, हे असते.

तंत्रपद्धती मुक्ति हे आपले अंतिम साध्य मानते; परंतु हे एकच साध्य तिला नसते – तिच्या मार्गात दुसरे एक साध्य तिला असते; आध्यात्मिक शक्ति, प्रकाश, आनंद हा मानवी अस्तित्वांत पूर्णत्वाने यावा व पूर्णत्वाने भोगला जावा हे तिचे मार्गातील साध्य असते; या पद्धतीत परमश्रेष्ठ अनुभूतीचे ओझरते दर्शनहि सापडते : मुक्ति आणि विश्वगत कर्म व आनंद यांचा संयोग या परमश्रेष्ठ अनुभूतीत प्रतीत होतो; या संयोगाला विरोधी आणि या संयोगाशी विसंवादी असणाऱ्या सर्व गोष्टींवर अंतिम विजय साधक मिळवू शकतो, या गोष्टीचे तंत्रपद्धतीला ओझरते दर्शन झाले आहे.

आमच्या आध्यात्मिक शक्यतांसंबंधी ही विशाल दृष्टि घेऊन, आम्ही आमच्या योगाला आरंभ करतो; या दृष्टीत आणखी एका गोष्टीची आम्ही भर घालतो; ही भर घालण्याने, आमच्या योगाला अधिक पूर्ण सार्थकता आणली जाते. ही भर अशी की, आम्ही मानवाचा आत्मा केवळ व्यक्तिभूत, केवळ सर्वातीताशी एकता साधण्यासाठी योग-प्रवास करणारा केवळ व्यक्तिभूत आत्मा आहे, असे मानीत नसून तो विश्वात्मा देखील आहे, सर्व जीवात्म्यांतील ईश्वराशी व सर्व प्रकृतीशी एकता साधण्याचे सामर्थ्य असलेला विश्वव्यापी आत्मा देखील आहे, असे मानतो आणि या विस्तृत दृष्टीला अनुरूप व्यवहाराचा पूर्ण पाठिंबा देतो.

मानवी आत्म्याची वैयक्तिक मुक्ति, आध्यात्मिक अस्तित्व, जाणीव (चेतना), आनंद या बाबतीत ईश्वराशी या आत्म्याची वैयक्तिक एकता (एकरूपता) हे ह्या पूर्ण-योगाचे पहिले साध्य नेहमीच असावे लागते.

योगाचे दुसरे साध्य मुक्त आत्म्याने मुक्तपणे ईश्वराच्या विश्वात्मक एकतेचा भोग घेणे हे असते;

पण या दुसऱ्या साध्यांतून तिसरे एक साध्य निघते ते हे की, ईश्वराच्या द्वारा सर्व जीवांशी जी एकता, त्या एकतेला व्यावहारिक रूप देणे; अर्थात ईश्वराचे मानवतेच्या संबंधांत जे आध्यात्मिक साध्य आहे, त्या साध्याच्या संबंधात सह-अनुभूतिपूर्वक ईश्वराचे सहकारी होणे.

वैयक्तिक योग येथपर्यंत आला म्हणजे, त्याची वैयक्तिकता, विभक्तता निघून जाते, आणि तो सामूहिक योगाचा एक भाग होतो; या सामूहिक योगाचे साध्य मानवजातीचे दिव्य प्रकृतीमध्ये उत्थापन करणे हे असते.

मुक्त वैयक्तिक आत्मा ईश्वराशी आत्मत: व प्रकृतितः एकरूप झाला म्हणजे त्याचे प्राकृतिक अस्तित्व मानवजातीच्या आत्मपूर्णत्वाचे साधन बनते – या साधनाच्या बळावर मानवजातीत ईश्वराची दिव्यता पूर्णपणे बहरू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 612-614)

राजयोगात सर्वप्रथम जी क्रिया हाती घेण्यात येते ती अवधानपूर्वक, काळजीपूर्वक आत्मशासन करण्याची क्रिया होय. या आत्मशासनामध्ये, निम्न पातळीवरील नाडी-पुरुषाच्या बेबंद क्रियांची जागा मनाच्या चांगल्या सवयींनी घेतली जाते. सत्याचा अभ्यास, अहंकारी धडपडीचे सर्व प्रकार टाकून देणे, दुसऱ्यांना इजा करण्याचे टाळणे, पावित्र्य, मानसिक राज्याचा खरा स्वामी जो दिव्य पुरुष त्याचे नित्य चिंतन, त्याचा नित्य ध्यास या गोष्टींनी मन व हृदय पवित्र, आनंदमय व विचक्षण बनते.

हे जे आतापर्यंत वर्णन केले ते राजयोगातील केवळ पहिले पाऊल होय. यानंतर साधकाने मनाचे आणि इंद्रियांचे सामान्य व्यापार अगदी शांत करावयाचे असतात; असे केले म्हणजेच साधकाचा आत्मा जाणिवेच्या उच्चतर स्तरांवर चढून जाण्यास मोकळा होतो आणि पूर्ण-स्वातंत्र्य व पूर्ण आत्म-प्रभुत्व यासाठी लागणारा पाया त्याला लाभतो. सामान्य मनाला नाडीसंघाच्या व शरीराच्या प्रतिक्रियांच्या आधीन राहावे लागते आणि त्यामुळे या मनाचे अनेक दोष व उणिवा उत्पन्न होतात, ही गोष्ट राजयोग विसरत नाही. हे दोष व उणिवा घालविण्यासाठी हठयोगातील आसन व प्राणायाम यांचा उपयोग राजयोग करतो; मात्र आसनांचे अनेक गुंतागुंतीचे प्रकार हठयोगात असतात, ते राजयोग बाजूला ठेवतो आणि त्याच्या स्वत:च्या साध्याला पुरेसा उपयोगी असा एकच सर्वात सोपा व परिणामकारक असा आसनाचा प्रकार तो घेतो. प्राणायामाचाही असाच एक सर्वात सोपा व परिणामकारक प्रकार तो घेतो. याप्रमाणे हठयोगाची गुंतागुंत व अवजडपणा राजयोग टाळतो; आणि त्याच्या प्रभावी, शीघ्र परिणामकारी प्रक्रियांचा उपयोग करून शरीर व प्राणक्रिया यांजवर ताबा मिळवतो आणि कुंडलिनी जागृत करतो – कुंडलिनी म्हणजे मूलाधार चक्रामध्ये वेटोळे घालून झोप घेत पडलेली शक्तिसर्पिणी; या सर्पिणीत सुप्त अशी सामान्यातीत शक्ति असते. कुंडलिनीची जागृती केल्यानंतर राजयोग हा चळवळ्या, चंचल मनाला पूर्ण शांत करून उच्चतर पातळीवर नेण्याचे कार्य करतो; याकरता तो क्रमाक्रमाने मानसिक शक्ती अधिकाधिक एकाग्र करीत जातो; या क्रमवार एकाग्रतेचा शेवट समाधीत होतो.

समाधी ही, मनाला त्याच्या मर्यादित जागृत व्यापारांपासून परावृत्त होऊन, अधिक मोकळ्या व अधिक उन्नत अशा जाणिवेच्या अवस्थांमध्ये जाण्याची शक्ति देते; या समाधि-शक्तीमुळे राजयोग एकाच वेळी दोन कार्यं साधतो. बाह्य जाणिवेच्या गोंधळापासून मुक्त अशी शुद्ध मानसिक क्रिया करून, मनाच्या पातळीवरून तो राजयोगी उच्चतर अतिमानसिक पातळीवर जातो; या पातळीवर व्यक्तीचा आत्मा आपल्या खऱ्या आध्यात्मिक अस्तित्वात प्रविष्ट होतो: हें एक कार्य; दुसरें कार्य : जाणिवेचा जो कोणता विषय असेल, त्या विषयावर जाणिवेची अनिर्बध एकाग्रता करण्याची शक्ति समाधीमुळे राजयोग्याला प्राप्त होते. आमच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आद्य विश्वशक्तीचे कार्य वरीलप्रमाणे चालते; जगावर दिव्य क्रिया घडते ती वरील पद्धतीने घडते.

राजयोगी हा समाधिस्थितीत उच्चतम विश्वातीत ज्ञान व अनुभव यांचा भोक्ता असतोच; त्याला वरील अनिर्बध एकाग्रतेने कोणत्याहि विषयावर आपली जाणीव वापरण्याची शक्ति मिळाली म्हणजे तो या शक्तीचा वापर करून, जागृत अवस्थेत त्याला हवे ते वस्तुविषयक ज्ञान मिळवू शकतो; तसेच वास्तव जगांत हवे ते प्रभुत्व, अर्थात् जगाला उपयुक्त व आवश्यक असे प्रभुत्व गाजवू शकतो.

राजयोगाची प्राचीन पद्धति ही, केवळ स्व-राज्य हे राजयोगाचे साध्य मानीत नव्हती, तर साम्राज्य हे पण त्याचे साध्य मानीत होती. स्व-राज्य म्हणजे आत्म्याचे स्वत:वरचे राज्य, स्वत:च्या क्षेत्रांतील सर्व अवस्था व व्यापार याजवर आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेचा पूर्ण ताबा असणे. साम्राज्य म्हणजे आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेने, तिच्या बाह्य व्यापारांवर आणि परिसरावर सुद्धां हुकमत चालविणे.

प्राणशक्ति व शरीर यांजवर हठयोग आपलें कार्य करतो, शारीरिक जीवन आणि या जीवनाच्या शक्ति पूर्णत्वास नेणे, त्यांना अतिनैसर्गिक सामर्थ्य येईल असे करणे हे आपले साध्य मानतो; तसेच हे साध्य साधून तो मानसिक जीवनाच्या क्षेत्रात पाऊल टाकतो; त्याप्रमाणे राजयोग मनाशी आपला व्यवहार करतो व मानसिक जीवनाच्या शक्तींत, अतिनैसर्गिक पूर्णत्व व व्यापकत्व आणण्याचे साध्य स्वत:समोर ठेवतो; आणि त्यापुढे पाऊल टाकून, आध्यात्मिक अस्तित्वाच्या क्षेत्रांत तो प्रवेश करतो.

हे सर्व ठीक – परंतु राजयोगांत हा दोष आहे कीं, समाधीच्या अनैसर्गिक अवस्थांवर तो प्रमाणाबाहेर भर देतो. राजयोगाच्या या दोषामुळे, मर्यादेमुळे, राजयोगी भौतिक जीवनापासून काहीसा दूर राहतो; हे भौतिक जीवन आमच्या सर्व जीवनाचा पाया असते, आणि आम्ही मानसिक व आध्यात्मिक गोष्टी ज्या मिळवतो, त्या शेवटी आम्हाला भौतिक जीवनाच्या क्षेत्रांत आणावयाच्या असतात. राजयोगांत आध्यात्मिक जीवन समाधिस्थितीशी फारच निगडित असते, हा त्याचा विशेष दोष आहे.

आध्यात्मिक जीवन आणि या जीवनाचे अनुभव जागृतीच्या अवस्थेत आणि आमच्या सामान्य व्यवहारात पूर्णतया उपयोगात आणावे, पूर्णतया कार्यकारी करावे, हा आमचा उद्देश आहे. परंतु राजयोगांत आध्यात्मिक जीवन आमचे सर्व अस्तित्व व्यापण्यासाठी खाली उतरत नाही, ते आमच्या सामान्य अनुभवांच्या पाठीमागे राहते, दुय्यम भूमिका घेते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 36)

हठयोगाच्या मुख्य प्रक्रिया आसन व प्राणायाम या आहेत. हठयोगात अनेक आसने किंवा शरीराच्या निश्चल बैठका आहेत; या आसनांच्या द्वारा हठयोग प्रथम शरीराची चंचलता दूर करतो : शरीरात विश्वव्यापी प्राणशक्ती-सागरातून ज्या प्राणशक्ती ओतल्या जात असतात, त्या प्राणशक्ती, काहीतरी क्रिया व हालचाली करून निकालात न काढता, शरीरात राखून ठेवण्याची शरीराची असमर्थता या चंचलतेने व्यक्त होत असते; ही चंचलता प्रथम हठयोग अनेक आसनांचा उपयोग करून दूर करीत असतो; परिणामतः हठयोग शरीराला असामान्य आरोग्य देतो, जोर देतो, लवचिकपणा देतो; तसेच, ज्या सवयींमुळे शरीराला, सामान्य भौतिक प्रकृतीच्या ताब्यात व तिच्या स्वाभाविक व्यापारांच्या मर्यादित परिघामध्ये राहावे लागते, त्या सवयींपासून शरीराला मुक्त करण्यासाठी हठयोग प्रयत्नशील असतो. गुरुत्वाकर्षण-शक्तीवरसुद्धा विजय मिळविण्यापर्यंत, ह्या शरीरजयाची मजल जाऊ शकते अशी समजूत हठयोगाच्या प्राचीन परंपरेत कायमच प्रचलित असलेली दिसते.

विविध दुय्यम व सूक्ष्म प्रक्रियांद्वारा हठयोगी शरीरशुद्धी, नाडीशुद्धी करतो. शरीरातील नाना प्रकारचा मल, नाड्यांतील नाना प्रकारची घाण ही प्राणाच्या प्रवाहाला अवरूद्ध करते, म्हणून ती दूर करणे इष्ट असते; श्वास आणि उच्छवास या श्वसनक्रिया काही नियमांनुसार करणे म्हणजेच प्राणायामाच्या क्रिया होत; या क्रिया हठयोगाची फार महत्त्वाची साधने आहेत.

प्राणायाम म्हणजे श्वसनावर किंवा प्राणशक्तीवर नियंत्रण मिळविणे; प्राणशक्तीचे शरीरातील प्रमुख कार्य म्हणजे श्वसन होय. हठयोगाला प्राणायाम दोन तऱ्हांनी उपयोगी पडणारा आहे. त्याचा पहिला उपयोग : शरीराचे पूर्णत्व तो पूर्ण करतो. भौतिक प्रकृतीच्या पुष्कळशा सामान्य गरजा पुरविण्याच्या कामातून प्राणशक्ती मोकळी केली जाते; परिणामतः भक्कम आरोग्य, चिर तारुण्य आणि पुष्कळदा असामान्य दीर्घ आयुष्य हठयोग्याला प्राप्त होते.

त्याचा दुसरा उपयोग : प्राणायाम प्राणकोशातील ‘कुंडलिनी’ (वेटोळे घालून पडलेली प्रसुप्त प्राणक्रियासर्पिणी) जागी करतो आणि या कुंडलिनीच्या द्वारा हठयोग्याला, सामान्य मानवी जीवनात अशक्य असणाऱ्या अशा असामान्य शक्ती, असामान्य अनुभूतिक्षेत्रे व असामान्य जाणीव-क्षेत्रे खुली करून देतो; तसेच त्याला उपजतपणेच प्राप्त असणाऱ्या सामान्य शक्तीही अधिक तीव्र, जोरकस करतो…….

……हठयोगाचे परिणाम याप्रमाणे नजरेत भरणारे असतात; आणि सामान्य व भौतिक मनाला ते सहजच फार ओढ लावतात. तथापि हठयोगाचा प्रचंड खटाटोप करून शेवटीं आम्हाला जें प्राप्त होते ते एव्हढे मोलाचे आहे काय ? असा प्रश्न आमच्या पुढे येतो.

हठयोग भौतिक प्रकृतीचे साध्य साधून देतो. केवळ भौतिक जीवन तो दीर्घ काळ टिकवतो, तो या जीवनाचे पूर्णत्व पराकोटीला पोहोचवितो, भौतिक जीवन भोगावयाची शक्ति तो एक प्रकारे असामान्य दर्जाची करतो; हे सर्व खरें – पण या योगाचा एक दोष हा आहे की, त्याच्या कष्टमय अवघड प्रक्रिया योग्याचा इतका वेळ व इतकी शक्ति खातात, आणि सामान्य मानवी संसारापासून योग्याला इतकें पूर्णपणे तोडून टाकतात की, या योगाचीं फळे जगाच्या संसाराला उपयोगी पडतील असे करणे हठयोग्याला अगदीं अव्यवहार्य होते किंवा फारच थोड्या प्रमाणांत व्यवहार्य होते.

हठयोगाने मिळणाच्या सिद्धि राजयोगाने व तंत्रामार्गानेहि मिळू शकतात व या दुसऱ्या पद्धतीत कष्ट कमी पडतात, सिद्धि राखण्याच्या अटीहि हठयोगांतील अटींहून सौम्य असतात. हठयोगाने प्राप्त होणाच्या भौतिक सिद्धि म्हणजे खूप वाढलेली प्राणशक्ति, दीर्घ तारुण्य, सुदृढ प्रकृति व दीर्घ आयुर्मान या होत – परंतु या सिद्धि, सामान्य मानवी जीवनापासून अलग राहून, जगाच्या सामान्य व्यवहारांत यांची भर न टाकतां हठयोग्याने कृपणाप्रमाणे एकट्याने भोगावयाच्या असल्याने, एका दृष्टीने कुचकामी ठरतात. एकंदरीत, हठयोगाला मोठी मोठी फळे येतात, परंतु या फळांसाठी किंमत फारच मोजावी लागते आणि शेवटी, या फळांचा उपयोग मानवी समाजाला जवळजवळ काहीच होत नाहीं.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 34)

*

(एका साधकाला दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग)
हठ्योगाच्या पद्धतीचा आम्ही आमच्या साधनेमध्ये समावेश करत नाही. या पद्धतीचा उपयोग जर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने करणार असाल तर, ती पद्धत साधनेपेक्षा स्वतंत्र म्हणूनच, तुमच्या स्वत:च्या निवडीने, उपयोगात आणली गेली पाहिजे.