Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २३०

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट आहे. ध्यान किंवा निदिध्यासन हा यांतील एक मार्ग आहे पण ते केवळ एक साधन आहे, भक्ती हे दुसरे साधन, तर कर्म हे आणखी एक साधन आहे.

साक्षात्काराच्या दिशेने पहिले साधन म्हणून योग्यांकडून चित्तशुद्धीची साधना केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी बोलतो, ते यापेक्षा काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ ध्यानसमाधीने होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते. कर्मातील ‘योग’ हा अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – २२९

इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.

सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.

ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.

एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २२८

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला म्हणजे, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही.

अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.

परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत.

जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ’ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ’कर्म’ असे संबोधतो.

साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, एवढेच काय पण, अगदी खरेखुरे प्रेम आणि भक्ती यांच्याहूनही ती गोष्ट काही कमी सोपी नसते. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. (उत्तरार्ध उद्या)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – १७७

(श्रीअरविंद यांनी पत्राद्वारे एका साधकाला पूर्णयोग म्हणजे काय ते समजावून सांगितले आहे.)

(०१) ‘ईश्वरा’कडे फक्त मनाच्या माध्यमातून (ज्ञानयोग) किंवा फक्त हृदयाच्या माध्यमातून (भक्तियोग) किंवा फक्त इच्छा व कर्म यांच्या माध्यमातून (कर्मयोग) जाण्याऐवजी, पूर्णयोगामध्ये व्यक्ती चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी आणि शक्तींनिशी ‘ईश्वर’प्राप्तीसाठी प्रयत्न करते. तो प्रयत्न करत असताना व्यक्ती उपरोक्त तिन्ही मार्गांचे आणि अन्य अनेक मार्गांचे एकाच योगमार्गामध्ये (ईश्वराशी ऐक्य साधण्याची पद्धत) एकीकरण करते आणि ‘ईश्वरा’चे, ‘त्या’च्या उपस्थितीसहित, चेतना, शक्ती, प्रकाश आणि आनंद यांसहित सर्वकाही, आपल्या स्वतःच्या चेतनेमध्ये आणि व्यक्तित्वामध्ये ग्रहण करते.

(०२) पूर्णयोगामध्ये व्यक्ती आपल्या ‘स्व’मध्ये आणि ‘जिवा’मध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेण्यासाठी नव्हे, तर आपल्या संपूर्ण प्रकृतीमध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते. (म्हणजे या कनिष्ठ मानवी प्रकृतीचे ईश्वरी आध्यात्मिक प्रकृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते.)

(०३) पूर्णयोगामध्ये जन्म-प्रक्रियेला विराम देऊन, व्यक्ती फक्त पारलौकिकात ‘ईश्वर’प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्नशील नसते तर, ती या जीवनामध्येच त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते; जेणेकरून जीवन हे देखील ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि ‘दिव्य’ प्रकृतीचे आविष्करण व्हावे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 373)

साधना, योग आणि रूपांतरण – ११०

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत. जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, किंबहुना त्यामानाने खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते.

*

कुटुंब, समाज, देश या गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’ नव्हेत; या गोष्टी म्हणजे अहम् चे व्यापक रूप आहेत. कुटुंब, समाज, देश या उद्दिष्टांसाठी कार्य करावे असा ‘ईश्वरी आदेश’ मिळाला असल्याची जर व्यक्तीला जाणीव असेल किंवा (ते कार्य करत असताना) व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये कार्य करणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’ची जाणीव असेल तरच ती व्यक्ती कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी कार्य करत असूनही, मी ‘ईश्वरा’साठी कार्य करत आहे, असे म्हणू शकते. अन्यथा, देश वगैरे गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’च आहेत, ही केवळ मनाची एक कल्पना असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216), (CWSA 28 : 438)

कर्म आराधना – ४६

तुम्हाला न आवडणारे काम तुम्हाला करावे लागेलच असे नाही, तर तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे (vital) चोचले पुरवण्यासारखे आणि त्याचे प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवन प्राणिक आवडी-निवडीच्या अधीन असणे, हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे तत्त्व आहे. कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे कर्मयोगाचे तत्त्व आहे आणि ते कर्म श्रीमाताजींसाठी करायचे असल्याने, ते आनंदाने करणे ही पूर्णयोगामधील खरी आंतरात्मिक आणि प्राणिक अवस्था असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 248]

कर्म आराधना – ४५

अडीअडचणींचा नाईलाजास्तव स्वीकार करणे हा कर्मयोगाचा भाग असू शकत नाही – तर घटना साहाय्यकारी असोत वा विरोधी असोत, त्या सद्भाग्यपूर्ण असोत वा दुर्भाग्यपूर्ण असोत; सौभाग्य असो अथवा दुर्भाग्य असो, प्रयत्नांना यश मिळो वा अपयश, या साऱ्या गोष्टींना स्थिर समतेने सामोरे जाणे आवश्यक असते. आवश्यक ते ते सारे करत असताना, गडबडून न जाता, न डगमगता, राजसिक आनंदाविना किंवा दुःखाविना, व्यक्तीने सर्व गोष्टी सहन करण्यास शिकले पाहिजे; आणि अडचणी वा अपयश आले तरीही खचून जाता कामा नये. एखादी व्यक्ती जीवनाच्या ओझ्याखाली दबून न जाता, जे जे करता येणे शक्य आहे ते ते सारे करत राहू शकते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 243]

कर्म आराधना – २०

‘भगवद्गीते’मध्ये कर्मयोगाचा गाभा म्हणून सांगितला आहे, तो गाभा तुम्ही ग्रहण करू शकलात तर – स्वतःला विसरा आणि तुमच्या काळज्या, दुःखं यांना एका महत्तर चेतनेप्रत असलेल्या अभीप्सेमध्ये विरून जाऊ द्या. एक महत्तर ‘शक्ती’ या विश्वामध्ये कार्यरत आहे याची जाणीव करून घ्या आणि या विश्वामध्ये जे कार्य करायचे आहे, त्या कार्यासाठी स्वतःला एक साधन बनवा. मग ते कार्य अगदी छोटेसे का असेना! पण काहीही असले तरी, तुम्ही ते संपूर्णतया स्वीकारले पाहिजे आणि तुम्ही तुमची समग्र इच्छा त्यामध्ये ओतली पाहिजे – विभाजित आणि विचलित अशा इच्छेनिशी तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळण्याची आशा बाळगता येणार नाही, – ना जीवनामध्ये आणि ना ‘योगा’मध्ये!

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 237-238]

(दिनांक : १९ जून १९०९)

आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नाही तर, नैतिक आणि आध्यात्मिक आहे. सरकार उलथवून लावणे हे आमचे उद्दिष्ट नसून, राष्ट्रनिर्माण हे आमचे उद्दिष्ट आहे. राजकारण हा या कार्याचा एक भाग आहे, पण केवळ अंशभागच! केवळ राजकारण, केवळ सामाजिक प्रश्न, केवळ धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य वा केवळ विज्ञान यांना आपण स्वत:ला वाहून घेता कामा नये तर, या सर्वांचा समावेश आपण ज्या एका तत्त्वामध्ये करतो, जो आपल्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, जो आमच्या दृष्टीने वैश्विक देखील आहे, त्याला आपण समर्पित झाले पाहिजे. जीवनाचा एक महत्तर कायदा आहे, मानवी उत्क्रांतीचे एक महान तत्त्व आहे; आध्यात्मिक ज्ञान आणि अनुभूतीचे एक अंग आहे की ज्याचे संरक्षण करणे, ज्याचे जितेजागते उदाहरण बनणे आणि ज्याचा प्रचार करणे, हे ‘भारता’चे आजवरचे नियत कार्य राहिले आहे. हा शाश्वत धर्म आहे. परकीय प्रभावांच्या दडपणाखाली येऊन भारताने केवळ धर्माच्या आराखड्यावरील पकडच मोठ्या प्रमाणात गमावली आहे असे नव्हे तर, त्या परकीय प्रभावांच्या दडपणामुळे भारताने ह्या धर्माचे जिवंत सत्यच गमावले आहे. भारताचा हा धर्म जर आचरणात आणला गेला नाही तर हा धर्म, धर्मच असणार नाही. तो जीवनाच्या कोणत्या तरी एका भागात उपयोगात आणून पुरेसे नाही तर, तो समग्र जीवनात उपयोगात आणला पाहिजे. त्याचा आत्मा आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या राजकारणामध्ये, आपल्या साहित्यामध्ये, आपल्या विज्ञानामध्ये, आपल्या व्यक्तिभूत चारित्र्यामध्ये, आत्मीयतांमध्ये, आपल्या आशाआकांक्षामध्ये प्रविष्ट झाला पाहिजे. या धर्माचे मर्म जाणून घेणे, त्याची सत्य म्हणून अनुभूती घेणे, तो ज्या उच्च भावनांप्रत उन्नत होत आहे त्या भावना अनुभवणे आणि त्या जीवनामध्ये अभिव्यक्त करणे व प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे आमच्या दृष्टीने ‘कर्मयोग’ होय. आम्ही असे मानतो की, योगसाधनेला मानवी जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी भारताची उन्नती होत आहे. योगामुळेच भारताला स्वातंत्र्य, एकता आणि महानता प्राप्त करून घेण्यासाठी बळ मिळणार आहे, आणि ते सारे टिकवून ठेवण्यासाठीचे बळदेखील भारताला या योगामुळेच मिळणार आहे. आमच्या नजरेला आध्यात्मिक क्रांती दिसत आहे आणि भौतिक ही केवळ त्याची छाया आणि प्रतिक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 24)

विचार शलाका

जीवन आणि आध्यात्मिकता या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, असा विचार करणे चुकीचे आहे, हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो.

…’श्रीकृष्ण’ ‘अर्जुना’ला पुन्हापुन्हा अत्यंत तळमळीने सांगत आहे की, “युद्ध कर आणि तुझ्या विरोधकांचा पाडाव कर”. “माझे स्मरण कर आणि लढ!”, “कोणत्याही अभिलाषेपासून मुक्त असलेले कर्म, कोणत्याही स्वार्थी दाव्यांपासून मुक्त असलेले असे कर्म आणि आध्यात्मिकतेने काठोकाठ भरलेल्या हृदयानिशी केलेले सर्व कर्म मला अर्पण कर आणि लढ!” …कुरुक्षेत्राचा सारथी अर्जुनाचा रथ हा उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्रामधून घेऊन जात आहे असे कर्मयोगाचे वर्णन आहे, ते कर्मयोगाचे प्रतीक आहे. कारण शरीर हा रथ आहे, इंद्रियं ही त्या रथाला जोडलेले घोडे आहेत आणि या रक्तपात आणि चिखलाने माखलेल्या जगाच्या मार्गावरून, श्रीकृष्ण मानवी आत्म्याला वैकुंठाच्या दिशेने घेऊन जात आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 12)