प्रश्न : भौतिक जाणिवेमध्ये आणि पूर्णत: भौतिक परिस्थितीमध्ये आपल्याला सदासर्वकाळ अडकवून ठेवणाऱ्या भौतिक जाणिवेमधून बाहेर कसे पडावे?
श्रीमाताजी : ते करण्याचे अगणित मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करावयाची म्हटले तर काहीच हाती लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांपाशी परत येऊन पोहोचतो. ह्यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.
बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, ह्या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; ह्या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग रुपांतरित झाल्याविना तसाच शिल्लक राहतो. त्यांच्यासाठी रूपांतरण करणे हा उपाय नसून, परित्याग करणे, शक्य तितक्या त्वरेने या शरीरातून बाहेर पडणे हाच केवळ त्यावरील उपाय असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला हवे आहे ते हे नाही.
आपल्याला शारीरिक, भौतिक जाणिवेचे रूपांतरण हवे आहे, त्याचा परित्याग करणे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा परमेश्वराप्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक बाबींचा व भौतिक जाणिवेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर, भौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.
– श्रीमाताजी
(CWM 08 : 299-300)