Posts

साधनेची मुळाक्षरे – २३

(श्रीअरविंद The Mother या ग्रंथामध्ये श्रीमाताजींचे स्वरूप उलगडवून दाखवीत आहेत, त्या ग्रंथातील हा अंशभाग…)

त्या एकमेवाद्वितीय आद्य विश्वातीत ‘शक्ती’चे – ‘श्रीमाताजीं’चे स्थान सर्व विश्वांच्या वर असते आणि त्या स्वतःमध्ये ‘परम ईश्वरा’ची शाश्वत चेतना बाळगून असतात. त्या एकट्या, परम ‘शक्ती’ आणि अनिर्वचनीय अशी ‘उपस्थिती’ स्वतःमध्ये साठवून असतात; जी ‘सत्यं’ आविष्कृत होणे आवश्यकच आहेत अशा ‘सत्यां’ना त्यांनी साद घातलेली असते; अशी सत्यं त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतलेली असतात; श्रीमाताजींच्या अनंत चेतनेच्या प्रकाशामध्ये गुप्त असणारी अशी जी सत्यं असतात, ती ‘सत्यं’ ‘परमरहस्या’मधून त्या खाली आणतात आणि श्रीमाताजी स्वत:च्या सर्वसामर्थ्यवान शक्तीमध्ये व असीम जीवनामध्ये आणि विश्वगत शरीरामध्ये, त्या सत्यांना शक्तिरूप प्रदान करतात. ‘परमेश्वर’ श्रीमाताजींमध्ये शाश्वत ‘सच्चिदानंद’ म्हणून कायमस्वरूपी आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे तो विश्वांमध्ये ‘ईश्वर-शक्ती’ या एका आणि दुहेरी चेतनेमध्ये आणि ‘पुरुष-प्रकृती’ या दुहेरी ‘तत्त्वां’द्वारे आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे त्याने ‘विश्वां’मध्ये आणि विविध ‘स्तरां’वर, ‘देवदेवता’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ यांच्या माध्यमातून मूर्तरूप धारण केले आहे; आणि ज्ञात तसेच अज्ञात विश्वांमधील सर्वकाही त्यांच्याचमुळे साकार झाले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 14-15)

साधनेची मुळाक्षरे – २२

एकमेव ‘ईश्वर’च सत्य आहे – उर्वरित सर्व मिथ्या आहे. आणि असे असूनसुद्धा ‘ईश्वर’च सर्वत्र आहे – संतांमध्ये आणि पापी व्यक्तीमध्ये सुद्धा तो विद्यमान आहे.

*

एकमेव ‘ईश्वर’च सत्य आहे – उर्वरित सर्व भ्रम आहे. आणि असे असूनसुद्धा ‘ईश्वर’च सर्वत्र व्यापलेला आहे – ऋषीमुनींमध्ये आणि अज्ञानी व्यक्तीमध्ये सुद्धा तो विद्यमान आहे.

*

एकमेव ‘ईश्वर’च प्रेम आहे – उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे स्वार्थी भावुकता आहे. परंतु ‘ईश्वरी’ प्रेम हे सर्वत्र आणि सर्व वस्तुमात्रांमध्ये विद्यमान आहे.

– श्रीमाताजी
(White Roses : 37-38)

साधनेची मुळाक्षरे – २१

एक गोष्ट अगदी एक क्षणभरसुद्धा विसरू नका की, हे सारे त्या परमेश्वराने निर्माण केले आहे, ‘त्या’ने ते स्वतःमधूनच निर्माण केलेले आहे. ‘तो’ या साऱ्यांमध्ये फक्त उपस्थितच आहे असे नाही तर, ‘तो’ स्वतःच हे सारेकाही आहे. केवळ अभिव्यक्ती आणि आविष्करण यामध्ये एवढाच काय तो फरक आहे.

तुम्ही ही गोष्ट विसरलात तर, सर्वकाही गमावून बसाल.

*

साधक : ‘ईश्वर’ सर्व वस्तुमात्रांमध्येच, म्हणजे अगदी कचरापेटीमध्ये देखील असतो का?

श्रीमाताजी : हे संपूर्ण विश्व ‘ईश्वरा’चे आविष्करण आहे, परंतु या आविष्करणाचा प्रारंभ उगमाशी असलेल्या अगदी अचेतनतेपासून होतो आणि तेथून ते या चेतनेप्रत हळूहळू उन्नत होत राहते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 05)

साधनेची मुळाक्षरे – २०

शारीरिक किंवा भौतिक स्तरावर ‘ईश्वर’ स्वतःला सौंदर्याद्वारे अभिव्यक्त करतो; मानसिक स्तरावर ज्ञानाद्वारे, प्राणिक स्तरावर शक्तिद्वारे, आणि आंतरात्मिक स्तरावर प्रेमाद्वारे तो स्वतःला अभिव्यक्त करतो.

आपण जेव्हा पुरेसे उन्नत होतो तेव्हा हे चारही पैलू एकाच चेतनेमध्ये, प्रेम, तेजस्विता, शक्तिमानता, सौंदर्य या साऱ्यांनी परिपूर्ण, सर्वांना सामावून घेत, सर्वांमध्ये व्याप्त अशा रीतीने, परस्परांशी संयुक्त होतात, असा शोध आपल्याला लागतो.

वैश्विक लीलेला समाधानी करण्यासाठीच ही चेतना स्वतःला आविष्करणाच्या विविध स्तरांवर वा पैलूंमध्ये विभाजित करते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 06)

विचार शलाका – २५

(‘पूर्णयोग’ साध्य करायचा असेल तर व्यक्तीने कोणती गोष्ट नीट समजून घ्यायला हवी, ती गोष्ट श्रीमाताजी येथे सांगत आहेत. एखाद्या व्यक्तीची ईश्वरविषयक जी काही संकल्पना असते, ती म्हणजेच केवळ ईश्वर नाही, तर इतरांच्या त्याच्याविषयीच्या ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पनांनुसार देखील ईश्वर असू शकतो, आणि कोणाच्याच संकल्पनेत बसू शकणार नाही असाही तो असू शकतो, हे व्यक्तीने समजून घेतले पाहिजे असे श्रीमाताजी सांगत आहेत. त्या पुढे म्हणतात..)

सहजस्फूर्तपणे किंवा ईश्वराबाबत पुसटशीही जाणीव नसताना देखील, लोक त्यांच्या त्यांच्या संकल्पनेला साजेसे ‘ईश्वरा’ने असावे असा आग्रह धरतात. विचार न करताच अगदी उत्स्फूर्तपणे ते तुम्हाला सांगतात, “हा ईश्वर आहे, हा ईश्वर नाही!’ वास्तविक, ईश्वराबद्दल ते असे कितीसे जाणत असतात?

… “दिव्यत्व म्हणजे काय?” असे तुम्ही त्यांना विचारले तर मात्र उत्तर देणे त्यांना कठीण जाते, त्यांना काहीच माहीत नसते. …एखाद्या व्यक्तीला जाण जेवढी कमी, तेवढी ती व्यक्ती एखाद्या गोष्टीविषयी अधिक मतं बनविते, हे निखालस सत्य आहे. आणि जेवढी एखाद्या व्यक्तीला जाण अधिक, तेवढी ती मतप्रदर्शन कमी करते. आणि पुढे पुढे तर एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्ती निरीक्षण करू लागते पण कोणतेही मत बनविणे तिला अशक्य होऊन बसते. व्यक्ती गोष्टी पाहू शकते, त्या जशा आहेत अगदी तशा त्या पाहू शकते, त्यांच्यातील परस्परसंबंध ती पाहू शकते, त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून त्या गोष्टी ती पाहू शकते, त्या सद्यस्थितीत जिथे आहेत आणि जिथे त्या असायला पाहिजेत यातील फरक व्यक्तीला उमगतो. – या दोहोंमधील ही तफावत ही जगातील एक फार मोठी अव्यवस्था आहे हे सुद्धा अशा व्यक्तीला दिसते – पण ती व्यक्ती त्यावर टिप्पणी करत नाही, ती फक्त निरीक्षण करते.

आणि एक क्षण असा येतो की जेव्हा, “हा ईश्वर आहे आणि तो ईश्वर नाही” असे म्हणणे देखील त्या व्यक्तीला अवघड जाते. कारण, खरे सांगायचे तर, एक काळ असा येतो की, तिच्या दृष्टीला संपूर्ण विश्वच अशा समग्रपणे, सर्वंकष रीतीने दिसू लागते की तिला हे कळून चुकते की, येथे कशालाही धक्का न पोहोचू देता, येथील एकही गोष्ट या विश्वापासून वेगळी काढता येणे अशक्य आहे.

आणि अजून एकदोन पावले पुढे गेल्यावर व्यक्तीला निश्चितपणे असे कळते की, ‘ईश्वर-विरोधी’ वाटल्यामुळे आपल्याला ज्याचा धक्का बसला होता, ती गोष्ट केवळ तिच्या योग्य जागी नाही इतकेच. प्रत्येक गोष्ट अगदी तिच्या अचूक जागीच असली पाहिजे. तसेच, या आविष्कृत झालेल्या विश्वामध्ये सातत्याने नवनवीन तत्त्वांची, घटकांची भर घातली जात असते, त्या घटकांच्या सुसंवादी प्रगतिशील अशा व्यवस्थेमध्ये जेणेकरून तिचा प्रवेश होणे शक्य होईल, इतपत ती गोष्ट लवचिक, घडणसुलभ (plastic) देखील असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 01-02)

विचार शलाका – २४

शरीराकडे ते जणू प्रेत आहे असे समजून पाहाणे, हे संन्यासवाद्यांचे लक्षण आहे. हा निर्वाणाचा मार्ग आहे. ही संकल्पना ऐहिक जीवनाच्या संकल्पनेशी मिळतीजुळती नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असला पाहिजे, चैतन्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच तो शरीरामध्येही असला पाहिजे. देह हा चैतन्याने बनलेला असतो, त्यामुळे देह हा देखील ‘ईश्वरा’चेच रूप आहे. मी या विश्वातील सर्व वस्तुमात्रांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहतो. येथील सर्व काही हे ‘ब्रह्म’च आहे, ‘वासुदेव’, ‘ईश्वर’ हाच सर्व काही आहे, (सर्वम् इदम् ब्रह्म, वासुदेवं सर्वमिति) ही दृष्टी वैश्विक आनंद मिळवून देते. आनंदाच्या सघन लहरी अगदी शरीरामधूनही उठत राहतात. या अवस्थेत, आध्यात्मिक भावनेने भरलेले असतानासुद्धा, व्यक्ती हे ऐहिक जीवन, वैवाहिक जीवन जगू शकते. प्रत्येक कृतीमध्ये व्यक्तीला दिव्यत्वाचा आनंददायी आत्माविष्कार आढळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 367)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

ईश्वरी कृपा – २६

‘ईश्वर’ आणि तुमच्यामध्ये तुम्ही इतर कोणाही व्यक्तिला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला का येऊ देता? तुम्ही जेव्हा पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. एखाद्या व्यक्तिला जर ‘ईश्वर’ त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीची मनोभूमिका संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवी. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असायला हवा आणि त्यामध्ये इतर कोणत्याही गोष्टीचा हस्तक्षेप असता कामा नये.

‘ईश्वर’ कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, या संबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ‘ईश्वर’च केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ‘ईश्वरा’ला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘ईश्वर’ काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती ‘त्याला’ पाहते, ‘त्याला’ भेटते; त्याचा ‘प्रकाश’, त्याची ‘उपस्थिती’, त्याचे ‘प्रेम’, त्याचा ‘आनंद’ हाच काय तो तिच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे.

कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 56)

जेव्हा तुम्ही योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील, अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही, अशा निराधार अवस्थेत हवेत लटकत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या उपटून फेकून दिल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे. तुम्ही काय होतात ह्याचा विचार करू नका, पण तुम्हाला काय व्हायचे आहे, त्याच अभीप्सेचा विचार करा; जे तुम्ही प्रत्यक्षात उतरवू पाहत आहात त्याच्यामध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि भविष्याकडे पाहा. ईश्वर हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 82-84)

प्रश्न : प्रत्येकातील चैत्य पुरुष (Psychic Being) नेहमी शुद्धच असतो का? की, तो शुद्ध करावा लागतो?
श्रीमाताजी : अस्तित्वामधील चैत्य पुरुष हा नेहमीच अतिशय शुद्ध असतो, कारण अस्तित्वाचा हा एक असा भाग आहे की, जो ईश्वराच्या संपर्कात असतो आणि अस्तित्वाचे सत्य तो अभिव्यक्त करत असतो. परंतु हा चैत्य पुरुष म्हणजे व्यक्तिच्या अस्तित्वाच्या अंधकारातील एक ठिणगी असू शकते किंवा तो जागृत, पूर्ण विकसित व स्वतंत्र असा प्रकाशमय पुरुष असू शकतो. या दोहोंच्या दरम्यान अनेक श्रेणी असतात.

प्रश्न : तो सहसा झाकलेलाच असतो का?
श्रीमाताजी : बाह्यवर्ती जाणीव (Outer consciousness) ही त्याच्या संपर्कात असत नाही, कारण ती आतमध्ये वळलेली असण्याऐवजी, बाहेरच्या दिशेला वळलेली असते कारण ती बाह्य गोंगाट, हालचाली या साऱ्यांमध्ये जगत असते. अंतरंगामध्ये पाहण्याऐवजी, अस्तित्वाच्या तळाशी पाहण्याऐवजी आणि आंतरिक प्रेरणांचे ऐकण्याऐवजी, ती जाणीव बाह्यामध्ये जे काही पाहते, जे काही करते, जे काही बोलते त्या साऱ्या गोष्टींमध्येच वावरत असते.

प्रश्न : चैत्य पुरुषाकडे कोणती शक्ती असते का?
श्रीमाताजी : सहसा, जीवाला मार्गदर्शन करणारा चैत्य पुरुषच तर असतो. व्यक्तीला त्याविषयी काहीच माहीत नसते कारण व्यक्ती त्याविषयी जागृत नसते, परंतु चैत्य पुरुषच सहसा जीवाला मार्गदर्शन करत असतो. जर का व्यक्ती सावध राहिली तर, व्यक्तीला त्याची जाण येते. परंतु बहुसंख्य लोकांना त्याची पुसटशी देखील कल्पना नसते.

उदाहरणार्थ, त्यांनी काहीतरी करावयाचे ठरविलेले असते, अर्थात त्यांच्या बाह्यवर्ती अज्ञानापोटीच, काहीतरी करावयाचे ठरविलेले असते आणि सारे काही असे घडत जाते की, जे करायचे ठरविले होते त्याऐवजी ते काहीतरी भलतेच करून बसतात आणि मग ते चिडतात, त्रागा करता, दैवाला दोष देत, संताप व्यक्त करत राहतात (ते ज्याच्या त्याच्या भावना व श्रद्धा यांवर अवलंबून असते.) ते म्हणत राहतात, प्रकृती दुष्ट आहे, किंवा नियती निर्दयी आहे किंवा मग देवच अन्यायी आहे किंवा…असेच काहीही. (ते ज्याच्या त्याच्या समजुतींवर अवलंबून असते.) खरंतर, बरेचदा तीच परिस्थिती त्यांच्या आंतरिक विकासासाठी अत्यंत अनुकूल अशी असते.

तुम्हाला आरामदायी जीवन हवे आहे, पैसा हवा आहे, कुलदीपक अशी मुलेबाळे हवी आहेत, त्या साऱ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मला मदत कर, असे जर तुम्ही तुमच्या चैत्य पुरुषाला सांगाल तर तो तुम्हाला त्यात साहाय्य करणार नाही, हे उघडच आहे. परंतु जेणेकरून, ईश्वराशी एकरूप होण्याची निकड तुमच्या जाणिवेमध्ये उत्पन्न व्हावी, असे काहीतरी तुमच्यामध्ये जागृत होईल, अशी परिस्थिती मात्र तो तुमच्यासाठी निर्माण करेल.

तुम्ही आखलेल्या चांगल्याचांगल्या योजना जर यशस्वी झाल्या, तर तुमच्या बाह्य अज्ञानाचे, तुमच्या मूर्ख क्षुल्लक महत्त्वाकांक्षांचे आणि तुमच्या ध्येयहीन कृतींचे आवरण अधिकाधिक घट्ट होत जाईल अशी शक्यता असते. परंतु जेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसतो, ज्याची तुम्ही अभिलाषा बाळगली होती ते पद तुम्हाला नाकारले जाते, तुमच्या योजना छिन्नविछिन्न होऊन जातात, जेव्हा तुम्ही पूर्णपणे विफल झालेले असता तेव्हा, कधीकधी ही प्रतिकूलताच तुमच्यासाठी अधिक सत्य आणि अधिक सखोल अशा कोणत्यातरी गोष्टींची दारे खुली करून देते.

आणि मग नंतर कधीतरी, जेव्हा तुम्ही थोडेसे जागृत असता आणि मागे वळून पाहू लागता तेव्हा, तुम्ही थोडेसे जरी प्रामाणिक असाल तर तुम्ही म्हणता, “खरंच की ! तेव्हा माझे म्हणणं बरोबर नव्हते – प्रकृती किंवा ईश्वरी कृपा किंवा माझा चैत्य पुरुष ह्यांचेच बरोबर होते, त्यांनीच हे सारे घडवून आणले आहे.” तो चैत्य पुरुषच असतो की, ज्याने हे सारे घडवून आणलेले असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 393-394)