Posts

ज्या व्यक्तीची चेतना ईश्वरी चेतनेशी एकत्व पावलेली असते अशी व्यक्ती सर्व गोष्टींना परिपूर्ण समत्वानेच सामोरी जाते.

– श्रीमाताजी
(Conversation with a Disciple, August 9, 1969)

*

समता हा या योगाचा (पूर्णयोगाचा) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; वेदना आणि दुःखभोग असतानादेखील समता बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, दृढपणे आणि शांतपणे चिकाटी बाळगली पाहिजे; अस्वस्थ वा त्रस्त किंवा निराश वा उद्विग्न होता कामा नये तर, ईश्वरी संकल्पावर अविचल श्रद्धा ठेवून वाटचाल केली पाहिजे.मात्र समत्वामध्ये उदासीन स्वीकाराचा समावेश होत नाही. एखाद्या वेळी साधनेतील काही प्रयत्नांबाबत तात्पुरते अपयश आले तरी व्यक्तीने समत्व राखले पाहिजे; व्यक्तीने त्रस्त किंवा निराश होता कामा नये; तसेच ते अपयश म्हणजे ‘ईश्वरी इच्छे’चा संकेत आहे असे समजून, प्रयत्न सोडता कामा नयेत. उलट, तुम्ही त्यामागचे कारण शोधून काढले पाहिजे, त्या अपयशाचा अर्थ शोधून काढला पाहिजे आणि विजयाच्या दिशेने श्रद्धापूर्वक मार्गक्रमण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी इच्छेकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही माणसाला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही. त्यासाठी व्यक्तीकडे प्रथमतः काय असावयास हवे तर, ईश्वरी इच्छा जे करेल ते भल्यासाठीच असते अशी नित्य धारणा! आणि हे असे कसे हे मनाला कळले नाही तरीही, ही धारणा असली पाहिजे. तसेच जी गोष्ट व्यक्तीला अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येऊ शकली नाही, ती गोष्ट तिने संन्यस्त वृत्तीने स्वीकारली पाहिजे. आणि अशा रीतीने एका स्थिर समत्वाकडे जाऊन पोहोचले पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या हालचाली कदाचित असू शकतील परंतु तेव्हाही या स्थिर समत्वापासून विचलित होता कामा नये. आणि एकदा का हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले, की मग इतर सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)