Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ३०७

रूपांतरण

(रूपांतरणाची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यामध्ये धीर, चिकाटी यांची कशी आवश्यकता असते ते श्रीमाताजी येथे समजावून सांगत आहेत. या प्रक्रियेस आरंभ करण्यापूर्वी व्यक्तीला त्यासंबंधी पुरेशी स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे, असे त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ दिसतो. हा संपूर्ण भाग मुळातूनच विचारात घ्यावा असा आहे. तो क्रमश: पाच भागांमधून देत आहोत.)

अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही हे खरेतर आपले दुर्दैव आहे असे म्हटले पाहिजे. कारण त्या अन्नाबरोबर, आपण दररोज आणि सातत्याने मोठ्या प्रमाणात अचेतनता, तामसिकता, जडत्व आणि मूढता यांचेही ग्रहण करत असतो. आपण सातत्याने, पूर्णपणे, अखंड सजग राहिले पाहिजे आणि जेव्हा एखादा अन्नघटक आपल्या शरीरामध्ये ग्रहण केला जातो तेव्हा आपण लगेच त्यावर क्रिया करून, त्याच्यामधील प्रकाश तेवढा बाजूला काढला पाहिजे आणि आपल्या चेतनेला अंधकारमय करणाऱ्या त्यामधील साऱ्या गोष्टींचा आपण अस्वीकार केला पाहिजे.

अन्नग्रहण करण्यापूर्वी ईश्वराला नैवेद्य दाखविण्याची, अर्पण करण्याची जी धार्मिक प्रथा आहे त्याचे मूळ येथे आहे आणि हेच त्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण आहे. अन्न ग्रहण करताना, ते अन्न आपल्या क्षुद्र अशा मानवी अहंकाराद्वारे ग्रहण केले जाऊ नये तर ते आपल्या अंतरंगातील ईश्वरी चेतनेला अर्पण केले जावे अशी आस व्यक्ती बाळगत असते. सर्व योगमार्गांमध्ये, सर्व धर्मांमध्ये याला महत्त्व दिले जाते. दररोज, सातत्याने, आपल्याही नकळत आपण अचेतनता शोषून घेत असतो, आणि त्याचे प्रमाण वाढवत नेत असतो, ते प्रमाण शक्य तितके कमी केले जावे यासाठी, त्या अन्नाच्या पाठीमागे असणाऱ्या चेतनेशी आपला संपर्क व्हावा, हे त्या प्रथेचे मूळ आहे.

प्राणाच्या बाबतीतही तसेच आहे. प्राणिक दृष्टया तुम्ही प्राणिक जगतामध्ये राहात असता. त्या जगतामधील प्राणिक शक्तीचे प्रवाह तुमच्या चेतनेमध्ये प्रवेश करत असतात, बाहेर जात असतात, ते एकमेकांशी मिळूनमिसळून राहात असतात तर, कधी परस्परांना विरोधही करत असतात. ते प्राणिक प्रवाह भांडत असतात, एकमेकांमध्ये मिसळत असतात. आणि जरी तुम्ही तुमची प्राणिक चेतना शुद्ध करण्याचा वैयक्तिक प्रयत्न केलात आणि त्या चेतनेमधील वासनात्म्यावर व क्षुद्र मानवी अहंकारावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केलात तरीही, तुम्ही ज्यांच्यासमवेत राहत असता त्यांच्याकडून आलेली सर्व विरोधी स्पंदने सुद्धा तुमच्याकडून अपरिहार्यपणे (तुमच्या नकळत) शोषून घेतली जातात. (कारण) व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही.

शारीरिक दृष्टया असे करण्यापेक्षा प्राणिकदृष्ट्या तसे करणे अधिक अवघड असते आणि (त्यामुळेच) व्यक्ती स्वतःमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींचे ग्रहण करत असते. म्हणजे व्यक्ती जर सातत्याने पूर्णपणे जागरूक नसेल, सदैव सावध नसेल आणि आतमध्ये जे जे प्रवेश करत आहे त्यावर तिचे जर पुरेसे नियंत्रण नसेल, म्हणजे ती स्वतःच्या चेतनेमध्ये नको असलेल्या घटकांचा शिरकाव होऊ देत असेल तर, अशा व्यक्तीला तिच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींकडून येणाऱ्या सर्व तऱ्हेच्या नकोशा स्पंदनाचा, सर्व लहानसहान अंधकारमय प्रतिक्रियांचा, सर्व कनिष्ठ गतिप्रवृत्तींचा, सर्व इच्छावासनांचा सतत संसर्ग होतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – २९०

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

इच्छावासना, लालसा या शरीराच्या जुन्या सवयी असतात, त्या वैश्विक प्रकृतीकडून शरीराकडे आलेल्या असतात आणि शरीराने त्या स्वीकारलेल्या असतात आणि त्यांना जणू काही स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवून टाकलेले असते.

जागृतावस्थेतील चेतनेकडून जेव्हा या गोष्टींना नकार दिला जातो तेव्हा त्या अवचेतनामध्ये (subconscient) किंवा ज्याला ‘परिसरीय चेतना’ (environmental consciousness) असे म्हणता येईल, त्यामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेथून त्या काही काळपर्यंत पुन्हा पुन्हा येत राहतात किंवा तेथून ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत, चेतनेवर दबाव टाकतात.

त्या (इच्छावासना) परिसरीय चेतनेमधून येत असतील तर त्या विचार-सूचनांचे किंवा आवेगांचे रूप घेतात किंवा मग त्यांचा अस्वस्थ करणारा एक अंधुकसा दबाव व्यक्तीला जाणवतो. त्या जर अवचेतनामध्ये गेल्या असतील तर तेथून त्या बरेचदा स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात, परंतु त्या जागृतावस्थेत सुद्धा पृष्ठभागावर येऊ शकतात.

जेव्हा शरीर नव-चेतनामय झालेले असते आणि त्याच वेळी त्याच्या ठायी ‘दिव्य शांती’ आणि ‘दिव्य शक्ती’ असते तेव्हा, व्यक्तीला बाह्यवर्ती दबावाची जाणीव होते परंतु त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ होत नाही आणि मग (शारीर-मनावर किंवा शरीरावर तत्काळ दबाव न टाकता) तो दबाव सरतेशेवटी (व्यक्तीपासून) दूर निघून जातो किंवा मग तो हळूहळू किंवा त्वरेने नाहीसा होतो.

मी ज्याला ‘परिसरीय चेतना’ असे संबोधतो ती चेतना प्रत्येक मनुष्य, त्याच्या नकळत, स्वतःच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूस, सभोवार वागवत असतो आणि या परिसरीय चेतनेच्या माध्यमातून तो इतरांच्या आणि वैश्विक शक्तींच्या संपर्कात असतो. या चेतनेद्वारेच इतरांच्या भावना, विचार इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. याच चेतनेद्वारे वैश्विक शक्तींच्या लहरी म्हणजे इच्छावासना, लैंगिकता इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. आणि व्यक्तीच्या मन, प्राण व शरीराचा ताबा घेतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 601)

विचारशलाका ३६

 

सर्वसाधारणपणे आपण ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक अधिवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती दिव्य शक्ती आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये परिवर्तन घडवून आणेल. ‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे – त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 07-08]

आध्यात्मिकता १३

‘नैतिकता’ जीवनाच्या विविधतेच्या आणि आत्मस्वातंत्र्याच्या विरोधी असणारे असे एक कृत्रिम जीवनमान उचलून धरते. ती मानसिक, ठरीव, मर्यादित असे काहीतरी तयार करते आणि सर्वांनी त्याबरहुकूम वागावे अशी अपेक्षा बाळगते. सर्वांनी समानच गुण आणि समानच आदर्श प्रकृती आत्मसात करावी, त्यासाठीच सर्वांनी धडपडावे असे तिला वाटते. नैतिकता ही काही दैवी नाही किंवा तिच्यामध्ये ‘ईश्वरीय’ असेदेखील काही नाही; ती मानवी असते, माणसासाठी असते. नैतिकता ही चांगल्या आणि वाईटामध्ये निश्चित असा भेद आहे असे समजून, तोच मूलभूत घटक आहे असे मानून चालते. पण ही एक स्वैर, यादृच्छिक (arbitrary) कल्पना आहे. ती सापेक्ष अशा काही गोष्टी घेते आणि त्या निरपवाद आहेत असे समजून दुसऱ्यांवर लादू पाहते; हे चांगले आणि हे वाईट याबद्दलच्या संकल्पना वेगवेगळ्या वातावरणामध्ये, वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या युगांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या असतात. नैतिकतेची संकल्पना पुढे जाऊन असेही सांगते की, काही वासना चांगल्या असतात आणि काही वासना वाईट असतात. आणि त्यातील चांगल्या स्वीकाराव्यात आणि वाईट नाकाराव्यात असेही ही नैतिक संकल्पना सांगते.

पण आध्यात्मिक जीवनाची मात्र अशी मागणी असते की, वासना, कामना (desire) मग त्या कोणत्याही प्रकारच्या असोत तुम्ही त्या अव्हेरल्याच पाहिजेत, नाकारल्याच पाहिजेत. जी स्पंदने, ज्या गतीविधी तुम्हाला ‘ईश्वरा’पासून दूर घेऊन जातात अशी सर्व स्पंदने, अशा सर्व गतीविधी तुम्ही दूर सारल्याच पाहिजेत, असा नियम असतो. इच्छावासना वाईट आहेत म्हणून तुम्ही त्या नाकारल्या पाहिजेत असे नव्हे, – कारण त्या इतरांसाठी वा एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्याही ठरू शकतात, – पण वासना म्हणजे असे आवेग वा शक्ती असतात, ज्या प्रकाशहीन आणि अज्ञानी असल्याने, ‘दिव्यत्वा’कडे चालू असलेल्या तुमच्या वाटचालीमध्ये अडसर बनून उभ्या ठाकतात. सर्व प्रकारच्या इच्छावासना, मग त्या चांगल्या असोत वा वाईट त्या याच वर्णनामध्ये बसतात कारण, वासना या मुळातच अप्रकाशमान अशा प्राणिक अस्तित्वाकडून आणि त्याच्या अज्ञानातून उदय पावतात.

दुसरी गोष्ट अशी की, ज्यांच्यामुळे तुम्ही ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये येऊ शकाल अशा सर्व गतीविधी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत. त्या चांगल्या आहेत म्हणून, तुम्ही त्या स्वीकाराव्यात असे नव्हे तर, त्या तुम्हाला ‘ईश्वरा’कडे घेऊन जातात म्हणून, तुम्ही त्या स्वीकारल्या पाहिजेत. जे काही तुम्हाला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाते त्याचा स्वीकार करा आणि जे त्यापासून तुम्हाला दूर नेते त्या सगळ्या गोष्टींना नकार द्या. पण अमुक अमुक या गोष्टी चांगल्या आहेत किंवा तमुक गोष्टी वाईट आहेत असे म्हणू नका आणि तुमचा दृष्टिकोन इतरांवर लादण्याचा प्रयत्नही करू नका. कारण ज्या गोष्टीला तुम्ही वाईट असे संबोधता, नेमकी तीच गोष्ट तुमच्या शेजाऱ्यासाठी, की जो ‘दिव्य जीवना’ची अनुभूती यावी म्हणून प्रयत्नशील नाही, त्याच्यासाठी चांगलीही असू शकेल.

– श्रीमाताजी [CWM 03 : 118-119]