श्रीअरविंदांनी जेव्हा बडोद्यामधील प्राध्यापकपदाची नोकरी सोडून दिली तेव्हा साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटले. पण एक आनंदही होता की, त्यांचे आवडते शिक्षक हे आता देश पातळीवरील नेते बनलेले होते. श्री. कन्हैयालाल मुन्शी हे या विद्यार्थ्यांमधील एक होते. भारतीय संस्कृतीची पुनस्थापना करण्याच्या हेतूने त्यांनी पुढील काळात भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.
मुन्शी विद्यार्थिदशेत असताना त्यांनी, प्राध्यापक श्रीअरविंद घोष यांना एक प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”
श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करीत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पर्वतराजी, नद्या, जंगले यासाऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक जितीजागती माता आहे या भावाने तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा.”
……ह्याच मुन्शीजींनी आपल्या साहित्यातून, वेदकाळातील सरस्वती नदीच्या किनारी वसणाऱ्या आर्यांचे जीवन चित्रित केले आहे. चाळीस वर्षांनंतर मुन्शीर्जीची श्रीअरविंदांशी पुन्हा भेट झाली. तेव्हा मुन्शीर्जीना श्रीअरविंदांचे पूर्णत: वेगळे रूप दिसून आले. ते रूप कसे होते ह्याचे वर्णन त्यांनी केले आहे, ” मी ज्यांचा मनोमन दूरून आदर करत असे ते माझे शिक्षक आता माझ्या समोर नव्हते, किंवा ज्यांच्या शिकवणुकीचा जीवनामध्ये मला वेळोवेळी उपयोग झाला होता ते मुनीवर्यही माझ्या दृष्टीसमोर नव्हते तर समोर एक एकसंध, परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. आसक्ती, प्रकोप, आणि भीती यांचे परिवर्तन शक्ती, सौंदर्य आणि शांतीमध्ये झाले होते. आर्य संस्कृतीची सारभूत कल्पनाच जणू मानवी रूपात मूर्त झाली होती.”
(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)