Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १२४

(उत्तरार्ध)

आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून भगवद्गीता सातत्याने कर्माचे समर्थन करत आहे. भक्ती आणि ज्ञानमार्गाप्रमाणेच कर्ममार्गाचे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. कृष्ण कर्माचा एक अधिक उच्चतर अर्थ लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा कर्मफलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे, असे त्याचे सांगणे आहे. धर्माला अनुसरून आणि योग्य प्रकारे कर्म केल्यास, कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास हरकत नाही, अशा कर्माने ‘ईश्वरा’कडे जाण्याच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा आणि आध्यात्मिक जीवनाचा मार्गही त्याने अवरूद्ध (prevent) होत नाही. या गोष्टींकडे पाहण्याचा भारताचा हा दृष्टिकोन पूर्वापार चालत आलेला आहे.

अर्थातच एक संन्यासवादी ध्येयसुद्धा काही जणांसाठी आवश्यक असते आणि आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्यालाही स्थान आहे. मी स्वतःसुद्धा असे म्हणतो की, व्यक्तीला जर एखाद्या तपस्व्याप्रमाणे जीवन जगता आले नाही किंवा एखाद्या एकान्तवासामध्ये राहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे अगदी किमान गरजांमध्ये जीवन जगता आले नाही तर ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकत नाही. हे उघडच आहे की, हावरटपणा, किंवा इतर कोणताही लोभ, किंवा अशा प्रकारची कोणतीही आसक्ती ही गोष्ट व्यक्तीच्या चेतनेमधून त्यागणे जितके आवश्यक असते त्याचप्रकारे संपत्तीची हाव आणि नफेखोरी या गोष्टीदेखील त्याच्या प्रकृतीमधून नाहीशा झाल्या पाहिजेत.

परंतु आध्यात्मिक पूर्णतेसाठी संन्यासमार्ग हा अगदी अनिवार्य आहे किंवा संन्यासमार्ग म्हणजेच आध्यात्मिक मार्ग, असे मी मानत नाही. एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे. तसे नसते तर, भारतामध्ये जनक किंवा विदुरासारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय कृष्णदेखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो कृष्ण वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा अधिपती झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा कुरूक्षेत्रातील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता. महाभारतामध्ये किंवा अन्यत्र, भारतीय धर्मशास्त्रामध्ये आणि भारतीय परंपरेमध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला समान स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासमार्ग हाच तेवढा भारतीय परंपरेतून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्वप्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग युरोपियन किंवा पाश्चात्त्य आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो भारतीय नाही असे म्हणता येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 249-250)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२२)

(श्रीअरविंदाश्रमामध्ये ज्याप्रकारचे लघुउद्योग, उद्योगव्यवसाय चालविले जातात ते पाहून, एका व्यक्तीने श्रीअरविंदांना कदाचित संन्यासमार्गाची महती सांगण्याचा प्रयत्न केला असावा असे दिसते. तेव्हा संन्यासमार्ग, दैनंदिन जीवन – व्यवहार, सर्व कर्म, गीतोक्त मार्ग, आध्यात्मिक प्रगती या साऱ्यांविषयीच श्री अरविंदांनी काही टिप्पणी केली आहे. त्यामधील हा अंशभाग…)

..एक संन्यासवादी ध्येयसुद्धा असते की जे काही जणांसाठी आवश्यक असते आणि आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्यालाही स्थान असते. मी स्वतः असे म्हणेन की, एखाद्या व्यक्तीला जर तपस्व्याप्रमाणे जीवन जगता आले नाही किंवा एखाद्या विरक्त व्यक्तीप्रमाणे अगदी किमान गरजांमध्ये जीवन जगता आले नाही तर ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या प्रकृतीमधून हावरटपणा किंवा इतर कोणताही हव्यास नाहीसा होणेच जितके आवश्यक असते; तितक्याच संपत्तीचा लोभ आणि नफेखोरी या गोष्टीदेखील तिच्या प्रकृतीमधून नाहीशा होणे आवश्यक असते, हे उघड आहे. आणि या गोष्टींबद्दलची सर्व प्रकारची आसक्ती आणि अन्य कोणताही हव्यास या गोष्टी व्यक्तीने स्वतःच्या चेतनेमधून काढून टाकणेच आवश्यक असते. परंतु आध्यात्मिक पूर्णतेसाठी संन्यासमार्ग हा जगण्याचा अगदी अनिवार्य मार्ग आहे किंवा संन्यासी वृत्तीने जीवन जगणे म्हणजेच आध्यात्मिक पूर्णता असे मात्र मी मानत नाही.

आणखी एक मार्गदेखील आहे. आणि तो मार्ग म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या कर्मामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये गुंतलेली असतानाही, किंवा ‘ईश्वरा’ला त्या व्यक्तीकडून ज्या सर्व प्रकारच्या कार्याची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कार्यामध्ये निमग्न असतानासुद्धा ती अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रति समर्पित होऊ शकते, आध्यात्मिक आत्मदान करू शकते आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्व मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 770-771)

आध्यात्मिकता २४

ज्यांना आध्यात्मिक जीवन जगण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आत्म-नियंत्रण, आत्म-प्रभुत्व, परीमितता, इच्छाविरहितता, जिवाच्या आंतरिक सत्याचा आणि त्याच्या आत्माविष्करणाच्या नियमाचा शोध या गोष्टी अगदी आवश्यक आहेत असे आपण म्हणू शकतो. स्वतःशी, स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक असणे, स्वतःला अस्ताव्यस्त भावावेगांबरोबर वाहवत जाऊ न देणे, बदलणाऱ्या रूपांना ‘वास्तविकता’ अथवा ‘सत्य’ न मानणे, या गोष्टी अध्यात्म-मार्गावर प्रगत होण्यासाठी व्यक्तीकडे असणेच आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 191]