Posts

आत्मा (The soul) आणि चैत्य पुरुष (The psychic being) ह्या दोघांचा गाभा जरी समान असला तरी, ह्या दोन्ही गोष्टी अगदी एकसारख्या मात्र नक्कीच नाहीत.

प्रत्येक व्यक्तीच्या केंद्रस्थानी स्थित असणारा ईश्वरी स्फुल्लिंग म्हणजे आत्मा होय; तो त्याच्या ईश्वरी उगमाशी अभिन्न असतो; तो मनुष्यातील ईश्वर असतो.

पार्थिव उत्क्रांतीच्या दरम्यान, असंख्य जन्मांच्या प्रक्रियेतून, ह्या आत्म्याभोवती, म्हणजे ह्या दिव्य केंद्राभोवती चैत्य पुरुषाची क्रमश: जडणघडण होत जाते. चैत्य पुरुष पूर्ण सुघटित आणि समग्रतेने जागृत होऊन, ज्या दिव्य केंद्राभोवती त्याची घडण होत असते त्या आत्म्याभोवतीचा तो जागृत कोश बनत नाही तोपर्यंत, अशा क्षणापर्यंत येत नाही तोपर्यंत ही जडणघडण चालूच राहते. आणि एकदा तो अशा रीतीने ईश्वराशी एकत्व पावला की मग मात्र, तो त्या ईश्वराचे या विश्वातील परिपूर्ण असे साधन बनतो.
– श्रीमाताजी
(CWM 16 : 245-246)

*

अपराप्रकृतीमध्ये, ईश्वराचा हा शाश्वत अंश आत्मा म्हणून, दिव्य अग्नीचे एक स्फुल्लिंग म्हणून प्रतीत होतो, तो व्यक्तिगत विकसन-प्रक्रियेला आधार पुरवत असतो; शारीरिक, प्राणिक, मानसिक अस्तित्वाला आधार पुरवत असतो.

जाणिवेच्या विकसनाबरोबर वृद्धिंगत होत जाणारा, स्फुल्लिंगाचे रूपांतर अग्नीमध्ये होत जाणारा ईश्वरांश म्हणजे चैत्य पुरुष होय. त्यामुळे चैत्य पुरुष हा विकसनशील असतो, तो जीवात्म्याप्रमाणे विकासपूर्व (prior to the evolution) नसतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 56)

प्रश्न : आत्मा व्यक्तिभूत होतो आणि क्रमश: चैत्य पुरुषामध्ये रूपांतरित होतो. त्याच्या जलद विकसनासाठी सुयोग्य स्थिती कोणती?

श्रीमाताजी : आत्मा जे प्रगतिशील व्यक्तिरूप धारण करतो त्यामधून चैत्य पुरुष निर्माण होतो, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

कारण आत्मा स्वयमेवच परम ईश्वराचा एक असा भाग असतो की, जो अपरिवर्तनीय आणि शाश्वत असा असतो. चैत्य पुरुष हा प्रगतिशील आणि अमर्त्य असतो.

आत्म-ज्ञानाच्या, आत्म-नियमनाच्या, आत्म-प्रभुत्वाच्या सर्वच पद्धती चांगल्या असतात. जी पद्धत तुमच्या प्रकृतीशी मिळतीजुळती आहे आणि जी सहज स्वाभाविकरितीने तुमच्यापाशी आलेली आहे, अशी पद्धत तुम्ही निवडली पाहिजे. आणि एकदा का ती पद्धत तुम्ही निवडली की, मग मात्र कितीही अडचणी आल्या, कितीही अडथळे आले तरी, तुम्ही त्यापासून न ढळता प्रयत्न करत राहिले पाहिजे, तुमची बौद्धिक इच्छाशक्ती तिथे उपयोगात आणली पाहिजे. हे एक असे दीर्घकालीन आणि बारकाव्याने करावयाचे काम आहे की, जे अगदी प्रामाणिकपणानेच हाती घेतले पाहिजे आणि चढत्या वाढत्या प्रामाणिकपणाने, इमानेइतबारे आणि समग्रतेने ते चालू ठेवले पाहिजे. सोपे मार्ग बहुधा कोठेच घेऊन जात नाहीत.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 246-247)

आध्यात्मिक ज्ञानाचे मन ज्या एकमेव उद्दिष्टाकडे वळले पाहिजे ते उद्दिष्ट म्हणजे शाश्वत परब्रह्म होय. या इथे प्रकृतीच्या धुक्याने परिवेष्टित झालेला आणि अभ्राच्छादित झालेला आत्मा, त्या ‘शाश्वता’वर लक्ष स्थिर करून, स्वत:ची स्वाभाविक असणारी अशी अमर्त्यतेची आणि विश्वातीततेची मूळ चेतना पुन:प्राप्त करून घेऊन, तिचा आनंद घेतो.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 415)