Tag Archive for: आत्मसमर्पण

भारताचे पुनरुत्थान – १३

पूर्वार्ध

लेखनकाळ : इ.स.१९१०
खरी अडचण ही आपल्या अवतीभोवती नसते; तर ती नेहमी आपल्या स्वत:मध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्ष वृत्ती (Disinterestedness) आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. स्वतःला बंधमुक्त करून घेण्याची आपली इच्छा असू शकते, तसा संकल्पही केलेला असू शकतो पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परममोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा अभाव आपल्याकडे असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, त्यांचा अवलंब आपण आपल्या कार्यफलाच्या आसक्तीला चिकटून राहून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईने जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, (स्वतःला बंधमुक्त करण्यासारख्या कार्यामध्ये) न भूतो न भविष्यति अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. ही साधनेची गरज असते.

ईश्वर आपल्या अंतरंगामध्येच आहे; ‘सर्वशक्तिमान’, ‘सर्वव्यापी’, ‘सर्वज्ञ’ शक्ती’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वराचे आणि आपले स्वरूप मूलतः एकसमानच आहे. आपण त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला जर त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सुकर होतो.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

समग्र अस्तित्व - ईश्वराचे साधन

 

आमच्या योगमार्गात पहिली जरुरीची गोष्ट ही आहे की, आमच्या मनाची जुनी केंद्रभूत सवय आणि दृष्टी पार मोडून काढावयाची; ही सवय आणि दृष्टी बहिर्मुख असते; बाह्य विश्वव्यवस्थेत आपला स्वतःचा विकास करावा, आपली स्वतःची तृप्ती करून घ्यावी, आपले स्वतःचे हितसंबंध सांभाळावे, ह्यावरच जुन्या सवयीचे व दृष्टीचे लक्ष खिळलेले असते. म्हणून मनाचे हे जुने वळण व दृष्टी पार मोडून काढणे ही आमच्या योगात पहिली जरुरीची गोष्ट मानली जाते. मनाच्या ह्या बहिर्वर्ती सवयीची व दृष्टीची जागा – जिला फक्त ईश्वरच दिसतो आणि ईश्वरप्राप्तीसाठीच जिची धाव असते अशा – सखोल श्रद्धेने व दृष्टीने घेणे हे या योगामध्ये आवश्यक असते.

दुसरी जरुरीची गोष्ट ही असते की, आमच्या निम्नतर अस्तित्वाने या नव्या श्रद्धेला आणि महत्तर दृष्टीला आपली निष्ठा अर्पण करावी, किंवा आम्ही त्यास तसे करावयास लावावे. आमच्या सर्व प्रकृतीने पूर्ण आत्मसमर्पण करावयास हवे; नवदृष्टिहीन इंद्रियरूप मनाला भौतिक जग आणि त्यातील वस्तू यांजहून जे आंतरिक जग कितीतरी कमी सत्य वाटते, त्या आंतरिक जगासाठी आमच्या प्रकृतीच्या प्रत्येक अंगाने, आणि प्रत्येक व्यापाराने पूर्ण आत्मसमर्पण करावयास हवे. आमच्या सर्व अस्तित्वाने – आमचा आत्मा, मन, इंद्रियगण, हृदय, इच्छा, प्राण, शरीर या सर्वांनी आपल्या सर्व शक्ती इतक्या पूर्णतेने, अशा रीतीने ईश्वरचरणी समर्पित करावयास हव्यात की, ज्यायोगे आमचे समग्र अस्तित्व हे ईश्वराचे सुयोग्य साधन होईल.

हे घडवून आणणे हे काही सोपे काम नाही; कारण जगातील प्रत्येक वस्तू एका ठाम चाकोरीतून चालत असते; ही चाकोरी, ही सवय हाच तिचा कायदा असतो; कोणत्याही वस्तूला आमूलाग्र बदल नको असतो; ती अशा बदलाला विरोध करते आणि पूर्णयोग तर जी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, त्या क्रांतीहून कोणताही बदल अधिक आमूलाग्र असू शकत नाही.

पूर्णयोगाचा अभ्यास करीत असताना प्रकृतीच्या प्रत्येक अंशाला केंद्रभूत श्रद्धेकडे, इच्छेकडे सतत ओढून आणावे लागत असते. उपनिषदांच्या भाषेत सांगावयाचे झाले तर, प्रत्येक विचाराला व ऊर्मीला ही आठवण करून द्यावी लागते की, “येथे लोक ज्याची ईश्वर म्हणून उपासना करत आहेत तो ‘ईश्वर’ नसून; तो ईश्वर ‘तेथे’ आहे.”

प्राणातील प्रत्येक तंतू, जे जीवन आजवर आपले स्वाभाविक जीवन म्हणून मानत आला आहे, त्या जीवनाचा आत्यंतिक त्याग करण्यास त्याने मान्यता द्यावी यासाठी त्याला समजावून सांगितले पाहिजे. मनाने आपले मनपण टाकून द्यायला हवे आणि त्याच्या पलीकडे असलेल्या तत्त्वाच्या प्रकाशाने प्रकाशमय व्हावयास हवे. प्राणाने आपले रूप बदलून अत्यंत व्यापक, शांत व समर्थ असे नवे रूप घ्यावयास हवे; आपले जुने, आंधळे, तळमळ करणारे, संकुचित रूप व आपल्या जुन्या क्षुद्र उर्मी आणि वासना नव्या रूपातील प्राणाला आपल्या म्हणून ओळखता येणार नाहीत इतकी नवीनता त्याच्या नव्या रूपात यावी लागते.
शरीरालादेखील परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जावे लागते; आज ते, म्हणजे मार्गातील अडथळा ठरणारी धोंड आहे किंवा ‘हे हवे’ ‘ते हवे’, असा ओरडा करणारा पशु आहे; हे आपले रूप टाकून त्याला आत्म्याचा सुबुद्ध सेवक व्हावे लागते, आत्म्याचे तेजस्वी साधन व्हावे लागते, आत्म्याचे जिवंत रूप व्हावे लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 72-73)

आमचा योगसमन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा आहे यापेक्षा, तो मनोमय देहाचा आत्मा आहे असे मानतो; त्यामुळे मानव मनाच्या पातळीवरही आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; मनोमय कोशातील मानसिक शक्तियुक्त आत्मा हा उच्च आध्यात्मिक शक्ती, उच्च आध्यात्मिक अस्तित्व प्रत्यक्ष आत्मसात करू शकतो आणि अशा रीतीने, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो आणि या उच्च आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करून आपली सर्व प्रकृती पूर्ण, पूर्णतासंपन्न करू शकतो, असे आमचा योगसमन्वय मानतो.

असा आमचा दृष्टिकोन असल्याने, आत्म्याला उपलब्ध असणाऱ्या मनाच्या शक्तींचा उपयोग करण्यावर आरंभी आमचा भर आहे. आत्म्याच्या कुलूपांना ज्ञान, कर्म, भक्तीची त्रिविध किल्ली लावून ती उघडण्यावर आमचा भर आहे; आमच्या ‘समन्वययोगा’त हठयोगपद्धती उपयोगात आणावी लागत नाही, मात्र तिचा थोडासा उपयोग करण्यास हरकत नाही; राजयोग पद्धती आमच्या समन्वययोगात अनौपचारिक अंग म्हणून येऊ शकते.

आमचा समन्वययोग आम्ही हाती घेण्याची स्फूर्ती आम्हाला झाली ह्याला कारण आहे ते असे कि – मानवी आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक अस्तित्व जास्तीत जास्त विकसित व्हावे आणि या विकसित अस्तित्वाने व शक्तीने आमच्या मानवी जीवनाच्या सर्व प्रांतांत आम्हाला आमची प्रकृती मुक्त व दिव्य करता यावी, आणि हे सर्व कार्य पूर्णत्वास नेण्याचा मार्ग दीर्घ नसावा, अल्पांत अल्प अगदी जवळचा असावा अशी आमची इच्छा होती आणि असा मार्ग म्हणजे ‘समन्वययोग’ हे आमच्या लक्षात आले.

आमच्या समन्वययोगात ‘आत्मसमर्पण’ (surrender) हे तत्त्व आम्ही साधकांपुढे ठेवले आहे. साधकाने या योगात आपले अस्तित्व सर्वथा ईश्वराच्या हाती द्यावयाचे असते. साधकाने आपले सर्व अस्तित्व ईश्वराच्या अस्तित्वाच्या, जाणिवेच्या, शक्तिच्या, आनंदाच्या हाती द्यावयाचे असते. साधकाच्या अंतरात्म्यात, त्याच्या मनोमय अस्तित्वात, ईश्वराला भेटण्याची जेवढी म्हणून स्थाने आहेत, त्या त्या सर्व स्थानी साधकाने ईश्वराची भेट घ्यावयाची असते; त्याच्याशी साहचर्य, ऐक्य प्रस्थापित करावयाचे असते. हे ऐक्य प्रस्थापित झाल्यावर ईश्वर साधकाच्या साधनभूत अस्तित्वाचा प्रत्यक्ष मालक होतो, आपला पडदा दूर करून, उघडपणे मालक होतो आणि आपल्या उपस्थितीने व मार्गदर्शनाने साधकाचे मानवी अस्तित्व पूर्ण करतो, त्याच्या प्रकृतीच्या सर्व शक्ती पूर्णतासंपन्न करून त्याची दिव्य जीवन जगण्याची पूर्ण तयारी करून देतो.

– श्रीअरविंद