Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ४२

तुम्ही दिव्य ‘शक्ती’प्रत स्वत:ला उन्मुख, खुले करण्यासाठी ध्यान करू शकता, (तुमच्यातील) सामान्य चेतनेचा त्याग करण्यासाठी म्हणूनही तुम्ही ध्यान करू शकता, तुमच्या अस्तित्वामध्ये अधिक खोलवर प्रवेश व्हावा म्हणून तुम्ही ध्यान करू शकता, स्वत:चे पूर्णतया आत्मदान कसे करावे हे शिकण्यासाठी म्हणून तुम्ही ध्यान करू शकता. या अशा सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी तुम्ही ध्यान करू शकता. तुम्ही शांती, अचंचलता, निश्चल-नीरवता यांमध्ये प्रवेश व्हावा म्हणूनही ध्यान करू शकता. लोक बहुधा यासाठीच ध्यान करतात पण त्यात त्यांना यश मिळत नाही. रूपांतरणाची ‘शक्ती’ प्राप्त व्हावी म्हणूनदेखील तुम्ही ध्यान करू शकता, तुमच्यातील कोणत्या गोष्टींचे रूपांतर व्हायला हवे त्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता, प्रगतीची दिशा ठरविण्यासाठी ध्यान करू शकता. अगदी व्यावहारिक कारणांसाठीदेखील तुम्ही ध्यान करू शकता. तुम्हाला एखादी अडचण दूर करायची आहे, त्यावर उपाय शोधायचा आहे, एखाद्या कृतीमध्ये किंवा तत्सम एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 08 : 89)

साधना, योग आणि रूपांतरण – २० (भाग ०४)

माझ्या दृष्टीने, माझ्या अनुभवाच्या आधारे सांगायचे तर (आणि माझा अनुभव पुरेसा दीर्घ आहे, कारण गेली सुमारे तेहतीस वर्षे मी विविध लोकांच्या संपर्कात आहे; त्यांचे प्रश्न, त्यांची योगसाधना, त्यांचे आंतरिक प्रयत्न मला माहीत आहेत; मी येथेही आणि इतरत्र, जगभरामध्ये सर्वत्र ते प्रश्न हाताळले आहेत.) मला असे वाटते की, ध्यानाद्वारे तुम्ही स्वतःमध्ये रूपांतर घडवून आणू शकत नाही… उलटपक्षी, (कर्माबाबत) मात्र मला अगदी खात्रीच आहे.

तुम्हाला जे कर्म करणेच भाग आहे, मग ते कर्म कोणतेही असो, ते जर तुम्ही केलेत आणि ते करत असताना ‘ईश्वरा’चे विस्मरण होऊ नये म्हणून काळजी घेतलीत, सतर्क राहिलात; तुम्ही जे काही कर्म केले असेल ते ‘ईश्वरा’र्पण केलेत आणि ‘ईश्वरा’ने तुमच्या प्रतिक्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणावे म्हणून तुम्ही स्वतःचे आत्मदान केलेत; तुमच्या प्रतिक्रिया स्वार्थी, क्षुल्लक, मूर्ख आणि अज्ञ असण्याऐवजी तुम्ही त्या तेजोमय, उदार अशा बनविल्यात तर, (तुम्ही जर अशा रीतीने वागलात तर) तुम्ही प्रगती कराल. याप्रकारे, तुम्ही केवळ स्वतःचीच प्रगती केलेली असते असे नाही, तर तुम्ही सार्वत्रिक प्रगतीला देखील हातभार लावलेला असतो.

कमीअधिक प्रमाणात रिक्त, पोकळ ध्यान करण्यासाठी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, ध्यान करत बसले आहेत आणि त्यांनी बरीच प्रगती केली आहे, असे मला आढळले नाही; किंवा त्यांनी काही प्रगती केली असेलच तर ती अगदीच किरकोळ होती.

उलट, मी अशीही काही माणसं बघितली आहेत की, आपण योगसाधना करत आहोत असा त्यांच्यामध्ये कोणताही आविर्भाव नव्हता, परंतु ते, या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या उत्साहाने आणि ‘ईश्वरा’चे या जगामध्ये अवतरण होणार या संकल्पनेमुळे उत्साहाने भारलेले होते आणि त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले जे काही छोटेमोठे कार्य होते ते हृदयापासून, उत्साहाने, स्वतःमध्ये जे काही आहे ते, हातचे काहीही राखून न ठेवता, संपूर्णपणे झोकून देऊन केले होते. त्या पाठीमागे वैयक्तिक मुक्तीची कोणतीही स्वार्थी संकल्पना नव्हती, अशा लोकांनी उत्कृष्ट प्रगती, खरोखरच उत्कृष्ट प्रगती केलेली मी पाहिली आहे. आणि कधीकधी खरोखरच अशी माणसं अद्भुत असतात.

मी संन्यासी पाहिले आहेत, मठांमध्ये राहणारे लोक पाहिले आहेत, जे स्वतःला योगी म्हणवून घेतात अशी माणसंही मी पाहिली आहेत. पण अशी बारा माणसं आणि (वर सांगितल्याप्रमाणे,) उत्कृष्ट कार्य करणारी एक व्यक्ती यांची बरोबरीच होऊ शकत नाही. (म्हणजे मी हे, पृथ्वीच्या रूपांतरणाच्या आणि जगाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. म्हणजे आपण जे करू इच्छित आहोत, हे जग जसे आत्ता आहे ते तसेच राहू नये आणि ते खऱ्या अर्थाने, दिव्य चेतनेनिशी ‘ईश्वरी’ संकल्पाचे साधन बनावे या दृष्टिकोनातून मी हे म्हणत आहे.) या जगापासून दूर पलायन करून तुम्ही या जगामध्ये परिवर्तन घडवू शकणार नाही. तर इथेच राहून, विनम्रपणे, विनयाने परंतु हृदयामध्ये अर्पण भाव जागता ठेवून ते शक्य होईल. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 43-44)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२७)

(उत्तरार्ध)

(‘ईश्वरा’प्रति आत्मदान करण्याची प्रेरणा) ही प्रेरणा प्राणिक इच्छा नसते तर ती आत्म्याची प्रेरणा असते; (त्या पाठीमागे) एक तर्कही असतो पण तो मनाचा तर्क नसतो, तर तो आत्म्याचा आणि जीवात्म्याचा तर्क असतो. तेथेही एक मागणी असते, पण ती मागणी म्हणजे प्राणिक लालसा नसते तर ती आत्म्याची अंगभूत अभीप्सा असते. जेव्हा, “मी तुझा अमुक कारणासाठी शोध घेत आहे, मी तुझा त्या करणासाठी शोध घेत आहे,” अशी भाषा जाऊन तेथे, “मी तुझा शोध केवळ तुझ्यासाठीच घेत आहे,” असा बदल घडून येतो; म्हणजे जेव्हा निव्वळ आत्मदान घडून येते तेव्हा अशा प्रकारची अभीप्सा उदयाला येते. कृष्णप्रेम (रोनाल्ड हेनरी निक्सन नावाचे एक ब्रिटिश साधक, यांनी वैष्णव संप्रदायाचा स्वीकार केला.) जेव्हा म्हणतात, ‘ज्ञान नको, हेही नको आणि तेही नको, तर फक्त कृष्णच हवा,” तेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या या अदभुत आणि अनिर्वचनीय केवलाविषयी बोलायचे असते.

‘ईश्वरा’ची ओढ ही खरोखरच एक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आपल्यामधील जीवात्मा ‘ईश्वरा’कडे ओढला जातो कारण त्याला त्या महत्तर ‘आत्म्या’ची अनिवार्य हाक आलेली असते. जीवात्मा आपल्या आराध्य दैवताकडे अनिवार्यपणे ओढला जातो, कारण ‘ईश्वरा’शिवाय त्याचे अस्तित्वच असू शकत नाही. कारण जीवात्मा हा जीवात्मा असतो आणि ‘ईश्वर’ हा ‘ईश्वर’ असतो. ‘ईश्वरा’साठीच ईश्वराचा शोध, अन्य कशासाठीही नाही, असे आम्ही जेव्हा म्हणत असतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे स्पष्ट व्हावे म्हणून, (अर्थात जेवढे स्पष्ट करण्याजोगे होते तेवढे) मी हे सर्व लिहिले आहे. स्पष्टीकरण करण्याजोगे असू देत वा नसू देत, आध्यात्मिक अनुभूतीची ही एक सर्वात प्रभावी वास्तविकता असते. ‘आत्मदानाची प्रेरणा’ ही या वास्तविकतेची केवळ एक अभिव्यक्ती असते.

परंतु याचा अर्थ असा होत नाही की, मी तुमच्या ‘आनंदा’च्या मागणीवर आक्षेप घेत आहे. जोपर्यंत तुमच्या व्यक्तित्वाच्या कोणत्याही एखाद्या भागाला तशी गरज असते, तोपर्यंत तुम्ही खुशाल त्याची मागणी करू शकता, कारण जोपर्यंत आपल्यामध्ये सदोदित असलेली निरपवाद आंतरिक हाक, स्वतःला पृष्ठस्तरावर नेण्यासाठी जोर लावत नाही तोपर्यंत (आनंद, प्रकाश, शक्ती, ज्ञान, शांती इत्यादी) याच गोष्टी व्यक्तीला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाणाऱ्या असतात. आणि ही आंतरिक हाक खरोखरच अगदी आरंभापासूनच असते आणि पाठीशी असते – ती आध्यात्मिक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आत्म्याची ‘ईश्वरा’प्रति असलेली ही निखालस (absolute) गरज असते.

त्या ठिकाणी ‘आनंद’ असताच कामा नये, असे काही माझे म्हणणे नाही. आत्मदान म्हणजेच स्वयमेव एक अपार ‘आनंद’ असतो, आणि जेव्हा ते आत्मदान स्वत:सोबत ‘आनंद’ घेऊन येते, तेव्हा ते एक अनिर्वचनीय ‘आनंद’ जागृत करते आणि इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा, (निःस्वार्थी आत्मदान करणे) या पद्धतीद्वारे हा ‘आनंद’ लवकर गवसतो, म्हणून एखादी व्यक्ती असे म्हणू शकते की, “निःस्वार्थी आत्मदान ही सर्वोत्तम नीती आहे.” अर्थातच केवळ एक ‘नीती’ म्हणून ती व्यक्ती ते आत्मदान आचरणात आणत नाही. ‘आनंद’ हे फल असते, पण या फलासाठी आत्मदान केले जात नाही, तर ते स्वयमेव आत्मदानासाठी आणि साक्षात ‘ईश्वरा’साठीच केले जाते – यामध्ये अगदी सूक्ष्मसा फरक आहे; तो मानसिक आहे असे वाटेल, पण त्यामध्ये खरोखरच फरक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 12-13)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२२)

(श्रीअरविंदाश्रमामध्ये ज्याप्रकारचे लघुउद्योग, उद्योगव्यवसाय चालविले जातात ते पाहून, एका व्यक्तीने श्रीअरविंदांना कदाचित संन्यासमार्गाची महती सांगण्याचा प्रयत्न केला असावा असे दिसते. तेव्हा संन्यासमार्ग, दैनंदिन जीवन – व्यवहार, सर्व कर्म, गीतोक्त मार्ग, आध्यात्मिक प्रगती या साऱ्यांविषयीच श्री अरविंदांनी काही टिप्पणी केली आहे. त्यामधील हा अंशभाग…)

..एक संन्यासवादी ध्येयसुद्धा असते की जे काही जणांसाठी आवश्यक असते आणि आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्यालाही स्थान असते. मी स्वतः असे म्हणेन की, एखाद्या व्यक्तीला जर तपस्व्याप्रमाणे जीवन जगता आले नाही किंवा एखाद्या विरक्त व्यक्तीप्रमाणे अगदी किमान गरजांमध्ये जीवन जगता आले नाही तर ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या प्रकृतीमधून हावरटपणा किंवा इतर कोणताही हव्यास नाहीसा होणेच जितके आवश्यक असते; तितक्याच संपत्तीचा लोभ आणि नफेखोरी या गोष्टीदेखील तिच्या प्रकृतीमधून नाहीशा होणे आवश्यक असते, हे उघड आहे. आणि या गोष्टींबद्दलची सर्व प्रकारची आसक्ती आणि अन्य कोणताही हव्यास या गोष्टी व्यक्तीने स्वतःच्या चेतनेमधून काढून टाकणेच आवश्यक असते. परंतु आध्यात्मिक पूर्णतेसाठी संन्यासमार्ग हा जगण्याचा अगदी अनिवार्य मार्ग आहे किंवा संन्यासी वृत्तीने जीवन जगणे म्हणजेच आध्यात्मिक पूर्णता असे मात्र मी मानत नाही.

आणखी एक मार्गदेखील आहे. आणि तो मार्ग म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या कर्मामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये गुंतलेली असतानाही, किंवा ‘ईश्वरा’ला त्या व्यक्तीकडून ज्या सर्व प्रकारच्या कार्याची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कार्यामध्ये निमग्न असतानासुद्धा ती अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रति समर्पित होऊ शकते, आध्यात्मिक आत्मदान करू शकते आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्व मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 770-771)

विचारशलाका – ०४

व्यक्ती जर ‘ईश्वरा’प्रति विश्वासाने आणि खात्रीपूर्वक आत्मदान करेल तर ‘ईश्वरा’कडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल; आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल, पडदे हटवले जातील. व्यक्तीला हे आत्मदान जरी अगदी एकदम पूर्णत्वाने करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक प्रमाणात करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ‘ईश्वरा’चा संपर्क आणि त्याची अनुभूती वाढत राहील. शंकेखोर मनाची सक्रियता कमी झाली आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, दुसऱ्या कोणत्याच तपस्येची आणि बळाची आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 69]

संपूर्ण समता प्रस्थापित व्हायला वेळ लागतो. आणि ही समता पुढील तीन गोष्टींवर आधारित असते. – आंतरिक समर्पणाच्या द्वारे जीवाने ‘ईश्वरा’प्रत केलेले आत्म-दान, वरून अवतरित होणारी आध्यात्मिक स्थिरता व शांती, आणि समतेला विरोध करणाऱ्या, अहंकारी आणि राजसिक अशा साऱ्या भावनांना दृढ, दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण नकार.

यासाठी पहिली आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे, हृदयामध्ये संपूर्ण समर्पण व अर्पण भाव. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी प्रभावी होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये वृद्धी आणि समर्पण या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 131)

विचार शलाका – ११

अतिमानस योगाचा (पूर्णयोगाचा) पहिला शब्द ‘समर्पण’ हा आहे आणि त्याचा अंतिम शब्ददेखील ‘समर्पण’ हाच आहे. दिव्य चेतनेमध्ये उचलून घेण्यासाठी म्हणून, पूर्णत्वासाठी म्हणून आणि रूपांतरणासाठी म्हणून, व्यक्तीची त्या शाश्वत ‘दिव्यत्वा’प्रत आत्मदान करण्याची इच्छा, यापासून या ‘योगा’चा प्रारंभ होतो. आणि निःशेष आत्मदानामध्ये त्याची परिणती होते. कारण जेव्हा आत्मदान पूर्णत्वाला पोहोचते, तेव्हाच या योगाची पूर्णत्वदशा येते, तेव्हाच प्रकृतीचे रूपांतरण होणे, व्यक्तीला पूर्णत्वप्राप्ती होणे आणि अतिमानसिक ‘दिव्यत्वा’मध्ये समग्रतया उन्नत होणे, या गोष्टी घडून येतात.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 367)

ईश्वरी कृपा – ०१

संपूर्ण आविष्करणामध्ये, जग ज्या दुःखामध्ये, अंधकारामध्ये आणि ज्या मूर्खतेमध्ये पहुडले आहे त्यातून या जगाला बाहेर काढण्याचे काम ती अनंत ‘कृपा’ सातत्याने करत असते. अनंत काळापासून ही ‘ईश्वरी कृपा’ कार्यरत आहे, तिचे प्रयत्न अविरत चालू आहेत आणि असे असूनदेखील, अधिक महान, अधिक सत्य, अधिक सुंदर अशा गोष्टींच्या आवश्यकतेची जाणीव होण्यासाठी या जगाला हजारो वर्षे लागली !

आपल्या स्वतःच्याच अस्तित्वामध्ये आपल्याला विरोधाचा जो सामना करावा लागतो त्यावरून, ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याला या जगाचा किती प्रचंड विरोध होत असेल याचे अनुमान, प्रत्येकजण लावू शकतो.

आणि तेव्हाच मग ऊर्ध्वस्थित असलेल्या ‘प्रकाशा’प्रत आणि ‘शक्ती’प्रत आणि जे ‘सत्य’ स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात आहे त्या ‘सत्या’प्रत, जर सर्व गोष्टी संपूर्णपणे अर्पण केल्या नाहीत, तर सगळ्या बाह्य गोष्टी, सगळ्या मानसिक रचना, सगळे भौतिक प्रयत्न हे व्यर्थ आहेत, फोल आहेत हे व्यक्तिला उमगते; तेव्हा अशी व्यक्ती निणार्यक प्रगती करण्यासाठी सिद्ध होते. आणि मग ज्याच्यामध्येच सर्वकाही परिवर्तन करण्याची शक्ती आहे अशा, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्या ‘ईश्वरा’ला आपल्या अस्तित्वाचे परिपूर्ण, समग्र आणि उत्कट असे आत्मदान करणे, हाच व्यक्तिचा एकमेव खरा प्रभावी दृष्टिकोन असतो.

जेव्हा तुमच्या अंतरंगात असणाऱ्या आत्म्याप्रत तुम्ही खुले होता तेव्हा, जे जीवन खरोखरच जगण्याजोगे आहे, अशा उच्चतर जीवनाची तुम्हाला गोडी चाखायला मिळते आणि त्यानंतर तुमच्यामध्ये त्या जीवनाप्रत उन्नत होण्याची, तेथवर जाऊन पोहोचण्याची इच्छा उदयाला येते, आणि मग ‘हे शक्य आहे’ असा विश्वास निर्माण होतो आणि अंतिमतः त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याचे सामर्थ्य निर्माण होते आणि अगदी ध्येयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाण्याचा संकल्प उदयास येतो.

सर्वप्रथम व्यक्तिने जागे झाले पाहिजे, तेव्हाच व्यक्ती विजय प्राप्त करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 419-420)

समर्पण – १५

ईश्वराशी ऐक्य म्हणजे योग आणि योग हा आत्मदानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात येतो – तुम्ही ईश्वराप्रत जे आत्मदान करता त्याच्या पायावर तो उभा राहतो. प्रारंभी तुम्ही या आत्मदानाची सुरुवात अगदी सरसकट करता, म्हणजे जणू कायमसाठी एकदाच आत्मदान करता; तुम्ही म्हणता, ‘मी ईश्वराचा सेवक आहे, माझे जीवन मी पूर्णतः ईश्वराला दिले आहे, आणि माझे सारे प्रयत्न दिव्य जीवनाच्या साक्षात्कारासाठीच आहेत.” परंतु ही फक्त पहिली पायरी आहे, कारण ही गोष्ट पुरेशी नाही. जरी तुम्ही निश्चय केलेला आहे, जरी तुम्ही तुमचे संपूर्ण जीवन ईश्वराला देऊ करण्याचे ठरविलेले आहे तरीदेखील प्रत्येक क्षणाला तुम्हाला त्याची आठवण ठेवली पाहिजे आणि तुमच्या अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी ती प्रत्यक्षात उतरविली पाहिजे. तुम्हाला प्रत्येक पावलागणिक ही आठवण पाहिजे की, तुम्ही ईश्वराचे आहेत; तुम्ही कोणताही विचार करत असा किंवा कर्म करत असा, तुमच्या माध्यमातून ती ईश्वरी चेतनाच कार्य करत आहे, असा तुम्हाला सतत अनुभव यायला पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीला तुमची स्वतःची असे संबोधू शकाल अशी कोणतीच गोष्ट असता कामा नये; सारे काही ईश्वराकडूनच येत आहे असे तुम्हाला जाणवले पाहिजे आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्ट त्या त्या गोष्टीच्या स्रोताला परत अर्पण केली पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्हाला याची जाणीव होते तेव्हा, एरवी ज्या गोष्टीकडे तुम्ही फारसे लक्ष पुरविले नसते, किंवा ज्याची एरवी फारशी पर्वा केली नसती अशा कोणत्याच गोष्टी आता क्षुल्लक, किरकोळ उरत नाहीत; त्या साऱ्यांनाच एक अर्थ प्राप्त होतो आणि पलीकडील एक विशाल क्षितिज खुले होते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 23)

समर्पण – १४

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; आडपडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल. आणि व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी असे आत्मदान करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढतीवाढती राहील. तुमच्यामधील शंका घेणारे मन जर कमी सक्रिय बनले आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी आत्मदानाव्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)