Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २३५

व्यक्ती आणि तिचे घटक यांच्या व्यवस्थेमध्ये एकाचवेळी दोन प्रणाली कार्यरत असतात. त्यातील एक केंद्रानुगामी असते. या प्रणालीमध्ये वर्तुळांची किंवा कोशांची एक मालिका असते, आणि तिच्या केंद्रस्थानी अंतरात्मा असतो. दुसरी प्रणाली ऊर्ध्व-अधर (vertical) अशी असते. म्हणजे यामध्ये आरोहण आणि अवरोहण असते, पायऱ्या-पायऱ्यांची एक शिडी असावी तशी ती असते. मनुष्याकडून ‘ईश्वरा’कडे होत जाणाऱ्या संक्रमणामध्ये, एकावर एक रचलेल्या स्तरांची जणू ही मालिकाच असते आणि त्यामध्ये अधिमानस (Overmind) व अतिमानस (Supermind) हे महत्त्वाचे टप्पे असतात.

हे संक्रमण घडून यायचे असेल तर आणि त्याच वेळी ते रूपांतरण देखील ठरावे असेही अपेक्षित असेल तर त्यासाठी, केवळ एकच मार्ग असतो. प्रथम, अंतर्मुखी परिवर्तन झाले पाहिजे, व्यक्तीने आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध घेण्यासाठी अंतरंगात शिरले पाहिजे आणि त्यास अग्रस्थानी आणले पाहिजे. आणि त्याचवेळी प्रकृतीचे आंतरिक मन, आंतरिक प्राण व आंतरिक शरीराचे घटक उघड केले पाहिजेत. नंतर, आरोहणाची प्रक्रिया केली पाहिजे. म्हणजे ऊर्ध्वगामी परिवर्तनाची एक मालिकाच तेथे असली पाहिजे आणि निम्न स्तरावरील घटकांचे परिवर्तन करण्यासाठी चेतनेने पुन्हा खाली उतरून आले पाहिजे. व्यक्तीने जेव्हा अंतर्मुखी परिवर्तन घडवून आणलेले असते तेव्हा समग्र कनिष्ठ प्रकृती दिव्य परिवर्तनासाठी सुसज्ज व्हावी यासाठी व्यक्ती त्या प्रकृतीचे आंतरात्मिकीकरण घडवते. ऊर्ध्वगामी होत असताना, व्यक्ती मानवी मनाच्या अतीत जाते आणि आरोहणाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीचे एका नवीन चेतनेमध्ये परिवर्तन होते आणि त्याचवेळी या नवीन चेतनेचा व्यक्तीच्या समग्र प्रकृतीमध्ये संचार होतो.

अशा रीतीने जेव्हा आपण बुद्धीच्या पलीकडे आरोहण करत, प्रकाशित उच्च मनाच्या (illuminated higher mind) माध्यमातून अंतःस्फूर्त (intuitive) चेतनेमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण सर्व गोष्टींकडे बौद्धिक श्रेणीतून नाही किंवा बुद्धी या साधनाच्या माध्यमाद्वारे नाही तर अधिक महान अशा अंतःस्फूर्त उंचीवरून आणि अंतःस्फूर्तिमय झालेल्या इच्छा, भावभावना, संवेदना आणि शारीरिक संपर्काच्या माध्यमाद्वारे पाहू लागतो. म्हणून, अंतःस्फूर्त मनाकडून त्यापेक्षाही महान असलेल्या अधिमानसिक उंचीवर जाताना, एक नवीन परिवर्तन होते आणि आपण प्रत्येक गोष्ट अधिमानसिक चेतनेमधून आणि अधिमानसिक विचार, दृष्टी, इच्छा, भावना, संवेदना, शक्तीक्रीडा आणि संपर्काने प्रभावित झालेल्या मन, हृदय, प्राण आणि शरीर यांच्याद्वारे पाहू लागतो, अनुभवू लागतो. परंतु अंतिम परिवर्तन हे अतिमानसिक असते, कारण एकदा का आपण तेथे पोहोचलो, एकदा का प्रकृतीचे अतिमानसिकीकरण झाले की मग आपण ‘अज्ञान’दशेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलो असतो आणि मग चेतनेचे परिवर्तन गरजेचे राहत नाही. अर्थात त्यापुढेही दिव्य प्रगती, किंबहुना अनंत विकसन होणे अजूनही शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 84-85)

साधना, योग आणि रूपांतरण – १९१

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०७

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या सर्वाप्रत खुले होणे आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वाप्रत उन्मुख होणे या दोन गोष्टी येथे सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. हृदय-चक्र हे चैत्य-पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर सिद्धीचे मुख्य साधन असते. ही साधनेची मूलभूत संगती (rationale) आहे.

‘ईश्वरा’ने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे यासाठी तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे यासाठी त्यास हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिले खुलेपण (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची अभीप्सा बाळगत असतो त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाबदेखील यामध्ये समाविष्ट असते.

आधी मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर, चेतनेचे एककेंद्रीकरण केले असता तसेच ईश्वरी ‘शांती’, ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे अस्तित्वामध्ये अवतरण घडून यावे म्हणून आवाहन केले असता, आणि आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगली असता दुसरी उन्मुखता घडून येते. (काही जणांबाबत आधी फक्त ‘शांती’ येते तर अन्य काही जणांबाबत, शांती व सामर्थ्य एकत्रितपणे येते.)

काही जणांना प्रथम ‘प्रकाशा’चा किंवा ’आनंदा’चा लाभ होतो किंवा मग त्यांच्यावर अचानकपणे ज्ञानाचा वर्षाव होतो. काही जणांच्या बाबतीत असे होते की, त्यांच्यामध्ये असणारी उन्मुखता ही, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या एका विशाल अनंत ‘निरवते’चे, ‘शक्ती’चे, ‘प्रकाशा’चे किंवा ‘आनंदा’चे त्यांच्यासमोर प्रकटीकरण करते. आणि नंतर एकतर त्या व्यक्ती या गोष्टींप्रत आरोहण करतात किंवा मग या गोष्टी त्या व्यक्तींच्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये अवरोहण करू लागतात. तर अन्य काही जणांच्या बाबतीत एकतर आधी मस्तकामध्ये अवरोहण होते नंतर हृदयाच्या पातळीवर अवरोहण होते, नंतर नाभी आणि नंतर त्याहून खाली आणि मग संपूर्ण देहाच्या माध्यमातून अवरोहण घडून येते किंवा मग एक प्रकारची अवर्णनीय (inexplicable) उन्मुखता आढळते, तेथे शांती, प्रकाश, व्यापकता किंवा शक्ती यांच्या अवरोहणाची कोणतीही जाणीव नसते. किंवा मग तेथे वैश्विक चेतनेमध्ये क्षितिजसमांतर खुलेपणा आढळून येतो किंवा अकस्मात विशाल झालेल्या मनामध्ये ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आढळतो. यापैकी जे काही घडते त्याचे स्वागत केले पाहिजे; कारण सर्वांसाठी एकच एक असा निरपवाद नियम नसतो. परंतु सुरुवातीला शांती अवतरित झाली नाही (आणि समजा नीरवता, शक्ती, प्रकाश आणि आनंद यापैकी काहीही जरी अवतरित झाले तरी), व्यक्तीने अत्यानंदाने फुलून न जाण्याची किंवा संतुलन ढळू न देण्याची काळजी घेतली पाहिजे. काहीही असले तरी, ईश्वरी शक्ती, श्रीमाताजींची शक्ती जेव्हा अवतरित होते आणि ताबा घेते तेव्हाच मुख्य प्रक्रिया घडून येते, कारण तेव्हाच चेतनेच्या सुसंघटनेला प्रारंभ होतो आणि योगाला व्यापक अधिष्ठान प्राप्त होते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 327-328)

साधना, योग आणि रूपांतरण – ८४

(आरोहण आणि अवरोहण प्रक्रियेचे परिणाम काय घडून येतात हे कालच्या भागात आपण पाहिले.)

एकदा हे अवरोहण स्वाभाविक झाले की, श्रीमाताजींची ‘दिव्य शक्ती’ आणि त्यांची ‘ऊर्जा’ कार्य करू लागते, आणि आता ती केवळ वरून किंवा पडद्याआडूनच कार्य करते असे नव्हे तर ती खुद्द ‘आधारा’मध्येच सचेतरितीने कार्यरत होते आणि आधाराच्या अडीअडचणी, त्याच्या संभाव्यता या गोष्टी हाताळू लागते आणि ती ‘दिव्य शक्ती’च तुमची योगसाधना करू लागते.

आणि मग सरतेशेवटी, सीमा ओलांडण्याची वेळ येते. तेथे चेतना निद्रिस्त नसते किंवा तिच्यात घट झालेली नसते. कारण चेतना ही सदासर्वकाळ तेथे असतेच; फक्त आता ती चेतना बाह्यवर्ती आणि भौतिकातून निघून, बाह्यवर्ती गोष्टींना आपली द्वारे बंद करून घेते आणि अस्तित्वाचा भाग असणाऱ्या आंतरिक आत्म्यामध्ये आणि प्राणामध्ये प्रवेश करण्यासाठी काहीशी मागे सरकते. आणि तेथे चेतना अनेकानेक अनुभवांमधून प्रवास करते. यामधील काही अनुभव हे जागृतावस्थेमध्ये सुद्धा जाणवले पाहिजेत, आणि तसे ते जाणवू शकतात. कारण, आंतरिक अस्तित्व अग्रभागी येणे आणि आंतरिक अस्तित्वाची आणि प्रकृतीची जाणीव होण्यासाठी चेतनेने अंतरंगामध्ये प्रविष्ट होणे, या दोन्हीही प्रक्रिया आवश्यक असतात.

अनेक कारणांसाठी चेतनेची ही अंतराभिमुख प्रक्रिया अपरिहार्य असते. अभिव्यक्त होण्यासाठी अगदी अंशतः प्रयत्नशील असणारे आंतरिक अस्तित्व आणि बाह्य साधनभूत चेतना यांच्यामधला जो अडथळा आहे तो अडथळा मोडून पडण्यामध्ये किंवा किमान तो दूर होऊन, त्यातून पलीकडे जात येण्यामध्ये तिचा (अंतराभिमुख प्रक्रियेचा) प्रभाव दिसून येतो. त्यामुळे अनंत समृद्ध संभाव्यतेबाबत आणि अनुभूतीबाबत एक सचेत जाणीव भविष्यामध्ये निर्माण व्हावी आणि लोकं ज्याला चुकीने स्वतःचे संपूर्ण अस्तित्वच मानतात, त्या छोट्या, अगदी अंध आणि मर्यादित शारीरिक व्यक्तिमत्त्वाच्या पडद्याआड अलक्षितपणे पहुडलेल्या नवीन अस्तित्वाची आणि नव्या जीवनाची जाणीव (त्या लोकांना) भविष्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी तिचा प्रभाव कृतिशील असतो. (चेतनेने) अंतराभिमुख होत घेतलेली बुडी आणि या आंतरिक जगतामधून पुन्हा जागृतावस्थेमध्ये येणे या दरम्यान गहनतर, संपूर्ण आणि समृद्ध असणाऱ्या जाणिवेचा प्रारंभ होतो आणि ती जाणीव निरंतर विस्तार पावू लागते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217)

साधना, योग आणि रूपांतरण – ८३

(साधकाला चेतनेच्या आरोहणाचा आणि अवरोहणाचा अनुभव कसा प्रतीत होतो, हे कालच्या भागात आपण पाहिले.)

आरोहण प्रक्रियेचे (ascension) विविध परिणाम आढळून येतात. ही प्रक्रिया चेतनेला मुक्त करू शकते त्यामुळे तुम्ही शरीरामध्ये बंदिस्त नाही किंवा शरीराच्या वर आहात असा अनुभव तुम्हाला येतो, किंवा तुम्ही शरीरासह इतके विशाल होता की जणूकाही तुमचे शारीर-अस्तित्व उरतच नाही. किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या मुक्त विशालतेमधील केवळ एक बिंदू आहात असा तो अनुभव असतो. त्यामुळे व्यक्तीला किंवा तिच्या एखाद्या घटकाला शरीरातून बाहेर पडता येते आणि तो घटक इतरत्र जाऊ शकतो. शरीरातून बाहेर पडून इतरत्र जाण्याच्या या कृतीसोबतच सहसा एक प्रकारच्या आंशिक समाधीची अन्यथा संपूर्ण योगतंद्रीची अवस्था येते. किंवा त्यामुळे चेतना सशक्त होऊ शकते. आता ती चेतना शरीरापुरतीच किंवा बाह्यवर्ती प्रकृतीच्या सवयींपुरतीच मर्यादित राहत नाही. त्याची परिणती चेतना अंतरंगामध्ये शिरण्यामध्ये, आंतरिक मानसिक गहनतांमध्ये प्रवेश करण्यामध्ये, तसेच चेतना आतंरिक प्राणामध्ये, आंतरिक सूक्ष्म देहामध्ये, अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यामध्ये होते. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या अगदी आंतरतम चैत्य अस्तित्वाविषयी किंवा आंतरिक मानसिक, प्राणिक आणि सूक्ष्म शारीर अस्तित्वाविषयी सजग होते. त्यामुळे व्यक्ती प्रकृतीच्या घटकांशी संबंधित असणाऱ्या त्या त्या क्षेत्रांमध्ये, त्या स्तरांमध्ये, त्या जगतांमध्ये वास्तव्य करण्यास आणि तेथे वावरण्यास सक्षम होते.

कनिष्ठ चेतनेच्या या पुनःपुन्हा आणि नित्य होणाऱ्या आरोहणामुळे मन, प्राण आणि शरीर हे घटक अतिमानसिक स्तरापर्यंतच्या उच्चतर स्तरांच्या संपर्कात येण्यासाठी सक्षम होतात आणि त्या उच्चतर स्तरांच्या प्रकाशामुळे, त्यांच्या शक्तीमुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे भारित होतात. आणि पुनःपुन्हा व नित्य होणारे ‘दिव्य चेतने’चे आणि तिच्या ‘ऊर्जे’चे हे अवरोहण हेच समग्र अस्तित्वाच्या आणि समग्र प्रकृतीच्या रूपांतरणाचे साधन असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 216)

साधना, योग आणि रूपांतरण – ८२

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांमधील आवरण भेदण्याच्या प्रक्रियेसंबंधी आपण कालच्या भागात माहिती घेतली.)

ही आंतरिक प्रक्रिया अनेक प्रकारे घडू शकते. आणि संपूर्णपणे बुडी घेण्याच्या ज्या सर्व खुणा असतात त्या सर्व एकत्रितपणे आढळून येतील असा एक व्यामिश्र अनुभवदेखील कधीकधी येऊ शकतो. आपण कोठेतरी आतमध्ये जात आहोत किंवा खूप खोलवर जात आहोत अशी एक संवेदना त्यामध्ये असते. आंतरिक गहनतेच्या दिशेने प्रवास चालू असल्याची जाणीव असते; आणि बरेचदा एक स्थिरतेची, सुखद सुन्नतेची (numbness), आणि हातपाय जड झाल्याची जाणीव असते. वरून येणाऱ्या शक्तीच्या दबावामुळे चेतना, शरीरामधून निघून अंतरंगामध्ये वळत असल्याची ती खूण असते. त्या दबावामुळे शरीर हे आंतरिक जीवनासाठी (आवश्यक असणाऱ्या) एका अचल आधाराचे रूप घेते किंवा एक प्रकारच्या सुदृढ आणि स्थिर उत्स्फूर्त आसनाच्या स्थितीमध्ये येते. लाटा खालून वर डोक्यापर्यंत उसळत आहेत अशा प्रकारची एक जाणीव असते, आणि त्यामुळे बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक जागृतीचा अनुभव येतो.

आधारामधील (मन, प्राण, शरीर यातील) कनिष्ठ चेतना वर असणाऱ्या उच्चतर चेतनेस भेटण्यासाठी आरोहण (ascend) करत असते. तांत्रिक मार्गामध्ये ज्यावर खूप भर दिला जातो त्या कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती असते. कुंडलिनी शक्ती शरीरामध्ये वेटोळे घातलेल्या स्थितीत सुप्त असते आणि ती मज्जारज्जूद्वारे आरोहण करत जाते आणि चक्रांच्या माध्यमातून ब्रह्मरंध्राच्याही वर स्थित असणाऱ्या ‘ईश्वरा’ला भेटण्यासाठी ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, या प्रक्रियेशी तो अनुभव समकक्ष असतो. आमच्या पूर्णयोगामध्ये, ही काही विशेष अशी प्रक्रिया नसते, तर समग्र कनिष्ठ चेतना ही कधी प्रवाहांच्या रूपात तर कधी लाटांच्या रूपात उत्स्फूर्तपणे वर उसळी मारत असते, तर कधीकधी ही प्रक्रिया कमी सघन असते. आणि दुसऱ्या बाजूने, ‘ईश्वरी चेतना’ आणि तिच्या ‘शक्ती’चे शरीरामध्ये अवरोहण (descent) होत असते. स्थिरता आणि शांती, ऊर्जा आणि शक्ती, प्रकाश, मोद आणि आनंद, व्यापकता आणि मुक्तता, आणि ज्ञान या गोष्टी जणू शरीरामध्ये वरून ओतल्या जात आहेत असा तो अवरोहणाचा अनुभव असतो. ‘ईश्वरी अस्तित्वा’चा किंवा ‘उपस्थिती’चा अनुभव येतो. कधीकधी यापैकी एखादा तर कधी त्यातील बरेचसे किंवा कधीकधी तर सर्वच एकत्रितपणे, असा अनुभव येतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 215-216)

साधना, योग आणि रूपांतरण – ७७

[श्रीअरविंद येथे अवरोहण (descent) प्रक्रियेच्या संदर्भात काही सांगत आहेत.]

पूर्वीचे योग हे प्रामुख्याने अनुभवांच्या मनो-आध्यात्मिक अतींद्रिय श्रेणींपुरतेच मर्यादित असत. त्यामध्ये उच्चतर अनुभव हे स्थिर मनामध्ये किंवा एकाग्रचित्त हृदयामध्ये एक प्रकारे झिरपत येतात किंवा प्रतिबिंबित होतात. या अनुभवाचे क्षेत्र हे ब्रह्मरंध्रापासून खाली असते. साधक (ब्रह्मरंध्राच्या) वर फक्त समाधी अवस्थेमध्येच जात असत किंवा अचल मुक्तीच्या स्थितीमध्ये जात असत, पण त्यांना गतिशील अवरोहणाचा कोणताही अनुभव येत नसे. (मला) जे जे गतिशील अनुभव आले होते ते सर्व अनुभव, आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाच्या आणि प्राणिक-शारीरिक (vital-physical) चेतनेच्या क्षेत्रामध्ये आले होते. (काही विशिष्ट मनो-आध्यात्मिक-अतींद्रिय अनुभवांद्वारे, साधकाच्या कनिष्ठ क्षेत्राची, प्रकृतीची पूर्वतयारी झाल्यानंतर), पूर्णयोगामध्ये चेतना ही ब्रह्मरंध्राच्या वर, मूलभूत आध्यात्मिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या उच्चतर श्रेणींप्रत ऊर्ध्वाभिमुख केली जाते. आणि तेथून नुसते काही ग्रहण करण्याऐवजी, चेतनेने तिथे निवास करून, तेथून कनिष्ठ चेतना पूर्णपणे परिवर्तित करणे अपेक्षित असते. कारण आध्यात्मिक चेतनेला साजेशी गतिशीलता, क्रियाशक्ती (dynamism) तेथे असते. दिव्य ‘प्रकाश’, ‘ऊर्जा’, ‘आनंद’, ‘शांती’, ‘ज्ञान’ आणि अनंत ‘बृहत्व’ हे तिचे स्वरूप असते आणि त्यांचे समग्र अस्तित्वामध्ये अवरोहण झाले पाहिजे. आणि साधकाने या सर्व गोष्टी प्राप्त करून घेतल्या पाहिजेत. अन्यथा त्याला मुक्ती लाभू शकते (सापेक्ष मनो-आध्यात्मिक बदल घडू शकतो.) परंतु त्याला पूर्णत्व मिळत नाही किंवा त्याचे रूपांतरण होऊ शकत नाही.

परंतु मी जर तसे म्हटले तर, ‘प्राचीन संतमहात्म्यांना अवगत नसलेले ज्ञान माझ्यापाशी आहे,’ असा दावा मी करत आहे आणि मी संतमहात्म्यांच्या अतीत गेलो असल्याचे दाखवितो आहे, अशी लोकांची समजूत होईल आणि या अक्षम्य गृहितकाच्या विरोधात गदारोळ उठेल. या संदर्भात मी असे म्हणू शकतो की, उपनिषदांमध्ये (नेमकेपणाने सांगायचे तर तैत्तरिय उपनिषदामध्ये) या उच्चतर स्तरांचे व त्यांच्या स्वरूपाचे आणि समग्र चेतना एकवटण्याच्या व त्या स्तरांमध्ये आरोहण करण्याच्या शक्यतेचे काही संकेत मिळतात. परंतु कालांतराने हे ज्ञान विस्मृतीमध्ये गेले आणि बुद्धी हीच सर्वोच्च गोष्ट आहे, आणि तिच्या किंचित वर ‘पुरूष’ किंवा ‘आत्मा’ आहे असे लोकं म्हणू लागले. परंतु त्यांना या उच्चतर स्तरांची सुस्पष्ट कल्पना नव्हती. परिणामी, समाधी अवस्थेमध्ये संभवतः, अज्ञाताप्रति आणि अनिर्वचनीय स्वर्गीय प्रदेशांमध्ये आरोहण होण्याची शक्यता असे; पण अवरोहण शक्य होत नसे. आणि त्यामुळे तशी संसाधनेसुद्धा उपलब्ध नसत; त्यामुळेच येथे भौतिकामध्ये रूपांतरणाचीही कोणती शक्यताच नसे. केवळ या जीवनापासून सुटका आणि गोलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, शिवलोकामध्ये किंवा परब्रह्मामध्ये मुक्ती लाभत असे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 378-379)

साधना, योग आणि रूपांतरण – ७६

(कधीकधी) असे होते की साधकांना अवरोहणाचा अनुभव येतो; पण त्यांना हे ‘अवरोहण’ (descent) आहे हे लक्षात येत नाही. कारण त्यांना केवळ त्याच्या परिणामाचीच जाणीव होते. प्रचलित योग आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही. अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य झाल्याचे जाणवते, परंतु त्यांना मस्तक-शिखराहूनही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याचप्रमाणे प्रचलित योगामध्ये व्यक्तीला जागृत झालेल्या आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनीच्या) ब्रह्मरंध्राप्रत होणाऱ्या आरोहणाची जाणीव असते; (येथे प्रकृती ब्रह्म-चेतनेशी युक्त होते.) मात्र व्यक्तीला अवरोहणाचा अनुभव येत नाही.

काही जणांना अशा गोष्टी अनुभवास आल्याही असतील पण, त्यांचे स्वरूप, त्यांचे तत्त्व किंवा समग्र साधनेमधील त्यांचे स्थान त्यांना उमगले होते की नाही, कोण जाणे? मला स्वतःला जोपर्यंत असा अनुभव आला नव्हता तोपर्यंत, मी तरी हे इतर कोणाकडून कधी ऐकले नव्हते. याचे कारण पूर्वीचे योगी जेव्हा आध्यात्मिक मनाच्या अतीत जात असत, तेव्हा ते समाधीमध्ये निघून जात असत; याचा अर्थ असा की, (आध्यात्मिक मनाच्या वर, ब्रह्मरंध्राच्या वर असणाऱ्या) या उच्चतर पातळ्यांविषयी सजग होण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नव्हता. ‘अतिचेतनेमध्ये (Superconscient) निघून जाणे’ हे त्यांचे उद्दिष्ट होते. ‘जाग्रत चेतनेमध्ये (waking consciousness) अतिचेतन उतरविणे’ हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते, परंतु हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377-378)

साधना, योग आणि रूपांतरण – ७५

निश्चल – नीरवतेचे (silence) ‘अवरोहण’ ही गोष्ट मी इतर योग-प्रणालींमध्ये ऐकलेली नाही; इतर योगांमध्ये मन निश्चल-नीरवतेमध्ये ‘प्रविष्ट होणे’ हा भाग आढळून येतो. पण तरीदेखील मी जेव्हापासून आरोहण (ascent) आणि अवरोहण (descend) यांविषयी लिहीत आहे तेव्हापासूनच मला अनेक ठिकाणाहून असे सांगितले जात आहे की, (मी सांगत आहे त्या) या योगामध्ये नवीन असे काहीच नाही. आणि म्हणून मला नवल वाटते की, आरोहण आणि अवरोहण म्हणजे काय, हे माहीत नसताना त्यांना त्याचा अनुभव येत होता की काय? किंवा असे होते काय की, त्यांचे त्या प्रक्रियेकडे लक्ष गेले नव्हते?

या योगामध्ये मला आणि इतरांना जो अनुभव आलेला आहे तो असा आहे की, चेतना मस्तकाच्या वर आरोहण करते आणि तेथे वास्तव्य करते. मी जेव्हा प्रथम याविषयी बोललो होतो तेव्हा लोकं माझ्याकडे बघायला लागले आणि मी काहीतरी निरर्थक बोलत आहे असा विचार करू लागले. पूर्वीच्या योगमार्गाचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना व्यापकतेची जाणीव नक्कीच झालेली असली पाहिजे कारण अन्यथा स्वतःमध्ये विश्व सामावले असल्याचा अनुभव त्यांना आला नसता किंवा शारीर-चेतनेपासून स्वतंत्र झाल्याचा किंवा ‘अनंतम् ब्रह्मा’शी एकत्व पावल्याचा अनुभव त्यांना आला नसता.

सर्वसाधारणपणे, उदाहरणार्थ तंत्रयोगामध्ये, मस्तकाच्या शिखरावर, ब्रह्मरंध्रापर्यंत आरोहण करणाऱ्या चेतनेचा अनुभव हा सर्वोच्च असल्याचे सांगितले जाते. राजयोगामध्येसुद्धा सर्वोच्च अनुभव घेण्याचे साधन म्हणून ‘समाधी’वर भर दिलेला आढळतो. परंतु हे स्पष्टच आहे की, व्यक्ती जर जाग्रतावस्थेमध्ये ‘ब्राह्मी स्थिती’ मध्ये नसेल तर त्या साक्षात्काराला पूर्णता प्राप्त होऊ शकत नाही. भगवद्गीता अगदी सुस्पष्टपणे ‘समाहित’ असण्यासंबंधी सांगते. (ही अवस्था समाधीमध्ये असणाऱ्या अवस्थेशी समांतर असते.) तसेच ब्राह्मी स्थितीसंबंधीही भगवद्गीतेमध्ये सुस्पष्टपणे उल्लेख येतो. ही अशी एक स्थिती असते की, ज्यामध्ये व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये (समाधी-अवस्थेत असल्याप्रमाणे) जीवन व्यतीत करते आणि सर्व क्रियाकलाप करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377)

साधना, योग आणि रूपांतरण – ०७

‘ईश्वरा’कडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. ध्यानामुळे जर (‘ईश्वर शक्ती’चे) अवरोहण (descent) घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

‘कर्म’ हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ‘ईश्वरा’ऐवजी, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ‘ईश्वर’ हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

प्रेम, भक्ती, …या गोष्टी ‘ईश्वरा’कडे पोहोचण्याचे जवळचे मार्ग असतात किंवा असू शकतात. (असू शकतात असे म्हणण्याचे कारण की) प्रेम आणि भक्ती या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान, नैराश्य या गोष्टींमध्ये (सी-सॉ सारखी) दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम व भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ‘ईश्वरा’कडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, व्यक्ती स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवतीच घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212)