Posts

विचार शलाका – १६

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामधील आपल्या जन्माचे गुप्त सत्य असेल तर, आजचा मनुष्य हा त्या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे आणि ते केवळ साधनभूत आहे. मन हे चेतनेचा केवळ एक मधला टप्पा आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि मनुष्य जर का अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

पण मनाच्या अतीत असणाऱ्या गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनुष्याच्याच मनाची क्षमता असेल तर मग त्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानव तत्त्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्याच्या उत्क्रांतीसाठी आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २२

केवळ अतिमानव बनण्याच्या कल्पनेने या योगाकडे वळणे ही प्राणिक अहंकाराची कृती ठरेल आणि त्यामुळे या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ ठरेल. जी माणसे त्यांच्या सर्व क्रियाकलापांसमोर हे उद्दिष्ट ठेवतात त्यांना अपरिहार्यपणे आध्यात्मिक आणि अन्य दु:खं सहन करावी लागतात. विभक्तकारी अहंकाराचे दिव्य चेतनेमध्ये विलयन करून, त्या द्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रथम प्रवेश करणे (त्या अनुषंगाने, म्हणजे असे करत असताना, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या व्यक्तिगत ‘स्व’चा शोध लागतो; हा ‘स्व’ म्हणजे मर्यादित, निरर्थक आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर, तो ईश्वराचा अंश असतो.) आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी म्हणून अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या योगाचे ध्येय आहे. बाकी सर्व गोष्टी या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या योगाचे मुख्य उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 21)

आज आहे तो मानववंश तसाच कायम ठेवण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, तिचे आज्ञाधारकपणे पालन करण्यासाठी, हा देह प्रकृतीच्या साध्यपूर्तीसाठी स्वाधीन करावयाचा का, ह्याच देहाला एका नूतन वंशाच्या निर्मितीसाठीचे एक पुढचे पाऊल म्हणून तयार करावयाचे, ह्यामधील निर्णायक निवड करावी लागेल.

ह्या दोन्ही बाबी एकत्रितपणे असू शकत नाहीत; प्रत्येक क्षणाला तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की, तुम्ही कालच्या मनुष्यत्वामध्ये राहू इच्छिता का उद्याच्या अतिमानवतेमध्ये?

– श्रीमाताजी
(CWM 14 : 127)

…एका नूतन विश्वाचे आगमन, अतिमानस विश्वाचे आगमन साजरे करणे हे एक अद्भुत आणि अपवादात्मक भाग्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 98)

श्रीमाताजी म्हणतात : दि. ०१ जानेवारी १९६९ रोजी मध्यरात्री दोन वाजताचा प्रहर होता… अतिमानवी चेतना पृथ्वी चेतनेमध्ये अवतरली आणि प्रस्थापित झाली. चेतना, ऊर्जा, शक्ती, प्रकाश, आनंद आणि शांती यांनी परिपूर्ण भरलेले असे ते अद्भुत अवतरण होते आणि त्याने संपूर्ण पृथ्वीचे वातावरण भरून गेले. सद्यकालीन मनोमय चेतना आणि अतिमानसिक चेतना यांच्या मधील हा एक दुवा आहे असे मला जाणवले. ही अतिमानवाची चेतना अवतरित होत होती. जी अजूनही मानवाची चेतनाच आहे परंतु अधिक विस्तृत श्रेणीतील, अधिक सामर्थ्यशाली, पण अतिमानसिक जीवामध्ये रुपांतरित झालेली नाही, अशी ही चेतना आहे. आता ही अतिमानवी चेतना पृथ्वी-चेतनेमध्ये फक्त अवतरित झालेली आहे असे नाही, तर ती तेथे प्रस्थापित झाली आहे आणि पूर्णपणे कार्यकारी झाली आहे.

(The Spirit of Auroville by Huta : 82)

*

ह्या अनुभवानंतर भौतिकदृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या कोणते बदल घडून आले, यासंबंधी श्रीमाताजींनी एका निकटवर्ती शिष्याकडे केलेले हे भाष्य –

‘ऊर्ध्वस्थित असणाऱ्या गोष्टी सर्वोत्तम आहेत, तिथे तुम्हाला चांगले चांगले अनुभव, तेजोमय, अद्भुत असे सगळे अनुभव येतील, पण इथे? इथे मात्र काहीच नाही,’ – ही मनाने पूर्वापार केलेली विभागणी होती. आणि मग एखादा जन्माला येतानाच ‘हे जग आशाहीन आहे’ ह्या धारणेनेच पुन्हा या जगतामध्ये जन्माला येतो.

ह्यावरूनच असे स्पष्ट होते की, यापेक्षा काही निराळे असू शकते ह्याची कल्पनादेखील ज्यांच्या मनाला शिवली नसेल अशी माणसे म्हणतात, “या जगामधून निघून जाणेच योग्य आहे….”

मला सारे काही स्पष्ट झाले ! परंतु आता ह्या घटनेमुळे, येथून सुटका करून घ्यायलाच हवी, असे ते जग अजिबात राहिले नाही. आणि हा मोठाच विजय आहे : सुटका करून घेणे यापुढे आवश्यक नाही. तुम्हाला ते जाणवते, दिसते आणि ते या देहाने स्वत:च अनुभवले आहे – ती शक्यता लवकरच, अगदी इथे देखील प्रत्यक्षात येईल, गोष्टी अधिक सत्यतर होत जातील.

असे काही आहे…. असे काही आहे की, ज्यामुळे ह्या विश्वामध्ये निश्चितपणे काहीतरी बदलले आहे.

अर्थातच, गोष्टी खऱ्या अर्थाने प्रस्थापित होण्यासाठी, काही कालावधी निश्चितच लागणार. तीच तर लढाई चालू आहे. ‘बाह्यत: काहीच बदललेले नाही’, असे सांगण्यासाठीच जणू काही प्रत्येक बाजूने, प्रत्येक पातळीवर, सर्व बाजूंनी गोष्टींचा मारा होत आहे, पण ते खरे नाही. ते खरे नाही, या शरीराला माहीत आहे की, हे खरे नाहीये.

श्रीअरविंदांनी Aphorisms मध्ये जे लिहिले आहे, तसे ते आत्ता मला दिसते आहे, ती केवढी भविष्यवाणी होती…. त्या सत्यवस्तूचे त्यांना झालेले ते दर्शन होते, ते केवढे भविष्यसूचक होते !

मला आता समजते आहे, त्यांचे महानिर्वाण आणि त्यांचे कार्य…. इतके अफाट, आणि तेही सूक्ष्म भौतिकातील कार्य, त्याची इतकी, इतकी मदत झाली आहे ना ! त्यांनी केवढी… (जणू एखादे जडद्रव्य मळत आहेत, याप्रमाणे श्रीमाताजी हाताने दर्शवितात) …गोष्टी घडविण्यासाठी केवढी मदत केली आहे, या भौतिकाची रचनाच बदलण्यासाठी केवढी तरी मदत केली आहे.

उच्चतर जगतांशी संपर्क साधण्याचा आजवर ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला, त्या सर्वांनी या ‘भौतिका’ला मात्र ते जसे आहे तसेच सोडून दिले…. म्हणूनच ही सगळी वर्षे तयारी करण्यामध्ये आणि तयारीमध्येच खर्ची पडली – स्वत:ला खुले करावयाचे आणि तयारी करावयाची – आणि हे अलीकडचे काही दिवस तर… देहाने ‘भौतिक’ दृष्ट्यासुद्धा ही नोंद घेतली आहे की, गोष्टी बदलल्या आहेत. त्यावर अजून काम व्हावे लागेल, प्रत्येक तपशीलानिशी गोष्टी प्रत्यक्षात आणाव्या लागतील, पण बदल घडून आला आहे, बदल झाला आहे.

भौतिक परिस्थितीतून सुटकाच नाही; (श्रीमाताजी मूठ घट्ट आवळून दाखवितात) ती मनुष्याला अगदी घट्ट बांधून ठेवते अशी, समजूत मन तिच्याविषयी करून घेते. ही समजूत इतकी दृढ असते की, ज्यांनी ज्यांनी उच्चतर जगतांचा जिवंत अनुभव घेतला होता, त्यांना असे वाटत होते की, जर एखाद्याला खरोखरच सत्यामध्ये जीवन जगावयाचे असेल, तर त्याने या जगापासून पळून जायला हवे, ह्या जडभौतिक जगाचा त्यागच करावयास हवा : (अशा प्रकारच्या सर्व सिद्धान्तांचा, श्रद्धांचा आधार हाच तर आहे), पण आता गोष्टी तशा उरलेल्या नाहीत. आता गोष्टी तशाच राहिलेल्या नाहीत.

जडभौतिक हे आता उच्चतर प्रकाश, सत्य, सत्यचेतना ग्रहण करण्यासाठी आणि त्याचे ‘आविष्करण’ करण्यासाठी सक्षम झाले आहे.

हे सोपे नाही, त्याला चिकाटी, इच्छाशक्तीची आवश्यकता आहे; पण एक दिवस असा येईल की, हे सारे सहज स्वाभाविक होईल. केवळ एक दरवाजा उघडायचा अवकाश – बस, इतकेच; आता आपल्याला फक्त पुढे चालून जायचे आहे.

(Conversation with a Disciple, March 14, 1970)

जेव्हा ज्ञानामुळे शांत झालेले, प्रेमाने काठोकाठ भरलेले हृदय परमानंदित होते आणि सामर्थ्याने स्पंदित होऊ लागते; जेव्हा शक्तीच्या सामर्थ्यशाली भुजा, विश्वासाठी आनंद आणि प्रकाशाच्या ज्योतिर्मयी पुर्णत्वामध्ये परिश्रम घेतात; जेव्हा ज्ञानाचा दीप्तिमान मेंदू, हृदयाकडून आलेल्या धूसर अंत:प्रेरणा ग्रहण करतो आणि त्या रूपांतरित करतो आणि उच्चासनस्थित अशा संकल्पशक्तीच्या कार्यासाठी स्वत:ला स्वाधीन करतो; जो जीव सर्व विश्वाच्या एकत्वामध्ये जीवन जगत असतो आणि रुपांतरित करण्याच्या भूमिकेतूनच विश्वातील सर्व गोष्टींचा स्वीकार करत असतो, अशा त्यागी जीवाच्या अधिष्ठानावर जेव्हा हे सर्व देव, एकत्रितपणे सुप्रतिष्ठित होतात; हीच ती अवस्था असते जेव्हा मनुष्य समग्रतया स्व-अतीत होतो.

… हाच तो अतिमानवत्वाकडे जाण्याचा दिव्य मार्ग !

*

अतिमानव कोण?

मनोमय मानवी अस्तित्व भंगलेले आहे हे जाणून, जो या जडभौतिकाच्या वर उठून; वैश्विकतेने स्वत:ला भारून घेतो आणि दिव्य शक्तीसामर्थ्य, दिव्य प्रेम व आनंद आणि दिव्य ज्ञान यामध्ये देवसायुज्यत्व साधतो, तोच अतिमानव !

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 157), (CWSA 12 : 439)

जे स्वत:च्या सामान्य प्रकृतीवर मात करण्यासाठी धडपडतात; दिव्य सत्याच्या संपर्कात येण्याचा जो खोलवरचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, तो जडभौतिकामध्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी, जे प्रयत्नशील असतात; जे अतीत किंवा सर्वोच्चाप्रत निघून जाण्याऐवजी, स्वत:च्या अंतरंगात अनुभवास आलेले जाणिवेतील परिवर्तन भौतिकरित्या, बाह्यात उतरविण्यासाठीसुद्धा धडपडतात; ते सर्व अतिमानवतेचे उमेदवार असतात. आणि त्यांच्या या प्रयत्नांच्या यशस्वितेमध्ये अनेकानेक प्रकार आहेत.

ज्या ज्या वेळी आपण सामान्य माणूस म्हणून बनून राहण्याचे नाकारतो, सामान्य जीवन जगणे नाकारण्याचा प्रयत्न करतो; ज्या ज्या वेळी आपल्या हालचालींमधून, कृतींमधून, प्रतिक्रियांमधून आपण ते दिव्य सत्यच अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करतो; जेव्हा सार्वत्रिक अज्ञानाची सत्ता आपल्यावर चालू न देता, दिव्य सत्याने आपण शासित होतो, त्या वेळी आपण अतिमानवतेचे प्रशिक्षणार्थी असतो. आणि आपल्या प्रयत्नांच्या यशस्वितेनुसार, आपण कमी अधिक प्रमाणात सक्षम प्रशिक्षणार्थी असतो, कमी अधिक प्रमाणात या मार्गावर प्रगत झालेले असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 410)

आता हे खात्रीपूर्वक ठामपणे सांगता येईल की, मनोमय जीव आणि अतिमानसिक जीव यांच्यामध्ये एक मधला दुवा असणारी प्रजाती असेल. एक अशा प्रकारचा अतिमानव असेल की ज्याच्यामध्ये मनुष्याचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये काही प्रमाणात असतील; म्हणजे असे की, तो त्याच्या बाह्य रूपाच्या दृष्टीने, त्याच्या पशुसमान जन्मप्रक्रियेनिशी अगदी मानवासारखाच असेल; पण तो त्याची चेतना इतकी रूपांतरित करेल की. साक्षात्कार आणि कृती ह्या दृष्टीने तो जणू त्या नव्या वंशाचा, अतिमानसिक वंशाचा सदस्यच असेल.

अशा ह्या प्रजातीला ‘संक्रमणशील प्रजाती’ असे संबोधता येईल. एखादी व्यक्ती तिच्या भविष्यवेधी दृष्टीद्वारे हे पाहू शकते की, ही संक्रमणशील प्रजाती जन्म देण्याच्या प्राणिजगतातील जुन्या पद्धती ऐवजी, जन्म देण्याची नवीनच मार्ग शोधून काढेल. आणि मग असे खऱ्या अर्थाने आध्यात्मिकरितीने जन्माला आलेले जीव हे त्या नवीन वंशासाठी, अतिमानसिक वंशासाठी आवश्यक असणाऱ्या घटकद्रव्यांचा भाग बनतील.

म्हणजे, प्रजननाच्या जुन्याच पद्धतीने जे जन्माला आले आहेत, परंतु अतिमानसिक साक्षात्काराच्या नवीन जगताशी, जाणीवपूर्वक आणि सक्रिय असा संपर्क प्रस्थापित करण्यात जे यशस्वी झाले आहेत त्यांना आपण ‘अतिमानव’ असे म्हणू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 313-314)

जेव्हा मनाचे या पृथ्वीवर अवतरण झाले तेव्हा, या पृथ्वीच्या वातावरणात मनाचे आविष्करण होण्याचा क्षण आणि पहिला माणूस उदयाला येण्याचा क्षण, यांच्यामध्ये लाखो वर्षांचा काळ लोटला. आता मात्र अतिमानवाचा उदय होणे, ही गोष्ट अधिक जलद घडून येईल; कारण मानवाला आता त्या गोष्टीची एक प्रकारची धूसर कल्पना आहे, तो अतिमानवाचे आगमन अपेक्षित करत आहे. त्याला अतिमानवाच्या आगमनाची एक प्रकारे जाणीव असल्याने, तो त्याची अपेक्षा बाळगून आहे. पण माकडं मात्र मानवाच्या उदयाची अपेक्षा बाळगत नव्हती, त्यांनी तसा कधी विचारही केलेला नव्हता, कारण कदाचित त्यांना जास्त विचारच करता येत नव्हता. परंतु, मानवाने मात्र अतिमानवाचा विचार केलेला आहे आणि तो त्याची वाट पाहत आहे, त्यामुळे ते आता लवकर घडून येईल. पण लवकर म्हटले तरी, कदाचित हजारो वर्षे लागतील.

ज्या व्यक्ती आंतरिक दृष्ट्या तयार झालेल्या असतात, खुल्या असतात आणि उच्चतर शक्तींच्या संपर्कात असतात, अतिमानसिक प्रकाशाशी आणि चेतनेशी, ज्या व्यक्तींचा कमी अधिक प्रमाणात थेट व्यक्तिगत संपर्क असतो, त्या व्यक्तींना पृथ्वीच्या वातावरणातील फरक जाणवतो.

ज्याप्रमाणे समधर्मी व्यक्तीच दुसऱ्या समधर्मी व्यक्तीला ओळखू शकतात, त्याप्रमाणे व्यक्तीमध्ये असलेली अतिमानसिक जाणीवच केवळ, पृथ्वीच्या वातावरणामध्ये अतिमानस कार्यरत असल्याचे जाणू शकते. या किंवा त्या कारणाने ज्यांनी अशी आकलनशक्ती विकसित केली आहे, त्यांनाच ते दिसू शकते.

पण ज्यांना, आपल्या अगदी नजीक आत असणाऱ्या आंतरिक अस्तित्वाची साधी जाणीवदेखील नाही, आणि जे त्यांचा आत्मा कसा असतो, हेसुद्धा सांगू शकत नाहीत, ते पृथ्वीच्या वातावरणातील हा फरक समजून येण्याइतपत तयार नसतात. त्यांना त्यासाठी पुष्कळ मजल मारावी लागेल. कारण ज्यांची चेतना ही कमी-अधिक प्रमाणात केवळ बाह्यवर्ती व्यक्तित्वामध्ये म्हणजे मन, प्राण आणि शरीर यांमध्येच केंद्रित झालेली असते अशा व्यक्तींना अशा कोणत्याही गोष्टींची ओळख पटण्यासाठी, अशा गोष्टींनी काही वैचित्र्यपूर्ण आणि अकल्पित रूप घेतलेले, दिसावे लागते. तेव्हा मग ते अशा गोष्टींना चमत्कार म्हणतात. परंतु, शक्तींच्या हस्तक्षेपामुळे जे सातत्याने चमत्कार घडून येतात; परिस्थितीमध्ये, व्यक्तिमत्त्वांमध्ये बदल घडून येतो आणि ज्याचा परिणाम हा दूरवर पसरलेला असतो अशाला ते चमत्कार असे संबोधत नाहीत; कारण येथे केवळ बाह्य रूप पाहिले जाते आणि ते खूपच स्वाभाविक वाटते. पण, खरे सांगायचे तर, घडणाऱ्या लहानात लहान गोष्टींकडे पाहून तुम्ही त्याचे चिंतन केलेत तर, त्या चमत्कारसदृश आहेत असे म्हणणे तुम्हाला भागच पडेल.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 126-127)