Posts

धम्मपद : गौतम बुद्धांचे शिष्य हे दक्ष आणि खरोखरच जागृत असतात; रात्रंदिवस ते ध्यानाचा आनंद घेत असतात.

…जो मनुष्य एकांतात अन्नग्रहण करतो, एकांतात निद्रा घेतो, स्वत:च्या आत्म-प्रभुत्वाची वाटचाल अथकपणे एकाकी रीतीने करतो, त्याला अरण्यातील एकांतवासाच्या जीवनाचा आनंद गवसतो.

श्रीमाताजी : बरेचदा असे आढळते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण असे एकटे राहण्यानेच, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही. कारण माणूस कोणत्याही परिस्थितीत असला तरी काही ना काही उद्योग शोधून काढतो. मला माझ्या जीवनाच्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते, जी बाह्य परिस्थिती ‘ईश्वरीकृपे’द्वारे आपल्याला बहाल केलेली असते ती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते, अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खराखुरा, अधिक सखोल व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो नक्कीच आकर्षक आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ती म्हणते, “झाडाखाली अगदी एकांतात बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल.” हे असे वाटते कारण त्या दिशेने विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.

जे ध्यान अनिवार्य असल्याप्रमाणे एकाएकी तुमचा ताबा घेते, ते ध्यान सर्वोत्तम असते. तुम्हाला कोणता पर्यायच नसतो. एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याशिवाय दुसरा कोणता पर्यायच तुमच्यापाशी नसतो. आणि तुम्ही अरण्यात एकांतवासात असताना (ध्यानाकडून) तुमचा असा ताबा घेतला जाईल हे काही अपरिहार्य नसते. जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा तेथे खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्या सोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा काहीएक टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खराखुरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे.

कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहार करीत असतानादेखील, त्यापासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वराला’ आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच ‘खरा विजय’ होय.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 276)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

ईश्वरी कृपा – ३२

तुम्ही जर अगदी प्रामाणिक अभीप्सेने आध्यात्मिक जीवनाकडे वळला असाल तर, कधीकधी असुखद गोष्टींचा तुमच्यावर जणू भडिमार होतो. उदाहरणार्थ, तुमच्या अगदी जवळच्या मित्रांशी तुमचे भांडण होते, तुमचे कुटुंबीय तुम्हाला घराबाहेर हाकलून देतात, तुम्ही जे प्राप्त करून घेतले आहे असे तुम्हाला वाटत असते ते तुम्ही गमावून बसता इ. इ.

मला असा एक माणूस माहीत आहे की, जो फार मोठी अभीप्सा बाळगून भारतामध्ये आला होता. ज्ञानप्राप्तीसाठीचे आणि योगसाधनेबाबतचे खूप काळ प्रयत्न करून झाल्यावर मग तो भारतात आला होता.

ही खूप पूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी लोक साखळी असलेले घड्याळ वापरत असत. तर, ह्या सद्गृहस्थाला त्याच्या आजीने एक सोन्याची पेन्सिल दिलेली होती, त्याच्या दृष्टीने ती जगातील सर्वात मौल्यवान वस्तू होती. ती पेन्सिल त्या साखळीला अडकविलेली होती. जेव्हा तो बंदरावर – पाँडिचेरी किंवा भारतात कोणत्यातरी बंदरावर किंवा मला वाटते, कोलंबोला उतरला – त्या काळी प्रवाशांना, जहाजातून छोट्या बोटींमध्ये आणि मग त्या बोटींद्वारे किनाऱ्यावर आणून सोडत असत. त्यामुळे ह्या सद्गृहस्थाला जहाजाच्या मार्गिकेवरून बोटीमध्ये उडी मारावी लागली. त्याची पायरी चुकली, त्याने कसाबसा तोल सांभाळला, पण त्या धावपळीमध्ये ती सोन्याची पेन्सिल सरळ खाली समुद्रात पडली आणि पार तळाशीच गेली. प्रथम तो काहीसा उद्विग्न झाला, पण नंतर त्याने स्वत:लाच समजावले, “ठीक आहे, हा तर भारताचा प्रभाव दिसतो आहे – मी माझ्या आसक्तीपासून मुक्त झालो आहे.”…

जे खूप प्रामाणिक आहेत त्यांच्याबाबतीत अशा घटना घडून येतात. मूलत: अडचणी, संकटांचे पर्वत हे प्रामाणिक लोकांसाठीच असतात. जे प्रामाणिक नसतात त्यांना खूप सुंदर, विलोभनीय रंगांच्या गोष्टी भुरळ पाडण्यासाठी मिळत जातात, परंतु, सरतेशेवटी त्यांना कळून चुकते की ते चुकले आहेत. पण ज्या कोणाला खूप अडीअडचणी, संकटे येतात त्यांवरून हे सिद्ध होते की, ते प्रामाणिकपणाच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 157)

मला असा एक माणूस माहीत आहे की, जो फार मोठी अभीप्सा बाळगून भारतामध्ये आला होता. ज्ञानप्राप्तीसाठीचे आणि योगसाधनेबाबत खूप काळ प्रयत्न करून झाल्यावर मग तो भारतात आला होता. ही खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे.

त्या काळी लोक साखळी असलेले घड्याळ वापरत असत. तर, ह्या सद्गृहस्थाला त्याच्या आजीने एक सोन्याची पेन्सिल दिलेली होती, त्याच्या दृष्टीने ती जगातील सर्वात मौल्यवान वस्तू होती. ती पेन्सिल त्या साखळीला अडकविलेली होती. जेव्हा तो बंदरावर – पाँडिचेरी किंवा भारतात कोणत्यातरी बंदरावर किंवा मला वाटते, कोलंबोला उतरला – त्या काळी प्रवाशांना, जहाजातून छोट्या बोटींमध्ये आणि मग त्या बोटींद्वारे किनाऱ्यावर आणून सोडत असत. त्यामुळे ह्या सद्गृहस्थाला जहाजाच्या मार्गिकेवरून बोटीमध्ये उडी मारावी लागली. त्याची पायरी चुकली, त्याने कसाबसा तोल सांभाळला, पण त्या धावपळीमध्ये ती सोन्याची पेन्सिल सरळ खाली समुद्रात पडली आणि पार तळाशीच गेली.

प्रथम तो काहीसा उद्विग्न झाला, पण नंतर त्याने स्वत:लाच समजावले, ”ठीक आहे, हा तर भारताचा प्रभाव दिसतो आहे – मी माझ्या आसक्तीपासून मुक्त झालो आहे.”

जे खूप प्रामाणिक आहेत त्यांच्याबाबतीत, अशा घटना घडून येतात. मूलत: अडचणी, संकटांचे पर्वत हे प्रामाणिक लोकांसाठीच असतात. जे प्रामाणिक नसतात त्यांना खूप सुंदर, विलोभनीय रंगांच्या गोष्टी भुरळ पाडण्यासाठी मिळत जातात, परंतु, सरतेशेवटी त्यांना कळून चुकते की ते चुकले आहेत. पण ज्या कोणाला खूप अडीअडचणी, संकटे येतात त्यांवरून हे सिद्ध होते की, ते प्रामाणिकपणाच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 157-158)