Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ६०

(ध्यानामध्ये प्राप्त झालेली) चांगली अवस्था कायम टिकून राहत नाही ही बऱ्यापैकी सार्वत्रिकपणे आढळणारी घटना आहे. चांगली अवस्था येणे व निघून जाणे अशी दोलायमान स्थिती नेहमीच आढळून येते. जो बदल होऊ घातलेला आहे तो जोपर्यंत स्वतः स्थिर होत नाही, तोपर्यंत अशी ये-जा चालूच राहते. हे दोन कारणांमुळे घडून येते. प्राण आणि शरीर दोघेही आपापल्या जुन्या गतिविधी एकदम सोडून देण्यास आणि नवीन गतिविधींशी जुळवून घेण्यास असमर्थ असतात हे पहिले कारण. आणि वरून (उच्च शक्तीचा) दबाव आला तर प्रकृतीमध्ये कोठेतरी दडून बसायचे आणि संधी मिळताच डोकं पुन्हा वर काढायचे ही जी (जड)द्रव्याची सवय असते, ती सवय हे दुसरे कारण असते.

*

(तुमच्या प्रकृतीमधील) सर्व घटक खुले होईपर्यंत ही दोलायमानता नेहमीच चालू राहते. दोनपैकी कोणत्या तरी एका कारणामुळे हे घडू शकते.

०१) तुमच्या अस्तित्वामधील एखादा लहानसा भाग किंवा एखादी गतिविधी उफाळून पृष्ठभागावर येते, जो भाग (दिव्य शक्तीप्रत) खुला नाहीये आणि त्याच्यामध्ये उच्चतर शक्तीचा प्रभाव निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

०२) बाह्यवर्ती शक्तीकडून तुमच्यावर एक प्रकारचे सावट टाकण्यात आले आहे आणि ते सावट तुमच्यामध्ये तुमचा जुना अडथळा परत निर्माण करत आहे असे नाही, पण काहीसा तात्पुरता अंधकार किंवा अंधकाराचा वरकरणी आभास निर्माण करत आहे.

अस्वस्थ होऊ नका, परंतु लगचेच अविचल होऊन स्वतःला खुले करण्याचा प्रयत्न करा. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की, ती जुनी चिवट अडचण आणि गोंधळ यांना पुन्हा परतून येण्यास मुभा देऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे, भलेही हा अंधकार काही गंभीर व्यत्यय निर्माण करणारा नसला तरीसुद्धा या अंधकाराला दीर्घ काळ टिकून राहण्याची मुभा देऊ नका. अविचल, सातत्यपूर्ण इच्छाशक्ती बाळगली की, अगदी गंभीरातल्या गंभीर अडचणींना तुम्ही अटकाव करू शकता. तुम्ही अविचल आणि स्थिरपणे सातत्याने उन्मुख राहिलात तर कोणत्याही दीर्घ पीडेचे निवारण होईल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 60)

आध्यात्मिकता ४६

सर्व अहंकार आणि सर्व अंधकार नाहीसा करण्यासाठी, कृतज्ञतेची शुद्ध, उबदार, मधुर आणि तेजस्वी ज्योत आपल्या हृदयामध्ये कायमच प्रज्वलित असली पाहिजे. साधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत घेऊन जाणारा जो परमेश्वर, त्या ‘परमेश्वराच्या कृपे’बद्दल कृतज्ञतेची ज्योत कायमच तेवत राहिली पाहिजे. व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ राहील, जेवढी तिला ‘ईश्वरी कृपे’च्या कृतीची अधिक जाण होईल आणि त्याबद्दल ती जेवढी अधिक कृतज्ञ राहील, तेवढा मार्ग जवळचा होईल.

– श्रीमाताजी : Conversations with disciple, July 15, 1964