(श्रीअरविंद येथे साधकांना सांगत आहेत की, एखादी गोष्ट कोणत्या वृत्तीने केली जाते, तिची उभारणी कोणत्या तत्त्वाच्या आधारावर केली जाते आणि तिचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो, यावर सारे काही अवलंबून असते.)

राजकारण हा काही नेहमीच चांगला स्वच्छ कारभार असतो असे नाही, किंबहुना बरेचदा तो तसा नसतोच. असे असूनही मी राजकारण केले आणि अगदी सर्वात जहाल असे क्रांतिकारी राजकारण, ज्याला ‘घोर कर्म’ म्हणता येईल असे राजकारण केले.

युद्धालादेखील आध्यात्मिक प्रकारचे कृत्य असे म्हणता येणार नाही तरीही मी युद्धाला साहाय्य केले आणि माणसांना युद्धावर पाठविले. ‘श्रीकृष्णा’ने ‘अर्जुना’ला अत्यंत भयानक प्रकारचे युद्ध करण्याचे आवाहन केले आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, माणसांनी सर्व प्रकारची मानवी कर्मे, ‘सर्वकर्माणि’ करावीत म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आता, ‘श्रीकृष्ण हा आध्यात्मिक मनुष्य नव्हता किंवा त्याने अर्जुनाला दिलेला सल्ला चुकीचा होता किंवा तो तत्त्वतः गैरलागू होता’ असे म्हणून तुम्ही वाद घालत बसणार का? श्रीकृष्ण तर याही पुढे जात उद्घोषित करतो की, एखाद्या मनुष्यास त्याच्या मूलभूत प्रकृतिधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार जे कर्म करण्यास सांगण्यात आले आहे, ते कर्म जर त्याने त्याच्या आणि त्या कर्माच्या धर्मानुसार केले आणि योग्य प्रकारे आणि योग्य वृत्तीने केले तर, तसे कर्म केल्याने तो ‘ईश्वरा’प्रत जाऊ शकतो.

‘ब्राह्मण’, ‘क्षत्रिय’ यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण ‘वैश्य’ धर्माला आणि त्याच्या कर्मालाही मान्यता देतो. श्रीकृष्णाच्या भूमिकेतून पाहायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने व्यापारउदिम करणे, पैसे मिळविणे, नफा मिळविणे आणि तरीसुद्धा तो आध्यात्मिक असणे, त्याने ‘योगसाधना’ करणे, त्याला आंतरिक जीवन असणे शक्य आहे.

‘भगवद्गीता’ आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून सातत्याने कर्माचे समर्थन करते. ‘भक्ती’ आणि ‘ज्ञानमार्गा’प्रमाणेच ‘कर्ममार्गा’चे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. श्रीकृष्ण कर्माला एक अधिक उच्चतर नियम (law) लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा फलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे असे त्याचे सांगणे आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 249]

आपल्या कर्मांचा ‘अधिपती’ असणारा ईश्वर, हा आपल्या प्रकृतीचे रूपांतरण करत असतानादेखील आपल्या प्रकृतीचा आदर करत असतो; कोणत्याही स्वैर लहरीनुसार नव्हे तर, तो नेहमीच प्रकृतीच्या माध्यमातून कार्य करत असतो. आपल्या या अपूर्ण प्रकृतीमध्येच आपल्या पूर्णत्वाची सामग्री सामावलेली असते. पण ती अपरिपक्व दशेत असते, ती विरूप झालेली, अस्थानी, कशीही अव्यवस्थितपणे फेकून दिलेली किंवा अगदीच बापुडवाण्या अयोग्य अशा क्रमाने मांडलेली असते.

ही सर्व सामग्री धीराने पूर्णत्वाला नेली पाहिजे, ती शुद्ध केली पाहिजे, तिची पुनर्रचना केली पाहिजे, तिची पुनर्घडण केली पाहिजे, तिचे रूपांतरण केले पाहिजे. तिला कशाही तऱ्हेने छिन्नविछिन्न करता कामा नये वा तिचे भंजनही करता कामा नये, तिला मारून टाकता कामा नये किंवा विकृत करता कामा नये, जोरजबरदस्तीने किंवा नकाराने तिचा नाशही करता कामा नये.

हे जग आणि या जगात राहणारे आपण सर्व म्हणजे ‘त्याची’ निर्मिती आहोत, त्याचे आविष्करण आहोत. आपल्या संकुचित आणि अज्ञानी मनाला समजू शकणार नाही अशा रीतीने तो आपल्याला आणि या विश्वाला हाताळत असतो. जोपर्यंत मन शांत होऊन दिव्य ज्ञानाप्रत खुले होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला ते समजू शकणार नाही. आपल्या दोषांमध्ये सत्याचे असे एक द्रव्य असते की जे, आपल्या चाचपडणाऱ्या बुद्धीला, त्याचा अर्थ उलगडवून दाखवावा म्हणून परिश्रम करत असते. मानवी बुद्धी दोष काढून टाकते पण त्याचबरोबर त्यामध्ये अंतर्भूत असणारे सत्यही काढून टाकते आणि ती आधीच्या दोषाच्या जागी तितक्याच एका अर्ध-सत्याची, अर्ध-दोषाची स्थापना करते.

परंतु जोपर्यंत आपण त्यामध्ये दडलेल्या आणि प्रत्येक मिथ्या आवरणाच्या खाली सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सत्याप्रत पोहोचण्याइतपत सक्षम होत नाही तोपर्यंत ‘दिव्य प्रज्ञा’ आपल्या चुका सहन करते. पापाचरणाकडे नव्हे तर पूर्णत्वाकडे जाणे, तसेच ज्याला आपण ‘ईश्वरी गुण’ असे संबोधू शकतो त्याप्रत जाणे हेच ज्या धडपडणाऱ्या ‘शक्ती’चे उद्दिष्ट असते; अशा ‘शक्ती’ची चुकीच्या दिशेने पडलेली पावले म्हणजे आपली पापं असतात. बरेचदा ही पापं म्हणजे जो गुण रूपांतरित केला जाणे आवश्यक असतो अशा एखाद्या गुणावरील आवरणं असतात, त्या ओंगळवाण्या आवरणांपासून तो गुण मुक्त करावा लागतो…

– श्रीअरविंद [CWSA 23 : 245-246]

एकदा का एखाद्याने योगमार्गामध्ये प्रवेश केला की, मग अगदी काहीही झाले, किंवा कोणत्याही अडचणी उद्भवल्या तरी ध्येयापर्यंत जाण्याचा निश्चय दृढ ठेवायचा, एवढी एकच गोष्ट त्याने करायची असते. खरेतर, योगाची परिपूर्ती कोणीही स्वतःच्या क्षमतेद्वारे करू शकत नाही – तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या महत्तर ‘शक्ती’द्वारेच ही परिपूर्ती होऊ शकते – सर्व प्रकारच्या चढउतारांमध्ये, त्या ‘शक्ती’ला नेटाने केलेल्या आवाहनामुळे ही परिपूर्ती होऊ शकते. तुम्ही अगदी सक्रियपणे ‘अभीप्सा’ बाळगू शकत नसलात तरीदेखील, साहाय्य लाभावे म्हणून श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख राहा – ही एकच गोष्ट अशी आहे की, जी नित्य केली पाहिजे.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 294]

साधक : श्रीअरविंद नेहमीच असे सांगतात की, श्रीमाताजी तुमच्या अंतरंगात आहेत.

श्रीमाताजी : हो, खरे आहे, अगदी पूर्णपणे बरोबर आहे. मी ‘शाश्वत ज्योती’ मध्ये एक ‘ईश्वरी अस्तित्व’ या नात्याने ‘उपस्थित’ आहे, संजीवन देणारी आणि कृतिप्रवण करणारी ‘शक्ती’ या नात्याने मी उपस्थित आहे, सर्व शांतीपूर्ण गोष्टी आणि माधुर्य प्रदान करणारी ‘शांती’ या नात्याने मी उपस्थित आहे, ओसंडून वाहणारा आणि उन्नयन करणारा ‘मोद’, शुद्धिकरण करणारा ‘प्रकाश’ आणि संमती प्रदान करणारे ‘स्पंदन’ या नात्याने मी तेथे उपस्थित आहे.

श्रीअरविंद तेथे एक चिरस्थायी ‘सत्त्व’ म्हणून उपस्थित आहेत आणि मी तेथे एक ‘मार्गदर्शक’ म्हणून उपस्थित आहे. वास्तविक, दोघांमध्ये एकच अस्तित्व आहे. एक, जो निरीक्षण करतो तो साक्षी आहे आणि दुसरी प्रत्यक्षात उतरविणारी शक्ती आहे. आणि जोपर्यंत व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत तिला काहीच समजू शकत नाही…..

होय, श्री अरविंदांना आणि मला जो जाणतो, (वास्तविक, ही एकच गोष्ट आहे, एकच अस्तित्व आहे.) – त्याच्यासाठी सारे अडथळे, साऱ्या अडचणी, सर्व पाश, सत्याच्या मार्गावरील सारे तथाकथित अडथळे गळून पडतात आणि ते कायमसाठी काढून टाकले जातात. केवळ या जन्मातच असे नव्हे तर, मृत्युनंतरच्या जीवनातील आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या जीवनांमधील सुद्धा – अगदी शाश्वतकाळपर्यंत काढून टाकले जातात. अशा व्यक्तीसाठी ‘परमेश्वर’ हा सर्व शक्तिमान असतो.

[The Supreme by Mona Sarkar]

आंतरिक आधार शोधण्यासाठी व्यक्तीने, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत सखोल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; व्यक्तीने आत अधिक आत, खोल, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अक्षुब्ध, अविचल शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे. अस्तित्वाच्या या अतीव अचंचलतेमध्ये (quietude), साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःखयातनांपासून दूर, विचार, कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ईश्वराचे ‘अस्तित्व’ अनुभवण्यासाठी व्यक्तीने अगदी काळजीपूर्वकपणे अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.

तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते, जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ईश्वरी ‘शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अभिमुख करणे आवश्यक असते. जिथे कोणतीही कृती शिल्लक राहात नाही, कोणताही ठसा उमटलेला नाही, अहंकार नाही, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नाही, अन्य काहीही नाही तर फक्त आनंदलहरी आहेत, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत व्यक्तीने खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ते ऐक्य अनुभवले पाहिजे…

-श्रीमाताजी [The Supreme by Mona Sarkar]

श्रीअरविंद : निर्भरतेची वृत्ती हे परिपूर्ण साधनेचे महान रहस्य आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी किंवा कोणतीही अडचण आली तरी, ईश्वरावर विसंबून राहणे म्हणजे ‘निर्भर’ असणे. जेव्हा सारे काही सुरळीत चालू असते तेव्हा ‘निर्भर’ असणे याला विशेष काही अर्थ नाही.

साधक : जेव्हा प्राणाचा क्षोभ होतो तेव्हा हे निर्भर असणे मी कायम कसे टिकवून ठेवू ? नकार देऊन ? की अलिप्त राहून ?

श्रीअरविंद : प्रथम अलिप्तता, नंतर अलिप्ततेसहित नकार.

साधक : पण जेव्हा आतूनच एक प्रकारचा असमाधानाचा सूक्ष्मसा ताण जाणवत असतो तेव्हा मी स्वतःला अलिप्त कसे ठेवू?

श्रीअरविंद : त्या असमाधानापासून अलिप्त होऊन. …स्वतःमधील जो ‘साक्षी’ आहे त्याने मागे उभे राहणे आणि येणाऱ्या स्पंदनांकडे ती स्वतःची (आपल्या आत्म्याची स्पंदने) आहेत असे समजण्यास नकार देणे, ती स्पंदने म्हणजे आपल्या गतकालीन प्रकृतीची सवय आहे किंवा सार्वत्रिक प्रकृतीचे आपल्यावर झालेले आक्रमण आहे, अशा रीतीने त्यांच्याकडे पाहाणे. असे समजून त्यांना हाताळणे म्हणजे अलिप्त होणे. हे अवघड आहे असे वाटू शकते पण व्यक्ती चिकाटीने प्रयत्न करत राहिली तर तिला ते चांगल्या रीतीने साध्य होते.

– [Nirodbaran’s Correspondence with Sri Aurobindo, Vol. II : 650-657]

श्रीमाताजी : मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात असू दे. ‘मी’चा शोध घेण्यासाठी कष्ट घ्या. तुमच्यासमोर जो मार्ग मी आखून दिला आहे त्यावर मार्गक्रमण करा. या कार्याइतके अन्य कोणतेच कार्य महत्त्वाचे नाही. याच्याशी तुलना करता इतर कोणतेच कार्य इतके महत्त्वाचे नाही. ‘ईश्वरा’चा शोध घ्यायचा. हेच जीवन आहे, हेच ध्येय आहे, हाच आनंदठेवा आहे. ‘ईश्वरा’वर निस्सीम ‘प्रेम’ करा जेणेकरून ‘तो’ नेहमीच तुमच्यासोबत राहील. सर्व कार्याचा कर्ता-करविता ‘तो’च असू द्यावा. ‘तो’ तुमच्यासोबत कर्म करतो. ‘तो’ तुमच्याबरोबर धडपड करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ‘तो’ प्रत्येक पावलागणिक तुम्हाला मार्गदर्शन करतो. फक्त ‘ईश्वर’च.

– [The Supreme by Mona Sarkar : 97]

तुम्ही जितके दुःखीकष्टी असाल आणि जितके शोक-विलाप करत राहाल तितके तुम्ही माझ्यापासून दूर होत जाता. ‘ईश्वर’ हा दुःखी नाही आणि ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर सर्व प्रकारच्या भावनिक कमकुवतपणाला आणि सर्व दुःखांना तुम्ही तुमच्यापासून दूर केले पाहिजे.

*

शोक करू नका. एकच लढाई पुन्हापुन्हा अनेक वेळा जिंकावी लागते, विशेषतः ती लढाई जेव्हा विरोधी शक्तींच्या विरोधात लढली जात असते तेव्हा ती पुन्हापुन्हा जिंकावी लागते. आणि म्हणूनच व्यक्तीने संयम बाळगत स्वतःला सुसज्ज ठेवलेच पाहिजे आणि अंतिम विजयाबद्दल श्रद्धा बाळगली पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 16 : 171], [CWM 16 : 184]

श्रीमाताजी : मी सतत तुमच्या सोबत असते आणि या आंतरिक ‘उपस्थिती’विषयी जागृत होणे हा साधनेमधील सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ‘क्ष’ला विचारा, तो तुम्हाला सांगेल की ही ‘उपस्थिती’ हा काही केवळ श्रद्धेचा विषय किंवा केवळ मानसिक कल्पनेचा खेळ नाही, तर ती अतिशय सघन अशी वस्तुस्थिती आहे, आणि चेतनेसाठी ती अगदी एखाद्या जडभौतिक गोष्टीप्रमाणे खरीखुरी आणि इंद्रियगम्य असते.

*

साधक : ज्याच्यामुळे मला ईश्वरी ‘उपस्थिती’ची जाणीव सदासर्वदा आणि सर्वत्र होईल अशा प्रकारच्या ईश्वरी ‘प्रेमा’चा उगम मी कोठे व कसा शोधू?

श्रीमाताजी : त्यासाठी तुम्ही आधी ‘ईश्वरा’चा शोध घेतला पाहिजे, एकतर तो शोध तुम्ही आंतरिकीकरणाच्या (interiorisation) आणि एकाग्रतेच्या साहाय्याने तुमच्या स्वतःमध्ये घेतला पाहिजे, किंवा तो शोध तुम्ही प्रेमाच्या आणि आत्म-त्यागाच्या माध्यमातून माझ्यामध्ये किंवा श्रीअरविंदांमध्ये घेतला पाहिजे. एकदा का तुम्हाला ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग अगदी स्वाभाविकपणे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, सर्वत्र त्याचेच दर्शन घडू लागेल.

*

‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘त्या’च्या ‘अस्तित्वा’चा शोध लागेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये, संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. आणि या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो.

– श्रीमाताजी [CWM 16 : 160-161]

ज्या ‘ईश्वरा’च्या प्राप्तीची आपण इच्छा बाळगतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. ‘तो’ त्याच्या स्वनिर्मित सृष्टीच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा असते ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साहाय्याने ‘त्या’ला जाणण्यास, ‘त्या’च्याशी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्या’ला अभिव्यक्त करण्यास आपण समर्थ बनणे ही होय. याच गोष्टीसाठी आपण स्वतःला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक ‘चैतन्या’चे आविष्करण.

– श्रीमाताजी [CWM 13 : 347]