प्रामाणिकपणा – १४

(‘प्रामाणिकपणा’ कसा अतिशय आवश्यक असतो, हे मुलांना अगदी लहानपणापासूनच सांगण्याबाबत श्रीमाताजी आग्रही असत. त्याचे स्पष्टीकरण करताना, त्या म्हणतात…)

दुसऱ्यांपेक्षा चलाख कसे व्हावे किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण चांगले दिसावे यासाठी लपवाछपवी कशी करावी हे बरेचदा मुलांना शिकविले जाते. काही पालक भीती दाखवून मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण शिक्षणाच्या सर्व पद्धतींपैकी ही सर्वांत वाईट पद्धत आहे; कारण त्यामुळे खोटे बोलणे, फसविणे, ढोंग करणे आणि तत्सम अन्य गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. पण तुम्ही जर मुलांना वारंवार असे समजावून सांगितलेत की : मुलांनो, तुम्ही जर पूर्ण प्रामाणिक नसाल, म्हणजे केवळ दुसऱ्याशीच असे नव्हे, तर स्वत:शी सुद्धा पूर्णपणे प्रामाणिक राहिला नाहीत, स्वत:तील अपूर्णता व कमतरता झाकण्याचा केव्हाही प्रयत्न केलात, तर तुम्ही कधीच कोणतीही प्रगती करू शकणार नाही; कोणतीही प्रगती कधीच न करता, तुम्ही आज जसे आहात तसेच आयुष्यभर राहाल. तेव्हा तुम्हाला जर नुसत्या प्राथमिक अजाण अवस्थेतून बाहेर पडून विकसित होत जाणाऱ्या चेतनेत उन्नत व्हायचे असेल, तर त्यासाठीसुद्धा सर्वात महत्त्वाची, एकमेव महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा ही आहे. जर, करू नये अशी एखादी गोष्ट तुम्ही केली असेल, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी कबूल केलीच पाहिजे. तुमच्यामध्ये एखादी अयोग्य अशी ऊर्मी उठली असेल, तर तिच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही स्वत:ला सांगितले पाहिजे की, ‘हे चांगले नाही’ किंवा ‘हे घृणास्पद होते’, एवढेच नव्हे तर, ‘हे दुष्टपणाचे होते.’

– श्रीमाताजी [CWM 15 : 297-298]

सद्भावना – ०४

सत्याने वागण्याचा एकच एक मार्ग आहे, व्यक्तीला जे सर्वोच्च सत्य आहे असे जाणवते केवळ तेच आपल्या प्रत्येक कृतीमधून, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला अभिव्यक्त होत राहील, यासाठी व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याच वेळी व्यक्तीला ही जाणीव देखील असली पाहिजे की, तिचे सत्याविषयीचे आकलन हे प्रगमनशील (progressive) आहे आणि त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या घडीला जे सर्वाधिक सत्य वाटते ते उद्या तसेच असेल असे नाही आणि त्याहूनही अधिक उच्च सत्य तुमच्या माध्यमातून अधिकाधिक अभिव्यक्त होईल. येथे आरामदायी तामसिकतेमध्ये झोपून राहणे याला थाराच नाही; व्यक्तीने सदैव जागे असले पाहिजे – मी शारीरिक झोपेविषयी बोलत नाहीये – व्यक्तीने कायम जागे असले पाहिजे, म्हणजे नेहमी सचेत (conscious) असले पाहिजे आणि नेहमी सद्भाव व प्रकाशमान ग्रहणशीलतेने परिपूर्ण असले पाहिजे. नेहमी उत्तमतेचा ध्यास घेतला पाहिजे, नेहमी उत्तम, नेहमीच उत्तम. तुम्ही स्वतःशी असे कधीच म्हणता कामा नये की, “बापरे, हे फारच थकवणारे आहे. मला आता विश्रांती घेऊ दे, मला आराम करू दे. बास, आता मी हे प्रयत्न थांबवणार आहे.” असे केलेत तर मग तुम्ही लगेचच एका गर्तेत सापडणार आहात आणि घोडचूक करणार आहात, हे निश्चित!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 282-283)

ईश्वरी कृपा – २४

‘ईश्वरी कृपा’ सदोदित तुमच्यासोबत असते; शांत मनाने तुम्ही तुमच्या हृदयात लक्ष एकाग्र करा, म्हणजे मग तुम्हाला खात्रीपूर्वक, तुम्ही ज्याची आस बाळगून आहात ते साहाय्य आणि इतकेच नव्हे तर, मार्गदर्शनसुद्धा मिळेल.

*

‘ईश्वरी कृपा’ ही सदोदित असतेच, ती शाश्वतपणे अस्तित्वात असते, सक्रिय असते पण श्रीअरविंद म्हणतात की, ‘ईश्वरी कृपा’ स्वीकारण्यासाठी आपण ग्रहणशील स्थितिमध्ये असणे, तिला सांभाळून ठेवणे आणि आपल्याला जे काही प्रदान करण्यात आले आहे त्याचा उपयोग करणे, हे आपल्यालाच अवघड जाते… ‘ईश्वरी कृपा’ ग्रहण करण्यासाठी व्यक्तिपाशी नुसती उत्कट अभीप्सा असणेच पुरेसे नाही तर, तिच्याकडे प्रामाणिक विनम्रता आणि परिपूर्ण विश्वासदेखील असला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 87), (CWM 16 : 250)