साधना, योग आणि रूपांतरण – ३१२

भव्य आणि गौरवशाली रूपांतरण

मानवाची महानता तो काय आहे यामध्ये नसून, तो काय करू शकतो यामध्ये सामावलेली आहे. मानव ही अशी एक बंदिस्त जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या ‘दिव्य कारागीरा’कडून ‘अतिमानवता’ घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न ‘कारागीर’ होण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला (Creator) दिलेली हाक आहे.

पृथ्वी आवाहन करेल आणि ‘परमेश्वर’ जर त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 160)

(ही मालिका येथे समाप्त होत आहे.)

साधना, योग आणि रूपांतरण – ३११

रूपांतरण

(रूपांतरण प्रक्रिया कशी स्वारस्यपूर्ण असते व त्यादरम्यान व्यक्तीला स्वत:विषयी कसे नवनवे शोध लागतात, हे आपण कालच्या भागात समजावून घेतले.)

उदाहरणादाखल, एका अगदी साध्याशा निश्चयाचा विचार करू या. (तो वरवर पाहता साधासा आहे.) “मी पुन्हा कधीही खोटं बोलणार नाही,” असे तुम्ही ठरविता. आणि अचानकपणे, तुम्हाला माहीतही नसते की तुम्ही खोटं का आणि कसे बोललात; पण तुम्ही अनाहूतपणे खोटं बोलता आणि बोलणं झाल्यानंतर मग ते तुमच्या लक्षात येते. तुम्ही म्हणता, “पण हे काही बरोबर नाही. मी जे आत्ता काही बोललो ते बरोबर नाही. मला काही तरी वेगळेच म्हणायचे होते.” मग तुम्ही शोध घेता. “हे असे कसे काय घडले? मी असा कसा विचार केला आणि मी असे कसे काय बोललो? माझ्या तोंडातून हे उद्गार कोणी काढले? मला असे बोलण्यास कोणी भाग पाडलं?…” असा खूप शोध तुम्ही घेता. अशा वेळी तुम्ही स्वतःच्या वागण्याचे समर्थन करता आणि म्हणता की, “ते उद्गार माझे नव्हते, ते बाहेरून आले होते” किंवा “ती गोष्ट अनाहूतपणे झाली होती, तो एक निसटता क्षण होता.” आणि नंतर मग तुम्ही त्याचा विचारही करत नाही. आणि मग पुन्हा पुढच्या वेळी तीच गोष्ट घडते.

त्या ऐवजी तुम्ही जर शोध घेतलात, “तुमच्यामधील जो कोणी खोटं बोलत आहे त्याचा हेतू काय असेल?” आणि मग तुम्ही शोध घेतच राहता, आणि मग तुम्हाला तुमच्यामध्येच एका कोपऱ्यात असे काहीतरी दडलेले आढळते की जे स्वतःला पुढे दामटू पाहात असते, किंवा ते त्याचा दृष्टिकोन ठामपणे रेटू इच्छित असते. (अनेकानेक कारणं सांगता येऊ शकतात.) लोकांचे तुमच्याविषयी मत चांगले झाले पाहिजे आणि तुम्ही कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहात असे त्यांना वाटले पाहिजे, म्हणून तुम्ही वस्तुतः जसे आहात त्याच्यापेक्षा तुम्ही काहीसे वेगळे असल्याचे ते भासवत असते. आणि तो तुमच्यामधील खोटं बोलण्यास प्रवृत्त झालेला घटक असतो. तुमच्या सक्रिय चेतनेमधून नाही, तर तुमच्या चेतनेच्या पाठीमागे जे दडून बसले होते त्याने तुम्हाला खोटं बोलण्यास भाग पाडलेले असते. तुम्ही जेव्हा सजग नसता तेव्हा मग तो घटक तुमचे तोंड, तुमची जीभ वापरतो आणि तुमच्या तोंडातून ते वदवून घेतो. आणि अशा रीतीने तुमच्या तोंडातून खोटं बाहेर पडते.

मी तुम्हाला हे एक उदाहरण दिले. अशी लाखो उदाहरणं आहेत आणि हे सारे मोठे रोचक असते. आणि व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये या सगळ्याचा शोध लागतो, आणि ती प्रामाणिकपणे म्हणते, “मला यामध्ये बदल केलाच पाहिजे,” तेव्हा तिला असे आढळते की, आता तिला एक प्रकारची आंतरिक स्वच्छ दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि मग इतरांमध्येसुद्धा कसे, काय चाललेले असते याविषयी ती हळूहळू सजग होऊ लागते आणि त्यांनी जसे वागावे असे या व्यक्तीला वाटत असते तसे जरी समोरची व्यक्ती वागली नाही तरीही आता त्याचा व्यक्तीला राग येत नाही. उलट गोष्टी कशा घडतात ते व्यक्तीला कळायला लागते; अमुक एक व्यक्ती ‘अशी का आहे’, ‘प्रतिक्रिया कशा तयार होतात’ हे आता व्यक्तीला उमगू लागते. आणि या ज्ञानामुळे व्यक्ती आता (रागराग करत नाही) तर नुसतेच स्मित करते. आता ती व्यक्ती कठोरपणे निष्कर्ष काढत नाही, तर आता व्यक्ती स्वतःमधील आणि इतरांमधील अडचणी दिव्य चेतनेला अर्पण करते. त्या अडचणींच्या अभिव्यक्तीचे केंद्र कोणते का असेना, त्यामध्ये रूपांतरण घडून यावे यासाठी व्यक्ती त्या गोष्टी दिव्य चेतनेला अर्पण करते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३१०

रूपांतरण

(आपले व्यक्तित्व एकसंध, एकजिनसी नसल्यामुळे रूपांतरणाच्या प्रक्रियेमध्ये एकच गोष्ट पुन्हापुन्हा करावी लागते, त्यासाठी चिकाटी कशी आवश्यक असते हे आपण कालच्या भागात पाहिले.)

आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते आणि ती अशी की, तुम्ही जर खरोखरच प्रामाणिकपणे, काळजीपूर्वक ही गोष्ट अंमलात आणण्याचा प्रयत्न कराल तर ती अतिशय स्वारस्यपूर्ण गोष्ट आहे.

जे लोक अगदी एकसुरी, कंटाळवाणे जीवन जगत राहतात त्यांच्यासाठीसुद्धा ही गोष्ट स्वारस्यपूर्ण ठरते. अशी लोकं असतात की, ज्यांना अगदी नीरस असे काम करावे लागते. नेहमी एकच गोष्ट आणि तीही त्याच त्याच वातावरणात करावी लागते. आणि त्या गोष्टीमध्ये किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये रुची कशी घ्यायची हे कळण्यासाठी आवश्यक असणारी जागरुकता त्यांच्या मनामध्ये नसते. अशा व्यक्तीसुद्धा जर स्वतःवर हे नियंत्रण ठेवण्याचे, आणि स्वतःमधील (अनावश्यक असणाऱ्या अशा) गोष्टी वगळायचे काम करू लागतील तर ती गोष्ट स्वारस्यपूर्ण ठरते. म्हणजे असे की, जी जी गोष्ट आपल्यासोबत अज्ञान, अचेतना आणि अहंकार घेऊन येते ती गोष्ट व्यक्तीने परिवर्तनाच्या इच्छेपुढे ठेवली आणि व्यक्ती जर जागरूक राहिली आणि तिने निरीक्षण केले, अभ्यास केला आणि हळूहळू त्याप्रमाणे आचरण करण्यास सुरुवात केली तर हे सारे खूपच रोचक बनते. आणि हे करता-करता व्यक्तीला अनेक अद्भुत आणि अनपेक्षित असे शोध लागतात.

स्वतःमध्ये दडलेेले अनेक छोटे पदर व्यक्तीसमोर उलगडायला लागतात, सुरुवातीला न दिसलेल्या अनेक गोष्टी आता तिला दिसायला लागतात. व्यक्ती एक प्रकारचा आंतरिक मागोवा घ्यायला लागते, स्वतःमधील छोट्याछोट्या काळोख्या कोपऱ्यांचा शोध घ्यायला लागते आणि मग स्वतःशीच म्हणते, “अरेच्चा! मी अशी होते? अमुक एक गोष्ट माझ्यात आहे, ही अमुक एक गोष्ट माझ्यात दबा धरून बसली होती!” कधीकधी अत्यंत घृणास्पद, अगदी नीच, आणि ओंगळ अशा गोष्टीसुद्धा आपल्या आतमध्ये दडून बसलेल्या असतात. आणि एकदा का तिचा शोध लागला की मग अगदी अद्भुत असते ते! मग व्यक्ती त्यावर प्रकाश टाकते आणि ती गोष्ट तिच्यामधून नाहीशी होते. “मी कधीच तिथवर जाऊन पोहोचू शकणार नाही,” असे जे तुम्हाला एकेकाळी वाटले होते आणि ज्यामुळे तुम्ही कष्टी झालेला होतात, तशी स्थिती राहिलेली नसते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०९

रूपांतरण

(व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही. हे मानसिक स्तरावर कसे व का अवघड असते ते कालच्या भागात पाहिले.)

तुम्ही केलेले काम शंभर वेळा बिघडेल, तुम्ही एकशे एक वेळा ते पुन्हा कराल. ते काम हजार वेळा होत्याचे नव्हते होईल, तरीसुद्धा तुम्ही ते पुन्हा एकदा कराल आणि मग एक वेळ अशी येईल की जेव्हा ते ’होत्याचे नव्हते’ होणार नाही.

व्यक्ती जर एकाच घटकाने बनलेली असती तर मग हे सोपे झाले असते. पण व्यक्ती अनेक घटकांनी मिळून बनलेली असते. आणि त्यामुळे असे होते की, अग्रभागी असणारा असा एखादा घटक असतो, त्याने (अमुक एका गोष्टीमध्ये सुधारणा होण्यासाठी) खूप परिश्रम केलेले असतात, तो खूप सचेत असतो आणि नेहमी जागरूक असतो आणि तो जेव्हा सक्रिय असतो तेव्हा सारे काही सुरळीत चाललेले असते; म्हणजे तेव्हा व्यक्ती स्वतःमध्ये कोणत्याही विरोधी गोष्टींना प्रवेश करू देत नाही, तेव्हा ती अगदी सजग असते आणि मग… व्यक्ती झोपी जाते, आणि दुसऱ्या दिवशी जागी होते तेव्हा आता दुसराच एखादा घटक सक्रिय झालेला असतो आणि मग व्यक्ती स्वतःच्या मनाशी म्हणते, “पण मी कालपर्यंत केलेल्या कामाचे काय झाले, ते सगळे काम कुठे गेले?”… आणि मग व्यक्तीला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागते.

सर्व घटकांना चेतनेच्या क्षेत्रामध्ये नेऊन, त्या सर्व घटकांमध्ये एक एक करून, जोवर परिवर्तन होत नाही तोपर्यंत व्यक्तीला पुन्हा पुन्हा अशी नव्याने सुरुवात करावी लागते. आणि मग जेव्हा तुमच्या परिश्रमांची परिसीमा होते तेव्हा मग परिवर्तन घडून येते, आता तुम्ही प्रगतीचा एक टप्पा पार केलेला असतो. नंतर पुन्हा, प्रगतीचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करावे लागते. पण तरीही तोवर निदान एक टप्पा तरी पार पडलेला असतो. अशा रीतीने व्यक्तित्वाचे सर्व घटक जेव्हा एका पाठोपाठ एक या पद्धतीने पृष्ठभागावर आणले जातात आणि तुम्ही जोपर्यंत त्या सर्व घटकांवर अगदी निरपवादपणे, चेतना, इच्छा आणि तुमचे ध्येय यांचा प्रकाश टाकत नाही तोपर्यंत हे असे करत राहावे लागते. सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे करत राहावे लागते. आणि मग तेव्हा कुठे व्यक्तित्वाचे संपूर्ण रूपांतरण झालेले असते.

तुमचा उत्साहभंग करण्यासाठी मी हे सांगत नाहीये, पण मी तुम्हाला जाणीव करून देऊ इच्छिते. नंतर मग तुम्ही असे म्हणता कामा नये की, “मला हे इतके अवघड आहे हे आधी माहीत असते तर मी या गोष्टीची सुरुवातच केली नसती.” हे सारे अतिशय अवघड आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. दृढ निश्चयाने प्रारंभ करा आणि जरी यामध्ये यश येण्यासाठी कितीही दूरवरची वाटचाल करावी लागली तरी ते पूर्णत्वास जाईपर्यंत कार्यरत राहा. त्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०८

रूपांतरण

(व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही. हे शारीरिकदृष्ट्या व प्राणिकदृष्ट्या कसे व का अवघड असते ते कालच्या भागात आपण पाहिले.)

मानसिकदृष्ट्या तर ही गोष्ट अधिकच वाईट असते. मानवी मन हे सर्व बाजूंनी उघड्या असणाऱ्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणासारखे असते. तेथे सर्व बाजूंनी गोष्टी आत येत असतात, जात असतात, एकमेकींवर आदळत असतात आणि त्यातील काही गोष्टी तेथेच स्थिरस्थावर होतात आणि त्या काही नेहमीचांगल्या असतातच असे नाही. आणि अशा या अनेकविध गोष्टींवर नियंत्रण प्रस्थापित करणे हे सर्वात कठीण असते.

तुमच्या मनामध्ये प्रवेश करणाऱ्या विचारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी काय म्हणत आहे ते तुमच्या लक्षात येईल. किती काळजीपूर्वक राहावे लागते हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे, डोळे टक्क उघडे ठेवून, तुम्हाला सतर्क राहावे लागते आणि तुमच्या अभीप्सेशी सुसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या आणि विसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या याविषयी तुम्हाला पूर्णपणे सुस्पष्टपणे जाण असावी लागते. कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या व्यक्तींचा त्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश होऊ नये यासाठी, तुम्हाला एखाद्या पोलिसाप्रमाणे प्रत्येक क्षणी लक्ष ठेवून राहावे लागते.

आणि हे विसरू नका की, तुम्ही अगदी कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तरीही या सर्व अडचणींचा शेवट एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षात होणार नाहीये. व्यक्ती जेव्हा हे प्रयत्न करायला सुरुवात करते तेव्हा तिच्यामध्ये अविचल अशी सहनशीलता, चिकाटी (patience) असणे आवश्यक असते. व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की, “हे करण्यासाठी मला पन्नास वर्षे लागली, शंभर वर्ष लागली किंवा कितीही वर्षे लागली तरी चालेल, पण मला जे साध्य करायचे आहे ते मी साध्य करेनच.”

एकदा का तुम्ही असा निर्धार केलात आणि तुम्ही निर्धारित केलेले उद्दिष्ट हे सतत व अथक परिश्रम घेण्यायोग्य आहे याची तुम्हाला जाणीव झाली असेल तर मग तुम्ही (रूपांतरणाच्या या प्रक्रियेस) आरंभ करू शकता.

अन्यथा, कालांतराने तुम्ही निराश होऊन जाल, तुमचा उत्साहभंग होईल. मग तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हणाल, “बापरे! हे खूपच अवघड आहे. मी (अमुक एक गोष्ट करण्याचा) प्रयत्न करतो आणि ती पुन्हा ‘होत्याची नव्हती’ होते, मग मी पुन्हा प्रयत्न करतो, परत तसेच होते. मी पुन्हा एकवार (मनाचा हिय्या करून) प्रयत्न करतो आणि परत तसेच होत्याचे नव्हते होते. काय करावे? मी माझ्या उद्दिष्टापर्यंत कधी जाऊन पोहोचणार?” (आणि म्हणूनच) व्यक्तीकडे प्रचंड सहनशीलता, चिकाटी असली पाहिजे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०७

रूपांतरण

(रूपांतरणाची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यामध्ये धीर, चिकाटी यांची कशी आवश्यकता असते ते श्रीमाताजी येथे समजावून सांगत आहेत. या प्रक्रियेस आरंभ करण्यापूर्वी व्यक्तीला त्यासंबंधी पुरेशी स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे, असे त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ दिसतो. हा संपूर्ण भाग मुळातूनच विचारात घ्यावा असा आहे. तो क्रमश: पाच भागांमधून देत आहोत.)

अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही हे खरेतर आपले दुर्दैव आहे असे म्हटले पाहिजे. कारण त्या अन्नाबरोबर, आपण दररोज आणि सातत्याने मोठ्या प्रमाणात अचेतनता, तामसिकता, जडत्व आणि मूढता यांचेही ग्रहण करत असतो. आपण सातत्याने, पूर्णपणे, अखंड सजग राहिले पाहिजे आणि जेव्हा एखादा अन्नघटक आपल्या शरीरामध्ये ग्रहण केला जातो तेव्हा आपण लगेच त्यावर क्रिया करून, त्याच्यामधील प्रकाश तेवढा बाजूला काढला पाहिजे आणि आपल्या चेतनेला अंधकारमय करणाऱ्या त्यामधील साऱ्या गोष्टींचा आपण अस्वीकार केला पाहिजे.

अन्नग्रहण करण्यापूर्वी ईश्वराला नैवेद्य दाखविण्याची, अर्पण करण्याची जी धार्मिक प्रथा आहे त्याचे मूळ येथे आहे आणि हेच त्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण आहे. अन्न ग्रहण करताना, ते अन्न आपल्या क्षुद्र अशा मानवी अहंकाराद्वारे ग्रहण केले जाऊ नये तर ते आपल्या अंतरंगातील ईश्वरी चेतनेला अर्पण केले जावे अशी आस व्यक्ती बाळगत असते. सर्व योगमार्गांमध्ये, सर्व धर्मांमध्ये याला महत्त्व दिले जाते. दररोज, सातत्याने, आपल्याही नकळत आपण अचेतनता शोषून घेत असतो, आणि त्याचे प्रमाण वाढवत नेत असतो, ते प्रमाण शक्य तितके कमी केले जावे यासाठी, त्या अन्नाच्या पाठीमागे असणाऱ्या चेतनेशी आपला संपर्क व्हावा, हे त्या प्रथेचे मूळ आहे.

प्राणाच्या बाबतीतही तसेच आहे. प्राणिक दृष्टया तुम्ही प्राणिक जगतामध्ये राहात असता. त्या जगतामधील प्राणिक शक्तीचे प्रवाह तुमच्या चेतनेमध्ये प्रवेश करत असतात, बाहेर जात असतात, ते एकमेकांशी मिळूनमिसळून राहात असतात तर, कधी परस्परांना विरोधही करत असतात. ते प्राणिक प्रवाह भांडत असतात, एकमेकांमध्ये मिसळत असतात. आणि जरी तुम्ही तुमची प्राणिक चेतना शुद्ध करण्याचा वैयक्तिक प्रयत्न केलात आणि त्या चेतनेमधील वासनात्म्यावर व क्षुद्र मानवी अहंकारावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केलात तरीही, तुम्ही ज्यांच्यासमवेत राहत असता त्यांच्याकडून आलेली सर्व विरोधी स्पंदने सुद्धा तुमच्याकडून अपरिहार्यपणे (तुमच्या नकळत) शोषून घेतली जातात. (कारण) व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही.

शारीरिक दृष्टया असे करण्यापेक्षा प्राणिकदृष्ट्या तसे करणे अधिक अवघड असते आणि (त्यामुळेच) व्यक्ती स्वतःमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींचे ग्रहण करत असते. म्हणजे व्यक्ती जर सातत्याने पूर्णपणे जागरूक नसेल, सदैव सावध नसेल आणि आतमध्ये जे जे प्रवेश करत आहे त्यावर तिचे जर पुरेसे नियंत्रण नसेल, म्हणजे ती स्वतःच्या चेतनेमध्ये नको असलेल्या घटकांचा शिरकाव होऊ देत असेल तर, अशा व्यक्तीला तिच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींकडून येणाऱ्या सर्व तऱ्हेच्या नकोशा स्पंदनाचा, सर्व लहानसहान अंधकारमय प्रतिक्रियांचा, सर्व कनिष्ठ गतिप्रवृत्तींचा, सर्व इच्छावासनांचा सतत संसर्ग होतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०६

अचेतनाचे रूपांतरण

(जुलै १९४८ मध्ये जागतिक परिस्थितीबद्दल खंत व्यक्त करणाऱ्या काही व्यक्तींसंबंधी, एका साधकाला उद्देशून लिहिलेले हे पत्र…)

सध्या गोष्टी काही ठीक चालल्या आहेत असे नाही, त्या दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालल्या आहेत आणि कोणत्याही क्षणी त्या अजूनही वाईट होतील किंवा वाईटाहूनही वाईट असे काही घडणे शक्य असेल तर तसेही घडू शकेल. सध्याच्या अस्वस्थ जगामध्ये, गोष्टी कितीही विरोधाभासी असल्या तरी त्या घडणे शक्य आहे, असे आता वाटू लागले आहे. त्या तुमच्या स्नेह्यांसाठी सर्वोत्तम गोष्ट कोणती असेल तर ती हीच की जे चाललेले होते ते सर्व आवश्यक होते, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. कारण एक नूतन आणि अधिक चांगले जग प्रत्यक्षात येण्यासाठी, काही विशिष्ट शक्यता उदयास येऊन, त्यांच्यापासून सुटका होण्याची आवश्यकता होती. ‘नंतर कधीतरी करू’ असे म्हणून त्या पुढे ढकलता येण्यासारख्या नव्हत्या.

योगामध्ये ज्याप्रमाणे, व्यक्तित्वामध्ये सक्रिय किंवा सुप्त अशा ज्या कोणत्या गोष्टी असतात, त्यांना प्रकाशामध्ये आणून कार्यान्वित करावे लागते म्हणजे त्यांचा सामना करता येतो आणि त्यांना हद्दपार करता येते किंवा तळाशी सुप्तपणे पडून असलेल्या गोष्टींना शुद्धिकरणाच्या हेतुने पृष्ठभागावर आणावे लागते, अगदी तसेच येथेही आहे.

‘उषःकालापूर्वीची रात्र ही अधिक काळोखी असते आणि उषेचे आगमन हे अपरिहार्य असते,’ ही म्हण त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मात्र त्यांनी ही गोष्टदेखील लक्षात ठेवली पाहिजे की, ज्या नवीन जगताचे आगमन आमच्या दृष्टीस (स्पष्टपणे) दिसत आहे ते जगत म्हणजे जुन्याच जगताच्या पोतापासून (texture) बनलेले पण प्रकाराने काहीसे वेगळे असणारे, असे नाही तर, त्या नूतन जगताचा उदय हा अन्य मार्गाने, म्हणजे बाहेरून नव्हे तर, अंतरंगातूनच झाला पाहिजे. म्हणून बाहेर घडणाऱ्या शोचनीय गोष्टींविषयी खूप जास्त चिंतित राहू नये, तर आपण अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहावे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहिल्याने, नवीन जगत, मग ते कोणत्याही रूपात साकार झाले तरी, तुमचे ते (स्नेही) त्यासाठी सज्ज राहू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 691)
*

साधना, योग आणि रूपांतरण – ३०५

अचेतनाचे रूपांतरण

(साधना अचेतनापर्यंत [Inconscient] जाऊन पोहोचल्यामुळे साधकांमध्ये सर्वसाधारणपणे एक निरुत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, असे निरीक्षण एकाने नोंदविले आहे, त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

या साधकांच्या आंतरिक जीवनामध्ये अचेतनातून आलेल्या तामसिकतेमुळे एक प्रकारचा अडसर निर्माण झाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडत नाहीये, हेच तर दुखणे आहे. व्यक्तीने जर योग्य परिस्थिती व योग्य दृष्टिकोन बाळगला, आपल्याला नेमून दिलेल्या कामामध्ये आणि साधनेमध्ये जर रस घेतला तर ही अचडण निवळेल.

योग्य वृत्ती ठेवणे आणि हळूहळू किंवा शक्य असेल तर वेगाने, उच्चतर अभीप्सेचा प्रकाश व्यक्तित्वाच्या अचेतन भागामध्येसुद्धा उतरविणे हा यावरील उपाय आहे; म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी, त्या भागालासुद्धा, योग्य संतुलन कायम ठेवता येईल. आणि मग अशा व्यक्तीला सूर्यप्रकाशित मार्ग (sunlit path) अशक्य वाटणार नाही.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 618)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०४

अचेतनाचे रूपांतरण

(दि. ९ एप्रिल १९४७ रोजी श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला या अडचणी इतक्या तीव्रतेने भेडसावत आहेत त्याचे कारण की योगसाधना आता ‘अचेतना’च्या आधारशिलेपर्यंत येऊन पोहोचली आहे. ही अचेतनता, आत्म्याच्या व ईश्वरी कार्याच्या विजयाला (ज्या विजयाकडे तिची वाटचाल चालली आहे त्या विजयाला) व्यक्तिगत स्तरावर व या जगामध्ये जो प्रतिकार होत असतो, त्या प्रतिकाराचा मूळ आधार आहे.

या अडचणी श्रीअरविंद-आश्रमामध्ये आणि बाहेरच्या जगामध्येसुद्धा आहेत. शंकाकुशंका, हतोत्साह, श्रद्धा कमी होणे किंवा नाहीशी होणे, आदर्शाबाबत असेलला प्राणिक जोम, उत्साह क्षीण होणे, मनाचा उडालेला गोंधळ आणि भवितव्याच्या आशेला बसलेला धक्का ही या अडचणींची सर्वसाधारण अशी लक्षणं आहेत.

बाहेरच्या जगामध्ये तर त्याची यापेक्षाही अधिक वाईट लक्षणं दिसून येत आहेत. उदाहरणार्थ, नैराश्यवादामध्ये झालेली वाढ, कोणत्याच गोष्टीवर विश्वास न ठेवणे, सचोटीमध्ये घट, प्रचंड प्रमाणात होणारा भष्ट्राचार, उच्चतर गोष्टी वगळून, अन्न, पैसा, सुखसोयी, मौजमजा यांमध्येच गुंतून पडणे आणि या जगामध्ये काहीतरी वाईट घडून येणार आहे याबद्दल असलेली एक सार्वत्रिक अपेक्षा, (अशा गोष्टी जगामध्ये दिसून येत आहेत.)

या गोष्टी कितीही भयंकर असल्या तरीही त्या तात्पुरत्या आहेत. आणि या जगामधील उर्जेची कार्यप्रणाली आणि आत्म्याची कार्यप्रणाली ज्यांना ज्ञात आहे अशा व्यक्तींची यासाठी तयारी करून घेण्यात आलेली आहे. हे असे निकृष्टतम घडून येणार हे मला आधी ज्ञात झाले होते, परंतु या गोष्टी म्हणजे उषःकालापूर्वीची रात्र आहे, त्यामुळे मी नाउमेद झालेलो नाही. या अंधकारापाठीमागे कशाची तयारी चालू आहे हे मला माहीत आहे, आणि त्याच्या आगमनाच्या प्रारंभिक काही खुणा मला दिसू लागल्या आहेत, मला त्या जाणवत आहेत. जे ईश्वराचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी त्यांच्या शोधकार्यामध्ये चिकाटी बाळगली पाहिजे, त्यावर दृढ राहिले पाहिजे. कालांतराने हा अंधकार भेदला जाईल, नाहीसा होईल आणि ‘दिव्य प्रकाश’ उदयास येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 619)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०३

अचेतनाचे रूपांतरण

सद्यस्थितीत साधकांना भेडसावणारी गोष्ट म्हणजे परिवर्तनाची सार्वत्रिक अक्षमता! त्याचे कारण असे आहे की, साधना ही आता एक सार्वत्रिक तथ्य या दृष्टीने अचेतनापर्यंत (Inconscient) आलेली आहे. प्रकृतीचा जो भाग अचेतनावर थेटपणे अवलंबून असतो अशा भागामध्ये परिवर्तन करण्याचा आता दबाव आहे, आणि तशी हाक आलेली आहे. म्हणजे दृढमूल झालेल्या सवयी, आपोआप घडणाऱ्या हालचाली, प्रकृतीची यांत्रिक पुनरावृत्ती, जीवनाला दिलेल्या अनैच्छिक, प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया, या साऱ्या गोष्टी मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक स्थायी, अपरिवर्तनीय भाग असल्यासारख्या दिसतात. समग्र आध्यात्मिक परिवर्तनाची शक्यता निर्माण होण्यापूर्वी या गोष्टींमध्ये परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. आणि ही गोष्ट शक्य व्हावी म्हणून ‘दिव्य शक्ती’ (व्यक्तिगत स्तरावर नव्हे तर, सार्वत्रिक स्तरावर) कार्यरत आहे. आणि हा दबाव त्याचसाठी आहे. कारण इतर स्तरांवर, हे परिवर्तन यापूर्वीच शक्य झालेले आहे. (आणि हे लक्षात ठेवा की या परिवर्तनाचे आश्वासन प्रत्येकाला देण्यात आलेले नाही.)

परंतु अचेतनास प्रकाशाप्रत खुले करणे हे भगीरथ-कार्य आहे; त्या मानाने इतर स्तरांवरील परिवर्तन हे अधिक सोपे होते. आणि अचेतनावरील हे कार्य आत्ताआत्ता कुठे सुरू झाले आहे आणि त्यामुळे वस्तुमात्रांमध्ये किंवा माणसांमध्ये कोणतेही कोणताही बदल दिसून येत नाहीये यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. हा बदल घाईने नाही, पण योग्य वेळी (निश्चितपणे) घडून येईल.

अनुभवादी गोष्टी ठीक आहेत पण मूळ प्रश्न असा की, अनुभवादींमुळे केवळ चेतना समृद्ध होते, त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. मनाच्या स्तरावर, जरी अगदी ब्रह्माचा साक्षात्कार झाला तरी तो अनुभवसुद्धा, काही अपवाद वगळता प्रकृतीस, ती जवळजवळ जिथे जशी आहे तशीच सोडून देतो. आणि म्हणूनच पहिली आवश्यकता म्हणून आम्ही चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणावर (psychic transformation) भर देत असतो. कारण त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन घडते आणि त्याचे मुख्य साधन भक्ती, समर्पण इत्यादी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 617)