समर्पण – ५८
या योगामध्ये दोन प्रक्रिया असतात, आणि त्यामध्ये एक संक्रमण-अवस्था असते; या योगाचे दोन कालावधी असतात – एक समर्पणाची प्रक्रिया आणि त्याचा परिणामस्वरूप असणारा, कळसाध्याय!
योगसाधनेचा पहिला टप्पा : पूर्वतयारी
पहिल्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती तिच्या घटकांमध्ये दिव्यत्वाचे ग्रहण करता यावे म्हणून स्वतःला तयार करत असते. या पहिल्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला कनिष्ठ प्रकृतीच्या साधनांच्या माध्यमाद्वारेच कार्य करावे लागते, परंतु त्या प्रयत्नांना वरून अधिकाधिक प्रमाणात साहाय्य मिळत असते.
परंतु ह्या प्रक्रियेच्या पुढच्या संक्रमण-अवस्थेच्या टप्प्यावर आपले वैयक्तिक आणि त्यामुळे अर्थातच अज्ञानग्रस्त प्रयत्न हे पुढेपुढे अपुरे पडू लागतात आणि मग तेथे उच्चतर प्रकृती कार्यरत होते; शाश्वत शक्ती ही मर्त्यतेच्या या मर्यादित रूपामध्ये अवतरित होते आणि क्रमाक्रमाने त्याचा ताबा घेते आणि त्याचे रूपांतरण करते. आधी जी पहिली अटळ अशी क्रिया होती, त्या कनिष्ठ क्रियेची जागा आता दुसऱ्या कालावधीमध्ये एका अधिक श्रेष्ठ अशा क्रियेद्वारे घेतली जाते; परंतु जेव्हा आत्म-समर्पण हे पूर्णत्व पावते तेव्हाच हे घडून येते.
आपल्यामधील अहंभावात्मक पुरुष स्वतःच्या शक्तीने किंवा इच्छेने किंवा ज्ञानाने किंवा स्वतःच्या कोणत्याही गुणाने स्वतःचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये करू शकत नाही; तो फार फार तर एवढेच करू शकतो की, तो स्वतःला रूपांतरणासाठी योग्य बनवू शकतो आणि तो जे बनण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याला अधिकाधिक समर्पण करू शकतो. जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार कार्यरत आहे तोपर्यंत आपली वैयक्तिक कृती ही स्वरूपतः नेहमीच अस्तित्वाच्या कनिष्ठ श्रेणींचा एक भाग असणार आणि ती तशी असणेच आवश्यक असते; ती धूसर किंवा अर्ध-प्रकाशित असते, ती तिच्या क्षेत्रामध्ये मर्यादित आणि तिच्या सामर्थ्यामध्ये अगदीच अंशतः प्रभावी असते.
आपल्या प्रकृतीमध्ये नुसते झगमगते परिवर्तन न घडविता, आध्यात्मिक रूपांतरण घडवायचे असेल तर, आपल्या व्यक्तिगत अद्भुत कार्यामध्ये प्रभावशाली व्हावे म्हणून आपण ‘दिव्य शक्ती’ला आवाहन केले पाहिजे; कारण आवश्यक असणारे अमर्याद, सर्वज्ञ, निर्णायक सामर्थ्य फक्त तिच्याकडेच असते. मात्र मानवी वैयक्तिक कृतीची जागा संपूर्णतया दिव्यत्वाने घेणे ही गोष्ट एकाएकी घडणे पूर्णपणे शक्य नसते. खालून होणारी सर्व लुडबुड की जी उच्चतर कृतीच्या सत्याला खोटे ठरविते, त्या लुडबुडीचा प्रथम प्रतिबंध केला पाहिजे किंवा ती अगदी नि:सत्त्व केली पाहिजे. आणि ही गोष्ट स्वेच्छेने केली पाहिजे.
कनिष्ठ प्रकृतीचे मिथ्यत्व आणि सारे आवेग यांना सातत्यपूर्ण, पुनःपुन्हा आणि नेहमीच नकार देणे तसेच आपल्या घटकांमध्ये वृद्धिंगत होणाऱ्या सत्याला आग्रहपूर्वक साहाय्य करणे हे आपल्याकडून अपेक्षित आहे. कारण क्रमाक्रमाने स्थिरावत जाणाऱ्या आपल्या प्रकृतीला आणि येणारा बोधक ‘प्रकाश’, ‘शुद्धता’ आणि ‘शक्ती’ टिकून राहण्यासाठी, त्यांच्या विकसनासाठी आणि त्यांच्या अंतिम परिपूर्णत्वासाठी, आपण त्यांचा मुक्तपणे स्वीकार करण्याची आवश्यकता असते; तसेच त्यांच्या विरोधात जे जे काही असेल, किंवा त्यांच्यापेक्षा जे जे काही गौण असेल किंवा त्यांच्याशी जे मिळतेजुळते नसेल त्याला आपण हट्टाग्रहाने नकार देणेच आवश्यक असते.
स्वतःची तयारी करण्याच्या या पहिल्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे वैयक्तिक प्रयत्नांच्या या कालावधीमध्ये, आपण ज्याच्या प्राप्तीसाठी धडपडत असतो त्या ‘दिव्यत्वा’वर आपल्या समग्र अस्तित्वाचे एककेंद्रीकरण करणे आणि त्याचाच स्वाभाविक परिणाम म्हणून, या ‘दिव्यत्वाचे खरे सत्य’ नसलेले असे जे जे काही आहे, त्याला घालवून देणे (katharsis), त्याला सातत्यपूर्ण नाकारणे, ही पद्धत आपण उपयोगात आणणे आवश्यक असते. आपण जे काही आहोत, आपण जो विचार करतो, आपल्याला जे संवेदित होते किंवा आपण जे काही करतो त्या साऱ्याचे संपूर्ण आत्मनिवेदन म्हणजे या प्रयत्नसातत्याचा परिणाम असेल. आपल्या या आत्मनिवेदनाची परिणती अंतिमतः त्या ‘परमोच्चा’प्रत केलेल्या संपूर्ण आत्मदानामध्ये झाली पाहिजे; कारण समग्र प्रकृतीचे सर्वसमावेशक निःशेष समर्पण म्हणजे त्याच्या पूर्णत्वाची खूण असेल; त्याचा मुकुटमणी असेल.
योगसाधनेचा दुसरा टप्पा : संक्रमण अवस्था
योगसाधनेच्या दुसऱ्या टप्प्यात, मानव आणि ईश्वरी कार्यकारित्व यांच्या संक्रमणामध्ये, एक चढतीवाढती, परिशुद्ध झालेली आणि सावध निष्क्रियता वाढीस लागलेली आढळेल; अन्य कोणत्याही शक्तीला नव्हे तर, केवळ ‘दिव्य शक्ती’ला अधिकाधिक प्रकाशमान असा दिव्य प्रतिसाद मिळताना आढळेल; आणि त्याचा परिणाम म्हणून वरून, एक महान आणि जागरूक चमत्कारसदृश्य कार्यकारितेचा चढतावाढता प्रवाह अनुभवास येईल.
योगसाधनेचा अंतिम टप्पा : दिव्यत्वाचे फूल उमलणे
अंतिम कालावधीमध्ये कोणतेही प्रयत्न शिल्लक राहात नाहीत, कोणतीही ठरावीक पद्धत असत नाही, कोणती ठरावीक साधना असत नाही; प्रयत्न आणि तपस्या या दोहोंची जागा, पार्थिव प्रकृतीच्या परिशुद्ध झालेल्या आणि परिपूर्ण झालेल्या कळीमधून एका नैसर्गिक, शुद्ध, शक्तिशाली आणि आनंददायी दिव्यत्वाचे फूल उमलण्याने घेतली जाईल. योगसाधनेच्या क्रियेचे हे स्वाभाविक टप्पे आहेत.
या प्रक्रिया नेहमीच, अगदी एकापाठोपाठ एक याच क्रमाने घडतात, असे नाही. पहिली प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरुवात झालेली असते; दुसरी प्रक्रिया पूर्णत्वाला जाईपर्यंत पहिली प्रक्रिया आंशिक रूपात चालू राहते; अंतिम दिव्य कार्यकारकत्व अंतिमतया सुस्थिर होण्यापूर्वी आणि प्रकृतीसाठी ते सामान्य होण्यापूर्वी, एक अभिवचन या स्वरूपात ते वेळोवेळी आविष्कृत होत राहते. व्यक्तीला तिच्या वैयक्तिक परिश्रमामध्ये आणि प्रयत्नामध्येसुद्धा दिशादर्शन करणारे असे, त्या व्यक्तीपेक्षा अधिक उच्चतर आणि अधिक महान असे काहीतरी नेहमीच असते. कनिष्ठ प्रकृतीच्या अप्रत्यक्ष नियंत्रणापासून व्यक्तीच्या सर्व घटकांसहित समग्र प्रकृतीची परिशुद्धता होण्यापूर्वीसुद्धा पुष्कळ आधीपासून व्यक्तीला पडद्यामागून मिळणाऱ्या या महत्तर मार्गदर्शनाची जाणीव होऊ शकते; व्यक्तीला काही कालावधीसाठी त्याची पूर्णपणे जाणीव होऊ शकते, तसेच व्यक्तीच्या अस्तित्वाच्या काही भागांना तर ही जाणीव कायमस्वरूपी होऊ शकते. तसेच, कधीकधी ती व्यक्ती अगदी आरंभापासूनसुद्धा याबाबत सजग असू शकते; जरी इतर घटक नाहीत तरी, व्यक्तीचे मन आणि हृदय हे या पकड घेणाऱ्या आणि मर्मभेदक अशा मार्गदर्शनाला एका विशिष्ट प्रारंभिक पूर्णतेनिशी योगसाधनेच्या अगदी पहिल्या पायरीपासूनच प्रतिसाद देऊ शकतात. परंतु जसजसा हा अंतिम टप्पा नजिक येऊ लागतो तसतसा, महान थेट नियंत्रणाच्या सातत्यपूर्ण, परिपूर्ण आणि एकसमान कृतीमुळे या संक्रमण-अवस्थेमध्ये आणि अंतिम टप्प्यामध्ये अधिकाधिक भेद पडू लागतो. आपल्यापुरतेच व्यक्तिगत नसलेल्या, या महत्तर दिव्यतर मार्गदर्शनाचे हे प्राबल्य म्हणजे व्यक्तीची प्रकृती ही समग्र आध्यात्मिक रूपांतरणासाठी चढत्यावाढत्या प्रमाणात परिपक्व होत चालली आहे याचे निदर्शक असते. आत्म-निवेदन हे फक्त तत्त्वतःच नव्हे तर कृतीमध्ये आणि शक्तीमध्येसुद्धा स्वीकारले गेले आहे, याचे हे अचूक लक्षण असते. निवडलेल्या, विस्मयकारी प्रकाशाच्या, शक्तीच्या आणि आनंदाच्या मानवी पात्रावर परमेश्वराने आपला प्रकाशमान वरदहस्त ठेवल्याची ती खूण असते.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 86-88)