कर्मामध्ये मुक्ती मिळवावयाची तर सर्व सामाजिक रूढी आणि सर्व नैतिक पूर्वग्रह यांच्या बंधनांपासून व्यक्तीने मुक्त असले पाहिजे. अर्थात स्वैराचारी, अनिर्बध जीवन जगण्याचा परवाना मिळाल्याप्रमाणेच जीवन जगायचे असा याचा अर्थ नाही. उलट येथे सामाजिक नियमांपेक्षा कितीतरी अधिक कडक असे अनुशासन व्यक्तीने स्वत:वर लादलेले असते. कारण, येथे कोणत्याही प्रकारच्या ढोंगाची मुळीच गय केली जात नाही आणि संपूर्ण, सर्वांगीण खरेपणा त्यात अपेक्षित असतो.

ज्यामुळे शरीरात समतोलपणा, सामर्थ्य आणि सौंदर्य यांची वाढ होण्यास मदत होईल अशाच रीतीने सर्व शारीरिक क्रियांची आखणी केली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यानंतर, कामवासनेच्या उपभोगासकट सर्व प्रकारच्या सुखतृष्णेपासून व्यक्तीने दूर राहिले पाहिजे. कारण कामोपभोगाची प्रत्येक क्रिया म्हणजे मृत्यूकडे नेणारे एक पाऊल आहे. आणि म्हणूनच फार फार प्राचीन काळापासून सर्व पवित्र आणि गुप्त संप्रदायांत, अमरत्वाच्या प्राप्तीसाठी झटणाऱ्या प्रत्येक साधकाला कामवासना-तृप्तीस पूर्ण बंदी असे. कारण अशा कामतृप्तीच्या मागोमाग कमी-अधिक अचेतनेचा काळ येतो, या स्थितीत सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रभावांना द्वार खुले होते आणि मनुष्याची जाणीव खाली उतरते.

तेव्हा एखाद्या व्यक्तीला जर अतिमानसिक जीवन जगण्याच्या इच्छेने स्वत:ची तयारी करावयाची असेल, तर त्याने सुखोपभोगासाठी, एवढेच नव्हे, तर आराम म्हणून किंवा ताण कमी करण्याच्या निमित्ताने सुद्धा आपली जाणीव ढिसाळपणा व निश्चेतनतेपर्यंत कधीच खाली घसरू देता कमा नये. व्यक्तीने शक्ती आणि प्रकाश यामध्येच विश्रांती मिळविली पाहिजे, अंधकार किंवा दुर्बलता यांत नव्हे.

म्हणूनच प्रगतीची आस बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात ब्रह्मचर्यत्वाचे व्रत असले पाहिजे; पण विशेषत: ज्यांना स्वत:ला अतिमानसिक शक्तीच्या आविष्कारासाठी तयार करावयाचे असेल, त्यांच्या बाबतीत ब्रह्मचर्याची जागा संपूर्ण परिवर्जनाने (abstinence) घेतली पाहिजे. हे परिवर्जन बळजबरीने व दमनाने नव्हे तर, एक प्रकारच्या आंतरिक किमयेमुळे साध्य झाले पाहिजे. सर्वसाधारणपणे प्रजननार्थ केलेल्या कृतीमध्ये ज्या शक्ती उपयोगात येतात त्या शक्तींचे, विकास आणि संपूर्ण रूपांतरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शक्तींमध्ये रूपांतर झाल्याचा परिणाम म्हणून ही आंतरिक किमया उदयास येते. हे तर उघडच आहे की, हा परिणाम संपूर्ण व खरोखरीच हितकारी होण्यासाठी मानसिक, प्राणिक जाणिवेतून इतकेच नव्हे तर, शारीरिक इच्छेतूनही सर्व कामप्रवृत्ती व कामेच्छा समूळ नष्ट व्हायला पाहिजेत. सर्व आमूलाग्र व चिरस्थायी रूपांतरण हे आतून बहिर्गामी दिशेने अग्रेसर होते त्यामुळे कोणतेही बाह्य रूपांतरण हे वरील प्रक्रियेचा स्वाभाविक व जवळजवळ अटळ असा परिणाम असते.

मानववंश जसा आहे तसाच चिरस्थायी राखण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, त्या मागणीपुढे मान तुकवून, तिचे हे साध्य यशस्वी व्हावे म्हणून, हा देह प्रकृतीला देऊ करावयाचा का; एका नूतन वंशाच्या निर्मितीच्या दिशेने टाकावयाचे पाऊल बनण्यासाठी, ह्या देहाची तयारी करावयाची ही निर्णायक निवड करावयास हवी. कारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणे शक्य नाहीत; व्यक्तीला भूतकालीन मानववंशाचा एक भाग बनून राहावयाचे आहे की, भावीकाळातील अतिमानववंशाशी संबंधित व्हावयाचे आहे, हे व्यक्तीने प्रत्येक क्षणी ठरवावयाचे आहे.

– श्रीमाताजी

मानसिक तपस्येचा प्रश्न असे म्हणताच, विचारनियंत्रण आणि त्याची परिणती म्हणून आंतरिक शांती प्राप्त करून देणाऱ्या दीर्घ ध्यानाची कल्पना मनात येऊ लागते. योगसाधनेमधील ध्यानाभ्यास इतका प्रसिद्ध आहे की, त्याविषयी अधिक लिहिण्याची जरूरी नाही.

पण साधारणत: लोकांचे लक्ष जात नाही असे योगाभ्यासांत अंतर्भूत असलेले दुसरेही एक अंग आहे. ते अंग म्हणजे वाक्संयम. काही अगदी थोडे अपवाद सोडले, तर बहुधा बोलण्यातील स्वैरपणास आळा घालण्यासाठी संपूर्ण मौनाचाच मार्ग स्वीकारावा, असे सांगितले जाते. पण तरीही बोलणे अजिबातच बंद करण्यापेक्षा त्यावर संयम मिळविणे ही अधिक मोठी व अधिक लाभदायक अशी तपस्या आहे.

शब्दोच्चाराचा उपयोग करू शकणारा पृथ्वीवरील पहिला प्राणी मनुष्य हाच आहे. पण त्याचबरोबर या वाक्शक्तीचा त्याला विशेष अभिमान असून, कोणताही संयम व विवेक न बाळगता, तो त्याचा उपयोग करतो. त्याच्या शब्दांच्या गोंगाटाने जगाचे कान बधीर झाले आहेत; आणि कधी कधी तर वनस्पतिसृष्टीत आढळून येणाऱ्या सांमजस्यपूर्ण शांतीसही मनुष्य पारखा झाल्यासारखे दिसते.

शिवाय, मानसिक शक्ती जितकी कमी, तितका वाणीचा जास्त उपयोग करावा लागतो ही गोष्टही सर्वांना चांगलीच माहीत आहे. उदाहरणार्थ, अगदी आदिम काळातील माणसे किंवा अशिक्षित माणसे; की ज्यांना बोलल्याशिवाय मुळी विचारच करता येत नाही आणि कमीअधिक मोठ्याने ते स्वत:शी काहीतरी शब्द पुटपुटताना आपल्याला दिसतात. कारण, विचारप्रवाहाचे अनुसरण करण्याचा त्यांच्याकडे तो एकच मार्ग असतो. शब्दोच्चाराशिवाय त्यांच्या ठिकाणी विचाराला मूर्त रूप येऊच शकत नाही.

आपल्याला काय म्हणावयाचे आहे हे प्रत्यक्ष बोलल्याशिवाय ज्यांना कळत नाही असे कितीतरी लोक सुशिक्षितांतही असतात. कारण, ते सुशिक्षित असले, तरी त्यांची मानसिक शक्ती दुर्बळ असते. त्या मुळेच त्यांचे बोलणे संपता संपत नाही आणि कंटाळवाणे होते. कारण, ते बोलू लागले म्हणजेच त्यांचे विचार अधिकाधिक स्पष्ट आणि नेमके होऊ लागतात. त्यामुळे जे काही सांगावयाचे, ते तंतोतंत बरोबर सांगता येईपर्यंत तीच गोष्ट पुन:पुनः सांगणे त्यांना भाग पडते.

असेही काही लोक असतात की, त्यांना जे काही बोलावयाचे असते त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. आयत्या वेळी काही बोलण्याची वेळ आली, तर ते अडखळतात, कारण त्यांना नेमके जे काय म्हणावयाचे असते त्याकरता योग्य शब्दांची क्रमवार सुसंगत जुळणी करण्यास त्यांना आधी वेळच मिळालेला नसतो.

शेवटी, वाणीवर संपूर्ण प्रभुत्व असलेले असेही काही जन्मजात वक्ते असतात. त्यांना जे काही व्यक्त करावयाचे असते, त्यासाठी त्यांना अगदी सहज योग्य शब्द सुचतात आणि त्यामुळे त्यांच्या मनातील आशय ते चांगल्या रीतीने व्यक्तही करतात.

तरीपण, मानसिक तपस्येच्या दृष्टीने या सर्वच गोष्टी ‘वायफळ बोलणे’ या सदरांत मोडतात. कारण, अगदी अटळ, अनिवार्य शब्दांखेरीज कोणताही शब्द उच्चारणे याला मी ‘वायफळ बोलणेच’ म्हणेन. पण हे ओळखावयाचे कसे? असे कोणी विचारील. त्यासाठी उच्चारित शब्दांच्या विविध प्रकारांचे व्यक्तीस ढोबळमानाने वर्गीकरण करावे लागेल.

सुमेळ व प्रगतीसाठी विचार करून नंतर बोला –

प्रथमत: भौतिक जगात व्यवहारासाठी आपण वापरतो ते शब्द. अशा शब्दांची संख्या फार मोठी असून सामान्य जीवनात त्याचाच उपयोग बहुतेक वेळा सर्वात अधिक असतो.

दररोजच्या कामासोबत शब्दांचा एकसारखा गोंगाटही जणू अनिवार्यच होऊन बसलेला दिसतो. तरीही हा गोंगाट कमीत कमी करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात, तर शांततेत कितीतरी गोष्टी अधिक चांगल्या आणि जलद करता येतात असे तुम्हास दिसून येईल. त्याचप्रमाणे आंतरिक शांती आणि एकाग्रता टिकविण्यासाठीही त्याचे फार साहाय्य होते हेही तुमच्या ध्यानी येईल.

तुम्ही एकटे नसाल, इतरांबरोबर राहत असाल, तर अशी सवय स्वत:मध्ये विकसित करा की, एकसारखे मोठ्याने बोलून स्वत:स तुम्ही बहिर्मुख करणार नाही. असे केल्याने तुमच्यामध्ये आणि इतरांमध्ये हळूहळू एक प्रकारची आंतरिक समजशक्ती निर्माण झाली आहे असे तुम्हास दिसून येईल. त्यानंतर अगदी थोड्या शब्दांत किंवा काही न बोलताही तुम्ही परस्परांत व्यवहार करू शकाल. अशी ही बाह्य शांतता, आंतरिक शांतीसाठी अत्यंत अनुकूल असते; आणि त्याच्या जोडीस तुमच्या ठिकाणी सदिच्छा व अखंड अभीप्सा असेल तर तुमच्या प्रगतीस अत्यंत पोषक असे वातावरणही तुम्ही तुमच्या भोवती निर्माण करू शकाल.

सामाजिक जीवनात, भौतिक जीवन आणि व्यवसायादींशी संबंधित वापरावयास लागणाऱ्या शब्दांप्रमाणेच संवेदना, मनोवृत्ती आणि भावभावना व्यक्त करणारे देखील शब्द असतील. येथे बाह्य मौनाची सवय अत्यंत साहाय्यकारी ठरते. कारण, जेव्हा तुमच्यावर एखाद्या भावनेच्या वा संवेदनाच्या तरंगाचे आक्रमण होते, त्यावेळी तुमची ही मौनाची सवय तुम्हाला सारासार विचार करावयास सवड मिळवून देते आणि आवश्यकता पडल्यास, संवेदना वा भावना शब्दांद्वारे व्यक्त करण्यापूर्वी तुम्ही स्वत:वर परत ताबा मिळवू शकता. असे केले तर कितीतरी भांडणे टळतील. केवळ वाणीवर संयम नसल्यानेच निर्माण होणाऱ्या कितीतरी मानसिक अनर्थांपासून व्यक्तीचा बचाव होऊ शकेल.

अशा रीतीने कोणताही अतिरेक न करता, व्यक्तीने आपल्या बोलण्यावर नेहमी संयम ठेवला पाहिजे. क्रोध, हिंसा आणि संताप यांच्या आवेगाच्या आहारी आपल्या जिभेला कधीही जाऊ देता कामा नये. भांडणाचे परिणाम वाईट असतात म्हणूनच नव्हे, तर त्यामुळे वातावरणांत अनिष्ट स्पंदने फेकण्यास व्यक्ती आपल्या जिभेला वाव देते, म्हणून ही गोष्ट वाईट आहे कारण, ध्वनींच्या स्पंदनांएवढी दुसरी कोणतीच गोष्ट इतकी सांसर्गिक नसते. वरील भावावेगांना व्यक्त होण्याची संधी देऊन व्यक्ती स्वत:मध्ये आणि इतरांमध्येही अशा गोष्टी चिरस्थायी करावयास संधी देते.

-श्रीमाताजी
(CWM 12 : 57-58)

दुसऱ्यांबद्दल आपण जे काय बोलतो ते सर्व अनिष्ट, अयोग्य प्रकारच्या ‘वायफळ’ बोलण्यातच अंतर्भूत केले पाहिजे.

पालक, शिक्षक किंवा विभागप्रमुख या नात्याने दुसऱ्यांची जबाबदारी तुमच्यावर नसेल, तर ते काय करतात वा काय करीत नाहीत याच्याशी तुम्हाला काही कर्तव्य असता कामा नये. इतरांबद्दल बोलणे, त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या कृतीविषयी तुमचे मत व्यक्त करणे, किंवा इतर लोक त्यांच्याबद्दल काय समजू वा बोलू शकतात ह्याचा पुनरुच्चार करणे हे तुम्ही टाळले पाहिजे. Read more

आता आपण प्राणिक तपस्येकडे, संवेदनांच्या तपस्येकडे, शक्तिच्या तपस्येकडे वळू. कारण, प्राण हेच शक्तीचे आणि प्रभावशाली उत्साहाचे अधिष्ठान आहे. प्राणतत्त्वामध्येच विचाराला संकल्पाचे स्वरूप येते, त्यामुळे कार्याला गती प्राप्त होते. हेही तितकेच खरे आहे की, वासना आणि विकार, हिंसक आवेग, आणि तितक्याच जोरदार प्रतिक्रिया, बंडखोर वृत्ती आणि निराशा यांचे अधिष्ठान प्राणच असतो. यावर साधारणत: नेहमी केला जाणारा उपाय म्हणजे त्यांचा कोंडमारा करणे, सर्व संवेदना काढून घेऊन त्याची उपासमार करणे. वास्तविक मुख्यतः या संवेदनावरच ‘प्राण’ पोसला जातो आणि सर्व संवेदनाच काढून घेतल्या तर तो झोपी जातो, सुस्त आणि आळशी होऊन जातो. त्याचा जणू (संवेदनारूपी अन्न न मिळाल्याने) भूकबळी जातो.

खरे पाहता, प्राणाचे पोषण होण्यास तीन स्रोत उपलब्ध असतात. सर्वात सुलभ असा स्रोत खालच्या बाजूने असतो : संवेदनांद्वारा येणाऱ्या भौतिक शक्तींपासून त्याचे पोषण होते.

दुसरा स्रोत त्याच्या स्वत:च्याच पातळीवर, प्राणाच्याच पातळीवर असतो. प्राणतत्त्व हे जर पुरेसे व्यापक आणि ग्रहणशील असेल, तर विश्वांतील विविध प्राणशक्तींशी त्याचा संबंध येतो व त्याला शक्ती प्राप्त होते.

शक्तीचा तिसरा स्रोत उच्च पातळीवरून येतो. जेव्हा प्रगतीची उत्कट आकांक्षा असते, तेव्हाच प्राण या स्रोतास अभिमुख होतो. वरून आलेली आध्यात्मिक शक्ती व प्रेरणा यांच्या संचाराने व समावेशामुळे हा स्रोत प्राणापर्यंत येऊन पोहोचतो.

यापेक्षा आणखी एका वेगळ्या शक्तिस्रोताची भर घालण्याचा लोक नेहमीच थोडाफार प्रयत्न करतात. पण त्यांचे बहुतेक सर्व कष्ट आणि दुर्भाग्य यांनाही तो स्रोतच कारणीभूत होत असतो. आपल्या बरोबरीच्या व्यक्तींमध्ये – सामान्यत: दोन व्यक्तींमध्ये – प्राणशक्तीची जी देवाणघेवाण होते त्यालाच लोक चुकून प्रेम असे समजून त्याद्वारा पोषण घेतात. पण वास्तविक ते प्रेम परस्परांच्या देवाणीघेवाणीमध्ये सुख घेणाऱ्या दोन शक्तींमधील केवळ आकर्षण असते.

संवेदनांची उपासमार नको, शुद्धिकरण हवे

आपल्यामधील प्राणतत्त्वाची उपासमार होऊ नये अशी आपली इच्छा असेल, तर संवेदनांचा त्यागही करता कामा नये किंवा त्यांची संख्या अथवा त्यांची तीव्रताही कमी करता कामा नये; संवेदना टाळणेही योग्य नाही, तर विचारपूर्वक व विवेकाने त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे.

संवेदना हे ज्ञानप्राप्तीचे व शिक्षणाचे उत्तम साधन आहे. पण हे कार्य त्याकरवी करून घ्यावयाचे असेल, तर स्व-समाधान आणि सुख याकरता चाललेल्या अज्ञानपूर्ण व अंध प्रयत्नांत, सुखोपभोगाचे एक साधन म्हणून अहंकारीपणाने संवेदनांचा उपयोग करता कामा नये.

कोणताही तिरस्कार किंवा नाखुषी न दर्शविता सर्वकाही सहन करावयास आपली इंद्रिये समर्थ असली पाहिजेत. पण त्याचबरोबर प्राणाच्या निरनिराळ्या उर्मीचे प्रकार, त्यांचे मूळ आणि त्यांचे परिणाम यांबाबत सारासार विवेक करण्याची इंद्रियांना शक्ती येऊन, ती अधिकाधिक विकसित झाली पाहिजेत; ती एवढ्यासाठी की, त्या उर्मी सुसंवाद, सौंदर्य आणि आरोग्य यांना उपकारक आहेत की, शरीर आणि प्राण यांच्या समतोलास व विकासास अपायकारक आहेत, हे इंद्रियांना कळले पाहिजे. भौतिक व प्राणिक जगतातील व्यामिश्रतेसह त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांच्याप्रत पोहोचणे व त्यांचा अभ्यास करणे या दृष्टीने साधने म्हणून या इंद्रियांचा उपयोग केला पाहिजे. असे केले म्हणजेच रूपांतरणासाठी करावयाच्या महान प्रयत्नांत त्यांचे योग्य स्थान इंद्रिये प्राप्त करून घेतील.

प्राणशक्ती दुर्बल करून नव्हे तर, ती ज्ञानयुक्त, सामर्थ्यसंपन्न आणि शुद्ध करूनच व्यक्ती आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या विकासास मदत करू शकते. संवेदनाच वर्ज्य करणे हे, जेवण न घेता स्वत:ची उपासमार करण्याइतकेच अपायकारक आहे. संवेदनांची निवड व नियंत्रण शास्त्रशुद्ध तपाचरणाने आणि फक्त प्राणशक्तीचा विकास व पूर्णता यांसाठीच केली पाहिजे. कारण प्राण हे खूप क्रियाशील, गतिशील असे साधन आहे, ते अस्तित्वाच्या इतर भागांप्रमाणेच प्रगतीसाठी आवश्यक आहे.

प्राणशक्तीला शिक्षण देऊन, तिला अधिक शुद्ध करून, अधिक संवेदनाक्षम बनवून, अधिक सूक्ष्म व अधिक सुसंस्कृत बनवून आपण तिच्या हिंसात्मक व पाशवी वृत्तींवर विजय मिळवू शकू. या गोष्टी म्हणजे वास्तविक अविचारीपणा, अज्ञान आणि अभिरुचीचा अभाव यांच्या निदर्शक आहेत.

प्राणशक्तीवर कोणतेही संस्कार न करता तिला आहे त्याच अवस्थेत सोडून दिले तर ती असंस्कृत, अहंकारी आणि विकृत असते हे खरे आहे परंतु त्याच प्राणशक्तीला संवर्धित करून ज्ञानपूर्ण केल्यानंतर ती सुसंस्कृत, धैर्यशील आणि नि:स्वार्थी होऊ शकते हेही तेवढेच खरे आहे. स्वत:मधील सुखतृष्णेचे रूपांतरण अतिमानसिक विपुलतेसाठी असलेल्या अभीप्सेमध्ये (Aspiration towards Divine) कसे करावयाचे एवढे जरी प्रत्येकाला कळले तरी ते पुरेसे आहे. त्यासाठी प्राणशक्तीला शिक्षण देण्याचे काम चिकाटीने, निष्ठेने व प्रामाणिकपणाने करीत राहिले तर अशी एक वेळ येते की, आपल्या ध्येयाची महानता आणि उज्ज्वलता, यांची तिला खात्री पटल्याने, दिव्य आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्राणशक्ती स्वत:च आपल्या क्षुद्र व भ्रामक अशा संवेदनाजन्य सुखोपभोगांचा त्याग करते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 55)

शांत, विश्रांतियुक्त झोप घेण्यासंबंधीची ही रात्रीची तपस्या झाल्यानंतर आता दिवसभर करण्याची तपस्या पाहू. Read more

सौंदर्याची तपस्या किंवा साधना आपणांस भौतिक जीवनाच्या तपस्येच्या द्वारा कर्मस्वातंत्र्याप्रत घेऊन जाईल. त्याचा पायाभूत कार्यक्रम म्हणजे सुंदर बांध्याचे, सुसंवादी ठेवणीचे शरीर घडविणे हा असेल. तसेच हालचालींमध्ये चपळ व लवचीक, कृतींमध्ये सामर्थ्यसंपन्न आणि आरोग्य व इंद्रियांच्या कार्याबाबत सुदृढ असे शरीर घडविणे हा असेल. हे सर्व साध्य करून घेण्यासाठी काही विशिष्ट सवयी लावून घेऊन, भौतिक जीवन सुसंघटित करण्यासाठी त्या सवयींचा साहाय्यक म्हणून उपयोग करून घेणे सामान्यतः योग्य ठरेल. कारण नियमित आखीव कार्यक्रमाच्या चौकटीत आपले शरीर अधिक सुगमतेने कार्य करू शकते. Read more