साधक : आध्यात्मिक मार्ग अनुसरण्यासाठी एखाद्या व्यक्तीची तयारी झाली आहे का, हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत का? विशेषेकरून, जेव्हा त्या व्यक्तीला आध्यात्मिक गुरु लाभलेला नसतो तेव्हा?

श्रीमाताजी : हो, सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवाची पूर्ण समता. ही शांत, स्थिर, महान शक्तीची एक प्रकारची भावना असते; आणि हा अगदी निरपवादपणे अटळ असा पाया आहे; हा शांतपणा म्हणजे जडत्वातून आलेला शांतपणा नसतो तर, एकाग्र शक्तीमुळे येणारी ती शांतीची संवेदना असते; ती तुम्हाला कायम स्थिर राहायला मदत करते. परिस्थिती कोणती का असेना, अगदी तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर अशी परिस्थिती असली तरी, त्यावेळी देखील ती तुम्हाला अगदी स्थिर ठेवते. ही पहिली खूण आहे.

दुसरी खूण म्हणजे तुमच्या सामान्य, साधारण अशा चेतनेमध्ये तुम्ही पूर्णत: बंदिवान झालेला आहात; प्रचंड कठीण, काहीतरी गुदमरवून टाकणारे, दुःसह, अशा कशामध्ये तरी तुम्ही बंदिवान झाला आहात असे तुम्हाला वाटते; जणू काही एखादी अभेद्य भिंत तुम्हाला पाडायची आहे, असे तुम्हाला वाटते. आणि त्या यातना असह्य होतात, त्या घुसमटवणाऱ्या असतात. त्या यातना भेदून पलीकडे जाण्याचे आंतरिक प्रयत्न चालू असतात पण त्या भेदणे तुम्हाला जमत शक्य होत नाही. ही सुद्धा सुरुवातीच्या काही खुणांपैकी एक खूण आहे. याचा अर्थ असा की, तुमची आंतरिक चेतना अशा एका बिंदूपाशी येऊन पोहोचलेली असते की, आता तिचा बाह्य साचा हा तिच्यासाठी खूपच तोकडा पडू लागतो. सामान्य जीवन, सामान्य उद्योग, सामान्य नाती, या साऱ्या साऱ्या गोष्टी इतक्या लहान, इतक्या किरकोळ वाटू लागतात की, त्या तोडून टाकण्यासाठी आवश्यक असणारी एक शक्ती तुम्हाला तुमच्या आतूनच जाणवू लागते.

अजून एक खूण आहे, ती अशी की, तुमच्यामध्ये एक आस असते, आणि जेव्हा तुम्ही एकाग्र होता, तेव्हा तुम्हाला वरून काहीतरी खाली अवतरित होत आहे, तुम्हाला काही प्रतिसाद मिळत आहे असे जाणवते. एक प्रकाश, एक शांती, एक शक्ती तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तीही अगदी त्वरित – तुम्हाला त्यासाठी खूप वेळ घालवावा लागत नाही किंवा वाट पाहावी लागत नाही – आतून एक अभीप्सा उदित होते, एक हाक येते आणि लगेचच त्याला प्रतिसाद मिळतो. यावरूनही हे लक्षात येते की, (तुमचे ईश्वराबरोबरचे) ‘नाते’ चांगल्या रीतीने प्रस्थापित झाले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 97-98)

‘पूर्णयोग’ म्हणजे भौतिक जीवनापासून पलायन नव्हे, की जे त्याला त्याच्या नशिबावर अपरिवर्तनीय रुपात, आहे तसेच सोडून देते; किंवा कोणत्याही निर्णायक बदलाची आशासुद्धा न बाळगता, भौतिक जीवनाचा ते जसे आहे तसाच स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे, किंवा विश्व हे ‘ईश्वरी इच्छे’चे अंतिम आविष्करण आहे असे मानून, विश्वाचा स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे.

सामान्य मानसिक चेतनेपासून, अतिमानसिक आणि दिव्य चेतनेपर्यंत असणाऱ्या चेतनेच्या सर्व श्रेणी चढत जाणे आणि जेव्हा हे आरोहण पूर्णत्वाला पोहोचेल तेव्हा या भौतिक विश्वामध्ये पुन्हा परत येणे आणि – पृथ्वी क्रमश: ईश्वरीय आणि अतिमानसिक विश्वामध्ये परिवर्तित व्हावी या हेतुने – प्राप्त करून घेतलेल्या त्या अतिमानसिक शक्तीनिशी व चेतनेनिशी, हे भौतिक विश्व प्रेरित करणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे.

 

– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

श्रीअरविंदांच्या जन्मापर्यंत, अध्यात्म आणि धर्म हे भूतकाळातील व्यक्तिमत्त्वांभोवती, विभूतींभोवती केंद्रित झालेले होते, आणि ‘पृथ्वीवरील जीवनास नकार’ या उद्दिष्टाकडे ते निर्देश करीत असत. तेव्हा, तुम्हाला दोन पर्यायामधून एकाची निवड करावी लागे : सुखदुःख, आनंद व दु:खभोग यांच्या रहाटगाड्यामध्ये फिरत असलेले, आणि तुम्ही योग्य आचरण केले नाहीत तर, नरकवासाची धमकी देणारे ‘इहलोका’तील जीवन हा एक पर्याय आणि दुसऱ्याच विश्वामध्ये, ‘परलोका’मध्ये पलायन, स्वर्ग, निर्वाण, मोक्ष हा दुसरा पर्याय असे…

या दोहोंमधून एकाची निवड करायची झाली तर निवडीसाठी फारसा वावच नसे, कारण दोन्ही पर्याय तितकेच वाईट असत. या मूलभूत चुकीमुळेच भारतामध्ये दुर्बलता आली, भारताचे अवमूल्यन झाले, हे श्रीअरविंदांनी आपल्याला सांगितले…

या पार्थिव जीवनापासून पलायन करून सत्य गवसणार नाही तर त्यामध्येच राहून, त्याचे परिवर्तन करून, त्याला ‘दिव्य’ बनविण्यामध्येच सत्य सामावलेले आहे; असे केल्याने या ‘भौतिक जगा’मध्येच ‘ईश्वरा’चे आविष्करण घडून येईल, हे श्रीअरविंदांनी दाखवून दिले.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 210-211)

*

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधला पाहिजे. पण येथे व्यक्तीने एक चूक करता कामा नये; ती म्हणजे तो मार्ग ‘तर्कबुद्धी’ने ‘शोधता’ कामा नये, तर तो मार्ग ‘अभीप्से’च्या (Aspiration) आधारे ‘शोधला’ पाहिजे. अभ्यास आणि विश्लेषण यांद्वारे नव्हे तर, अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलचा (Inner opening) प्रामाणिकपणा यांच्या माध्यमातून तो मार्ग शोधला पाहिजे.

व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे जेव्हा त्या आध्यात्मिक ‘सत्या’प्रतिच अभिमुख झालेली असते, – मग त्याला नाव कोणतेही दिलेले असूदे, जेव्हा बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, निरपवाद, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो. अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, नंतर त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी स्पष्ट होते. आणि अशा रीतीने वाटचाल केल्यास, व्यक्तीकडून कोणतीही चूक होण्याची शक्यता उरत नाही….

हे तुमच्यासाठी चांगले असते, हेच केवळ आवश्यक असते. मात्र ती काहीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील तुम्ही जेव्हा ती इतरांवर लादू पाहता तेव्हा ती मिथ्या बनते…

…मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत मात्र प्रत्येकाने स्वत:चाच मार्ग अनुसरला पाहिजे, त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल केली पाहिजे.

अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे; ती मदत असते ‘ईश्वरी कृपेची’! ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 406-407)

तुम्ही जेव्हा योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही अशा निराधार अवस्थेत हवेत लोंबकळत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या गोष्टी तुम्ही बाहेर काढून टाकल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे.

तुम्ही काय होतात याचा विचार करू नका, तर तुम्ही काय बनण्याची इच्छा बाळगता त्याचाच विचार करा; तुम्ही जे प्रत्यक्षात अनुभवू इच्छित आहात त्या विचारांमध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा. ‘ईश्वर’ हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 83-84)

धम्मपद : रस्त्याच्या कडेलासुद्धा एखादे सुंदर सुवासिक फूल उमललेले आढळते, त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशित बुद्धांचे शिष्यदेखील, त्यांच्या बुद्धिप्रकाशाच्या योगे, अंध व अज्ञानी जनसमूहात, चारचौघांमध्ये उठून दिसतात.

श्रीमाताजी : येथे काही चांगल्या सूचना करण्यात आल्या आहेत, उदाहरणार्थ, इतर जणं काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, निष्काळजीपणा यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय निर्मळ फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही इतके त्याज्य काहीच नसते.

व्यक्तीचा भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

तुम्ही जे बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्याभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता; तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील; ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थीभावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार म्हणजेच सारखे दुःख, सततचा असंतोष तुमच्या वाट्यास येणार; म्हणजेच अंतिमतः निराशाच पदरी पडणार. आपले स्वत:चेच वातावरण सदोदित आपल्या सोबत असते.

…जेव्हा तुम्ही सदाचारी असता; उदार, उदात्त, नि:स्वार्थी, दयाळू असता, त्यावेळी तुम्ही तुमच्यामध्ये व तुमच्याभोवती एक विशिष्ट वातावरण निर्माण करीत असता. हे वातावरण म्हणजे एक प्रकारचा प्रकाशमय विश्राम असतो. सूर्यप्रकाशात बहरून येणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे तुम्ही खुलून येता, त्याच प्रकाशमयतेमध्ये श्वासोच्छ्वास करता. त्यामुळे जीवनात कोणतीही कटुता, विद्रोह, क्लेश, दुःखद प्रतिघात तुमच्यावर होत नाहीत. अगदी सहज स्वाभाविकपणे तुमच्या भोवतालचे वातावरण प्रकाशमय होते आणि ज्या हवेत तुम्ही श्वासोच्छ्वास करता ते वातावरण आनंदमय होऊन जाते. देहामध्ये असताना किंवा देहातून बाहेर गेल्यावरही, जागृती किंवा निद्रेमध्ये, जीवनामध्ये किंवा मरणोत्तर नवीन जन्म मिळेपर्यंतच्या जीवनातही तुम्ही त्याच वातावरणात जगता. छिन्नविछिन्न करून टाकणाऱ्या वाऱ्याप्रमाणे, गोठवून टाकणाच्या थंडीप्रमाणे, किंवा भस्मसात करून टाकणाऱ्या अग्निज्वालेप्रमाणे, दुष्कृत्ये ही मनुष्याच्या चेतनेवर प्रतिकूल परिणाम घडवून आणतात. सर्व सत्कृत्ये, शुभ कर्म ही जीवनात प्रकाश, स्वास्थ्य, आनंद आणि पुष्पविकासी सूर्यप्रकाश भरत असतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 199-200)

धम्मपद : दुष्कृत्य करणारा मनुष्य इहलोकामध्ये व परलोकामध्येही क्लेश भोगतो. तो त्याची दुष्कृत्ये आठवून विलाप करतो आणि दुःखभोग भोगतो.

श्रीमाताजी : आपण करत असलेले कृत्य वाईट, ओंगळ आहे हे दिसण्यासाठी, समजण्यासाठीसुद्धा मनुष्य एका उंचीवर पोहोचलेला असला पाहिजे. त्याला आत गाभ्यात कोठेतरी सौंदर्य, उदात्तता, उदारता या गोष्टींची पूर्वप्रचिती आलेली असावी लागते, तरच त्याला या गोष्टींच्या अभावामुळे सहन करावे लागणारे दुःख नेमके कसे असते याची कल्पना येऊ शकते.

मला वाटते, सुंदर काय, उदात्त काय हे माहीत असूनही जे लोक जाणूनबुजून, मुद्दाम वाईट वागतात, त्यांच्यासाठी जीवन हे खरोखरच वेदनामय ठरते. काय करू नये ते माहीत असतानासुद्धा, एकसारखे तीच गोष्ट करत राहायची तर त्याच्या मोबदल्यात, शांती, स्वास्थ्य याची किंमत मोजावी लागणारच. जो खोटे बोलतो तो त्याचे पितळ कधीतरी उघडे पडेल या भीतीखाली सतत वावरत असतो. जो चुकीचे वागला आहे तो सतत या चिंतेत असतो की त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा तर होणार नाही ना! जो दुसऱ्याला फसविण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला त्याची चोरी उघडकीला येईल की काय याची कायमच धास्ती वाटत असते. वास्तविक अगदी पूर्ण स्वार्थी दृष्टीने पाहिले तरीसुद्धा सत्कृत्य करणे, न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत आणि समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

आणि या उपर, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल, कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्माने तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्याभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता; जर तुम्ही केलेली कर्मे ही सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थीभावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार म्हणजेच सारखे दुःख, सततचा असंतोष तुमच्या वाट्यास येणार; म्हणजेच अंतिमत: निराशाच पदरी पडणार..

– श्रीमाताजी
(CWM 03 : 197-198)

(‘अतिमानस आविष्करण आणि पूर्णत्व-संपादन’ या विषयी श्रीअरविंद लिखित एका उताऱ्याचे वाचन श्रीमाताजींनी केले. त्या उताऱ्यामध्ये मन, प्राण तसेच शरीर या आधाराचे महत्त्व प्रतिपादन करण्यात आले होते. त्याच दृष्टीने ‘श्रीअरविंद आश्रमा’त व्यायाम, योग-आसने, प्राणायामादी शरीर-साधनेला महत्त्व दिलेले आढळते. या पार्श्वभूमीवर पुढील संवाद झालेला आहे.)

साधक : माताजी, प्रगतीसाठी क्रीडा-स्पर्धा आवश्यक आहेत का ?

श्रीमाताजी : नैतिक शिक्षणाच्या दृष्टीने विचार करता, खरंतर, त्या आवश्यक असतात कारण जर एखाद्याने त्या स्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने सहभाग घेतला तर स्वत:च्या अहंकारावर ताबा मिळविण्याची ती एक उत्तम संधी असते. पण स्वत:च्या दुर्बलता व कनिष्ठ वृत्ती ह्यांच्यावर मात करण्याच्या भूमिकेतून त्याकडे न पाहता, जर का एखादा नुसताच खेळत राहिला तर साहजिकच आहे की, त्याला त्यांपासून कसा व काय फायदा करून घ्यायचा ते माहीत नसेल आणि त्यामुळे त्याला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. परंतु कोणत्याही हीन प्रकारच्या प्रवृत्तींशिवाय, म्हणजे द्वेषभाव वा महत्त्वाकांक्षा न बाळगता, जर एखादा योग्य वृत्तीने खेळायची इच्छा बाळगेल; एखादा जर, ज्याला ‘खिलाडू वृत्तीने खेळलेला नि:पक्षपाती खेळ’ (fair play) असे म्हटले जाते अशा अभिवृत्तीने (spirit) खेळ खेळेल, म्हणजेच सर्वोत्तम तेच करण्याचा प्रयत्न करणे आणि यशापयशाची चिंता न करणे, अशी अभिवृत्ती राखेल; समजा त्याला यश मिळाले नाही किंवा त्याला अनुकूल अशा गोष्टी घडल्या नाहीत तरी त्यामुळे अस्वस्थ न होता तो जर प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकेल, तर त्या गोष्टी उपयुक्त ठरतील. याचा परिणाम म्हणून, या अशा स्पर्धांमधून, स्व-नियंत्रण व कर्मफलापासून अलिप्तवृत्ती या गुणांनी व्यक्ती संपन्न होईल. या गोष्टी व्यक्तीचे असामान्य चारित्र्य घडविण्यामध्ये अतिशय साहाय्यकारी ठरतात.

अर्थातच, तुम्ही जर त्या स्पर्धा अगदी सामान्य पद्धतीने, सर्व प्रकारच्या सामान्य व हीन क्रियाप्रतिक्रिया राखत खेळलात, तर त्यांपासून तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. पण हे तर कोणत्याही कृतीबाबत म्हणता येईल. मग ते खेळात असो किंवा बौद्धिक क्षेत्रात असो, जर कोणी कोणतीही कृती सामान्य पद्धतीने करेल, तर तसे करणे म्हणजे वेळ वाया घालावणेच आहे.

पण जर तुम्ही स्पर्धेमध्ये, वा सामूहिक क्रीडास्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने खेळलात, योग्य वृत्तीने सहभागी झालात तर, ते एक चांगले शिक्षण आहे कारण ते तुम्हाला विशेष प्रयत्न करायला आणि तुमच्या स्वत:च्या अशा मर्यादा ओलांडण्यास भाग पाडते. ज्या एरवी बहुधा सुप्तच राहिल्या असत्या अशा तुमच्यातील बऱ्याच गोष्टींबाबत, हालचालींबाबत सजग करण्याकरता तुम्हाला मिळालेली ती एक नक्कीच उत्तम संधी असते. पण अर्थातच, तुम्हाला मिळालेली ही एक संधी आहे आणि प्रगतीचे साधन आहे हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

जर तुम्ही स्वत:ला नुसतेच मोकळे सोडलेत आणि सामान्य पद्धतीनेच, नुसतेच खेळत राहिलात तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालविता आहात. पण हे सर्वच बाबतीत खरे आहे; केवळ खेळाबाबत आहे असे नाही, अगदी अभ्यास आणि इतर सर्व बाबतीतसुद्धा तेच खरे आहे. एखादा काय करतो यापेक्षा तो त्या गोष्टी कशा करतो, तो कोणत्या वृत्तीने त्या गोष्टी करतो यावर सारे काही अवलंबून असते.

…कोणतीही महत्त्वाकांक्षा बाळगू नका, कोणतेही ढोंग करू नका, आव आणू नका, प्रत्येक क्षणी तुमच्यातील चरम स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम करीत असताना अशा स्थितीत राहणे, ही सर्वांगीण जीवनाच्या दृष्टीने आदर्श स्थिती आहे. आणि अशी स्थिती जर एखाद्याला साध्य झाली तर, तो पूर्णत्वाच्या मार्गावर फार पुढे निघून गेला आहे हे निश्चित…. पण अर्थातच हे सारे खरोखर प्रामाणिकपणे करायचे असेल तर, एक प्रकारची आंतरिक परिपक्वता आवश्यक आहे.

– श्रीमाताजी [CWM 09 : 97-98]

धम्मपद : गौतम बुद्धांचे शिष्य हे दक्ष आणि खरोखरच जागृत असतात; रात्रंदिवस ते ध्यानाचा आनंद घेत असतात.

…जो मनुष्य एकांतात अन्नग्रहण करतो, एकांतात निद्रा घेतो, स्वत:च्या आत्म-प्रभुत्वाची वाटचाल अथकपणे एकाकी रीतीने करतो, त्याला अरण्यातील एकांतवासाच्या जीवनाचा आनंद गवसतो.

श्रीमाताजी : बरेचदा असे आढळते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण असे एकटे राहण्यानेच, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही. कारण माणूस कोणत्याही परिस्थितीत असला तरी काही ना काही उद्योग शोधून काढतो. मला माझ्या जीवनाच्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते, जी बाह्य परिस्थिती ‘ईश्वरीकृपे’द्वारे आपल्याला बहाल केलेली असते ती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते, अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खराखुरा, अधिक सखोल व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो नक्कीच आकर्षक आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ती म्हणते, “झाडाखाली अगदी एकांतात बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल.” हे असे वाटते कारण त्या दिशेने विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.

जे ध्यान अनिवार्य असल्याप्रमाणे एकाएकी तुमचा ताबा घेते, ते ध्यान सर्वोत्तम असते. तुम्हाला कोणता पर्यायच नसतो. एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याशिवाय दुसरा कोणता पर्यायच तुमच्यापाशी नसतो. आणि तुम्ही अरण्यात एकांतवासात असताना (ध्यानाकडून) तुमचा असा ताबा घेतला जाईल हे काही अपरिहार्य नसते. जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा तेथे खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्या सोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा काहीएक टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खराखुरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे.

कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहार करीत असतानादेखील, त्यापासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वराला’ आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच ‘खरा विजय’ होय.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 276)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)