श्रद्धेच्या जोडीला एक प्रकारचे स्पंदनही असावयास हवे. एक अशी कृतज्ञतेची भावना हवी की, ईश्वर अस्तित्वात आहे. ईश्वर अस्तित्वात आहे, ही एक प्रकारची अद्भुत कृतज्ञतेची भावना तुम्हाला एक प्रकारच्या उत्कट आनंदाने भरून टाकते. ह्या विश्वामध्ये दिसणारा भयानकपणाच फक्त अस्तित्वात आहे असे नाही तर, या विश्वामध्ये ईश्वर म्हणूनही काहीतरी अस्तित्वात आहे, हो, तेथे ईश्वर आहे, ईश्वरी अस्तित्व आहे. जेव्हा कधी, अगदी एखादी छोटीशीही गोष्ट, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुमचा ईश्वरीय अस्तित्वाच्या त्या उदात्त वास्तवाशी संपर्क घडविते तेव्हा तेव्हा, त्या प्रत्येक वेळी, तुमचे हृदय अगदी उत्कट, अगदी अद्भुत आनंदाने, कृतज्ञतेने भरून जाते. बाकी सर्व गोष्टींच्या तुलनेत अशी कृतज्ञता म्हणजे सर्वाधिक आनंददायी गोष्ट असते.

दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला कृतज्ञतेइतका आनंद देऊ शकत नाही. व्यक्ती एखाद्या पक्षाचे गाणे ऐकते, एखादे सुंदरसे फूल पाहते, एखाद्या लहानग्या बालकाकडे पाहते, उदारतेची एखादी कृती पाहते, एखादे चांगलेसे वाक्य वाचते, मावळत्या सूर्याकडे पाहते, असे काहीही असू शकते, अवचितपणे ते तुमच्या समोर येते आणि मग, हे विश्व ईश्वराची अभिव्यक्ती करत आहे, या विश्वापाठीमागे असे काहीतरी आहे, की जे ईश्वरी आहे ह्यासारखी उत्कट, गाढ, तीव्र अशी भावना मनात दाटून येते.

तेव्हा कृतज्ञतेविना भक्ती ही अपूर्ण आहे; भक्तीसोबत कृतज्ञताही असावयास हवी.

(CWM 08 : 40)

खऱ्याखुऱ्या धार्मिक भावनेने चर्चमध्ये किंवा देवळामध्ये जाणाऱ्या माणसांचे प्रमाण अगदीच कमी असते. म्हणजे असे की, देवाकडून काहीतरी मागण्यासाठी, काहीतरी याचना करण्यासाठी नाही तर, स्वत:ला समर्पित करण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी, त्याच्याविषयी अभीप्सा बाळगून, आत्मदान करण्यासाठी जाणारी माणसं अगदीच अल्प असतात. असे करणारी व्यक्ती लाखामध्ये अगदी एखादीच असते.

(CWM 06 : 194-195)

परमेश्वराची ही अद्भुत कृपा होय की, तो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या ईश्वरी ध्येयाप्रत अगदी सर्वात जवळच्या मार्गाने घेऊन जात असतो. ती व्यक्ती कशी का असेना, तिच्यामध्ये कितीही अज्ञान, कितीही गैरसमजुती का असेनात, अहंकार, विरोधाची, बंडाची भावना का असेना तरीही, परमेश्वर त्या व्यक्तीला ईश्वरी ध्येयाप्रत घेऊन जात असतो, ही गोष्ट कधीही विसरता कामा नये, ह्या गोष्टीविषयी नेहमीच कृतज्ञ असले पाहिजे.

कृतज्ञतेची विशुद्ध ज्योती तुमच्या हृदयामध्ये कायम तेवत असली पाहिजे. ती अशी उबदार, मधुर, तेजस्वी, ज्योत असेल की, जिच्यामध्ये सर्व अहंकाराचा, सर्व अंधकाराचा विलय होऊन जाईल. साधकाला त्याच्या ध्येयाप्रत घेऊन जाणाऱ्या ईश्वरी कृपेविषयीच्या कृतज्ञतेची ज्योत तुमच्या हृदयामध्ये तेवत असली पाहिजे आणि व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ असेल, ही ईश्वरी कृपेची कृती व्यक्तीला जितकी अधिक उमगेल आणि त्याविषयी ती व्यक्ती जेवढी अधिक कृतज्ञता बाळगेल, तेवढा तो मार्ग अधिकच जवळचा असेल.

(Bulletine 1964-08 : 100)

विनम्रतेची आवश्यकता ही एक अशी गोष्ट आहे की जिच्याविषयी नेहमी बोलले जाते पण तिचा अर्थ समजण्यात नेहमीच चूक होते. ती चुकीच्या पद्धतीने घेतली जाते, तिचा अर्थ चुकीचा घेतला जातो आणि तिचा वापरही चुकीचा केला जातो. जर तुम्हाला शक्य असेल तर योग्य रीतीने विनम्र व्हा, परंतु चुकीच्या रीतीने विनम्र होण्यात काही अर्थ नाही, कारण त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र आहे, जर तुम्ही तुमच्या मधून घमेंड नावाचे तण उपटून फेकून देऊ शकाल तर, खरोखरच तुम्ही काहीतरी साध्य केल्यासारखे होईल. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की ही गोष्ट किती कठीण आहे ते? तुमच्या लक्षात येईल की, एक प्रकारच्या आत्मप्रौढीयुक्त आत्म-समाधानाने फुलून गेलेले असल्याशिवाय तुम्ही कोणतीच गोष्ट नीट करू शकत नाही, तुम्हाला चांगले काही सुचत नाही, तुम्ही योग्य अशी कृती करत नाही किंवा त्या समाधानाने आतून फुललेले नसाल (भले तुम्हाला त्याची जाणीवही नसेल) तर तुम्ही किंचितही प्रगती करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला घणाचे घाव घालूनच, आत्मप्रौढी मोडून काढावी लागते. तरीदेखील काही अवशेष शिल्लक राहतातच आणि मग त्यांना मोड यायला सुरुवात होते.

व्यक्तीने त्यावर आयुष्यभर काम करत राहिले पाहिजे आणि या पुन्हा पुन्हा डोके वर काढणाऱ्या तणाला मुळापासून उपटून काढण्यासाठी काम करत राहणे कधीही विसरता कामा नये. कारण ते तण इतक्या बेमालूमपणे तुमच्यामध्ये असते की, तुम्हाला असे वाटते की, ती घमेंड, आत्मप्रौढी तुमच्यामधून निघून गेली आहे आणि तुम्ही स्वत:ला अगदी विनम्र, विनयशील समजत असता आणि म्हणता, “हे मी केलेले नाही, मला जाणवते आहे की, हे ईश्वरी आहे, जर तो ईश्वर नसेल तर मी कोणीच नाही.” आणि लगेचच पुढच्या क्षणी हा असा विचार केल्याबद्दल तुम्ही स्वत:वरच खूप खुष होऊन जाता.

*

प्रश्न : जेव्हा आम्ही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारु लागते आणि त्या तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि त्यातूनच सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सोडवणूक कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असते, निरीक्षण करत असते. आणि मग कधीकधी तो गर्विष्ठ होतो. मग साहजिकच आपल्या प्रयत्नांमधील बरेचसे सामर्थ्य तो काढून घेतो. ही एक अशी सवय आहे की, काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्ती स्वत:कडे पाहत असते.

स्वत:चे निरीक्षण करणे आवश्यकच आहे; परंतु मला वाटते, पूर्णपणे प्रामाणिक असण्याचा, सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे हे त्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी स्वाभाविक असली पाहिजे म्हणजे व्यक्तीने सततच स्वत:चे निरीक्षण करणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, समाधानाने स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट तितकीच ही गोष्टही वाईट आहे; ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच घातक आहेत. व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये, इतकी ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

जेव्हा व्यक्ती ही स्व-केंद्रित राहत नाही, काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार राहत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात ती स्वत:च एक आस बनून जाते तेव्हा ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा आस बाळगणारी व्यक्ती शिल्लक राहत नाही, तर जेव्हा ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव आसच बनून राहते आणि ती पूर्ण एकाग्र आवेगाने झेपावते तेव्हा अशी व्यक्ती खरोखर खूप प्रगत होऊ शकते.

अन्यथा, नेहमीच त्यामध्ये एक प्रकारची क्षुद्र आत्मप्रौढी, एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, आणि एक प्रकारची स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आत शिरकाव करतात आणि सारे काही बिघडवून टाकतात. कठीण असते ते सारे !

*

प्रश्न : विनम्र असण्याची योग्य रीत आणि अयोग्य रीत कोणती?

श्रीमाताजी : ते ओळखणे अगदीच सोपे आहे. जेव्हा माणसांना सांगितले जाते की, ‘विनम्र व्हा’ तेव्हा ती ताबडतोब, ‘दुसऱ्या व्यक्तींसमोर विनम्र व्हायचे’ असा विचार करतात आणि इथेच विनम्रता चुकीची असते. खरी विनम्रता म्हणजे ईश्वरासमोर असणारी विनम्रता ! ही एक अगदी नेमकी अशी, अचूक, एक जिवंत अशी संवेदना असते की, आपण कोणीच नाही, आपण त्या ईश्वराशिवाय काहीच करू शकत नाही, आपल्याला त्या ईश्वराविना काहीच समजू शकत नाही. म्हणजे अगदी एखादा असामान्यपणे बुद्धिमान किंवा सक्षम असला तरीही, दिव्य चेतनेच्या तुलनेत ते काहीच नसते आणि ही जाण व्यक्तीने कायम बाळगली पाहिजे, कारण त्यामुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने ग्रहणशील होऊ शकते – ही अशी विनम्रता ईश्वरासमोर कोणताही आव आणत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 44-45), (CWM 06 : 402), (CWM 05 : 44-45)

पहिली गोष्ट म्हणजे स्वत:ला न फसविणे. आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे आपल्याला कळते. अत्यंत हुशार असा असुर सुद्धा ईश्वराला फसवू शकत नाही. पण सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, जीवनात बरेचदा – दिवसाच्या धावपळीत आपण स्वत:लाच फसविण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते, अगदी सहजपणे, अगदी आपोआप आपण अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्ती नेहमीच स्वत:च्या कृतींचे समर्पक समर्थन करते, स्वत:च्या शब्दांबद्दल व कृतींबद्दल समर्थन देते.

पहिल्यांदा नेहमी हेच घडते. भांडणांसारख्या गोष्टींविषयी मी येथे बोलत नाहीये; मी दैनंदिन जीवनातील बारकाव्याच्या गोष्टी सांगत आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक दुसऱ्यानेच केलेली असते, असे प्रत्येक जण समजत असतो. अगदी बाल्यावस्था पार केल्यावर जराशी समज आल्यावर देखील तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी मूर्खपणाच करता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर, मी पण असा वागलो नसतो.” पण वास्तविक, हे बरोबर याच्या उलट असायला पाहिजे. समजा तुमच्या बरोबर कोणी आहे, आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, तुमची अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची हवी, भले मग ती सोबत असणारी व्यक्ती, तसे करो वा न करो. ह्याला मी ‘प्रामाणिक असणे’ म्हणते.

एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला तर, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात, तर, तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. आणि तुम्ही स्वत:चेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे.

ही बाब तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे, आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. आणि ज्या कोणाला प्रत्येक गोष्टीचा लगेचच संसर्ग होतो, जे अगदी हलक्या प्रतीचे विनोद करतात किंवा इतरांसारखाच मूर्खपणा करतात त्यांच्या विषयी तर मी बोलतच नाहीये.

तुम्ही तुमची वृत्ती भले कितीही प्रामाणिक राखण्याचा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा जर तुम्ही तीक्ष्णपणे स्वत:चे निरिक्षण कराल तर, तुम्हाला शेकडो वेळा तरी स्वत:मधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. प्रामाणिकपणा हा किती कठीण असतो हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल.

*

जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा तुम्हाला असे आढळेल की, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी साहाय्य, मार्गदर्शन आणि ईश्वरी कृपा नेहमीच तेथे असते आणि मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

*

पूर्णपणे प्रामाणिक राहावयाचे झाले तर, पसंती-नापसंती, वासना, आकर्षण-प्रतिकर्षण, सहानुभूती किंवा द्वेषभावना, आसक्ती वा तिटकारा नसणे ही अनिवार्यपणे आवश्यक अशी गोष्ट आहे. व्यक्तीने वस्तूंविषयी समग्र दृष्टिकोन बाळगला पाहिजे, त्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक गोष्ट आपापल्या योग्य स्थानी असते आणि सर्व गोष्टींकडे पाहण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन समानच म्हणजे, सत्यदर्शनाचा दृष्टिकोन असतो.

*

आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या पातळीपर्यंत, अस्तित्वाच्या सर्व हालचाली उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकता ! प्रामाणिकपणा हा केंद्रीय दिव्य संकल्पाच्या सभोवार संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह, सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 06), (CWM 03 : 192), (CWM 08 : 398), (CWM 14 : 65)

सर्वात महत्त्वाचा एक गुण म्हणजे दीर्घोद्योग, प्रयत्न-सातत्य, चिकाटी. एक प्रकारची आंतरिक खिलाडूवृत्ती, जी तुम्हाला नाऊमेद होऊ देत नाही, दुःखी होऊ देत नाही आणि हसतहसत साऱ्या अडीअडचणींना सामोरे जाण्यास मदत करते. इंग्लिशमध्ये ह्याला एक छान शब्द आहे – Cheerfulness. जर तुम्ही अशा प्रकारची आनंदी वृत्ती किंवा खेळकरपणा तुमच्यामध्ये बाळगलात तर तुम्ही, तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखणाऱ्या वाईट प्रभावांशी चांगल्या रीतीने दोन हात करता, तुम्ही त्यांचा चांगल्या रीतीने प्रतिकार करता.

*

(CWM 08 : 23)

गरज पडली तर, एखादी गोष्ट हजार वेळा सुरु करण्याची जरी वेळ आली तरी, ती करण्याचा निश्चय करावयास हवा. माणसं अगदी निराश होऊन माझ्याकडे येतात आणि म्हणतात, ”मला वाटलं होते की, आता सगळं काही झालं आहे; पण आता मला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. ”परंतु जर त्यांना असे सांगितले की, ”हे तर काहीच नाही. तुम्हाला कदाचित तीच गोष्ट शंभर नाही, दोनशे वेळा, कदाचित हजार वेळासुद्धा करावी लागेल. तुम्ही कुठे एक पाऊल पुढे टाकता आणि असे समजायला लागता की, तुम्ही सुरक्षित आहात, परंतु नेहमीच असे काहीतरी असते की, तुम्ही थोडेसे पुढे गेल्यावर तीच अडचण फिरुन परत येते.”

तुम्हाला असे वाटते की, तुम्ही प्रश्न सोडवला आहे, समस्या सोडविली आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा तोच प्रश्न, तीच समस्या सोडवायला लागते. ती दिसायला कदाचित काहीशी भिन्न दिसते पण समस्या तीच असते. अशावेळी “ती समस्या अगदी लाखो वेळा जरी आली तरी मी ती लाख वेळा सोडवेन, परंतु मी त्यातून पार पडेनच,” असा निश्चय जर तुम्ही केलेला नसेल, तर तुम्ही योग करूच शकणार नाही. ही अगदी अनिवार्य अशी गोष्ट आहे.

(CWM 08 : 41-42)

*

व्यक्तीला स्वत:मध्येच एक प्रकारची आश्वासकता वाटली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये, काहीही करावे लागले तरीही ती आश्वासकता व्यक्तीने शेवटपर्यंत कायम राखली पाहिजे. जे चिकाटीने प्रयत्नशील राहतात, त्यांना विजय प्राप्त होतो.

सर्व प्रकारच्या विरोधांमध्येसुद्धा ही चिकाटी टिकवून ठेवण्यासाठी एक अविचल असा आधार आवश्यक असतो आणि असा एकमेव अविचल आधार म्हणजे ती सद्वस्तु, ते परम सत्य होय. दुसरीकडे कोठेही असा आधार शोधणे हे व्यर्थ आहे. ज्याबाबत कधीही निराश व्हावे लागणार नाही असा हा एकमेव आधार आहे.

(CWM 09 : 255)

*

प्रयत्नसातत्याद्वारेच व्यक्ती अडचणींवर मात करू शकते, त्यांच्यापासून पळ काढून नव्हे. जो चिकाटी राखतो, प्रयत्नशील राहतो त्याचा विजय निश्चित असतो. जो प्रयत्नसातत्य राखतो त्याचा जय होतो. नेहमीच सर्वोत्तम करत राहा, त्याच्या फलांची काळजी परमेश्वर करेल.

(CWM 14 : 163)

श्रीमाताजींच्या प्रतीकामधील बारा पाकळ्यांचे स्पष्टीकरण येथे त्या करत आहेत. हे ते गुण आहेत. १) प्रामाणिकपणा २) विनम्रता ३) कृतज्ञता ४) चिकाटी ५) अभीप्सा ६) ग्रहणशीलता ७) प्रगती ८) धैर्य ९) चांगुलपणा, सद्भाव १०) उदारता ११) समता १२) शांती
यातील पहिले आठ गुण ईश्वराशी संबंधित दृष्टिकोनाबाबतचे आहेत तर शेवटचे चार हे मानवाशी संबंधित आहेत.
– श्रीमाताजी
(Mother: Conversation with a disciple, January 19, 1972)

आपल्या सामर्थ्याला नेहमी दिव्य शक्तीवरील श्रद्धेचा आधार असला पाहिजे. आणि जेव्हा त्या दिव्य शक्तीचा आविष्कार होतो त्यावेळी आपली श्रद्धा सर्वांगीण आणि परिपूर्ण असली पाहिजे किंवा झाली पाहिजे.

सनातन काळापासून अखिल-सृष्टी निर्माण करत असलेल्या आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमानतेने सुसज्ज असणाऱ्या अशा विश्वदेवतेला, जागृत चैतन्यमय विश्वशक्तीला अशक्य असे काहीच नाही. अखिल ज्ञानभांडार, सारी शक्तिसामर्थ्य, सर्व प्रकारचे यश आणि विजय, सर्व प्रकारची कर्मे आणि कौशल्यं तिच्याच हाती असून, ती सर्व, विविध प्रकारच्या पूर्णत्वांनी व सिद्धींनी आणि आत्म्याच्या संपदांनी संपन्न असतात.

ही ‘महेश्वरी’ आहे, सर्वोच्च ज्ञानदेवता आहे. सर्व प्रकारची सूक्ष्म दिव्य दर्शनशक्ती आणि सत्याची अपार असीमता, आध्यात्मिक संकल्पशक्तीची ऋजुता आणि तिच्या अतिमानसिक विशालतेची स्थिरता व उत्कटता त्याचबरोबर तिच्या प्रबोधन शक्तीचा परमानंद ती आपणास प्रदान करते.

ती ‘महाकाली’ आहे, सर्वोच्च सामर्थ्याची देवता आहे. सर्व दिव्यबल आणि आध्यात्मिक शक्तिसामर्थ्य तिचेच आहे. तप:शक्तीची उग्रतम तीव्रता आणि युद्धाभिमुख शीघ्र चपळता त्याचबरोबर पराजय, मृत्यू आणि अज्ञानशक्ती यांना क:पदार्थ लेखणारे अट्टहास्य व विजय तिच्याजवळ आहे.

ती ‘महालक्ष्मी’ आहे, सर्वोच्च प्रेम आणि दिव्यानंद यांची ती देवता आहे. आत्म्याचा कृपाप्रसाद, दिव्यानंदाची मोहिनी आणि सौंदर्य, त्याचबरोबर संरक्षण आणि सर्व प्रकारचे मानवी व दैवी आशीर्वचन हे तिचे वरदान आहे.

ती ‘महासरस्वती’ आहे, आत्म्याचे कर्म आणि दिव्य कौशल्य यांची ती देवता आहे. योग कर्मसु कौशलम्, दिव्य ज्ञानाचा उपयोग आणि जीवनामध्ये चैतन्याचे आत्म-उपयोजन आणि त्याच्या सुसंवादाचे सौख्य हा तिचा योग आहे. आणि तिच्या सर्वच रूपांमध्ये आणि शक्तींमध्ये, शाश्वत ‘ईश्वरी’च्या प्रभुत्वसंपन्नतेची परमश्रेष्ठ भावना ती तिच्यासोबत वागवत असते.

साधनाकडून अपेक्षित असलेली अशी सर्व प्रकारच्या कृतींची जलद आणि दिव्य क्षमता, एकत्व, सहभागी सहानुभूती, सर्व जीवांमधील सर्व शक्तींशी मुक्त अशी एकजीवता आणि या सगळयामुळे, विश्वामधील सर्व ईश्वरी संकल्पाशी एक उत्स्फूर्त आणि फलदायी अशी सुसंवादिता ती तिच्या सोबत वागवत असते. तिच्या अस्तित्वाची आणि तिच्या शक्तींची अतिशय सघन जाणीव होणे आणि आपल्या समग्र अस्तित्वाने, आपल्या सर्वांगामधील आणि आपल्या सभोवताली होणाऱ्या तिच्या कार्याविषयी समाधानपूर्वक स्वीकार करणे, ही महाशक्तीवरील श्रद्धेच्या परिपूर्तीची परमावधी असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 780-781)

जर तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही उणीव न ठेवता, किंवा कोणताही प्रतिकार, विरोध न करता, स्वत:ला माताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना तुमच्यामध्ये त्यांचे कार्य, कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. जाणीव, लवचीकता आणि हातचे काहीही राखून न ठेवता केलेले समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असणेच आवश्यक आहे.

जाणीव :
श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, जरी श्रीमाताजी तुमच्या अंधकारात आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी जिवंत संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट वेगळी असते.

लवचीकता :
तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ लवचीक (Plastic) असली पाहिजे – स्वसंतुष्ट अज्ञानी मन जसे प्रश्न विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये. ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच हालचालींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक ईश्वरी प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच हालचालींवर भर देणारी असता कामा नये. माणसाची शारीरिक जाणीव जशी अडथळा निर्माण करते आणि त्याच्या किरकोळ आणि काळोख्या गोष्टींमधील सुखाला ती जशी चिकटून राहते; शरीराची आत्माविहिन दिनचर्या, आळस किंवा त्याची जी जड निद्रा असते त्याला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाने जशी शारीरिक जाणीव आरडाओरडा करते; तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी, स्वत:ची अक्षमता, जडता आणि तामसिकता ह्यांना हटवादीपणे चिकटून राहिलेली अशी असता कामा नये.

समर्पण :
हातचे काहीही राखून न ठेवता केलेले, तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभ लवचीकपणा (Plasticity) आणेल; वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता ह्या साऱ्या गोष्टींसाठीसातत्यपूर्ण खुलेपणा राखलात तर, तुमच्यामधील सर्व अंगांमध्ये जाणीव जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची जाणीव ही त्यानंतर अर्धचेतन जाणिवेशी संबद्ध न राहता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परम प्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

पण सावध असा आणि तुमच्या क्षुल्लक अशा पार्थिव मनाने, की ज्याला त्याच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींनादेखील स्वत:च्या निकषांच्या, स्वत:च्या मोजमापांच्या अंकित करायला आवडते, स्वत:च्या संकुचित तर्काच्या आणि प्रमादशील समजुतींच्या, बिनबुडाच्या आक्रमक अज्ञानाच्या आणि स्वत:च्या क्षुद्र आत्म-विश्वासपूर्ण अज्ञानाच्या अंकित करायला आवडते, अशा पार्थिव मनाद्वारे, दिव्य मातेला समजून घेण्याचा किंवा त्यांची पारख करण्याचा यत्न करू नका.

दिव्य शक्तीच्या विविध स्तरांवरील बहुमुखी स्वातंत्र्याचे आकलन, अर्धवट उजळलेल्या अशा अंधकारमय तुरुंगात बंदिस्त झालेल्या मानवी मनाला होऊ शकणार नाही. दिव्य शक्तीच्या दृष्टीची आणि कृतीची गतिमानता आणि तिची जटिलता ही मनाच्या अडखळणाऱ्या आकलनाला ओलांडून कितीतरी पलीकडे जाते; तिच्या गतिविधींची परिमाणे ही मनाची परिमाणेच नव्हेत. हे मन दिव्य शक्तीच्या विविध व्यक्तिमत्त्वांमधील जलद बदलाने भयचकित होऊन जाते. तिचे लयताल निर्माण करणे आणि ते मोडूनही टाकणे, तिचे वेगामध्ये वाढ करणे आणि वेग मंद करणे, एकाची समस्या हाताळण्याची तिची एक पद्धत तर दुसऱ्याची समस्या हाताळताना तिची दुसरीच पद्धत, अशा तिच्या अनेकविध पद्धती, तिने आत्ता एक दिशा पकडणे आणि नंतर ती सोडूनही देणे व दुसरीच दिशा पकडणे आणि मग त्या सर्वच दिशा एकत्रित करणे या सगळ्या प्रकाराने मन भयचकित होते. आणि अशा मनाला, परमशक्ती जेव्हा अज्ञानाच्या जंजाळामधून वळणावळणाने वरवर ढकलत दिव्य प्रकाशाकडे घेऊन जात असते, तेव्हाच्या त्या परमशक्तीच्या पद्धतीचे आकलन होऊ शकत नाही.

त्यापेक्षा तुमचा आत्मा श्रीमाताजींप्रत खुला करा आणि तुमच्या चैत्य प्रकृतीने तरी तुम्ही श्रीमाताजींना जाणून घेऊ शकता, ह्याबाबत समाधानी राहा आणि त्यांच्याकडे चैत्य दृष्टीने पाहा, तीच एकमेव गोष्ट तुम्हाला सत्याप्रत थेटपणे घेऊन जाणारी असेल. आणि श्रीमाताजी स्वत:च त्यांच्या चैत्य घटकांद्वारे तुमचे मन, हृदय, प्राण आणि तुमची शारीरिक चेतना उजळून टाकतील आणि त्यांना त्या परमशक्तीच्या कार्यपद्धती, परमशक्तीची प्रकृती उघड करून दाखवतील. सर्वज्ञतेच्या व सर्वशक्तिमानतेच्या आपल्या ज्या अगदीच बाळबोध वरवरच्या संकल्पना असतात, त्या नुसारच ईश्वरी शक्तीने कायम वागावे, अशी आपल्या अज्ञानी मनाची जी सदोष मागणी असते, ती सुद्धा टाळा. प्रत्येक वळणावर सहजसुलभ यश, डोळे दिपवणारे वैभव आणि चमत्कारपूर्ण शक्ती अनुभवास यावी, ह्यासाठी आपल्या मनाचा गोंगाट चालू असतो. असे डोळे दिपवणारे, प्रभावित करणारे काही अनुभवास आले नाही तर, तेथे ईश्वर आहे ह्यावर त्याचा विश्वासच बसू शकत नाही. श्रीमाताजी अज्ञानाशी मुकाबला करण्यासाठी, अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उतरल्या आहेत. अज्ञानक्षेत्राच्या पलीकडे, उच्च स्थानी कोठेतरी राहून नव्हे तर, श्रीमाताजी प्रत्यक्ष अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उतरून, अज्ञानाशी दोन हात करत आहेत.

श्रीमाताजी त्यांचे ज्ञान आणि त्यांची शक्ती झाकून ठेवतात, अंशत:च प्रकट करतात. बऱ्याचदा त्यांचे साधन झालेल्यांपासून आणि व्यक्तींपासून त्या ते ज्ञान व शक्ती रोखून ठेवतात आणि शोधक मनाच्या पद्धतीनुसार, अभीप्सा बाळगणाऱ्या चैत्य पुरुषाच्या पद्धतीनुसार, संघर्ष करणाऱ्या प्राणाच्या पद्धतीनुसार, बंदिवान होऊन दुःख भोगणाऱ्या शारीरिक प्रकृतीच्या पद्धतीनुसार, त्या साधनभूत झालेल्या व्यक्तींमध्ये रूपांतर घडून यावे असा त्यांचा प्रयत्न असतो.

परमशक्तीच्या संकल्पाद्वारे अशा काही अटी घालून देण्यातआलेल्या आहेत, बऱ्याचशा गुंतागुंतीच्या गाठी आहेत, ज्या आधी सैल करणे आवश्यक आहे; कारण त्या अचानकपणे कापून टाकता येत नाहीत.आजवर दीर्घकाळ ज्या जहागिऱ्यांवर व प्रांतांवर ज्यांनी अधिराज्य केले होते त्या असुरांनी व राक्षसांनी, ह्या विकसनगामी पार्थिव प्रकृतीवर ताबा मिळविलेला आहे. त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रांतांमध्ये जाऊन, त्यांच्या अटींनुसार, त्यांच्याशी दोन हात करण्याची आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्यातील मानवाला त्याच्या मर्यादांच्या अतीत जाण्यासाठी तयार केले पाहिजे, त्याला त्या दिशेने घेऊन गेले पाहिजे पण आत्तातरी मानव या मर्यादांच्या खूप पलीकडे असणाऱ्या अशा रूपांकडे अचानकपणे उचलले जाण्याच्या दृष्टीने खूपच दुर्बल आणि अंधकारपूर्ण आहे.

ईश्वरी चेतना व शक्ती अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक क्षणी, जी गोष्ट करणे गरजेची आहे ती गोष्ट, त्या परिश्रमपूर्वक करत असतात. जो आदेश देण्यात आला आहे त्यानुसार त्या नेहमीच पावले उचलत असतात आणि जे पूर्णत्व अस्तित्वात यावयाचे आहे त्याला ती ईश्वरी चेतना ह्या अपूर्णतेमध्येच आकारास आणत असते.

…जर तुम्ही मनालाच अनुसरत राहिलात तर, श्रीमाताजी अगदी तुमच्या समोर प्रत्यक्षपणे जरी प्रकट झाल्या तरीही ते मन श्रीमाताजींना ओळखू शकणार नाही. आत्म्याचे अनुसरण करा, तुमच्या मनाला अनुसरू नका. जे मन बाह्य रूपांकडे धाव घेते त्या मनाला न अनुसरता, सत्याला प्रतिसाद देणाऱ्या आत्म्याचे अनुसरण करा. ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवा; ती तुमच्यातील देवसदृश घटकांना मुक्त करेल आणि त्यांना दिव्य प्रकृतीच्या अभिव्यक्तीचा आकार देईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 24-26)

ज्यांची आपण श्रीमाताजी म्हणून आराधना करतो, त्या म्हणजे अखिल अस्तित्वावर प्रभुत्व असणारी ईश्वराची चित्शक्ती आहेत. ती चित्शक्ती ‘एक’ असूनही इतकी ‘अनेकअंगी’ आहे की, तिच्या गतिविधींचे अनुसरण करणे हे अत्यंत चपळ मनाला किंवा सर्वस्वी मुक्त आणि अत्यंत विशाल बुद्धिलाही अशक्य असते. श्रीमाताजी ह्या परमेश्वराची चेतना आणि शक्ती असून, त्या त्यांनी निर्माण केलेल्या निर्मितीपासून, सृष्टीपासून खूपच दूर उच्चस्थानी आहेत.

परंतु असे असूनसुद्धा, श्रीमाताजींच्या कार्यपद्धतींमधील काही गोष्टी ह्या त्यांच्या मूर्त रूपांच्या द्वारे म्हणजे देवतारूपांच्या द्वारे आपणास पाहता आणि अनुभवता येऊ शकतात. कारण, ज्या देवतारूपांच्या माध्यमातून श्रीमाताजी, त्यांनी निर्माण केलेल्या जीवसृष्टीसमोर प्रकट होण्याचे मान्य करतात; त्या देवतारूपांचा स्वभाव आणि कार्य अधिक सुनिश्चित आणि समर्याद असते त्यामुळे त्यांच्या माध्यमातून, श्रीमाताजींच्या कार्यपद्धती आपणास अधिक सुस्पष्टपणे आकलन होऊ शकतात.

श्रीमाताजींच्या चार शक्ती म्हणजे त्यांची चार अगदी अद्वितीय अशी व्यक्तिमत्त्वं आहेत, अंश आहेत, त्यांच्या दिव्यत्वाची मूर्त रूपं आहेत. ह्या रूपांच्या माध्यमातूनच त्या त्यांच्या प्राणिमात्रांवर कार्य करतात, त्यांना आदेश देतात, या जगतातील त्यांच्या निर्मितीमध्ये सुमेळ निर्माण करतात आणि ह्या रूपांच्या माध्यमातूनच त्यांच्या हजारो शक्तींच्या कार्याला श्रीमाताजी दिशा देतात. श्रीमाताजी एकच आहेत, परंतु त्या आपल्या समोर विभिन्न रूपे धारण करून येतात; त्यांच्या शक्ती आणि व्यक्तिमत्त्वे अनेक आहेत, त्यांचे अंशावतार आणि विभूतीही अनेक आहेत; हे सारेजण या विश्वामध्ये श्रीमाताजीचे कार्य करत असतात.

*

ह्या पार्थिव लीलेमध्ये श्रीमाताजींचा जो व्यवहार चालतो, त्यांचे ह्या विश्वाला जे मार्गदर्शन लाभते त्यामध्ये, श्रीमाताजींचे चार महान पैलू, चार नेतृत्वकारी शक्ती आणि त्यांची व्यक्तिमत्त्वे अग्रस्थानी आहेत.

महेश्वरी – श्रीमाताजींचे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे शांत व्यापकता आणि आकलनकारी प्रज्ञा, प्रशांत कृपा आणि अक्षय करुणा आणि सार्वभौम व राज्यपदालाही मागे टाकणारी, सर्व-सत्ताक महत्ता.

महाकाली – दुसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीमाताजींच्या गौरवशाली सामर्थ्याची शक्ती, दुर्दम्य आवेग, त्यांची युयुत्सू भाववृत्ती, त्यांची तीव्र इच्छा, त्यांची त्वेषपूर्ण चपळता आणि विश्वाला हलविणारी ताकद.

महालक्ष्मी – त्यांचे तिसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रफुल्ल, मधुर, सौंदर्याच्या गुप्त रहस्याची अद्भुतता, सुसंवाद, उत्कृष्ट लयतालबद्धता, जटिल व सूक्ष्म समृद्धी, श्रीमाताजींचे खिळवून ठेवणारे आकर्षण व मनोहर कृपा.

महासरस्वती – त्यांचे चौथे व्यक्तिमत्त्व हे, तादात्म्यातून येणाऱ्या ज्ञानाची घनिष्ठ व गभीर क्षमता; काळजीपूर्वक व निर्दोष असे कर्म आणि स्थिरता व सर्व गोष्टींमधील अचूक अशी परिपूर्णता, या साऱ्याने सुसज्ज असलेले असे असते.

प्रज्ञा, सामर्थ्य, सुसंवाद आणि परिपूर्णता असे त्यांचे विविध गुणधर्म आहेत. ह्याच शक्तींसमवेत श्रीमाताजींची वरील चारही व्यक्तिमत्त्वं ह्या जगतामध्ये (मानवी प्रमाणात) येतात. त्यांच्या या शक्ती विभूतींच्या माध्यमातून (अर्ध-दैवी प्रमाणात) मानवी रूप धारण करून, आविष्कृत होतात. श्रीमाताजींच्या थेट व जिवंत प्रभावाला जी व्यक्ती स्वत:ची पार्थिव प्रकृती खुली करू शकते, तिच्या आरोहणामध्ये, हे गुणधर्म तिच्यामध्ये ईश्वरी प्रमाणात आढळून येतात. या चारही व्यक्तिमत्त्वांना आम्ही चार महान नावं दिली आहेत, महेश्वरी, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 14 & 17-18)