मानसिक अस्तित्वाच्या आणि चैत्य प्राणाच्या शुद्धिकरणाच्या द्वारे, आध्यात्मिक मुक्तीसाठी लागणारी भूमी तयार करण्याचे काम केले जात असते – खरे तर शरीर आणि शारीरिक प्राण यांची शुद्धी देखील संपूर्ण सिद्धीसाठी आवश्यक असते पण तूर्तास शारीरिक शुद्धीचा प्रश्न आपण बाजूला ठेवू.

मुक्तीसाठी आवश्यक पूर्वअट आहे ती म्हणजे शुद्धी. सकल शुद्धी ही एक प्रकारची सुटका असते, मुक्ती असते; कारण शुद्धी म्हणजे बंधनात टाकणाऱ्या, बांधून ठेवणाऱ्या, अपूर्णता आणि गोंधळ यांनी अंधकार निर्माण करणाऱ्या गोष्टी फेकून देणे असते.

इच्छा-वासनांच्या शुद्धिमुळे चैत्य प्राणाची मुक्ती साध्य होते, चुकीच्या भावभावना आणि त्रासदायक प्रतिक्रिया यांच्या शुद्धीकरणातून हृदयाची मुक्ती साधली जाते. इंद्रिय-मनाच्या मळभ आणणाऱ्या संकुचित विचारांच्या शुद्धिकरणातून बुद्धीची मुक्ती साधली जाते आणि केवळ बौद्धिकतेच्या शुद्धीतून विज्ञानाची (Gnosis) मुक्ती साधली जाते. पण ह्या साऱ्या साधनभूत मुक्ती आहेत.

आत्म्याची मुक्ती ही अधिक व्यापक आणि अधिक मूलभूत स्वरुपाची असते; ही मुक्ती म्हणजे मर्त्यतेच्या मर्यादांमधून बाहेर पडून, चैतन्याच्या अमर्याद अशा अमर्त्यतेत खुले होणे असते.

काही विचारप्रणालींनुसार, मुक्ती म्हणजे सर्व प्रकृतीला नाकारणे, शुद्ध केवल अस्तित्वाची एक शांत स्थिती, निर्वाण किंवा विलोपन, आपल्या प्राकृतिक अस्तित्वाचे कोणत्यातरी अव्याख्येय अशा केवलामध्ये विलयन करणे हे होय. परंतु परमानन्दामध्ये निमग्न होऊन त्यातच राहणे, निष्क्रिय शांतीची विशालता, आत्म-विलोपनाद्वारे होणारी सुटका किंवा त्या ‘केवला’मध्ये स्वत:ला बुडवून टाकणे हे काही आमचे ध्येय नाही. फार फार तर, मुक्तीचा गर्भितार्थ आम्ही असा घेऊ शकतो की, आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी अपरिहार्य आणि सिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या प्रकारच्या सर्व अनुभवांमध्ये सामायिक असणारा आंतरिक बदल यातून दर्शविला जातो.

तेव्हा आपल्याला असे दिसून येईल की, मुक्तीमध्ये नेहमीच दोन गोष्टी अध्याहृत असतात – तिला नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन बाजू असतात – पहिली म्हणजे अस्वीकार करणे आणि दुसरी म्हणजे ग्रहण करणे. मुक्तीची नकारात्मक बाजू म्हणजे महत्त्वाच्या बंधांपासून सुटका, कनिष्ठ आत्म-प्रकृतीच्या प्रधान-गाठींपासून सुटका; तर सकारात्मक बाजू म्हणजे अधिक उच्चतर अशा अध्यात्मिक अस्तित्वाकडे उन्मीलित होणे किंवा त्या उच्चतर अस्तित्वामध्ये विकसित होणे.

पण ह्या प्रधान-गाठी आहेत तरी कोणत्या – मन, हृदय, चैत्य जीवनशक्ती ह्यांच्या साधनभूत गाठींच्या अधिक सखोल अशा वळणा-वाकणापेक्षा भिन्न अशा कोणत्या गाठी आहेत त्या? भगवद्गीतेमध्ये आपल्यासाठी त्यांचा निर्देश करण्यात आला आहे आणि इतकेच नव्हे तर, गीतेमध्ये त्यांचा वारंवार, जोरकसपणे उल्लेख केलेला आहे; त्या चार गोष्टी म्हणजे इच्छा-वासना, अहंकार, द्वैत, आणि प्रकृतीचे त्रिगुण; कारण गीतेनुसार, वासनारहितता, अहंकार-विरहितता, मन, आत्मा व चैतन्य यांचा समतोल आणि निस्त्रैगुण्य (त्रिगुणातीत) ह्या चार गोष्टी असणे म्हणजे स्वतंत्र असणे, मुक्त असणे होय. गीतेमधील हे वर्णन आपण स्वीकारायला हरकत नाही कारण ह्या विस्तृत वर्णनामध्ये सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश झालेला आहे.

मुक्तीची सकारात्मक बाजू म्हणजे, आत्म्यामध्ये वैश्विकता असणे, ईश्वराच्या चैतन्याशी विश्वातीत ऐक्य साधणे, सर्वोच्च दिव्य प्रकृतीने संपन्न असणे – म्हणजे असे म्हणता येईल की, ईश्वरासारखे होणे किंवा आपल्या अस्तित्वाच्या कायद्याने त्याच्याशी एकत्व पावणे. मुक्तीचा संपूर्ण व सर्वांगीण अर्थ हा असा आहे आणि चैतन्याची परिपूर्ण मुक्ती देखील ह्यातच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 674-675)

पूर्णयोगाच्या साधकाची ईश्वरप्राप्तीसाठीची जी धडपड चालू असते त्या कक्षेतून, स्वत:च्या जीवनामध्ये तसेच स्वत:च्या अस्तित्वाच्या व विश्वात्मक पुरुषाच्या सर्व गतीविधींद्वारे ईश्वराला भेटणे हेही समाविष्ट असेल. निसर्ग व जीवन हे त्याच्यासाठी ईश्वराला भेटण्याचे संकेतस्थळही असेल आणि त्याचबरोबर ते त्याच्यासाठी त्या ईश्वराचे प्रकटीकरणदेखील असेल.

बौद्धिक, कलात्मक व गतियुक्त व्यवहार, विज्ञान, तत्त्वज्ञान, जीवन, विचार, कला आणि कर्म या गोष्टी ईश्वराच्या अनुमतीने चालतात आणि त्यामध्ये अधिक खोल गर्भितार्थ दडला असल्याचे त्याच्या लक्षात येते. ह्या साऱ्या माध्यमांमधून अभिव्यक्त होणाऱ्या ईश्वराचे तो स्पष्ट दर्शन घेऊ शकतो आणि त्या साऱ्यामध्ये असणाऱ्या ईश्वराचा आनंद त्याला लाभतो म्हणूनच तो त्यांच्या प्राप्तीसाठी धडपड करतो. हा साधक या गोष्टींच्या बाह्य रूपांविषयी आसक्ती धरणार नाही; कारण आसक्ती ही आनंदाच्या मार्गातील धोंड असते. त्याला असा एक शुद्ध, समर्थ आणि परिपूर्ण आनंद मिळत असतो, की ज्या आनंदामध्ये सर्वकाही समाविष्ट असते परंतु तो आनंद दुसऱ्या कशावरच अवलंबून नसतो. आणि त्याला त्या सर्वांमध्ये त्याच्या प्रियकराच्या म्हणजे ईश्वराच्या प्रतिमा, त्याची प्रतीके, त्याचे अस्तित्व, त्याच्या खुणा, त्याच्या कृती सापडतात. केवळ कलेसाठीच कलेची साधना करू पाहणाऱ्या सामान्य मनाला कदापिही मिळणार नाही वा त्याची कल्पनादेखील ते करू शकणार नाही असा व एवढा आनंद या भक्ताला त्या गोष्टींमधून होतो. ते सर्व काही आणि त्याहूनही अधिकचे असे सर्व काही हे त्याच्यासाठी पूर्णयोगाचा आणि समावेशनाचा मार्ग ठरतो.

प्रेम ही ह्या आनंदाची सर्वत्रगत शक्ती असते. आणि त्या प्रेमाचा आनंद जे विशिष्ट रूप धारण करतो ती असते, सौंदर्याची दृष्टी !

ईश्वराचा प्रेमिक हा विश्वाचा प्रेमी असतो आणि तो ‘सर्व-आनंदमया’ला आणि ‘सर्व-सौन्दर्यमया’ला प्रेमाने कवळतो. जेव्हा वैश्विक प्रेम हे साधकाच्या हृदयाचा ताबा घेते तेव्हा, ईश्वराने त्याला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. आणि जेव्हा साधकाला सर्वत्र सर्व-सौंदर्य पाहण्याची दृष्टी येते आणि सदा सर्वकाळ आनंदाने त्याला कवळून घेतले आहे असा त्याला अनुभव येत राहतो, तेव्हा साधकाने ईश्वराला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. प्रेमाची परिपूर्ती ऐक्यामध्ये होणे आणि परस्परांनी परस्परांना कवळून घेणे ही एकाच वेळी सर्वोच्च अशी अवस्था पण असते आणि तेव्हाच त्या प्रेमाची तीव्रताही अत्युच्च पातळीवर जाऊन पोहोचलेली असते. आणि हेच ऐक्यातील परमानंदाचे अधिष्ठान असते.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 591-592)

ईश्वर किंवा पुरुषोत्तम हा विश्वपुरुष देखील आहे; आणि ह्या विश्वाशी असलेली आपली सर्व नाती ही साधने असून, या साधनांद्वारे आपण या विश्वपुरुषाशी आपले नाते प्रस्थापित करण्याची तयारी करत असतो. विश्वाच्या आपल्यावर होणाऱ्या क्रियांना आपण ज्या भावनांनी प्रतिक्रिया देतो, त्या सर्व भावना वस्तुत: या विश्वपुरुषाला, ईश्वराला उद्देशूनच असतात.

आरंभी या गोष्टीचे आपल्याला ज्ञान नसते; मात्र आपले ज्ञान जसजसे वाढते तसतसे आपण जाणीवपुर:सर ईश्वरालाच आपल्या भावनांचा विषय करतो आणि अशा रीतीने ईश्वराशी आपले जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित होते. आपण ईश्वराशी एकता साधण्याच्या उद्देशाने जसजसे ईश्वराच्या अधिकाधिक निकट जातो तसतसे आपल्या भावनांतील मिथ्यत्वाचे व अज्ञानाचे दोष गळून पडतात.

आणि मग आपल्याला उमगते की, आपल्या सर्व भावनांना ईश्वरच प्रतिसाद देत असतो; आपण प्रगतीच्या ज्या टप्प्यावर जसे असू त्या त्या टप्प्यानुसार तो आपल्याला स्वीकारतो, जवळ घेतो आणि आपल्या भावनांनुसार प्रतिसाद देतो. जर ते तसे नसते, जर तो आपल्याला मदत करत नसता तर, आपल्याला त्याच्याशी अधिकाधिक निर्दोष संबंध प्रस्थापित करता आले नसते; हेही आपल्याला उमगते.

मानव ईश्वराकडे कोणत्याही भावनेने जावो, ईश्वर त्याचे स्वागत करतो व त्याच्या भक्तीला ईश्वरी प्रेमाने प्रतिसाद देतो. अस्तित्वाचे जे कोणते घटक, जे कोणते गुण व्यक्ती ईश्वराला समर्पित करतात, त्या त्या घटकांच्या आणि त्या त्या गुणांच्या माध्यामातून ईश्वर त्या व्यक्तींना विकसित करतो, त्यांना प्रोत्साहित करतो, त्यांच्या प्रगतीचे नियमन करतो. त्यांचा मार्ग सरळ असो वा वळणावळणाचा, तो ईश्वर त्यांना स्वत:कडेच घेऊन जातो.

– श्रीअरविंद
(CWSA

भक्ती आणि ज्ञान यांचे परस्परांविषयीचे गैरसमज हे अज्ञानमूलक आहेत; त्याचप्रमाणे कर्ममार्ग कमी दर्जाचा आहे ही या दोन्ही मार्गांची असणारी समजूतही तितकीच अज्ञानमूलक आहे. ज्ञानमार्गी व भक्तिमार्गी म्हणतात की, आध्यात्मिक संपत्ती ही कर्ममार्गापेक्षा श्रेष्ठ दर्जाची आहे; परंतु त्यांचे हे म्हणणेही अज्ञानमूलकच आहे.

अशी एक तीव्र भक्ती, असे एक तीव्र ज्ञान असते की ज्यांना ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप उत्पन्न करणारे वाटते परंतु जोवर ईश्वराच्या जाणिवेशी आमची जाणीव एकत्व पावत नाही, ईश्वराच्या कर्मसंकल्प-शक्तीशी आमची कर्मसंकल्प-शक्ती एकत्व पावत नाही; तोवरच ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप करणारे आहे असे वाटते. परंतु एकदा का हे एकत्व साधले की, कर्म हीच ज्ञानाची शक्ती बनते आणि कर्म हाच प्रेमाच्या अभिव्यक्तीचा मार्ग बनतो.

ईश्वराशी एकत्वाची अवस्था म्हणजे ज्ञान असेल आणि या एकत्वाचा आनंद म्हणजे भक्ती असेल तर, त्या एकत्वाचा प्रकाश व माधुर्य यांचे जिवंत सामर्थ्य म्हणजे दिव्य कर्म असे म्हणता येईल. कोणत्याही मानवी प्रेमामध्ये जी एक आस असते, ती तशीच आस व प्रेमाची तीच स्पंदने ईश्वराबद्दलच्या प्रेमातही असतात. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही जगापासून आणि इतर सर्वांपासून दूर कोठेतरी, हृदयाच्या गुह्यतम कोपऱ्यामध्ये दडून, ऐक्याच्या निरपवाद आनंदामध्ये निमग्न राहू इच्छितात. तीच कदाचित भक्तिमार्गावरीलही एक अपरिहार्य अशी मनोवस्था असू शकते.

पण ज्या विशाल अशा प्रेमाची परिपूर्ती ज्ञानामध्ये झालेली असते ते प्रेम हे, हृदयाच्या अंतरगृहातील आनंद आणि बाह्य जग यांच्यात कोणताही भेद किंवा विरोध आहे असे मानत नाही. तर उलट, बाह्य जग हे त्या प्रियकराचे, ईश्वराचे धाम आहे, सर्व प्राणिमात्र हे ईश्वराचेच अस्तित्व आहे असे ही व्यापक भक्ती मानते; आणि व्यापक भक्तीची ही जी दिव्य दृष्टी आहे त्या दिव्य दृष्टीत दिव्य कर्माचा आनंद आहे आणि दिव्य कर्माचे समर्थन आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 551)

परिपूर्ण झालेले प्रेम ज्ञानाला वगळत नाही तर, उलट तेच प्रेम स्वत: ज्ञान मिळवून देते आणि ज्ञान जेवढ्या प्रमाणात पूर्ण असते तेवढ्या प्रमाणात प्रेमाची शक्यता अधिकाधिक समृद्ध होते…

भगवद्गीतेमध्ये भगवंत असे सांगतात की, ”भक्तीमुळे एखादा भक्त ‘मला’ माझ्या सर्व प्रमाणात आणि माझ्या महानतेनिशी जाणू शकतो आणि तो जर याप्रमाणे ‘मला’ माझ्या अस्तित्वाच्या तत्त्वानिशी जाणेल तर, तेव्हा तो माझ्यामध्ये सामावू शकेल.”

प्रेम हे जर ज्ञानविरहीत असेल तर, ते तीव्र व जोरदारही असू शकेल; पण ते आंधळे, ग्राम्य, आणि बव्हंशी वेळा भयंकरही असू शकेल. हे ज्ञानविरहीत प्रेम ही मोठी ताकद असू शकते, परंतु ते खूप मोठी धोंडसुद्धा ठरू शकते; प्रेम ज्ञानदृष्ट्या सीमित असेल तर उत्साहाच्या भरात, संकुचितपणाच्या जोशात ते स्वत:चीच अवहेलना करते, परंतु, पूर्ण ज्ञानाभिमुख झालेले प्रेम हे ईश्वराशी अमर्याद आणि संपूर्ण ऐक्य घडवून आणते.

असे प्रेम कर्माशी फारकत घेत नाही, उलट ते दिव्य कर्मामध्ये स्वत:ला आनंदाने झोकून देते. कारण ते ईश्वरावर प्रेम करीत असते आणि त्याच्या सर्व अस्तित्वाशी व त्यामुळे, सर्व जीवामात्रांमधील ईश्वराशी ते एकरूप झालेले असते; आणि त्यामुळे अशा प्रेमाला, जगाकरता काम करणे हा, विविधतेने नटलेल्या ईश्वरावर प्रेम करण्याचा आणि त्याची परिपूर्तता करण्याचा मार्ग वाटतो.

अशाप्रकारे भक्तीच्या, प्रेमाच्या मार्गाने आपण प्रवासाला आरंभ केला की, आपल्या त्रिविध शक्ती (प्रेमशक्ती, ज्ञानशक्ती व कर्म-संकल्पशक्ती) ईश्वराच्या ठिकाणी ऐक्य पावतात; ह्या मार्गाच्या देवदूताला, (All-Lover’s being) ‘सर्व-प्रेममया’च्या अस्तित्वाच्या दिव्य आनंदाचा परमानंद लाभणे ही आपली परिपूर्ती वाटते; त्याला ते त्याचे सुरक्षित धाम वाटते; त्याला ते शाश्वत स्थान वाटते आणि तेच वैश्विक किरणोत्सर्गाचे केंद्रस्थान वाटते.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 547)

मनोमय पुरुषाने, वासनात्मक मनाशी असलेले त्याचे सहसंबंध आणि त्याच्याबरोबर झालेले त्याचे तादात्म्य (self-identification) ह्यापासून स्वत:ला विलग करावेच लागते. त्याला असे म्हणावे लागते की, ”हे झगडणारे व यातना भोगणारे, कधी दुःखी तर कधी आनंदी असणारे; कधी प्रेम तर कधी द्वेष करणारे मन म्हणजे मी नव्हे; ते कधी आशावादी असते तर कधी गोंधळलेले असते; कधी रागावते व भिते तर कधी ते खुशीत असते; कधी निराश, नाउमेद असते; अशा प्राणिक वृत्तीप्रवृतीच्या हेलकाव्यांचे व भावनात्मक आवेगांचे बनलेले हे मन म्हणजे मी नव्हे. ह्या सर्व गोष्टी म्हणजे संवेदनात्मक आणि भावनात्मक मनामध्ये प्रकृतीचे जे कार्य चालते ते कार्य आहे, त्या सर्व तिच्या सवयी आहेत, अन्य काही नाही.” या प्रकारे मनोमय पुरुषाने संवेदनात्मक व भावनात्मक मनाशी असलेले आपले ऐक्याचे नाते तोडले, म्हणजे मनोमय पुरुष किंवा मन आपल्या भावनांपासून दूर होते आणि ज्याप्रमाणे ते शरीराच्या क्रिया व अनुभूती दूरून पाहते, त्याचप्रमाणे मनाच्या भावनांकडेही ते दूरून पाहते, ते या भावनांचे निरीक्षक किंवा साक्षी बनते. याप्रमाणे मनात दोन तट पडतात; एक मन भावनात्मक व दुसरे निरीक्षक बनते.

भावनात्मक मनात नानाविध वृत्ती व विकार येत राहतात, प्रकृतीच्या गुणांच्या सवयीनुसार हे घडत राहते; दुसरे निरीक्षक मन हे वृत्तीविकार पाहात राहते; त्यांचा तटस्थपणे अभ्यास करते आणि त्यांना जाणून घेते, परंतु त्यापासून ते अलिप्त असते. निरीक्षक मन भावनात्मक मनाच्या वृत्तीविकारांकडे पाहताना जणू काही मनाच्या रंगमंचावर, स्वत:पेक्षा वेगळ्या व्यक्ती खेळत आहेत अशा दृष्टीने त्यांजकडे पाहते.

प्रथम या वृत्तीविकारांत त्याला रस वाटतो आणि ते तादात्म्याकडे झुकते, जुन्या सवयींमुळे मधूनमधून ते त्यांच्याशी एकरूप होते; नंतर पूर्ण शांती राखून व अनासक्तपणे ते त्यांजकडे पाहू शकते; आणि शेवटी शांतीबरोबर आपल्या शांत अस्तित्वाचा शुद्ध आनंद त्याला लाभतो; आणि ते समोरच्या गोष्टी पाहून स्मित करू लागते. एखादे लहान मूल खेळत असावे आणि त्यात ते स्वत:च हारावे त्याप्रमाणे, भावनात्मक मनाची सुखदुःखे व इतर विकारवृत्ती मिथ्या आहेत हे त्याला पटते.

दुसरी गोष्ट अशी की, आपणच त्या साऱ्याला अनुमती देणारे किंवा नाकारणारे स्वामी आहोत, अनुमंता आहोत ही गोष्ट, निरीक्षक मनाच्या लक्षात येते. अर्थात आपली संमती काढून घेऊन हा खेळ आपण बंद पाडू शकतो हेही त्याला उमगते.

निरीक्षक मनाने संमती काढून घेतली की, एक महत्त्वाची गोष्ट घडते. भावनात्मक मन शांत होते व सामान्यत: शांत राहते; ते सामान्यत: शुद्ध राहते, विकाररूप प्रतिक्रियांपासून सामान्यत: अलिप्त राहते. या प्रतिक्रिया त्याच्या ठिकाणी पुन्हा येतात तेव्हा त्या आतून येत नाहीत, तर बाहेरून येतात – बाहेरून आलेल्या क्रियांना प्रतिक्रिया म्हणून त्या उत्पन्न होतात. ही प्रतिक्रिया देण्याची सवयसुद्धा कालांतराने नष्ट होते आणि भावनात्मक मन पूर्वी टाकून दिलेल्या विकारांपासून पूर्ण मुक्त होते.

आशा व निराशा, सुख व दुःख, आवड आणि निवड, आकर्षण आणि तिटकारा, समाधान व असमाधान, हर्ष आणि विषाद, भय आणि कंप, क्रोध, उद्वेग आणि लाज आणि प्रेमवद्वेष इत्यादी सर्व विकार हे मुक्त झालेल्या चैत्यपुरुषापासून गळून पडतात. सर्वसाधारणपणे जीवाला या अवस्थेतून जावे लागते; परंतु आम्ही मात्र या अवस्थेला अंतिम साध्य मानलेले नाही.

….पूर्णत्वासाठी ही गोष्ट आवश्यक आहे की, मनोमय पुरुषाने ‘प्रकृतीचा स्वामी’ ही स्वत:ची बैठक पुनरपि प्राप्त करून घ्यावी; मनाचा आंतरिक प्रवाह व बुद्धीचा युक्तिवाद थांबवून या पुरुषाचे भागत नाही, त्यांची जागा वरून प्रकाश मिळवणारा सत्य-ज्ञानयुक्त (Truth-Conscious) विचार घेईल अशी व्यवस्था, स्वत:ची इच्छाशक्ती कामी लावून त्याला करावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 352-353)

आपल्याला असे आढळून येते की, जर आपण प्रयत्न केला तर, मनामध्ये शरीरापासून अलग होण्याची शक्ती आहे. मन शरीरापासून केवळ कल्पनेनेच नव्हे, तर कृतीनेही अलग होऊ शकते; शरीरापासून ते भौतिक दृष्टीने, किंबहुना प्राणिक दृष्टीनेही अलग होऊ शकते.

शरीरविषयक गोष्टींसंबंधी एक प्रकारची अलिप्त वृत्ती धारण करून, मनाच्या या अलगपणाला आपण ही बळकटी दिली पाहिजे. शरीराचे झोपणे किंवा जागे राहणे या गोष्टींना अनाठायी महत्त्व दिल्यामुळे, त्याच्याबद्दल निष्कारण वाटणारी काळजी आपण सोडून दिली पाहिजे; शरीराचे हालणे-चालणे किंवा विसावा घेणे, शरीराचे सुख किंवा दुःख, त्याचे आरोग्य किंवा अनारोग्य, त्याचा जोर किंवा थकवा, त्याचा आराम किंवा अस्वस्थता यासंबंधाने काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे; शरीर काय खातेपिते यासंबंधानेही काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे. आपण आपले शरीर सुस्थितीत ठेवू नये असा ह्याचा अर्थ नव्हे; परंतु अतिरेकी संन्यासी व्रते आपण टाळली पाहिजेत; शरीराची जाणूनबुजून हेळसांड करणे हेसुद्धा आपण टाळले पाहिजे.

इत्यर्थ असा की, आपण भूक, तहान, अस्वस्थता, अनारोग्य या शरीराच्या अवस्थांमुळे आपल्या मनाचा क्षोभ होऊ देऊ नये; शारीरिक आणि प्राणिक प्रवृत्तीचा माणूस शरीरविषयक गोष्टींना जे महत्त्व देतो, ते आपण देऊ नये. द्यायचेच असेलच तर, त्याला दुय्यम स्थान द्यायला हरकत नाही आणि तेही, शरीराचा ‘साधन’ म्हणून उपयोग आहे हे लक्षात ठेऊनच ! शरीर एक साधन आहे म्हणून जे महत्त्व त्याला द्यावयाचे तेही मर्यादित ठेवावे, ते फुगवून त्याला निकडीच्या गोष्टींचे स्वरूप येईल असे करता कामा नये. उदाहरणार्थ, आपण काय खातोपितो यावर मनाची शुद्धता अवलंबून असते अशी वृथा कल्पना आपण करू नये. (एक मात्र खरे की, काही एका अवस्थेमध्ये खाण्यापिण्यासंबंधी नियंत्रणे आपल्या आंतरिक प्रगतीसाठी उपकारक ठरतात.) तसेच, आपले मन वा जीवन केवळ खाण्यापिण्यावरच अवलंबून असते, अशी वृथा कल्पनाही आपण बाळगता कामा नये.

खाणेपिणे ही फक्त एक सवय आहे, निसर्गाने लावलेली ती व्यवस्था आहे; प्रकृतीने मन किंवा प्राण व खाद्यपेय यांजमध्ये एक संबंध निर्माण करून, तो रूढ केला आहे इतकेच; त्यामुळे त्यापेक्षा त्याला अधिक काही मूल्य आहे असे समजण्याची गरज नाही.

वस्तुत: मानसिक व प्राणिक अस्तित्वाच्या उर्जेमध्ये, कोणत्याही प्रकारे घट न होऊ देता, नव्या पद्धतीने, सध्याच्या सवयीच्या उलट पद्धतीने, अन्नसेवनाचे प्रमाण आपण किमान पातळीवर आणू शकतो.

परंतु त्याहीपेक्षा, विवेकपूर्ण प्रशिक्षणाने, मन व प्राण यांना, शारीरिक पोषणाच्या किरकोळ मदतीवर विसंबून ठेवण्यापेक्षा, त्यांचा ज्यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध आहे अशा, मानसिक व प्राणिक शक्तीच्या गुप्त झऱ्यांवर विसंबून राहण्याचे प्रशिक्षण देऊन, त्यांना उर्जेच्या अधिक मोठ्या स्त्रोतांकडे वळविता येणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 343-344)

सामान्यत: त्याग ह्या संकल्पनेची जी लक्षणे मानली जातात त्याहून ‘त्याग’ ह्या संकल्पनेचा आमचा अर्थ वेगळा आहे.

सामान्यत: त्याग ह्या शब्दाचा अर्थ सुखविषयांचा-त्याग, सुखाचे दमन (inhibition of pleasure), स्वत:चा अव्हेर (Self-denial) असा होतो.

मानवी आत्म्याला त्यागाची ही साधना आवश्यक आहे, कारण अज्ञानामुळे त्याचे हृदय सुखोपभोगांना लगडून बसते. सुखोपभोगांचे दमन आवश्यक ठरते कारण इंद्रियजन्य संवेदना, ह्या इंद्रियोपभोगांच्या परिपूर्तीच्या मधु-कर्दमामध्ये (mud-honey) अडकतात, जणू रुतून बसतात. सुखोपभोगाच्या वस्तूंचा, सुखविषयांचा त्याग करणेही आवश्यक मानण्यात येते कारण, मन विषयाला चिकटते आणि ते एखाद्या विषयाला चिकटून बसले की, त्या विषयाला सोडून पलीकडे जाणे, आणि स्वत:च्या अंतरंगात जाणे त्याला जमत नाही.

माणसाचे मन जर असे अज्ञानी नसते, आसक्तीयुक्त नसते, असे चळवळे, अस्थिर व बंधनप्रिय नसते, वस्तूंच्या आकारांनी फसणारे नसते तर, त्यागाची आवश्यकता भासली नसती; जीवात्मा आनंदमार्गावर प्रवास करू शकला असता; लहान आनंदाकडून मोठ्या आनंदाकडे, दिव्य आनंदाकडून दिव्यतर आनंदाकडे तो प्रवास करू शकला असता. मात्र सध्याच्या स्थितीत असा प्रवास व्यवहार्य नाही.

मन ज्या ज्या गोष्टींना चिकटून बसलेले असते, त्यांच्या वास्तव रूपांची प्राप्ती व्हावयास हवी असेल तर, त्याने त्या प्रत्येक गोष्टीचा अंतरंगातूनच त्याग करावयास हवा. बाह्य त्याग हा अत्यावश्यक नाही, तथापि काही काळ तोही आवश्यक ठरतो; पुष्कळशा बाबतीत तो अपरिहार्य होतो; आणि कधीकधी तर सर्व बाबतीत त्याचा उपयोग असतो.

असे देखील म्हणता येईल की, पूर्ण बाह्य त्याग ही अशी एक अवस्था आहे की, तिच्यातून प्रत्येक जीवात्म्याला, त्याच्या विकासाच्या, प्रगतीच्या कोणत्यातरी कालखंडात असताना, जावेच लागते. मात्र अशा त्यागात केव्हाही अहंकारी आग्रही आत्मपीडनाचे व स्वत:च्या भयंकर छळाचे प्रकार नसावेत, कारण ते आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ईश्वराला अपमानकारक असतात. परंतु शेवटी हा त्याग देखील साधनच असतो, आणि म्हणून त्याचा उपयोग केव्हातरी संपतोच.

जेव्हा एखादी वस्तू आपल्याला तिच्या जाळ्यात ओढू शकत नाही तेव्हा, त्या वस्तूचा त्याग करण्याची आवश्यकता उरत नाही. आता साधकाचा जीव त्या वस्तूचा वस्तू म्हणून उपभोग घेत नसतो तर त्यातून अभिव्यक्त होणाऱ्या ईश्वराचा आनंद तो घेत असतो. आता सुखाचा संकोच करणेही आवश्यक ठरत नाही; कारण साधक आता सुखासाठी धडपडत नाही तर, सर्व वस्तूंमध्ये समानत्वाने असणाऱ्या ईश्वरी प्रकाशाची त्याला प्राप्ती झालेली असते. त्यामुळे एखादी वस्तू स्वत:ची असली पाहिजे किंवा तिच्यावर आपला भौतिक ताबा असला पाहिजे अशी निकड त्याला भासत नाही. असा जीव आता कोणत्याच गोष्टीवर स्वत:चा हक्क सांगत नाही तर, उलट तो सर्व जीवांमध्ये निवास करून असणाऱ्या त्या एका ईश्वराची इच्छा जाणीवपूर्वकपणे पाळत असतो आणि म्हणून स्वत:चा अव्हेर करण्याची जागाही आता शिल्लक राहत नाही. आणि असे झाले म्हणजे तो प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होतो आणि आत्म-स्वातंत्र्याप्रत खुला होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 333)

त्याग हा आम्हाला साधन म्हणूनच मान्य होईल; साध्य म्हणून कदापि मान्य होणार नाही; मानवात ईश्वरी पूर्णता प्रकट करणे हे आमचे साध्य आहे व ते सकारात्मक आहे, त्यामुळे त्याग हे नकारात्मक साधन आमचे मुख्य किंवा एकमेव साधन होऊ शकत नाही.

ईश्वराच्या मानवातील आत्मपरिपूर्तीहून वेगळे आणि तिला विरोधी असे जे असेल त्याचा आपण पूर्ण त्याग केला पाहिजे. तसेच या आत्मपरिपूर्तीपेक्षा निम्नतर वा आंशिक अशी जी जी सिद्धी असेल तिचाही आपण क्रमशः त्याग केला पाहिजे.

विश्वातील जीवनावर आपली आसक्ती असता कामा नये. ती जर असेलच तर, तिचा आपण नि:शेष त्याग करावयास हवा. तसेच विश्वातून होणाऱ्या सुटकेविषयी, मुक्तीविषयी, महान आत्मनिर्वाणाविषयीचीही आसक्ती आपल्यामध्ये असता कामा नये. आणि ती असेलच तर, तिचादेखील आपण नि:शेष त्याग केला पाहिजे. हा पूर्ण त्याग आमच्या साध्याला धरून आहे. आम्हाला आसक्ती मुळीच नको आहे; मग ती संसाराविषयी असो वा मुक्तीविषयी असो.

*

आपला त्याग हा आंतरिक त्याग असला पाहिजे हे उघड आहे; आसक्तीमय अशी इंद्रियांची वासना व हृदयाची वासना; विचार आणि आचार यांचा हट्टाग्रह; आणि जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव या तीन गोष्टींचा आपण विशेषेकरून सर्वप्रथम त्याग करणे आवश्यक आहे. आपल्या निम्नतर प्रकृतीशी आपल्याला जखडून ठेवणारी अशी ही तीन बंधने आहेत. ह्या तीन बंधनांचा, आम्ही संपूर्ण त्याग केल्यावर, इतर कोणतेही बंधन आपल्याला बांधू शकत नाही. म्हणून आपण प्रथम आपल्या ठिकाणची आसक्ती आणि वासना पूर्णपणे फेकून दिली पाहिजे.

आसक्ती व वासनाविषयक त्याग :

आपण आसक्ती बाळगावी असे या जगात काहीही नाही; ना संपत्ती ना दारिद्रय, ना सुख ना दुःख, ना जीवन ना मरण, ना मोठेपणा ना लहानपणा, ना दुर्गुण ना सद्गुण; ना मित्र ना पत्नी, ना मुलेबाळे, ना देश, ना आपले कर्तव्य, ना सेवाकार्य, ना स्वर्ग, ना पृथ्वी, ना त्यांच्या आतले काही, ना त्यांच्या पलीकडचे काही. अगदी कशाविषयीही आपल्या ठिकाणी आसक्ती असता कामा नये.
मात्र याचा अर्थ असा नव्हे की, आपण कशावरच प्रेम करू नये, कोणताच आनंद उपभोगू नये; कारण आसक्ती म्हणजे प्रेमातील अहंभाव होय, प्रेम नव्हे. वासना म्हणजे विषयोपभोगाची जी भूक आहे त्यातील संकुचितता व असुरक्षितता आहे; तो वस्तुजातातील दिव्यानंदाचा शोध असत नाही.

आचारविचारांचा हट्टाग्रह :

आपल्या कनिष्ठ प्रकृतीशी आपल्याला बांधून ठेवणाऱ्या तीन बंधनांपैकी पहिल्या बंधनाचा, आसक्ती व वासनारूप बंधनाचा विचार झाला. आता दुसरे बंधन, विचार व आचार यांचा हट्टाग्रह. पूर्णत्व मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे आपला अहंकारी आग्रह आपल्याला दिव्यकर्ममार्गात सर्वथा टाकून द्यावा लागतो त्याचप्रमाणे दिव्य ज्ञान परिपूर्ण व्हावयास हवे असेल तर तेथेही आपला अहंकारी आग्रह सोडावा लागतो.

जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव :

उपरोक्त स्व-इच्छा म्हणजे मनातील अहंकारच असतो; की जो स्वत:च्या आवडीनिवडी, स्वत:च्या सवयी, स्वत: केलेल्या विचारांच्या, दृष्टिकोनांच्या, आणि इच्छेच्या भूतकाळातील वा भविष्यातील कल्पनांना घट्ट धरून राहतो. कारण त्या कल्पना वा रचना म्हणजेच तो स्वत: आहे किंवा त्या त्याच्या स्वत:च्या आहेत अशी त्याची धारणा असते. आणि मग त्यातून तो ‘मी’ आणि ‘माझे’ यांचे एक अतिशय नाजूक धाग्यांचे जाळे स्वत:भोवती विणत राहतो आणि एखादा कोळी ज्याप्रमाणे आपल्या जाळ्यात जीवन जगत राहतो तसाच हाही राहू लागतो.

कोळ्याला जसा त्याच्या जाळ्यावर केलेला आघात रुचत नाही, त्याचप्रमाणे कोणी धक्का दिलेला ह्या अहंकारी मनाला रुचत नाही, त्याचा ते द्वेष करते. कोळ्याला स्वत:च्या जाळ्याहून निराळ्या जाळ्यात राहावे लागल्यास परकेपणा वाटतो, त्याप्रमाणे अहंकारी मन नव्या दृष्टिकोनाकडे नव्या रचनांकडे, नव्या स्वप्नांकडे नेले गेले की, त्याला परकेपणा वाटतो, त्याला दु:ख होते. ही आसक्ती मनातून अजिबात काढून टाकली पाहिजे.

जगासंबंधाने व जीवनासंबंधाने असलेली आपली सामान्य वृत्ती आपण टाकून दिली पाहिजे; जागृत न झालेले मन या सामान्य वृत्तीला स्वभावधर्म असे समजून चिकटून राहते; परंतु आपण येथेच थांबता उपयोगी नाही; आपण निर्माण केलेल्या कोणत्याही मानसिक रचनेला, बुद्धिप्रधान विचारपंथाला, धार्मिक मतवादाला किंवा तार्किक सिद्धांताला आपण बांधलेले राहता कामा नये; मनाचे व इंद्रियांचे जाळे आपण तोडूनच टाकले पाहिजे. पण तेथेही आपण थांबता कामा नये; विचारकाचे जाळे, धर्मवाद्यांचे जाळे, धर्मसंस्थापकांचे जाळे थोडक्यात ‘शब्दांचे’ व ‘कल्पनांचे’ जाळे यापासून आपण स्वत:ला दूर केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 329)

एकाग्र ध्यान :

इकडेतिकडे धावणाऱ्या मनाला एक विशिष्ट सवय लावणे ही एकाग्रता साधण्यासाठीची पहिली पायरी असली पाहिजे. ही विशिष्ट सवय म्हणजे, इकडेतिकडे न ढळता स्थिरपणे, एकच विषय घेऊन, त्यावर एकाच दिशेने क्रमबद्ध विचार करण्याची सवय होय. मनाने हा विचार करताना सर्व मोह, तसेच त्याला ढळवू पाहणारे सर्व हाकारे कटाक्षाने टाळले पाहिजेत. आपल्या सामान्य जीवनात अशी एकाग्रता वरचेवर पाहावयास मिळते, अनुभवावयास मिळते; मनाला सामान्य जीवनात बाह्य विषय, बाह्य क्रिया यांवर एकाग्र व्हावयाचे असते व ते तसे एकाग्र होतेही; परंतु असा बाह्य विषय नसताना आंतरिक विषयावर एकाग्र होणे हे मनाला फार अवघड जाते; तथापि, ज्ञानाच्या साधकाला अशी ही आंतरिक एकाग्रता प्रत्यक्षात आणणे आवश्यकच आहे.

एकाग्रता ही कल्पनेच्या फलदायी सारतत्त्वावर करावयाची असते. जीवाच्या इच्छेने एकाग्र होऊन तसा आग्रह धरला की, ही कल्पना तिच्यात अंतर्भूत असलेल्या सत्याची सर्व अंगे प्रकट करते. उदाहरणार्थ, जर ‘दिव्य प्रेम’ हे आपल्या एकाग्रतेचा विषय असेल तर, प्रेम म्हणजे ईश्वर ह्या संकल्पनेच्या सारभूत तत्त्वावर एकाग्रतेने चिंतन केले पाहिजे. त्या दिव्य प्रेमाचे बहुविध आविष्करण तेजोमय रीतीने उदित व्हावे अशा पद्धतीने मनाने त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ही एकाग्रता फक्त विचारांमध्ये नाही तर हृदयात, अस्तित्वात आणि साधकाच्या दृष्टीमध्येही असली पाहिजे. येथे विचार आधी आणि अनुभव नंतर असे होऊ शकते, पण कधीकधी, अनुभव आधी आणि नंतर त्या अनुभवातून ज्ञानाचा उदय असेही होऊ शकते. त्यानंतर मग प्राप्त झालेल्या गोष्टीचे अधिकाधिक चिंतन, मनन केले पाहिजे आणि ती जोवर नित्याचा अनुभव बनत नाही आणि पुढे जाऊन, जीवाचा तो नियमच किंवा धर्मच बनत नाही तोवर ती गोष्ट धरून ठेवली पाहिजे.

निदिध्यास :

एकाग्र ध्यानाची प्रक्रिया वर सांगितली; परंतु ह्या प्रक्रियेहून जोरदार, अधिक कष्टाची प्रक्रिया म्हणजे, समग्र मन हे कल्पनेच्या केवळ सारभूत अंशावरच एकाग्र करणे, त्याचे एकाग्रतेने निदिध्यासन करणे ही आहे. ध्यानविषयाचा फक्त मानसिक अनुभव घेण्यासाठी किंवा फक्त विचारगत ज्ञान मिळविण्यासाठी हा निदिध्यास केला जाऊ नये, तर कल्पनेच्या मागे असणाऱ्या वस्तूचे सार गाठण्यासाठी हा निदिध्यास केला जावा. या प्रक्रियेमध्ये साधकाचा विचार थांबतो आणि साधक तन्मयतेने वस्तूचे आनंदभरे दर्शन घेत राहातो अथवा आंतरिक समाधीच्या द्वारा त्या वस्तूत विलीन होऊन जातो. ही दुसरी प्रक्रिया जर उपयोगात आणली असेल तर नंतर, या प्रक्रियेने ज्या अवस्थेप्रत आपण चढून जातो त्या अवस्थेला खाली बोलावून, आपल्या निम्नतर अस्तित्वाचा ती ताबा घेईल, आपल्या सामान्य जाणिवेला ती प्रकाश, सामर्थ्य, आनंद प्रदान करेल असे करावे लागते. असे न केल्यास, आंतरिक समाधीत किंवा उच्च पातळीवर ती अवस्था आपली असेल पण आपण जागृतीत येऊन जगाच्या संपर्कात उतरलो की, आपल्या पकडीतून ती निसटलेली असेल, असे बरेच जणांचे होते. तेव्हा, हे असे अर्धवट प्रभुत्व हे पूर्णयोगाचे साध्य नाही.

मन निर्विषय करणे :

एकाच विषयावर मन एकाग्र करणे ही एक प्रक्रिया; विचार दृष्टिविषय झालेल्या एकाच वस्तूचा जोरदार निदिध्यास घेणे ही दुसरी प्रक्रिया; ह्या प्रक्रिया वर वर्णिल्या. तिसरी प्रक्रिया मन एकदम शांत, निर्विषय करणे ही आहे. अनेक मार्गांचा वापर करून, मन शांत करता येते. एक मार्ग असा आहे – मन क्रिया करीत असताना त्या क्रियेत साधकाने भाग घेऊ नये तर अगदी तटस्थ राहावे. मनाकडे केवळ पाहत राहावे; असे सारखे तटस्थतेने मनाकडे पाहात राहिले, तर शेवटी मन कंटाळते. त्याच्या उड्या, त्याची धावपळ ही त्याच्या मालकाच्या संमतीशिवाय चालली आहे हे त्याच्या लक्षात येते आणि मग ते अधिकाधिक शांत होत जाते व शेवटी पूर्ण शांत होते. मन शांत करण्याचा दुसरा मार्ग असा – मन जे विचार सुचवील ते साधकाने असंमत करावे. ते मनातून बाहेर फेकून द्यावे. ते जसजसे त्याच्या समोर येत जातील तसतसे त्यांना फेकून देत राहण्याचे कार्य त्याने करीत राहावे; आणि आपल्या अस्तित्वात मनाच्या धांगडधिंग्यामागे जी शांती नेहमीच वसत असते, त्या शांतीला चिकटून राहावे. असे करीत राहिल्याने, अस्तित्वातील गुप्त शांती प्रकट होते; साधकाच्या मनात, सर्व अस्तित्वांत महान शांती प्रकटपणे स्थिर होते आणि या शांतीबरोबर सर्वव्यापी शांत ब्रह्माची अनुभूती साधकाला प्राप्त होते. या महान शांतीच्या पायावर दुसरी सर्व उभारणी करता येते. ही उभारणी, ज्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या आधारावर केली जाते ते ज्ञान वस्तूंविषयीच्या वरवरच्या लक्षणांचे ज्ञान नसते तर, ते ईश्वरी अभिव्यक्तीच्या अति-खोल असणाऱ्या सत्याचे ज्ञान असते.

– श्रीअरविंद

(CWSA 23 : 323-324)