‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘प्रकृती’ ही उत्क्रांतीच्या माध्यमातून एक प्रकारे योगच करत आहे. या योगप्रवासामध्ये जडसृष्टी, प्राण, मन यांच्या विकसनानंतर, आता एका नवीन उत्क्रांती-टप्प्याकडे तिच्या विकसनाची वाटचाल चालू आहे. अधिमानस, अतिमानव, आणि अतिमानसिक जीव या मार्गाने ती वाटचाल करत आहे, असे श्रीअरविंद यांनी स्पष्ट केले आहे.

आजवरच्या वाटचालीमध्ये प्रकृती एकाकी रीतीने हे कार्य करत होती. परंतु मानव – हा तिचा अधिक विकसित जीव आता या कार्यामध्ये तिचा सहभागीदार होऊ शकतो, ही शक्यता प्रथमतः श्रीअरविंद यांच्या दृष्टिक्षेपात आली. आणि प्रकृतीच्या या कार्यामध्ये, तिला त्वरेने पुढच्या टप्प्याकडे जाण्याच्या प्रक्रियेमध्ये साहाय्य करण्याच्या दृष्टीने श्रीअरविंद यांच्या समवेत श्रीमाताजीदेखील सहभागी झाल्या.

अधिमानसाचे अवतरण (Descent of Over-mind) दि. २४ नोव्हेंबर १९२६ रोजी घडून आल्याचे आपण विचारात घेतले. त्यानंतर अतिमानसाकडे (Supramental) वाटचाल सुरू झाली. आणि याच अधिक उच्चतर कार्यासाठी, अधिक गहनतर कार्यासाठी, अधिक एकाग्रतेने, एकदिश होत कार्य करण्याची आवश्यकता होती. ती आवश्यकता लक्षात घेऊन, दैनंदिन जीवनामधून स्वतःला बाजूला करून, श्रीअरविंदांनी एकांतवास स्वीकारला. पुढे चोवीस वर्षे ते आश्रमातील त्यांच्या खोलीमधून एकदाही बाहेर आले नाहीत. श्रीअरविंदआश्रम आणि साधकांच्या साधनेची सर्व जबाबदारी त्यांनी श्रीमाताजींवर सोपवली होती.

‘अतिमानसिक जीव’ (Supramental Being) ही नवीनच श्रेणी प्रकृतीच्या विकासक्रमामध्ये उदयाला यायची असेल तर, पृथ्वी-चेतनेमध्ये अतिमानसाची प्रस्थापना करणे आवश्यक आहे, हे मानवी बुद्धीच्या आकलनापलीकडचे असे कार्य श्रीअरविंद आणि श्रीमाताजी करू पाहत होते. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी या ‘अवतारद्वया’ची सारी योगसाधना त्या दिशेने उत्क्रांत होत होती. त्या साधनेच्या दरम्यान एका विवक्षित क्षणी श्रीअरविंद यांच्या लक्षात आले की, दोघांपैकी कोणा एकाच्या देहामध्ये अतिमानसिक चेतनेची रूजवण करून, तो देह पृथ्वी-चेतनेमध्ये समरस करणे आवश्यक आहे, म्हणजे मग अतिमानसाची प्रस्थापना पृथ्वी-चेतनेमध्ये होईल. श्रीअरविंदांनी हे जेव्हा श्रीमाताजींना सांगितले तेव्हा, श्रीमाताजींनी आपला देह या कार्यासाठी देण्याची तयारी दाखविली. मात्र श्रीअरविंदांनी त्यांना सांगितले की, “त्यासाठी तुम्ही देहत्याग करता कामा नये, कारण माझ्या देहापेक्षा तुमचा देह ‘रूपांतरणा’च्या कार्यासाठी अधिक सुयोग्य आहे. तेव्हा तुम्हाला देहामध्ये राहूनच कार्य पुढे न्यावे लागेल.” याचा अर्थ असा की, देहत्यागाची जेव्हा आवश्यकता निर्माण होईल तेव्हा ‘मी देहत्याग करीन’, असे श्रीअरविंदांनी सूचित केले होते. हा संवाद होता सन १९३८ मधील!

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी हा जो उत्क्रांतियोग करत होते, त्यामध्ये आता तो क्षण जवळ येत चालला होता. जणू अनंत काळ आपल्या हाती आहे, अशी कार्यपद्धती असणारे श्रीअरविंद नोव्हेंबर १९५० च्या सुमारास ‘सावित्री’चे लेखनकार्य त्वरेने पूर्ण करण्यामागे लागले होते, अशी माहिती सावित्रीचे लेखकु झालेले निरोदबरन देतात. Book of Death and the Epilogue हे सावित्रीमधील शेवटचे दोन अध्याय वगळता, श्रीअरविंद यांनी सावित्रीच्या पुनर्लेखनाचे सर्व कार्य पूर्ण केले होते. हे दोन अध्याय बाकी आहेत, असे निरोदबरन यांनी सांगताच “ते नंतर पाहू,” असे म्हणत श्रीअरविंदांनी आपल्या निर्गमनाचा सूचक संकेत दिला होता.

एरवी साधकांच्या तब्येतीवर आपल्या योगसामर्थ्याने उपचार करणारे श्रीअरविंद, स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र त्या योगशक्तीचा वापर करत नव्हते. ते पाहून, ‘आपण आपली योगशक्ती का वापरत नाही’, असे निकटवर्तीयांनी विचारले तेव्हा, “त्याचे स्पष्टीकरण देता येणार नाही, तुम्हाला ते कळणार नाही,” असे श्रीअरविंद यांनी सांगितले होते. या साऱ्याच गोष्टी त्यांच्या हेतुपूर्वक चाललेल्या निर्गमनाकडे निर्देश करणाऱ्या होत्या. श्रीमाताजींना याची जाणीव होत होती, त्यांनीही डॉ. संन्याल (अखेरच्या काळात श्रीअरविंदांवर उपचार करणारे डॉक्टर) यांना सांगितले होते, “…he is withdrawing.”

आणि अखेर तो दिवस उजाडला, दि. ०५ डिसेंबर १९५०, पहाटे ०१ वाजून २० मिनिटांनी अगदी शांतपणे श्रीअरविंदांनी निर्गमन केले. रूढ अर्थाने ज्याला ‘मृत्यू’ म्हणता येईल असा हा मृत्यू नव्हता. याची ग्वाही, निर्गमनानंतरही पाच दिवसपर्यंत त्यांचा पार्थिव देह तसाच टिकून राहिला होता, यामधून मिळते. या अद्भुत घटनेची वार्ता कळल्यानंतर, यामध्ये काही रासायनिक पदार्थांचा वापर करून देह टिकवून ठेवला असावा, अशी शंका घेऊन फ्रेंच डॉक्टर येऊन तपासणी करून गेले होते. उष्णकटिबंधीय प्रांतामध्ये देहावर अंतिम संस्कार न करता, तो देह जास्तीत जास्त ४८ तास ठेवता येतो, असे कायदा सांगत होता. आणि इथे १०० तास, कोणत्याही रसायनांचा वापर न करता, श्रीअरविंदांचा देह विघटन न होता, तसाच शाबूत होता, याची निःसंशय ग्वाही त्या फ्रेंच डॉक्टरांनी दिली. हा एक ‘चमत्कार’ असल्याचा स्पष्ट निर्वाळा त्यांनी दिला.

श्रीअरविंदांचे निर्गमन होऊनही देह तसाच कायम आहे, हे लक्षात आल्यावर श्रीमाताजींनी अध्यात्ममार्गाने, उच्च पातळीवरून त्यांची भेट घेतली आणि ‘आपण पुन्हा या देहात परतणार आहात काय?’ असे विचारले. तेव्हा श्रीअरविंदांनी उत्तर दिले, “I have left this body purposely. I will not take it back. I shall manifest again in the first Supramental body built in the Supramental way.” मी या देहाचा हेतुपूर्वक त्याग केला आहे, तेव्हा मी या देहामध्ये आता परतणार नाही. अतिमानसिक पद्धतीने घडण होऊन जेव्हा पहिला अतिमानसिक देह तयार होईल तेव्हा मी त्या माध्यमातून आविष्कृत होईन, असे श्रीअरविंदांनी उत्तर दिले होते.

श्रीमाताजींनी डिसेंबर १९५० मध्ये सांगितले, “He was not compelled to leave his body, he choose to do so for reasons so sublime that they are beyond the reach of human mentality.” (“त्यांना देहत्याग करणे भाग पडले नव्हते, तर त्यांनी तो स्वतःहून घेतलेला निर्णय होता. त्याची कारणे इतकी उदात्त आहेत की, कोणत्याही मानवी मानसिकतेच्या आकलनशक्तीच्या ती पलीकडची आहेत,’ असे श्रीमाताजींनी सांगितले होते.)

‘सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा’ या भूमिकेतून श्रीअरविंदांनी हे बलिदान केले होते. पृथ्वी-चेतनेमध्ये अतिमानसिक चेतना स्थापित करण्यासाठी केलेली ही सर्वोच्च कृती होती. श्रीअरविंद पृथ्वीच्या गर्भात शिरून पुढील कार्य अदृश्यरूपाने करू पाहात होते. आणि त्यांच्यानंतर, तेच कार्य या पृथ्वीतलावर करण्यासाठी परमेश्वराने श्रीमाताजींची योजना केली होती. श्रीअरविंदांच्या निर्गमनानंतर, श्रीअरविंदांच्या देहामध्ये साठविलेली योगशक्ती त्यांनी श्रीमाताजींमध्ये संक्रमित केली. श्रीअरविंदांच्या देहावर विघटनाचे पहिले लक्षण दिसून येताच डॉ. संन्याल यांनी श्रीअरविंदांचे ‘निधन’ झाल्याचे घोषित केले. त्यानंतर लगेचच या शक्ती-संक्रमणाचा सघन अनुभव श्रीमाताजींना आला. “हा अनुभव इतका सघन होता, की आपल्या देहाच्या रंध्रांमधून ती शक्ती संक्रमित होत असताना, जणू काही घर्षण होत आहे,’ अशी जाणीव श्रीमाताजींना होत होती.

अतिमानसिक चेतनेसंदर्भातील, पृथ्वी-चेतनेच्या रूपांतरणाच्या संदर्भातील हे कार्य श्रीअरविंदांच्या निर्गमनानंतर, सन १९७३ पर्यंत श्रीमाताजींनी पुढे चालू ठेवले. महायोगी श्रीअरविंद यांच्या जीवनातील साऱ्याच घटना इतक्या अगम्य आहेत, मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडील आहेत की, त्यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने वेध घेणे अवघड आहे, एक प्रकारे अशक्यप्राय आहे. त्यांचे चरित्रलेखन करू पाहणाऱ्या लेखकांना श्रीअरविंदांचे सांगणे होते की, “माझे चरित्र लिहिण्याच्या फंदात पडू नका. तुमचा तो प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही. कारण तुम्हाला काय किंवा अन्य कोणालाही काय माझ्या जीवनाबाबतीत तीळमात्र माहिती नाही, कारण माझे जीवन, माणसाच्या दृष्टीला दिसू शकेल अशा पद्धतीने पृष्ठभागावर जगण्यात आलेले नाही.”

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ ही मालिका म्हणजे, श्रीअरविंदांचे पृष्ठस्तरीय जीवन समजावून घेण्याचा एक तोकडा प्रयत्न होता, याची जाणीव मनात बाळगत, येथे या चरित्रपर मालिकेची परिसमाप्ती करत आहोत. या प्रवासामध्ये सारे वाचक आमच्या सोबत होते, याबद्दलची कृतज्ञता येथे व्यक्त करावीशी वाटते. मनापासून धन्यवाद!!

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांचा देह समाधिस्थ करण्यात आल्यानंतर, दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी श्रीमाताजींनी पुढील संदेश दिला. हा संदेश श्रीअरविंदांच्या समाधीवर संगमवरामध्ये कोरण्यात आला आहे.

“आमच्या प्रभूचे भौतिक आवरण असणाऱ्या हे देहा, तुझ्याप्रत आमची अनंत कृतज्ञता!! ज्याने आमच्यासाठी इतके काही केले, ज्याने कार्य केले, ज्याने संघर्ष केला, ज्याने दुःखभोग सहन केले, ज्याने आशा बाळगली, ज्याने खूप चिकाटी बाळगली; ज्याने सर्वासाठी संकल्प केला, सर्वासाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्याने आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले; त्याच्याप्रत आमची अनंत कृतज्ञता! त्याच्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की, आम्हाला त्याचे कधीही विस्मरण होऊ नये; अगदी एक क्षणदेखील आम्ही हे विसरू नये की, आम्ही सारे त्याचे ऋणी आहोत.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांमध्ये १९४८ ते १९४९ च्या दरम्यान आजारपणाची काही लक्षणं दिसून आली. मध्यंतरीच्या काळात ती दिसेनाशी झाली होती पण कालांतराने म्हणजे १९५० च्या मध्यावर ती पुन्हा एकदा दिसू लागली. आणि दि. ०५ डिसेंबर १९५० रोजी पहाटे ०१ वाजून २६ मिनिटांनी श्रीअरविंदांनी देह ठेवला.

श्रीअरविंद यांचा देह समाधि-स्थानी ठेवण्याची सारी व्यवस्था करण्यात आली होती पण सहा डिसेंबरला संध्याकाळी श्रीमाताजींनी पुढील संदेश प्रसृत केला की, “श्रीअरविंदांचा अंतिमसंस्कार आज करण्यात आलेला नाही. त्यांच्या देहामध्ये ‘अतिमानसिक प्रकाशा’चे (Supramental Light) संघनीकरण झालेले असल्यामुळे, त्या देहावर विघटनाची कोणतेही चिन्ह दिसत नाही आणि जोवर तो देह जसाच्या तसा आहे तोवर त्यांचा देह तसाच ठेवण्यात येईल.’’

श्रीअरविंदांच्या देहाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

श्रीअरविंद यांच्या महासमाधीनंतर ५ दिवसपर्यंत देह विघटन न होता तसाच कायम राहणे, या अद्भुत घटनेची नोंद The Hindu यासारख्या तत्कालीन प्रसिद्ध वृत्तपत्रांनी देखील घेतली होती. पुढे त्या घटनेचे स्पष्टीकरण करताना ज्येष्ठ साधक श्री. अमल किरण (श्री. के. डी. सेठना) यांनी असे म्हटले होते की, “श्रीअरविंद यांच्या देहाभोवती अनेकांनी पाहिलेला अद्भुत सोनेरी प्रकाश पाच दिवस, त्यावरील तजेला निघून न जाता किंवा त्याला विघटनाचा किंचितसाही स्पर्श न होता, तसाच टिकून राहणे, ही गोष्ट म्हणजे, त्यांनी स्वत:च्या भौतिक देहरूपी-रचनेचा त्याग करून, पृथ्वीसाठी जो विजय संपादन केला होता, त्या विजयाचे द्योतक आहे.”(क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंद एकांतवासात गेले तेव्हापासून, म्हणजे सन १९२६ पासून ते १९५० पर्यंतच्या कालावधीतील त्यांचे एकही छायाचित्र उपलब्ध नाही. कारण जेव्हा त्यांचे छायाचित्र काढण्याची परवानगी मागण्यात आली होती तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला होता आणि टिप्पणी केली होती : “बऱ्याच लोकांनी यापूर्वी देखील असा प्रस्ताव मांडला होता.”

छायाचित्रांची ही प्रतीक्षा एप्रिल १९५० मध्ये संपली, जेव्हा हेन्री कार्टियर-ब्रेसाँ (फ्रेंच छायाचित्रकार) यांना श्रीअरविंद यांच्या खोलीत त्यांच्या छायाचित्रांची मालिका घेण्याची परवानगी मिळाली. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांपैकी एक छायाचित्र दि. २४ एप्रिल १९५० या दर्शनदिनी काढण्यात आलेले आहे. (हे छायाचित्र आजच्या post सोबत जोडत आहोत.) पुढे सात महिन्यांनंतर, ५ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद यांनी देह ठेवला. अशाप्रकारे कार्टियर-ब्रेसाँ यांनी काढलेली छायाचित्रे ही श्रीअरविंद यांच्या हयातीत काढली गेलेली शेवटची छायाचित्रे ठरली.

हेन्री कार्टियर-ब्रेसाँ १९५० मध्ये पाँडिचेरीला आले तेव्हा ते जगातील आघाडीच्या छायाचित्रकारांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. रमण महर्षी, महात्मा गांधी यांची त्यांनी काढलेली छायाचित्रे प्रसिद्ध होती.

श्रीअरविंद यांच्या दहा मिनिटांच्या दर्शनाने कार्टियर-ब्रेसाँ प्रभावित झाले. बाहेर ब्रेसाँ यांची वाट पाहत असलेल्या मंडळींनी उत्सुकतेने विचारले, “छायाचित्रण कसे झाले?” कार्टियर-ब्रेसाँ यांनी उत्तर दिले, “त्यांच्यासारखी व्यक्ती मी आजवर पाहिलेली नाही. ते तिथे अगदी अविचल बसले होते.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘श्रीअरविंद आश्रमा’तर्फे फेब्रुवारी १९४९ मध्ये दोन नियतकालिके प्रकाशित होऊ लागली. एक म्हणजे Bulletin of Physical Education (शारीरिक शिक्षण विभागाचे वार्तापत्र), हे त्रैमासिक आणि दुसरे पाक्षिक मदर इंडिया. ‘बुलेटिन’ हा श्रीअरविंद आश्रमाच्या क्रीडा विभागाचा एक अविभाज्य भाग आहे. या क्रीडा विभागात आश्रमातील आबालवृद्ध सहभागी होतात. त्याची स्थापना श्रीमाताजींनी केली होती आणि त्या स्वतः या विभागाच्या उपक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये सहभागी होत असत. श्रीमाताजी इ. स. १९४० ते इ. स. १९५० या दशकामध्ये आश्रमाच्या मैदानावर आणि टेनिसकोर्टवर पुष्कळ वेळ व्यतीत करत असत. त्या उत्तम टेनिसपटू होत्या. त्या कालावधीमध्ये ‘बुलेटिन’साठी श्रीअरविंद यांनी आठ लेख लिहून दिले होते आणि ते त्यांचे अखेरचे गद्यलेखन होते. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांचा एकांतवासाचा काळ हा त्यांच्या भरघोस साहित्यनिर्मितीचा कालखंड होता. श्रीअरविंद १९३० सालच्या सुमारास, साधकांना उद्देशून प्रचंड मोठ्या प्रमाणात पत्रलेखन करत होते पण त्याचबरोबर ते विपुल प्रमाणात काव्यनिर्मिती आणि गद्यलेखनसुद्धा करत होते. या कालखंडामध्ये त्यांनी अनेक कविता, विशेषतः सुनीतं लिहिली आहेत, आणि पाँडिचेरीला प्रारंभीच्या दिवसांपासून ज्या ‘सावित्री’ महाकाव्याच्या लेखनाची सुरूवात झाली होती, त्या लेखनाने आता वेग घेतला होता.

श्रीअरविंदांच्या जीवनाच्या उत्तरार्धातील बराचसा काळ श्रीअरविंद ‘सावित्री’ या महाकाव्याचे लिखाण करत होते. ‘सावित्री’चे पहिले हस्तलिखित उपलब्ध आहे ते इ. स. १९१६ मधील. सुरुवातीच्या काळात एक वर्णनात्मक कविता असे त्याचे रूप होते. पण नंतर त्यावर अनेकदा संस्करणे करण्यात आली. श्रीअरविंदांनी त्याला व्यापक आणि अधिक गहन अर्थ प्रदान करत, त्या काव्याचे महाकाव्यात रूपांतर करण्याचे कार्य १९३० च्या सुमारास पुन्हा एकदा हाती घेतले. ‘सावित्री – एक आख्यायिका आणि एक प्रतीक’, हे महाकाव्य म्हणजे त्यांची सर्वाधिक महत्त्वाची साहित्यकृती ठरली. या महाकाव्याच्या परिष्करणाचे काम ते त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत करत होते. इ. स. १९४० च्या सुमारास जेव्हा त्यांची शारीरिक दृष्टी साथ देईनाशी झाली तेव्हा, निरोदबरन या त्यांच्या निकटवर्ती साधकाच्या मदतीने त्यांनी हे लिखाण पूर्ण केले. १९४६ सालापासून त्यातील काही भाग प्रथमतः प्रकाशित होऊ लागले. ‘सावित्री’ या महाकाव्याच्या पहिल्या भागाची पहिली आवृत्ती १९५० साली प्रकाशित झाली. श्रीअरविंदांच्या हयातीमध्ये हा संपूर्ण ग्रंथ प्रकाशित होऊ शकला नाही. त्यांच्या महासमाधीच्या पुढल्या वर्षभरात दुसऱ्या खंडाच्या रूपाने तो समग्रपणे प्रकाशित करण्यात आला.

श्रीअरविंदांनी निरोदबरन यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये नमूद केले आहे की, “आरोहणाचे (ascension) एक माध्यम या दृष्टीने मी ‘सावित्री’चे लेखन केले. एका विशिष्ट अशा मानसिक स्तरावरून मी त्याच्या लेखनास सुरुवात केली होती आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचत असे तेव्हा तेव्हा त्या स्तरावरून मी त्याचे पुनर्लेखन करत असे… खरं सांगायचे तर, ‘सावित्री’ हे माझ्या दृष्टीने लिहून हातावेगळे करायचे काव्य नव्हे, तर व्यक्ती स्वतःच्या योगिक चेतनेमधून कोणत्या स्तरावरील काव्यनिर्मिती करू शकते आणि अशा प्रकारचे काव्य हे कसे सर्जक ठरू शकते, हा प्रयोग करण्याचे ते क्षेत्र आहे.”

…’सावित्री’चे सुमारे बारा वेळा पुनर्लेखन करण्यात आले. आणि या पुनर्लेखनाची दिशा डोक्याच्या वरील स्तरांकडे जाणारी होती. ‘अधिमानसिक’ (Overmind) काव्याच्या दिशेने चाललेला हा प्रवास होता.

१९३८ नोव्हेंबरमध्ये झालेल्या अपघातामधून श्रीअरविंद सावरू लागले होते, त्या कालावधीमध्ये ‘Life Divine’ (दिव्य जीवन) या ग्रंथाचे लिखाण करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती. १९३९ आणि १९४० सालांमध्ये दोन भागांमध्ये त्याच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यानंतर, Collected Poems and Plays, Vedic hymns to Agni, The Human Cycle and The Ideal of Human Unity, Sri Aurobindo’s Letters on yoga या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. परंतु एवढे प्रचंड लिखाण प्रकाशित होत असूनही, १९४० ते १९५० या दरम्यान त्यांच्या साहित्यनिर्मितीचा केंद्रबिंदू ‘सावित्री’ हाच होता. श्रीअरविंदांनी देह ठेवल्यानंतर चार वर्षांनी, म्हणजे दि. १५ ऑगस्ट १९५४ रोजी, ‘Savitri, a Legend and a symbol’ या ग्रंथाचे श्रीअरविंद आश्रमातर्फे प्रकाशन करण्यात आले. या महाकाव्यामध्ये २३८१३ पंक्ती (lines) असून, हे इंग्रजी भाषेतील सर्वांत मोठे दीर्घ-काव्य आहे.

श्रीअरविंद लिखित साहित्य आजवर ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे, त्यावरून त्यांच्या लेखनाचा आवाका लक्षात येईल. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी संघर्ष चालूच राहिला. फेब्रुवारी १९४६ साली, बंगाल आणि इतर प्रांतांमध्ये उसळलेल्या हिंदु-मुस्लीम दंग्यांमुळे ज्याची जटिलता अधिकच वाढली होती. भारताच्या स्वातंत्र्याविषयीच्या वाढत्या मागणीला दिलेला प्रतिसाद म्हणून, हा देश सोडून जाण्याचा इरादा असल्याचे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. दि. ०१ जुलै १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचे विधेयक संसदेमध्ये पारित करण्यात आले; त्या विधेयकानुसार, सत्तासूत्रे भारतीयांच्या हाती देण्याची तारीख दि. १५ ऑगस्ट १९४७ असेल, असे ठरले.

दि. १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस श्रीअरविंद यांचा ७५ वा वाढदिवस होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्यातील हा अंशभाग…

१५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस. हा भारतासाठी जुन्या युगाचा अंत आणि नव्या युगाचा प्रारंभ असणार आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर ती आशिया आणि अखिल विश्वासाठी देखील महत्त्वाची आहे. मानवतेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निर्धारित करण्यामध्ये ज्या शक्तीचा मोठा वाटा असणार आहे, अशा एका नव्या शक्तीचा, अकथित अशी क्षमता असलेल्या एका नव्या शक्तीचा, राष्ट्रसमूहांमध्ये प्रवेश होत असल्याचे हे द्योतक आहे.

…या निमित्ताने, माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माझ्यामध्ये ज्या ध्येयांची, आदर्शाची रुजवण झाली होती, त्या ध्येयांचा, आदर्शाच्या सार्थकतेचा प्रारंभ झालेला मला दिसत आहे, अशी व्यक्तीश: मी उद्घोषणा करू शकतो; कारण ही ध्येयधोरणं भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ही ध्येयधोरणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारताचे भावी कार्य आहे, हे असे कार्य आहे की, जेथे भारताने नेतृत्व स्वीकारणे आवश्यकच आहे. कारण मला नेहमीच असे वाटत आले आहे आणि तसे मी सांगत आलो आहे की, भारताचा उदय होतो आहे तो केवळ त्याचे स्वत:चे भौतिक हेतू म्हणजे त्याचा विस्तार व्हावा; महानता, शक्तिसामर्थ्य, समृद्धी ह्या गोष्टी त्याला साध्य व्हाव्यात म्हणून नाही, अर्थात त्याकडेही भारताने दुर्लक्ष करता कामा नये किंवा इतरांप्रमाणे इतरेजनांवर प्रभुत्व संपादन करावे म्हणूनही भारताचा उदय होत नाहीये तर ‘ईश्वरा’साठी, या जगतासाठी, अखिल मानव-वंशाला साहाय्य करण्यासाठी, त्यांचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा उदय होतो आहे. ही ध्येयं आणि आदर्श त्यांच्या स्वाभाविक क्रमाने अशी होती :

१) भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती.
२) आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान, मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे.
३) मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की, जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यत: ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल; ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल.
४) भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणारी साधने ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल.
५) सरतेशेवटी, उत्क्रांतीची एक नवीन पायरी, जी चेतनेचे उच्चतर पातळीवर उन्नयन करून, त्याद्वारे ती – मानवांनी जेव्हापासून विचार करायला आणि व्यक्तिगत परिपूर्णतेची व एका परिपूर्ण समाजरचनेची स्वप्न पाहायला सुरुवात केली तेव्हापासून मानवजातीला अस्तित्वविषयक ज्या अनेकानेक समस्यांनी गोंधळात टाकले होते, अस्वस्थ केले होते – अशा समस्यांचे निराकरण करायला सुरूवात करेल. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

१९४२ साली जेव्हा दुसरे महायुद्ध भारताच्या दिशेने अधिकाधिक सरकू लागले तेव्हा आश्रमापासून लांब राहत असलेले साधकही, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या थेट संरक्षणाच्या छत्रछायेखाली पाँडिचेरीला येऊ इच्छित होते. अनेक साधकांना तशी परवानगीही देण्यात आली होती. काही साधकांनी तर येताना आपल्याबरोबर स्वतःच्या सर्व कुटुंबीयांनाच आश्रमात आणले. तोपर्यंत आश्रमातील लहान मुलांची संख्या अगदीच मर्यादित होती, त्याकाळी अगदी फार लहान वयाचे असे आश्रमात कोणीच नव्हते, परंतु आता मात्र त्यांची संख्या बऱ्यापैकी झाली होती आणि ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. काही काळानंतर, त्यांच्या शिक्षणाची काही ना काहीतरी व्यवस्था लावणे आता आवश्यक होऊन बसले होते. त्यानुसार दि. ०२ डिसेंबर १९४३ रोजी श्रीमाताजींनी साधारणपणे वीस विद्यार्थ्यांसाठी एक शाळा सुरू केली.

तेव्हापासून, आजपर्यंत या शाळेमध्ये विविध शैक्षणिक प्रयोग करण्यात येत आहेत. येथे मुक्त प्रगती-शिक्षण प्रणाली (Free Progress Education System) अस्तित्वात आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी प्रतिपादित केलेल्या समग्र शिक्षण (Integral Education) या शैक्षणिक तत्त्वज्ञानानुसार येथे शिक्षण दिले जाते. या शिक्षणाचे शारीरिक शिक्षण, प्राणिक शिक्षण, मानसिक शिक्षण, आंतरात्मिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण हे पाच पैलू आहेत.

पुढे १९५१ मध्ये, पाँडिचेरी येथे एक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये श्रीअरविंद यांचे उचित स्मारक व्हावे या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय विद्यापीठ केंद्र’ स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार, दि. ०६ जानेवारी १९५२ रोजी श्रीमाताजींच्या हस्ते ‘श्रीअरबिंदो इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. १९५९ साली, त्याचे नाव बदलून ‘श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ असे करण्यात आले. येथे बालवाडीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.

शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र असल्याने जगभरातील विविध प्रांतांमधील विविध संस्कृतीचे प्रतिबिंब येथे दिसावे तसेच वैश्विक सांस्कृतिक समन्वयामध्ये प्रत्येक राष्ट्राने परस्पर सामंजस्य आणि मानवी एकात्मतेला चालना देण्यासाठी अद्वितीय योगदान द्यावे अशी येथे अपेक्षा आहे. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंद यांनी क्रिप्स यांच्या प्रस्तावाला संमती दिली होती कारण तो प्रस्ताव स्वीकारल्याने भारत आणि ब्रिटन यांना आसुरी शक्तींच्या विरोधात एकत्रितपणे उभे राहणे शक्य झाले असते आणि क्रिप्स यांची योजना स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणून उपयोगात आणता आली असती.

दि. ३१ मार्च १९४२ रोजी श्रीअरविंदांनी ब्रिटिश मुत्सद्याला पुढील संदेश पाठविला : मी तुमचे निवेदन ऐकले आहे. जरी मी आता राजकीय क्षेत्रात कार्यरत नसून आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलो, तरीसुद्धा, हा प्रस्ताव मांडण्यासाठी तुम्ही जे काही केले आहे त्याबद्दल एके काळचा एक राष्ट्रीय नेता आणि भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतला एक कार्यकर्ता या नात्याने, मी आपले अभिनंदन करू इच्छितो. भारताला त्याच्या स्वातंत्र्याबाबत आणि एकात्मतेबाबत, स्वतःसाठी काही ठरविण्याची आणि त्याला जे निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे त्याची सर्वार्थाने व्यवस्था लावण्याची आणि जगातील स्वतंत्र राष्ट्रांमध्ये स्वतःचे एक प्रभावशाली स्थान निर्माण करण्याची जी संधी देण्यात आली आहे तिचे मी स्वागत करतो. सारे मतभेद, सारे कलह बाजूला सारून, या योजनेचे स्वागत केले जाईल आणि त्याचा यथायोग्य उपयोग केला जाईल अशी मला आशा आहे. भारत आणि ब्रिटन यांमधील पूर्वीच्या संघर्षाची जागा मैत्रीपूर्ण संबंधांनी घेतली जाईल आणि ती एका महत्तर वैश्विक एकतेची पायरी असेल, ज्यामध्ये, भारत एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने, आपल्या आध्यात्मिक शक्ती साहाय्याने, समस्त मानवसमूहासाठी एक अधिक चांगले आणि आनंदी जीवन निर्माण करण्यासाठी योगदान देईल, अशीही मला आशा आहे. या भूमिकेतून, तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये काही मदत होणार असेल तर, मी जाहीरपणे माझा पाठिंबा देत आहे.

‘क्रिप्स’ योजना स्वीकारावी म्हणून श्रीअरविंद यांनी तत्कालीन काँग्रेस नेत्यांना तार पाठविली होती आणि त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचविण्यासाठी, वैयक्तिकरित्या एक दूत देखील पाठविला होता. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

क्रिप्स योजना नाकारली गेली आणि श्रीअरविंदांनी त्यांच्या परीने निष्काम कर्म करूनदेखील, आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करून घेण्याच्या त्यांच्या मार्गाकडेच त्यांना पुन्हा वळणे आवश्यक ठरले होते. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांनी सुरुवातीला स्वतःला (दुसऱ्या) महायुद्धाशी सक्रियपणे जोडून घेतलेले नव्हते. पण हिटलर जेव्हा त्याच्या विरोधात असणाऱ्या सर्व शक्तींना चिरडून टाकणार आणि या जगावर नाझींचे वर्चस्व प्रस्थापित होणार, असे दिसू लागले तेव्हा मग, त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

त्यांनी जाहीरपणे मित्रराष्ट्रांची (चीन, रशिया, इंग्लंड व अमेरिका) (Allies) बाजू घेतली, निधी गोळा करण्यासाठी जे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी काही आर्थिक साहाय्यही देऊ केले होते तसेच सैन्यामध्ये प्रवेश करण्यासंबंधी किंवा युद्धासाठी जे प्रयत्न केले जात होते त्यामध्ये सहभागी होण्यासंबंधी त्यांचा सल्ला मागायला जी मंडळी त्यांच्याकडे येत असत त्यांना ते प्रोत्साहन देत असत.

येथे ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, श्रीअरविंदांनी जेव्हा जाहीरपणे मित्रराष्ट्रांची बाजू घेतली तेव्हा संपूर्ण भारत हा अगदी ठळकपणे विरोधी पक्षाला म्हणजे अक्ष (Axis) शक्तींना (जर्मनी, इटली, जपान) साहाय्य पुरविण्याच्या पक्षाचा होता. त्या काळी भारतीयांची ब्रिटिशविरोधी राष्ट्रीय भावना एवढी कडवी होती की, हिटलरचा प्रत्येक विजय हा आपला विजय आहे, असे त्यांना वाटत असे.

‘वंदे मातरम्’च्या दिवसांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी जी धारणा श्रीअरविंदांच्या मनात होती ती १९४२ सालीसुद्धा तशीच कायम होती; परंतु त्यामुळे नाझी आक्रमणाच्या खऱ्या स्वरूपाकडे कानाडोळा करण्याइतके ते अंध झाले नव्हते.

हिटलर आणि नाझी यांच्या पाठीशी काळोख्या आसुरी शक्ती आहेत हे त्यांना दिसले आणि त्यांचा विजय म्हणजे अनिष्ट शक्तींच्या सत्तेची मानववंशाला करावी लागणारी गुलामी आणि परिणामतः उत्क्रांतिक्रमाची परागती, विशेषतः मानववंशाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीला बसणारी खीळ! यातून केवळ युरोपच नाही तर आशियासुद्धा गुलामगिरीकडे ओढला गेला असता आणि भारताबाबत तर ही गुलामगिरी अधिकच भयावह ठरली असती, भारताने या पूर्वी कधीच अशी गुलामी अनुभवली नसेल अशी ती गुलामगिरी ठरली असती आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आजवर जे प्रयत्न झाले होते ते सगळे विफल ठरले असते.

श्रीअरविंदांच्या सेवेमध्ये असणारे श्री. ए. बी. पुराणी यांनी लिहून ठेवले आहे की, ”नाझीवादाच्या धोकादायक राजवटीपासून मानवतेला वाचविण्याच्या कार्यासाठी श्रीअरविंद स्वतःची ऊर्जा कशी पणाला लावत होते, हे पाहणे हा एक अनमोल अनुभव होता. कोणत्याही फलाच्या किंवा बक्षिसाच्या अपेक्षेविना, किंबहुना आपण काय करत आहोत याची यत्किंचितही कल्पना दुसऱ्यांना येऊ न देता, मानवतेसाठी ठोस कार्य कसे करता येते, याचा तो एक आदर्श वस्तुपाठ होता. श्रीअरविंद जणू ईश्वरच बनून, ईश्वर या जगाची काळजी कशी घेतो, आणि तो खाली उतरून, मानवासाठी कसे कार्य करतो, हे स्वतःच्या उदाहरणाने प्रत्यक्ष दाखवून देत होते.

श्रीअरविंदांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, – जे एकेकाळी, “केवळ अ-सहकार पुकारणारेच नव्हते तर ते ब्रिटिश साम्राज्यवादाचे कट्टर शत्रू होते,” असे – श्रीअरविंद आता, विन्स्टन चर्चिल यांच्या प्रकृतीसंबंधीचे वार्तापत्र कसे काळजीपूर्वक ऐकत असत आणि चर्चिल यांच्या तब्येतीची काळजी ते कसे वाहत असत, ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. ते ईश्वरी कार्य होते, ईश्वराने या जगासाठी केलेले ते कार्य होते.

युद्धाच्या बातम्या सातत्याने ऐकणे किंवा काही आर्थिक हातभार लावणे किंवा काही जाहीर विधाने करणे एवढ्यापुरताच श्रीअरविंदांचा सहभाग मर्यादित नव्हता. जेव्हा प्रत्येकजण इंग्लंडच्या तत्काळ पराभवाची आणि हिटलरच्या निश्चित विजयाची अपेक्षा बाळगून होते अशा वेळी, डंकर्कच्या क्षणापासून (मे १९४०) श्रीअरविंदांनी आपली आध्यात्मिक शक्ती आंतरिक रीतीने युद्धामध्ये लावली होती आणि तेव्हा त्यांना जर्मनीच्या वेगाने चाललेल्या विजयवारूला रोख लागल्याचे दिसून आले आणि युद्धाची लाट ही विरोधी दिशेने वळायला लागली असल्याचे दिसल्यावर त्यांना समाधान लाभले होते.

श्रीअरविंद त्यांची शक्ती त्यांच्या साधकांसाठी, त्यांचे आजारपण दूर करण्यासाठी, किंवा त्यांच्या साधनेमध्ये त्यांना साहाय्य करण्यासाठी बऱ्याच काळापासून उपयोगात आणत असत, हे आम्ही पाहिले आहे. परंतु आध्यात्मिक शक्तीची श्रेणी ही भौतिक अंतरावरून ठरविता येत नाही. श्रीअरविंद यांनी एकदा एका पत्रामध्ये लिहिले होते, ‘निश्चितच, माझी शक्ती ही केवळ आश्रम आणि आश्रमातील परिस्थिती एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. युद्धाची योग्य प्रगती होण्यासाठी आणि मानवी जगतामध्ये बदल घडून येण्यासाठी साहाय्य व्हावे यासाठी ती शक्ती मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जात आहे, हे तुम्हाला माहीत आहे.’ योगसाधनेव्यतिरिक्त आश्रमाच्या कक्षाच्या पलीकडे ती वैयक्तिक कारणासाठीसुद्धा उपयोगात येत असे पण अर्थातच हे सारे कार्य शांतपणे आणि आध्यात्मिक कृतीच्या द्वारे केले जात असे.” (क्रमश:)