(पौर्वात्य देशांचा पाश्चिमात्य आणि पाश्चिमात्य देशांचा पौर्वात्य देशांवर प्रभाव पडत आहे, आणि या साऱ्या घडामोडींच्या माध्यमातून नवीनच काही आकाराला येऊ घातले आहे, ‘प्रकृती’ हे सारे काही घडवून आणत आहे, या विषयी श्रीमाताजी पुढे सांगतात -)

‘प्रकृती’चे मार्ग संथ, अंधकारमय आणि जटिल असतात. आत्म्याच्या माध्यमातून जी गोष्ट अगदी त्वरेने, सुकरतेने आणि काहीही व्यर्थ जाऊ न देता झाली असती, तीच गोष्ट करण्यास ‘प्रकृती’ला मात्र खूप दीर्घ कालावधी लागतो. सध्या या जगामध्ये प्रचंड अपव्यय होताना दिसतो. परंतु या गोष्टी अशाच घडत आहेत. लोकांना परस्परांमध्ये मिसळविण्याचे ‘प्रकृती’चे तिचे तिचे स्वतःचे असे काही मार्ग आहेत.

साधक : हे सारे हेतुपूर्वक केले जात आहे का?

श्रीमाताजी : माणसं ज्याला ‘हेतुपूर्वक’ असे समजतात, तशा तऱ्हेने नाही. परंतु त्या पाठीमागे निश्चितपणे काही ‘प्रयोजन’ आहे, एक ‘उद्दिष्ट’ आहे की ज्या दिशेने ही वाटचाल चालू आहे. इतकेच, की सारे काही चेतनेच्या प्रमाणावर अवलंबून असते. एखाद्या माणसाला हे सारे काही गोंधळाचे वाटू शकते, कारण तो फक्त तपशीलाचा भाग पाहू शकतो, आणि मग त्याला तो काळाचा प्रचंड अपव्यय आहे असे वाटते, कारण त्याची काळाची संकल्पना ही त्याच्या स्वतःच्या व्यक्ती म्हणून असलेल्या कालावधीइतकीच मर्यादित असते.

परंतु ‘प्रकृती’ समोर मात्र शाश्वतता पसरलेली असते. आणि तिच्या दृष्टीने हे वाया घालविणे नसते, कारण ती म्हणजे जणू काही अशा एखाद्या व्यक्तीसारखी आहे की, जिच्यापाशी एक भली मोठी कढई आहे, त्यामध्ये ती साऱ्या गोष्टी ओतत असते, त्याचे मिश्रण बनवीत असते आणि जर ते मिश्रण यशस्वी झाले नाही तर ती ते सारे मिश्रण बाहेर काढून टाकते कारण तिला हे माहीत असते की, त्याच गोष्टींचा वापर करून ती पुन्हा एक नवीन मिश्रण तयार करणार आहे. असे असते हे सारे. येथे काहीही व्यर्थ जात नाही, कारण ते पुन्हा केव्हातरी उपयोगात येणार असते. आकार नष्ट होतात आणि त्यातील द्रव्य पुन्हा हाती घेतले जाते आणि हे सारे असेच सातत्याने चालू राहते. काही घडविले जाते, काही बिघडविले जाते, होत्याचे नव्हते केले जाते – ‘प्रकृती’ला वाटले तर ती हे सारे शेकडो, हजारो वेळा करू शकते, त्याचे तिला काहीच वाटत नाही. कारण यामध्ये काहीच वाया जात नाही, कारण ते सारे तिचेच कार्य असते. कार्य हेच तिचे सुख असते, कार्याशिवाय ती अस्तित्वातच राहू शकली नसती.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 342-343)

‘प्रकृती’ने ही सृष्टी हाती धरलेली आहे, ती पूर्णतः अचेतन असल्यासारखी वाटते परंतु तिच्यामध्ये ‘परम चेतना’ आणि एकमेव ‘सद्वस्तु’ सामावलेली आहे आणि हे सर्व विकसित व्हावे, आत्म-जागृत व्हावे, आणि त्यांनी स्वतःला पूर्ण जाणून घ्यावे यासाठी ती कार्य करत असते. परंतु या गोष्टी ती अगदी सुरुवातीलाच प्रकट करत नाही. ती त्या हळूहळू विकसित करत नेते आणि म्हणूनच प्रारंभी गुप्त असलेली ही बाब शेवटाकडे येता-येता प्रकट होत जाते. आणि मनुष्य आता उत्क्रांतीच्या एका उच्च बिंदूपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्यासमोर प्रकृतीचे हे उपरोक्त रहस्य प्रकट केले जाऊ शकते आणि आजवर जे वरकरणी अचेतनेमध्ये घडले होते तेच आता सचेतनतेने, स्वेच्छेने आणि म्हणूनच कितीतरी अधिक वेगाने आणि साक्षात्काराच्या आनंदामध्ये घडू शकते.

आध्यात्मिक वास्तविकता (Spiritual Reality) मनुष्यामध्ये विकसित केली जात आहे आणि ती आता स्वतःला समग्रपणे आणि मुक्तपणे अभिव्यक्त करणार आहे, हे मनुष्यामध्ये घडताना एखादी व्यक्ती आता आधीच पाहू शकते. यापूर्वी, प्राण्यांमध्ये व वनस्पतींमध्ये, (अशाच प्रकारचे काहीतरी घडत होते) ते दिसण्यासाठी अतिंद्रिय दृष्टी (clairvoyant) असणे आवश्यक होते, मात्र मनुष्य हा त्याच्या स्वतःच्या ठायी असणाऱ्या या आध्यात्मिक वास्तविकतेविषयी जागरूक आहे; किमान मानवी अस्तित्वाच्या उच्चतर भागामध्ये तरी ही जाणीव असते. ‘परमस्रोता’ला आपल्याकडून कशाची अपेक्षा आहे हे मनुष्याला आता कळू लागले आहे आणि ते प्रत्यक्षात उतरावे म्हणून तो आता सहकार्य करू लागला आहे.

सृष्टी म्हणजे वस्तुनिष्ठीकरण (objectivisation) झालेला खुद्द ‘निर्माणकर्ता’च आहे, याविषयी सृष्टीने स्वत:ने जागरूक व्हावे अशी तिच्याकडून ‘प्रकृती’ची अपेक्षा आहे. म्हणजे असे की, ‘निर्माणकर्ता’ आणि ‘निर्मिती’ (The Creator and the Creation) यांच्यामध्ये भेद नाहीच मुळी, आणि त्यामुळे सजग व प्रत्यक्षीभूत झालेले ऐक्य हे उद्दिष्ट आहे. हेच ‘प्रकृती’चे गुपित आहे.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 321-322)

मला असा एक माणूस माहीत आहे की, ज्याला त्याची चेतना व्यापक करायची होती; तो म्हणाला की, त्याला त्यासाठीचा मार्ग सापडला आहे. रात्रीच्या वेळी उघड्यावर जमिनीवर पाठ टेकून आडवे पडायचे आणि चांदण्यांकडे पाहत राहायचे, त्यांच्याशी तादात्म्य पावायचा प्रयत्न करायचा आणि त्या जगड्व्याळ अशा विश्वात खोलखोल दूरवर जायचे. अशा रीतीने ही पृथ्वी, तिच्यावरील छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची व्यवस्था, त्यांचे प्रमाण या सगळ्या गोष्टींबाबतचे भान हरपून जाते आणि तुम्ही आकाशाएवढे विशाल होता – पण तुम्ही ब्रह्मांडाएवढे विशाल होता असे म्हणू शकत नाही कारण आपण जे पाहतो तो त्याचा (ब्रह्मांडाचा) केवळ अंशभागच असतो, परंतु तुम्ही चांदण्यांनी भरलेल्या आकाशाएवढे विशाल होता, असे म्हणू शकता. आणि अशा रीतीने, काही कालावधीसाठी तरी तुमच्यातील छोट्या छोट्या अशुद्धता गळून पडतात आणि व्यक्ती एका अतिविशाल मापदंडाद्वारे गोष्टी समजावून घेते. हा खरोखर चांगला प्रयोग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 151)

निसर्गाचे रहस्य – १४

‘निसर्गा’च्या शक्ती या अंध आणि हिंस्त्र असतात, असे म्हटले जाते. परंतु तसे अजिबातच नसते. माणूस स्वतःची फूटपट्टी ‘निसर्गा’ला लावून, त्याकडे बघत असतो म्हणून त्याला तसे वाटते. थोडं थांबा, आपण एक उदाहरण घेऊया. एखादा भूकंप झाला की, अनेक बेटं पाण्याने वेढून जातात आणि त्यामध्ये लाखो माणसं आपला जीव गमावतात. तेव्हा लोकं म्हणतात, “निसर्ग किती क्रूर आहे!”

मानवाच्या दृष्टिकोनातून पाहता हा निसर्ग क्रूर आहे. निसर्गाने काय केले आहे? त्याने हलकल्लोळ माजवला आहे. पण विचार करा, तुम्ही जेव्हा उड्या मारता, धावत असता किंवा तसेच काही करत असता, तेव्हा कधीतरी तुम्ही पडता-आपटता, तुम्हाला मार बसतो आणि तुमच्या शरीराचा तो भाग काळानिळा पडतो. आपल्या पेशींच्या दृष्टीने तो एक भूकंपच असतो, तुम्ही अगणित पेशी नष्ट केलेल्या असतात. हा प्रमाणाचा प्रश्न आहे. आपल्यासाठी, आपल्या छोट्याशा चेतनेसाठी, अगदी लहान असणाऱ्या आपल्या चेतनेसाठी हे सारे फार महाभयंकर असते पण पृथ्वीच्या दृष्टीने तो केवळ एक लहानसा मुकामार असतो. आपण येथे फक्त पृथ्वीबद्दलच बोलत आहोत. पृथ्वी म्हणजे तरी काय? पृथ्वी म्हणजे काहीच नाही, पृथ्वी म्हणजे विश्वामधील जणू एक छोटेसे खेळणे आहे. आपण जर या विश्वाबद्दल बोलू लागलो तर, जगतांचे नाहीसे होणे हे एखाद्या मुक्यामारासारखेच असते. ते अगदीच किरकोळ असते.

शक्य झाले तर व्यक्तीने स्वत:ची चेतना विशाल केलीच पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 151)

साधक : माताजी, “उत्क्रांत होणाऱ्या ‘प्रकृती’च्या सुरुवातीच्या टप्प्यांवर आपली गाठ तिच्या अचेतनेच्या मुग्ध गोपनीयतेशी (dumb secrecy) पडते.” मला (श्रीअरविंदांच्या ‘दिव्य जीवन’मधील) या विधानाचा अर्थ समजला नाही. ही गोपनीयता म्हणजे काय ते सांगाल का?

श्रीमाताजी : …श्रीअरविंद अगदी सुरुवातीपासून हेच सांगत आहेत की, जडभौतिकाच्या अगदी गाभ्यामध्ये, आतमध्ये खोलवर ‘ईश्वरी उपस्थिती’ (Divine Presence) दडलेली असते. आणि सर्व वस्तुमात्रांच्याच केंद्रस्थानी असलेल्या या ‘ईश्वरी उपस्थिती’कडे म्हणजे तिच्या उगमाकडे सृष्टी परत वळावी, यासाठी तिची तयारी करणे हे समग्र पार्थिव उत्क्रांतीकडून अपेक्षित आहे. आणि हाच ‘प्रकृती’चा मनोदय आहे.

हे विश्व म्हणजे त्या ‘परमेश्वरा’चे वस्तुनिष्ठीकरण (objectivisation) आहे, जणू त्याने स्वतःच स्वतःला न्याहाळता यावे, स्वतःला स्वतःचे जीवन जगता यावे, स्वतःच स्वतःला जाणून घ्यावे या हेतुने, स्वतःला स्वतःपासून वेगळे काढून, वस्तुनिष्ठ रूपात आणले असावे. आणि म्हणून तेथे असे एक अस्तित्व असेल, अशी एक चेतना असेल की जी त्या ‘परमेश्वरा’ला स्वतःचा उगमस्रोत म्हणून ओळखू शकेल आणि संभूतीमध्ये (Becoming) त्याचे आविष्करण घडून यावे म्हणून त्याच्याशी सचेतनपणे एकत्व पावेल. याव्यतिरिक्त या विश्वाचे अन्य कोणतेच प्रयोजन नाही. ही पृथ्वी म्हणजे या वैश्विक जीवनाचे स्फटिकीभवन (crystallization) झालेले एक प्रातिनिधिक रूप आहे, एककेंद्रीकरण झालेली, ती एक छोटी प्रतिकृती आहे; ज्यामुळे, उत्क्रांतीचे कार्य करणे आणि त्याचे अनुसरण करणे सोपे जाण्याची शक्यता आहे. आपण पृथ्वीचा इतिहास समजावून घेतला की, या विश्वाची निर्मिती का झाली असावी, हे आपल्या लक्षात येते. शाश्वत ‘संभूती’मध्ये (eternal Becoming) ‘परमेश्वर’ स्वतःविषयीच अधिकाधिक जागृत होत आहे आणि निर्मितीचे ‘निर्माणकर्त्या’शी ऐक्य व्हावे हे त्यामधील उद्दिष्ट आहे; ‘आविष्करणा’मध्ये घडून येणारे हे ऐक्य सजग, ऐच्छिक आणि मुक्त असणार आहे.

हे ‘प्रकृती’चे गुपित आहे. ‘प्रकृती’ ही कार्यकारी शक्ती आहे, तीच हे सारे कार्य करत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 321)

एखादा भूकंप होतो, किंवा एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा जर त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात माणसं राहत असतील तर या घटनांमुळे त्यांचा मृत्यू होतो, आणि अर्थातच त्यांच्यासाठी ती एक आपत्ती ठरते, ‘निसर्गा’साठी मात्र ती एक गंमत असते. आपण म्हणतो, “काय भयंकर वारा सुटला आहे?” साहजिकच आहे, माणसांसाठी तो “भयंकर” असतो, पण ‘निसर्गा’साठी मात्र तो तसा नसतो. हा प्रमाणाचा प्रश्न असतो, नाही का? एखादी उच्चतर शक्ती आविष्कृत होण्याची इच्छा बाळगत आहे आणि ‘प्रकृती’कडून तिला प्रतिरोध होत आहे, असे घडणे शक्य आहे, पण हे आवश्यक मात्र नाही.

ही गोष्ट अगदी सहज समजण्यासारखी आहे की, महाकाय शक्तींबरोबर ‘प्रकृती’चा चाललेला हा खेळ असतो आणि तिच्यासाठी ती केवळ एक लीला असते; तिच्या दृष्टीने त्यात कोणत्याही प्रकारे आपत्तीजनक असे काहीही नसते. ‘प्रकृती’-चेतनेच्या किंवा जडभौतिक चेतनेच्या दृष्टीने, पृथ्वीवरील भौतिक आकार आणि मानवजात या गोष्टी म्हणजे जणू काही मुंग्यांसारख्याच असतात. तुम्ही स्वतःदेखील जेव्हा चालत असता तेव्हा, तुम्ही तुमच्या पायाखाली मुंग्या चिरडू नयेत म्हणून तुमचा मार्ग बदलणे आवश्यक समजत नाही. (अर्थात तुम्ही कट्टर ‘अहिंसक’ असलात तर बाब निराळी!) तुम्ही चालत असता आणि तुमच्या पायांखाली शेकडो मुंग्या आल्या तरी काही इलाज नसतो. ‘प्रकृती’चेही अगदी असेच असते. ती वाटचाल करत असते आणि तिच्या त्या वाटचालीत तिच्या पायदळी तिने हजारो माणसं जरी नष्ट केली तरी ती बाब तिच्यासाठी इतकी महत्त्वाची नसते कारण ती अशी लाखो माणसे पुन्हा निर्माण करू शकते. तिच्यासाठी ते अवघड नसते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 175)

पृथ्वी ही जडभौतिक विश्वाचे केंद्र आहे. ज्या शक्तीद्वारे ‘जडभौतिका’चे रूपांतरण घडून येणार आहे त्या शक्तीच्या एककेंद्रीकरणासाठी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. ‘जडभौतिका’मधील ईश्वरी क्षमतेचे ती प्रतीक आहे. …‘ईश्वरी चेतने’च्या थेट हस्तक्षेपामुळे या पृथ्वीची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे फक्त या पृथ्वीवरच ‘ईश्वरा’शी थेट संपर्क होऊ शकतो आणि तसा तो होतो देखील. पृथ्वी दिव्य प्रकाश शोषून घेते, विकसित करते आणि त्याचा किरणोत्सर्ग करते. हा किरणोत्सर्ग स्थलाच्या कक्षा ओलांडून पलीकडे जातो आणि जेथे जेथे ‘जडभौतिकता’ आहे तेथे तेथे तो पसरतो. ‘ईश्वरी चेतने’ची सुसंवादिता आणि प्रकाशाची जी देणगी पृथ्वी घेऊन येते ती देणगी, हे जडभौतिक विश्व काही प्रमाणात वाटून घेते. परंतु त्या चेतनेचे परिपूर्ण आणि अंतिम विकसन हे या ‘पृथ्वी’वरच शक्य असते. चैत्य पुरुष (Psychic being) हा फक्त या पृथ्वीवरच आढळून येतो, कारण तो पृथ्वीचीच निर्मिती आहे. तो ‘जडभौतिका’ ला झालेला ‘ईश्वरी’ स्पर्श आहे. चैत्य पुरुष हा ‘पृथ्वी’ चे अपत्य असते; तो या ‘पृथ्वी’वरच जन्माला येतो आणि येथेच विकसित होतो. तो ‘पृथ्वी’खेरीज अन्य कोणत्याच ठिकाणचा रहिवासी नाही.

– श्रीअरविंद
(The Yoga of Sri Aurobindo : Part 06 by Nolini Kant Gupta : 23)

ज्यांना स्वतःचे शुद्धीकरण करून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पाऊस असतो. तो तुमच्यातील सारे दोष, साऱ्या त्रुटी आणि साऱ्या अशुद्धता दूर करतो. पावसामध्ये पृथ्वीचे, पृथ्वीवर जीवन जगणाऱ्या माणसांचे आणि पृथ्वीवरील वातावरणाचे शुद्धीकरण करण्याची शक्ती असते.

परंतु त्यासाठी व्यक्तीने स्वतःला खुले ठेवले पाहिजे, तिच्या मनात किंचितही भीती असता उपयोगी नाही; ताप येईल किंवा आपण आजारी पडू अशी कोणतीही भीती असता कामा नये. आपल्या वर असणाऱ्या त्या ‘विशालते’प्रत आपण स्वतःला खुले ठेवले आणि पावसाला आपले शुद्धीकरण करू दिले, तर त्याचे ठोस परिणाम दिसून येतात.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 197)

प्रेमाची स्पंदने ही फक्त मनुष्यप्राण्यापुरतीच मर्यादित नसतात; मनुष्यप्राण्याच्या तुलनेत इतर जगतांमध्ये ही स्पंदने कमी दूषित असतात. झाडांकडे व फुलांकडे पाहा. जेव्हा सूर्य मावळतो आणि सारे काही शांत होते, अशावेळी थोडा वेळ शांत बसा आणि ‘निसर्गा’शी एकत्व पावण्याचा प्रयत्न करा. या पृथ्वीपासून, झाडांच्या अगदी मुळापासून, त्याच्या तंतूतंतूंमधून वरवर जाणारी, अगदी सर्वाधिक उंच अशा बाहू फैलावलेल्या शाखांपर्यंत पोहोचलेल्या उत्कट प्रेमाची, उत्कट इच्छेची अभीप्सा तुम्हाला संवेदित होईल. प्रकाश आणि आनंद घेऊन येणाऱ्या अशा कशाची तरी ती आस असते, कारण तेव्हा प्रकाश मावळलेला असतो आणि त्यांना तो पुन्हा हवा असतो. ही आस, ही उत्कंठा इतकी शुद्ध आणि तीव्र असते की, झाडांमधील ही स्पंदने जर तुम्हाला जाणवू शकली तर तुमच्यामध्ये देखील, येथे आजवर अभिव्यक्त न झालेल्या शांती, प्रकाश, प्रेम यांविषयीची उत्कट प्रार्थना उदयाला येत आहे आणि वर वर जात आहे असे तुम्हाला जाणवेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 72)

….‘निसर्गा’मध्ये स्वतःला पूर्णतः कसे झोकून द्यायचे हे जर एखाद्याला माहीत असेल, आणि तो जर ‘निसर्गा’च्या कार्याला विरोध करत नसेल, तर तो कधीच आजारी पडणार नाही. ‘निसर्गा’ची स्वतःची अशी काही साधने असतात आणि व्यक्तीने भीतीपोटी किंवा संकोचापोटी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर, निसर्ग तुम्हाला आश्चर्यकारकरित्या त्वरेने बरे करतो. ‘निसर्गा’च्या तालाशी ताल जुळवून कसे जगायचे हे व्यक्तीला समजले तर तो ‘निसर्ग’च तुम्हाला सर्व संकटांतून काळजीपूर्वकपणे बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितो. ‘निसर्गा’च्या प्रवाहाबरोबर वाटचाल कशी करायची ते व्यक्तीने स्वतः शिकले पाहिजे – मग त्या लाटाच तुम्हाला अगदी हळूवारपणे तुमच्या अंतिम गंतव्यापर्यंत घेऊन जातात.

…स्वतःला झोकून देणे, ‘प्रकृती’च्या हाती स्वतःला सोपविणे, तिच्या लाटेवर प्रवाहित होणे… (असे करता आले तर) अडीअडचणी आणि धोके पूर्णतः नाहीसे होतात. जणू काही व्यक्ती स्वतःला मोकळे सोडते – पूर्णतः खुले करते – जणू काही व्यक्ती त्यावर तरंगत राहते… मग अशा या स्थितीमध्ये, पाण्याच्या तळाशी असलेल्या काळोखाकडे न पाहता, आकाशाकडे पाहत, प्रकाशाकडे पाहत, व्यक्तीने मार्गदर्शन मिळावे म्हणून स्वतःला ‘प्रकृती’च्या हाती सोपवले तर… व्यक्ती जेव्हा अशा रीतीने वागेल, तेव्हा तिला कोणतीही वेदना स्पर्श करू शकणार नाही.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 139)