पृथ्वीवर जडद्रव्याची जी विशिष्ट परिस्थिती होती त्यामुळे ‘मृत्यू’ अपरिहार्य झाला. अचेतनतेच्या (unconsciousness) प्राथमिक पायरीपासून उत्तरोत्तर चेतनेकडे विकसित होत जाणे हाच जडतत्त्वाच्या उत्क्रांतीचा अर्थ आहे. आणि जेव्हा ही विकासाची प्रक्रिया प्रत्यक्ष घडू लागली तेव्हा या प्रक्रियेत, आकारबंधांचा विलय, विघटन ही एक अटळ अशी आवश्यकता ठरली. सुसंघटित व्यक्ति-चेतनेला एक स्थिर असा आधार मिळावा म्हणून एका निश्चित बांधीव आकाराची गरज होती. आणि असे असूनसुद्धा या आकारबंधाच्या स्थिरतेमुळेच मृत्यू अटळ बनला. जडद्रव्य आकारबद्ध होणेच भाग होते; अन्यथा वैयक्तिकीकरण (पृथकीकरण) (individualisation) होणे आणि प्राणशक्तीला वा चेतनाशक्तीला सघन असे मूर्तरूप येणे अशक्य होते. आणि त्यांच्याविना पार्थिव, जडतत्त्वाच्या पातळीवर पुढे सुसंघटित अस्तित्व निर्माण होण्यास आवश्यक अशा पायाभूत परिस्थितीची उणीव भासली असती. पण निश्चित, घनीभूत अशी घडण होताच एकाएकी त्याच्या ठिकाणी अलवचिकता, कठीणता आणि पाषाणवतता येण्याची प्रवृत्ती आढळून आली. हा पृथक आकारबंध अतिशय बंधनकारक असा साचा बनला; तो शक्तींच्या गतीचे अनुसरण करू शकत नाही; या वैश्विक गतिमानतेशी सुमेळ राखत तो स्वत:मध्ये क्रमश: बदल घडवू शकत नाही; तो प्रकृतीच्या अपेक्षा अखंडपणे भागवू शकत नाही किंवा तिची गती देखील पकडू शकत नाही; तो प्रवाहाबाहेर फेकला जातो. मात्र एका विशिष्ट क्षणी, आकारबंध आणि त्याला चालना देणारी शक्ति या दोहोंमधील वरील प्रकारच्या वाढत्या असमानतेमुळे व विसंवादामुळे त्या आकारबंधाचे संपूर्णत: विलयन, विघटन अटळ होऊन बसते. एक नवीन आकारबंध निर्माण करावयास हवा ज्यामुळे एक नवीन (आकारबंध व त्याला चालना देणारी शक्ती यांमध्ये) सुमेळ आणि समानता शक्य होईल.

हा आहे मृत्युचा खरा अर्थ आणि ही आहे मृत्यूची प्रकृतीमधील उपयुक्तता! पण हा आकारबंध जर का अधिक वेगवान व अधिक लवचिक झाला आणि बदलत्या चेतनेनुरुप स्वत:मध्ये बदल घडविण्याविषयी शरीरातील पेशींना जागृत करता आले तर मूलगामी विघटनाची गरजच उरणार नाही, आणि मृत्यू ही अटळ गोष्ट राहणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मानवी अस्तित्वाचे वास्तविक सत्य कोणते? सर्वोच्च ध्येय कोणते ? विश्वाच्या या महान चक्रांमध्ये युगानुयुगे माणसाचा जन्म आणि मृत्यू पुन्हापुन्हा होत राहतो ती म्हणजे एक प्रदीर्घ प्रगती असते; या प्रगतीद्वारे तो स्वतःची तयारी करत असतो आणि अमर्त्यत्वासाठी स्वतःला सुयोग्य बनवत असतो. आणि तो स्वतःला कशा प्रकारे तयार करेल? त्यासाठी योग्य माणूस कोण? मी म्हणजे प्राण आहे आणि मी म्हणजे शरीर आहे या संकल्पनेच्या जो अतीत झाला आहे; जो या जगाचे भौतिक आणि संवेदनात्मक स्पर्श त्यांच्या त्यांच्या मूल्यानुसार स्वीकारत नाही किंवा भौतिक मनुष्याला (Physical man) ते स्पर्श ज्या मोलाचे वाटतात त्या मोलाने जो हे स्पर्श स्वीकारत नाही; जो मी स्वतः आत्मा आहे आणि सर्वजण देखील आत्मे आहेत हे जाणतो, जो स्वतः स्वतःच्या शरीरामध्ये नाही तर, आत्म्यामध्ये राहायला शिकलेला आहे आणि इतरांशी व्यवहार करत असतानादेखील जो त्यांच्याशी भौतिक अस्तित्व म्हणून केवळ व्यवहार करत नाही तर, इतरांबरोबर देखील जो आत्मवत व्यवहार करतो, तो मनुष्य अमर्त्यत्वासाठी योग्य असतो. मृत्युचे अस्तित्व नसणे म्हणजे अमर्त्यत्व असा त्याचा अर्थ नाही. — ज्याला जन्मतः मन मिळालेले आहे अशा प्रत्येक प्राणिमात्राला ही गोष्ट आधीच मिळालेली असते, — परंतु अमर्त्यत्व म्हणजे जन्म आणि मृत्युच्या अतीत असणे. अमर्त्यत्व हे असे एक आरोहण असते की, ज्या आरोहणामुळे मनुष्य, मनो-मार्गदर्शित शरीर (mind-informed body) म्हणून जगणे सोडून देतो आणि अंततः आत्मा म्हणून, परम आत्म्याच्या ठिकाणी जीवन जगतो.

जो कोणी दुःख आणि शोकाच्या अधीन असतो, संवेदना आणि भावना यांचा गुलाम असतो, क्षणभंगुर गोष्टींच्या स्पर्शाने व्याप्त असतो असा कोणीही अमर्त्यत्वासाठी सुयोग्य बनू शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 61-62)

गेले काही दिवस आपण अमर्त्यत्व, शरीराचे रूपांतरण, अतिमानस यासंबंधीचे तत्त्वज्ञान समजावून घेतले. आपण पाहिले की, अतिमानसिक देहाच्या चार वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे दीप्तिमानता (luminosity). अशा देहाचे विवेचन करताना श्रीमाताजींनी म्हटले आहे की, ”अंततः तो देह दीप्तिमान होऊन जाईल, त्याच्या प्रत्येक पेशीमधून अतिमानसिक उज्ज्वलता प्रस्फुरित होत राहील. सूक्ष्म दृष्टी खुली होण्याइतपत ज्यांचा विकास झाला आहे केवळ अशा व्यक्तींनाच नव्हे; तर अगदी सामान्य माणसालादेखील ही प्रभा जाणवेल. अगदी हरएक व्यक्तीसाठी ती गोष्ट उघड सत्य असेल, अगदी शंकेखोर माणसाची सुद्धा ज्यामुळे खात्री पटेल असा तो रूपांतरणाचा स्थायी पुरावा असेल.”

तत्त्वज्ञान स्वरूपातील हे विधान, श्रीअरविंदांनी देह ठेवला तेव्हा मूर्त झालेले आपणास आढळते. ‘रूपांतरणाचा स्थायी पुरावा’ असे त्याचे वर्णन करता येईल. आयुष्यभर ज्या कारणार्थ देह झिजवला, किंबहुना देहधारणाच ज्या कारणार्थ घडली, ज्या कारणार्थ अवतार घेतला त्या अतिमानसिक प्रकाशाचे अवतरण स्वतःच्या देहामध्ये करून, तो देह श्रीअरविंदांनी या पृथ्वी-चेतनेच्या रूपांतरणासाठी विसर्जित केला.

“दिव्य चेतना प्राप्त करून घेणे आणि दिव्यत्वामध्ये जीवन जगणे म्हणजे स्वयमेव अमर्त्यत्व आणि शरीरसुद्धा दिव्य बनविणे आणि ते ईश्वरी कार्यासाठीचे व दिव्य जीवनासाठीचे सुयोग्य साधन बनविणे, ही त्याची (अमर्त्यत्वाची) भौतिक अभिव्यक्ती असेल” – असे श्रीअरविंदांचे सांगणे आहे. हे केवळ सांगणे नाही, हे केवळ पोकळ तत्त्वज्ञान नाही तर त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीअरविंद!

शंकेखोर मनाला याची खात्री कशी पटावी? श्रीअरविंदांनी दि.०५ डिसेंबर १९५० रोजी रात्री ०१ वाजून २६ मिनिटांनी देह ठेवला आणि नंतर दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी सायंकाळी ०५ वाजता म्हणजे सुमारे शंभर तासांनी त्यांना समाधीस्थ करण्यात आले. या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांच्या देहामध्ये विघटनाच्या कोणत्याही खाणाखुणा दिसत नव्हत्या, विघटनाचा लवलेशदेखील आढळून येत नव्हता.

“श्रीअरविंदांच्या देहामध्ये अतिमानसिक प्रकाशाचे संघनीकरण झालेले आहे, आणि म्हणून जोवर त्यामध्ये विघटनाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत तोवर तो देह तसाच ठेवण्यात येईल”, अशी घोषणा श्रीमाताजींनी केली होती.

पाँडिचेरी हा भारताचा पूर्व किनारा, उष्णकटिबंधीय प्रांत, आणि अशा प्रांतांमध्ये कोणत्याही बाह्य अथवा कृत्रिम उपायांचा अवलंब न करता, एखाद्याने देह ठेवल्यानंतर त्या देहाचे विघटन न होता तो टिकून राहणे, हेच शास्त्रज्ञांसाठी आणि डॉक्टरांसाठी देखील थक्क करणारे असे आश्चर्य होते. आणि त्याची नोंद त्यावेळच्या डॉक्टरांनी, प्रशासकांनी, वृत्तपत्रांनीसुद्धा घेतली होती. ‘प्रचंड भौतिकतावादाच्या या युगात आत्माच्या वर्चस्वाचे अविनाशी साक्षीदार’ अशा शब्दात सुविख्यात ‘हिंदु’ या वृत्तपत्राने या घटनेची नोंद घेतली होती. शंकेखोर व्यक्तींना, बुद्धिवाद्यांना मिळालेला हा एक भक्कम पुरावा होता.

देहाचे विघटन तर नाहीच, उलट शांतपणे ध्यानस्थ पहुडलेल्या देहाला व्यापून असणारा निळसर, सोनेरी दीप्तिमानतेचा अनुभव तेथील उपस्थितांना येत होता, त्याची वर्णने प्रत्यक्षदर्शींनी लिहून ठेवली आहेत. श्रीअरविंदांनी देह ठेवल्यानंतर आश्रमाच्या छायाचित्रकाराने काढलेले त्यांचे छायाचित्र आजही त्याची साक्ष देत आहे. (आजच्या post सोबत ते छायाचित्र दिले आहे आणि ते बघितल्यावर कोणालाही वाटावे की, जणूकाही श्रीअरविंद झोपलेले असताना कोणीतरी त्यांचे छायाचित्र घेतले आहे की काय?)

श्रीअरविंदानी देह ठेवण्यापूर्वी एक वर्ष आधी, अतिमानस अवतरणाच्या त्यांच्या जीवितकार्याबद्दल, श्रीमाताजी आणि त्यांची चर्चा झाली होती. तेव्हा या कार्यासाठी आवश्यकता भासल्यास आपले बलिदान देण्याची तयारी श्रीमाताजींनी दर्शविली होती, परंतु श्रीअरविंदांनी त्यांना सांगितले होते, “जर तशीच आवश्यकता भासली तर ते बलिदान मी करेन, तुम्ही अतिमानस अवतरणाचे आणि रूपांतरणाचे आपले कार्य चालू ठेवा.” आणि खरोखरच श्रीअरविंदांनी पुढे देह ठेवला आणि श्रीमाताजी त्यानंतर २३ वर्षे श्रीअरविंदप्रणित अतिमानस अवतरणाचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत करत राहिल्या. श्रीमाताजींचे प्राणोत्क्रमण हा देखील श्रीअरविंदांप्रमाणेच, मानवाच्या अमर्त्यत्वाच्या वाटचालीमधील महत्त्वपूर्ण टप्पा मानावा लागेल असाच आहे.

श्रीअरविंदांनी देह ठेवला ही वैश्विक परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती नव्हती किंवा मोक्षादी स्वार्थासाठी परलोकामध्ये निघून जाणेदेखील नव्हते, तर ते एक वीरमरण होते. पृथ्वीची जडभौतिक चेतना आणि अतिमानसिक चेतना यांमधील ते युद्ध होते. आज या पृथ्वीचेतनेमध्ये शरीर, प्राण आणि मन जसे स्थायी आहेत तशी अतिमानसिक चेतना या पृथ्वीचेतनेमध्ये स्थायी करायची तर त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचा निर्धार करून, प्राणपणाने दिलेली ती झुंज होती. पृथ्वी-चेतनेच्या उत्थानासाठी केलेला तो दिव्य त्याग होता.

या दिव्य त्यागाचे वर्णन करताना श्रीमाताजी म्हणतात, “ज्यांनी आमच्या साठी इतके काही केले, ज्यांनी कार्य केले, ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी दु:खभोग सहन केले, ज्यांनी आशा बाळगली, ज्यांनी खूप चिकाटी बाळगली; ज्यांनी सर्वासाठी संकल्प केला, सर्वासाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्यांनी आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले; त्यांच्याप्रत आमची अनंत कृतज्ञता! त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की, आम्हाला त्यांचे कधीही विस्मरण होऊ नये; अगदी एक क्षणदेखील आपण हे विसरू नये की, आपण सारे त्यांचे ऋणी आहोत.” श्रीअरविंदांच्या समाधीवर कोरलेली ही वाक्यं आपल्याला त्यांच्या कार्याची सतत आठवण करून देत राहतात.

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

अतिमानसिक देह

जे अतिमानसिक शरीर येथे अस्तित्वात आणायचे आहे त्या शरीराची हलकेपणा (lightness), अनुकूलनशीलता (adaptability), विकासानुगामित्व (plasticity) आणि प्रकाशमानता (luminosity), ही चार गुणवैशिष्ट्ये असतील.

जेव्हा शरीर हे सर्वांगांने दिव्य होईल तेव्हा जणू काही असे वाटेल की, ते हवेमधून चालत आहे, त्यामध्ये कोणतेही जडत्व किंवा तमस किंवा अचेतनता असणार नाही.

त्याच्या अनुकूलनशीलतेच्या शक्तीला कोणतीच मर्यादा असणार नाही. त्याला ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये ठेवण्यात येईल, ती परिस्थिती त्याच्याकडून जी मागणी करेल त्या मागणीशी ते लगेचच स्वतःला अनुकूल करून घेईल; नेहमी जसे आत्म्याला जडत्व (जडभौतिक शरीर) हे लोढणे म्हणून वागवावे लागते तसे आता करावे लागणार नाही; कारण त्या शरीरातील पूर्ण चैतन्य हे जडत्व आणि अक्षमता या गोष्टींना पूर्ण हद्दपार करेल.

शरीरावर आघात करू पाहणाऱ्या प्रत्येक विरोधी शक्तीच्या हल्ल्याचा सामना करण्यास अतिमानसिक विकासानुगामित्व त्या शरीरास सक्षम बनविते. शरीर त्या हल्ल्याचा प्रतिकार दुबळेपणाने करणार नाही; उलट, ते शरीर एवढे लवचिक, लवलवीत असेल की विरोधी शक्तीला निघून जाण्यासाठी वाट मोकळी करून देऊन, ते त्या शक्तीलाच शून्यवत करून टाकेल. त्यामुळे त्याला कोणतेही हानीकारक परिणाम सहन करावे लागणार नाहीत आणि अगदी प्राणघातक हल्लेदेखील त्याला कोणतीही हानी न पोहोचवता निघून जातील.

आणि अंततः ते शरीर दीप्तिमान होऊन जाईल, त्याच्या प्रत्येक पेशीमधून अतिमानसिक उज्ज्वलता प्रस्फुरित होत राहील. सूक्ष्म दृष्टी खुली होण्याइतपत ज्यांचा विकास झाला आहे केवळ अशा व्यक्तींनाच नव्हे; तर अगदी सामान्य माणसालादेखील ही प्रभा जाणवेल. अगदी हरएक व्यक्तीसाठी ती गोष्ट उघड सत्य असेल, अगदी शंकेखोर माणसाची सुद्धा ज्यामुळे खात्री पटेल असा तो रूपांतरणाचा स्थायी पुरावा असेल.

देहाचे रूपांतरण हा सर्वोच्च आध्यात्मिक पुनर्जन्म असेल – हे रूपांतर म्हणजे सामान्य गतकाळ पूर्णतया नाहीसा होणे असेल. कारण सातत्याने आपले आधीचे सहसंबंध आणि आधीची परिस्थिती झुगारून देत, प्रत्येक नव्या क्षणी जणू नव्यानेच जीवन सुरू केल्याप्रमाणे वाटचाल करत राहणे म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म होय. आपल्या गतकाळातील कृतींचा जो प्रवाह असतो, ज्याला ‘कर्म’ असे म्हटले जाते, त्यापासून मुक्त होणे म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म होय; वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, प्रकृतीच्या कार्य आणि कारणाची जी सामान्य गतिविधी असते त्या बंधनापासून सुटका, मुक्तता म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म होय. जाणिवेमधून हे भूतकाळाचे बंध जेव्हा अगदी यशस्वीरीत्या तोडून टाकले जातात तेव्हा, त्या सगळ्या चुका, सगळे गुन्हे, सगळे दोष आणि मूर्खपणाच्या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या स्मरणामध्ये अजूनही जाग्या असतात, रक्त शोषणाऱ्या जळवांप्रमाणे ज्या आपल्याला चिकटून बसलेल्या असतात, त्या सगळ्या गोष्टी गळून पडतात आणि आपण अत्यंत आनंददायीरीत्या मुक्त व्हावे म्हणून त्या आपल्याला सोडून जातात. हे स्वातंत्र्य ही काही केवळ विचारगम्य गोष्ट नाही; तर ते अतिशय सघन, व्यावहारिक आणि भौतिक असे वास्तव आहे. आपण खरोखरच मुक्त असतो, आपल्याला कोणतीच गोष्ट बंधनात पाडू शकत नाही, कोणतीच गोष्ट आपल्यावर परिणाम करू शकत नाही, जबाबदारीच्या जाणिवेने आपण ग्रस्त नसतो. आपल्याला आपल्या भूतकाळाच्या अतीत व्हायचे असेल, आपल्याला तो पुसून टाकायचा असेल किंवा त्याचा प्रतिकार करायचा असेल तर, केवळ पश्चात्ताप किंवा तत्सम गोष्टींद्वारे तसे करता येणार नाही. अशा प्रकारचा अरूपांतरित भूतकाळ कधी अस्तित्वात होता हेच आपण विसरून गेले पाहिजे आणि आपल्याला जखडून ठेवणाऱ्या बंधनांना तोडणाऱ्या चेतनेच्या प्रदीप्त अवस्थेमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. आध्यात्मिक पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे जेथे आपण ईश्वराशी एकत्व पावलेले असतो आणि कर्माच्या प्रतिक्रियांपासून शाश्वतपणे मुक्त असतो अशा चैत्य जाणिवेमध्ये आपण प्रथम प्रवेश केला पाहिजे. चैत्य पुरुषाविषयी (Psychic being) जाग आल्याखेरीज हे करता येणे शक्य नाही; परंतु जो आत्मा सदासर्वदा ईश्वराप्रत समर्पित झालेला असतो, त्या आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याविषयी आपण एकदा का निःशंकपणे जागृत झालो की, सर्व बंधने नाहीशी होतात. मग मात्र भूतकाळ आपल्याला जखडून ठेवत नाही आणि जीवन नित्य नवीन स्वरुपात पुन्हा एकदा सुरू होते. आध्यात्मिक पुनर्जन्माच्या अंतिम उच्चावस्थेची तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगते की, अखिल विश्व प्रत्यक्षात प्रत्येक क्षणाला नाहीसे होत असते आणि प्रत्येक क्षणाला ते नव्याने निर्माण होत असते, असा सदोदित अनुभव येऊ शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 175-177)

अतिमानस आणि अमर्त्यत्व

अतिमानसिकीकरणाचे (supramentalisation) जे सर्व संभाव्य परिणाम आहेत त्यांपैकी एक परिणाम म्हणजे अमर्त्यत्व, परंतु हा काही अनिवार्य असा परिणाम नाही आणि जीवन आत्ता जसे आहे तसेच ते अगणित काळ चालू राहील किंवा ते शाश्वत टिकून राहील, असा याचा अर्थ नाही. अनेक जण असा विचार करतात की, ते त्यांच्या साऱ्या मानवी इच्छावासनांसहित आत्ता ते जसे आहेत तसेच कायम राहतील आणि एकच फरक असेल तो म्हणजे ते त्या वासना अनंत काळपर्यंत तृप्त करत राहतील. परंतु असे अमर्त्यत्व प्राप्त करून घेण्याच्या योग्यतेचे नाही… दिव्य चेतना प्राप्त करून घेणे आणि दिव्यत्वामध्ये जीवन जगणे, हे स्वयमेव अमर्त्यत्व आहे आणि शरीरसुद्धा दिव्य बनविणे आणि ते ईश्वरी कार्यासाठीचे व दिव्य जीवनासाठीचे सुयोग्य असे साधन बनविणे, ही त्याची फक्त भौतिक अभिव्यक्ती असेल.

*

शारीर-मनाच्या (Physical mind) चेतनेला सुधारित अतिमानसिक प्रकाशाचा (Supramental Light) स्पर्श झाला तरी किंवा जडामध्ये किंवा अगदी शारीर-मनामध्ये अधिमानसाचे (Overmind) अवतरण झाले तरी, त्या अवतरणाबरोबर शरीराचे अमर्त्यत्व येत नाही तर, शरीरामध्ये अमर्त्यत्वाची चेतना येऊ शकते. या अगदी प्रारंभिक खुलेपणाच्या गोष्टी आहेत, पण त्या म्हणजे काही ‘जडा’मधील अतिमानसिक परिपूर्ती नव्हेत.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 314 & 275)

शारीरिक परिवर्तन

…तुमच्या शरीराची घडण कशी झाली? सर्व अवयव, सर्व कार्ये यांची घडण ही अगदी प्राण्यांच्या पद्धतीने झाली. तुम्ही पूर्णतः अवलंबून असता : तुमचे हृदय सेकंदाच्या हजाराव्या भागाइतका वेळ जरी बंद पडले तरी सगळे संपते, तुम्ही मरण पावता. सर्व गोष्टी चालू असतात आणि त्या आपोआप चालू असतात, तुमच्या जागृत इच्छेविना चालू असतात (आणि ते चांगलेच आहे, कारण जर तुम्हाला या साऱ्या कारभारावर देखरेख करावी लागली असती तर, तो सारा कारभार केव्हाच चुकीच्या दिशेने गेला असता.) तेव्हा सारे काही चालू असते. प्रत्येक गोष्ट आवश्यक असते कारण प्रत्येक गोष्ट त्याच पद्धतीने सुनियोजित करण्यात आली आहे. इंद्रियाशिवाय तुम्ही कार्य करू शकत नाही, निदान पूर्णतः तरी करू शकत नाही; त्याचे प्रतिनिधित्व करणारे असे तुमच्यामध्ये काहीतरी असावे लागते.

रूपांतरामध्ये हे अध्याहृत आहे की, या सगळ्या पूर्णत: शारीरिक व्यवस्थेची जागा ही ठरावीक प्रकारच्या विविध स्पंदनांनी युक्त अशा शक्तिसंचयाच्या व्यवस्थेने घेतली जाईल; प्रत्येक इंद्रिय-अवयवाची जागा, जागृत इच्छाशक्तिद्वारे संचालित होणाऱ्या आणि उच्चतर प्रांतामधून, वरून येणाऱ्या प्रक्रियेने जिला दिशा मिळत असते अशा एका जागृत शक्तिकेंद्राने घेतली जाईल. तेव्हा मग पोट, हृदय या गोष्टीच असणार नाहीत, रक्ताभिसरण नाही, फुफ्फुसे नाहीत… या साऱ्या गोष्टी नाहीशा होतील. हे सर्व इंद्रिय-अवयव ज्याचे प्रतीक असतात त्या गोष्टींचे प्रतिनिधित्व या स्पंदनांच्या पूर्ण संचाद्वारे केले जाईल आणि हे संच त्या अवयवांची जागा घेतील. कारण हे इंद्रिय-अवयव म्हणजे शक्तिकेंद्रांची केवळ भौतिक प्रतीके असतात; त्यांना मूलभूत अशी वास्तविकता नसते; तर या गोष्टी विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या शक्तिकेंद्रांना एक विशिष्ट रूप किंवा एक आधार पुरवितात. तेव्हा मग हे रूपांतरित शरीर या खऱ्या शक्तिकेंद्रांमार्फत कार्य करू लागेल. त्यामुळे, प्राण्यांच्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे इंद्रिय-अवयव हे शक्तिकेंद्रांची प्रतीके म्हणून विकसित झाले होते, त्या प्रतीकात्मक प्रतिनिधींच्या मार्फत कार्य करण्याची गरज रूपांतरित शरीराला आता उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 58-59)

अमर्त्यत्व समजून घेताना

अमर्त्यत्व या शब्दाबद्दल काही गैरसमज आहेत आणि हे समज काही नवीन नाहीत; हे गैरसमज वारंवार होताना आढळतात. अमर्त्यत्वाविषयी जेव्हा कोणी बोलतो तेव्हा बहुतेक सगळ्यांना शरीराचे अस्तित्व अनंत काळ टिकून राहणार असे वाटते.

पहिली गोष्ट म्हणजे, शरीर अनंत काळपर्यंत तेव्हाच टिकून राहू शकते जेव्हा, त्याला त्याच्या अमर्त्य आत्म्याविषयी पूर्ण जाणीव होते आणि ते त्या आत्म्याशी एकत्व पावते, शरीर त्याच्याशी इतके तादात्म्य पावते की, शरीरालासुद्धा आत्म्यासमान क्षमता प्राप्त होते, सातत्यपूर्ण रूपांतरणाचे तसेच गुण प्राप्त होतात ज्यामुळे शरीरसुद्धा वैश्विक गतिविधीचे अनुसरण करण्याइतपत सक्षम होते. शरीर जर टिकून राहायचे असेल तर त्यासाठी ही अगदी पूर्णपणे अनिवार्य अशी गोष्ट आहे. कारण शरीर हे कठीण (rigid) असते, कारण ते गतिविधींचे अनुसरण करत नाही, वैश्विक उत्क्रांतीशी सातत्याने तादात्म्य पावण्यासाठी स्वतःमध्ये जे त्वरेने रूपांतरण घडवून आणले पाहिजे तसे ते करू शकत नाही, त्याचे विघटन होते आणि ते नष्ट होते. त्याचा अडेलतट्टूपणा, त्याचे काठिण्य, त्याची स्वतःचे रूपांतरण करण्याची अक्षमता या गोष्टींमुळेच त्याचा विनाश आवश्यक होऊन बसतो, त्यामुळे त्याचे मूलद्रव्य (substance) हे भौतिक मूलद्रव्यांच्या सर्वसाधारण प्रांतामध्ये परत जाऊन मिसळू शकते; ज्यामुळे त्या शरीराची पुन्हा नव्या रूपांमध्ये पुनर्घडण होऊ शकते आणि अशा प्रकारे ते पुढील प्रगती करायला सक्षम होते. पण सहसा, जेव्हा कोणी अमर्त्यत्वाविषयी बोलतो, तेव्हा माणसं शारीरिक अमर्त्यत्वाचाच विचार करतात – ते अजूनपर्यंत साध्य झालेले नाही, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

शारीरिक अमर्त्यत्व शक्य आहे असे श्रीअरविंद सांगतात आणि ते असेही सांगतात की, असे अमर्त्यत्व घडून येईल; परंतु ते त्यासाठी एक अट घालतात, ती अशी की, त्यासाठी शरीराचे अतिमानसिकीकरण (supramentalised) झाले पाहिजे, त्याच्यामध्ये अतिमानसिक जिवाचे काही गुण तरी असले पाहिजेत, विकासानुगामित्व (plasticity) आणि सातत्यपूर्ण रूपांतर हे ते गुण आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 28-29)

आसक्ती आणि अमर्त्यत्व

देहाविषयी आसक्ती असेल तर, अमर्त्यत्व येऊ शकणार नाही, म्हणून आपल्या अस्तित्वातील जो भाग देहाबरोबर तादात्म्य पावलेला नाही केवळ अशा अमर्त्य भागामध्ये जीवन जगण्यामुळेच आणि पेशींमध्ये त्याची चेतना आणि शक्ती उतरविल्यामुळेच हे अमर्त्यत्व प्राप्त होऊ शकेल. अर्थातच मी योगिक साधनांविषयी बोलतो आहे. आता शास्त्रज्ञ असे मानतात की, (किमान सैद्धांतिकरित्या तरी) मृत्युवर मात करता येईल अशी भौतिक साधने शोधणे शक्य आहे, पण त्यामुळे केवळ वर्तमान शरीराच्या सद्यकालीन चेतनेची कालमर्यादा वाढविण्यात आली (prolongation), असा त्याचा अर्थ होईल. जोपर्यंत चेतनेचे आणि कार्याचे परिवर्तन होत नाही तोपर्यंत, होणारा हा लाभ अत्यंत अल्पसा असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 314)

शारीरिक अमर्त्यत्वाचे सार

चेतनेमधील परिवर्तन ही आवश्यक गोष्ट आहे आणि त्याशिवाय कोणतीही शारीरिक सिद्धी मिळणे शक्य नाही. शरीर जर आहे तसेच राहिले, ते जर मृत्युचे, रोगाचे, क्षय, वेदना, अचेतनता आणि अज्ञानाच्या साऱ्या परिणामांचे गुलाम बनून राहिले, तर अतिमानसिक परिवर्तनाचे पूर्णत्व शक्य नाही. ह्या गोष्टी जर राहणारच असतील तर अतिमानसाच्या अवतरणाची (Descent of the Supramental) काहीच आवश्यकता नाही कारण ईश्वराबरोबर मानसिक व आध्यात्मिकरित्या एकत्व साध्य करण्यासाठी आवश्यक असे चेतनेमधील परिवर्तन घडण्यासाठी, केवळ अधिमानस (The Overmind) पुरेसे आहे, इतकेच काय उच्च मन (The Higher Mind) देखील पुरेसे आहे. मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये ‘सत्या’चे गतिशील कार्य घडून येण्यासाठी अतिमानसिक अवतरण आवश्यक आहे. याचा अंतिम परिणाम म्हणून देहामधून अचेतनता नाहीशी होणे अंतर्भूत असेल; असे शरीर मग ऱ्हास आणि आजाराच्या अधीन राहणार नाही. ज्या सर्वसामान्य प्रक्रियांमुळे मृत्यु ओढवतो त्या प्रक्रियांच्याही अधीन शरीर राहणार नाही, असा याचा अर्थ होतो. शरीरामध्ये परिवर्तन घडवून आणायचे झाले तर, त्या शरीरामध्ये निवास करणाऱ्या रहिवाशाची तशी इच्छा असली पाहिजे. हे शारीरिक अमर्त्यत्वाचे सार असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 310)

आपल्यामधील अमर्त्य तत्त्व

बहुसंख्य लोकं जेव्हा ‘मी’ असे म्हणत असतात तेव्हा तो त्यांचा एक अंश असतो, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या शरीराचा, त्यांच्या विचारांचा एक अंश असतो, तो त्रयस्थपणे बोलत असतो; आणि हा बोलणारा सतत बदलत असतो. त्यामुळे त्यांचे ‘मी’ अगणित असतात किंवा त्यांचा ‘मी’ नेहमीच बदलत असतो. असे असेल तर मग, नित्य असणारे असे त्यांच्यामध्ये काय असते ?… अर्थातच, चैत्य पुरुष. कारण एखादी गोष्ट स्थायी असण्यासाठी ती गोष्ट प्रथम अमर्त्य असावी लागते. अन्यथा ती स्थायी होऊ शकत नाही. तसेच ज्या अनुभवांमधून ती गोष्ट जाते, त्या अनुभवांपासून ती गोष्ट स्वतंत्र अशी असावी लागते : ते अनुभव म्हणजेच ती गोष्ट असे असून चालत नाही. म्हणजेच, नदीच्या पात्रामुळे नदी निर्माण होत नाही, तर ती म्हणजे केवळ एक परिस्थिती असते. हीच तुलना जर आपण किंचितशी पुढे नेली तर (खरे तर, तुलना व्यर्थ असतात, तुलनेमध्ये लोक त्यांना पाहिजे त्या गोष्टी शोधत असतात.) असे म्हणता येईल की, नदी हे जीवनाचे एक चांगले प्रतीक आहे, म्हणजे असे की या नदीमध्ये स्थायी असे काय असते, तर ते असते ‘पाणी’. तो एकच पाण्याचा थेंब नित्य नसतो, पण पाणी मात्र नित्य असते – पाण्याशिवाय नदी असूच शकणार नाही. आणि त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये जर काही स्थायी असेल तर ती असते ‘चेतना’. मनुष्यामध्ये चेतना असते आणि त्यामुळे तो टिकून राहतो. रूपं टिकून राहत नाहीत, तर या साऱ्या रूपांना बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे चेतना, तीच टिकून राहते. तीच या सर्व रूपांमधून जात असताना, त्या रूपांची स्मृती कायम ठेवते (स्मृती ही अगदीच बाह्यवर्ती अशी गोष्ट असते.), इतकेच नव्हे तर त्या चेतनेचे तेच स्पंदनही ती कायम ठेवते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 173)