भारत – एक दर्शन ३०

(अलीपूरच्या कारागृहामध्ये असताना श्रीअरविंद यांना भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश…)

विज्ञानाने लावलेल्या शोधांची आणि तत्त्वज्ञानाच्या भाकितांचा अगोदरच अंदाज बांधून, आणि त्यांचा स्वत:मध्ये समावेश करून घेत, जडवादावर मात करू शकेल असा (सनातन धर्म, हिंदु धर्म) हा एकच धर्म आहे.

‘ईश्वरा’चे सान्निध्य मानवजातीवर ठसवू पाहणारा आणि ‘ईश्वरा’च्या सन्निध जाण्यासाठी मानवाचे जेवढे म्हणून मार्ग आहेत त्या सर्वांना आपल्या कवेत कवळू पाहणारा हा एकच धर्म आहे.

‘ईश्वर’ हा सर्व मानवजातीत, वस्तुमात्रांत आहे; ‘ईश्वरा’तच आपण आपले सर्व व्यवहार करतो व ‘ईश्वरा’शिवाय आपणास अस्तित्व नाही; हे सत्य सर्व धर्म जाणतात पण हा असा एकच धर्म आहे की जो हरघडी, दरक्षणी केवळ याच सत्यावर भर देतो.

हा असा एकच धर्म आहे की जो आपल्याला केवळ सत्य समजावून देऊन त्याविषयी विश्वास बाळगण्यासाठीच सक्षम करतो असे नाही तर, त्या सत्याची आपल्या अस्तित्वाच्या सर्व अंगांना साक्षात अनुभूती यावी यासाठीदेखील तो आपल्याला सक्षम करतो.

हा असा एकच धर्म आहे की जो जगाला, जग काय आहे हे दाखवून देतो, (म्हणजे) जग ही ‘वासुदेवा’ची लीला आहे हे तो दाखवून देतो. या लीलेचे सूक्ष्मतम कायदे, त्याचे उदात्त नियम काय आहेत हे तो दाखवतो आणि या लीलेमध्ये आपण आपली भूमिका सर्वोत्तमपणे कशी पार पाडू शकतो हेही तो दाखवतो.

हा असा एकमेव धर्म आहे की ज्याने जीवनाच्या अगदी लहानात लहान भागाची देखील धर्माशी फारकत होऊ दिलेली नाही. हा धर्म अमरत्व काय आहे हे जाणतो. या धर्माने आपल्यामधून मृत्युची वास्तविकताच सर्वथा पुसून टाकली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 08 : 11-12]

श्रीअरविंद