रामायण : राष्ट्रीय चारित्र्याची घडण (भाग ०१)
भारत – एक दर्शन २३
मूलतः महाभारताचा जो साहित्य-प्रकार आहे तोच रामायणाचादेखील आहे. फरक एवढाच की रामायणाचा आराखडा अधिक साधा आहे, त्यातील वृत्ती अधिक सुकुमार आदर्शवादी आहे आणि त्यामध्ये काव्यात्मक ऊबदारपणा आणि रंग यांचा तजेला अधिक आहे. रामायणामध्ये उत्तरकालीन कवींनी पुष्कळच भर घातलेली असली तरीसुद्धा, या महाकाव्याचा अधिकांश भाग हा एकहाती लिहिण्यात आलेला आहे, हे अगदी स्पष्ट आहे, आणि महाभारताच्या तुलनेत त्यामध्ये जटिलता कमी आहे तसेच त्यामध्ये रचनेची स्वाभाविक अशी एकसंधता आहे. रामायणाचा आविष्कार हा फारसा तत्त्वज्ञानात्मक नाही, तो शुद्ध काव्यात्मक मनाचा आविष्कार अधिक आहे. तो रचनाकाराचा आविष्कार असण्यापेक्षा अधिक प्रमाणात एका कलाकाराचा आविष्कार आहे. आरंभापासून अंतापर्यंत रामायणाची कथा एकसंध आहे आणि ती कथा कथानकाचा मुख्य प्रवाह कधीच सोडत नाही.
असे असूनसुद्धा त्यामध्ये दृष्टीची विशालता आहे, रामायणाच्या संकल्पनेमध्ये महाकाव्यात्मक उदात्ततेची महाभारताहून अधिक मोठी, विस्तृत-पंखांची झेप आहे त्यामध्ये तपशीलवार मांडणीचा बारकावा अथपासून इतिपर्यंत तसाच कायम राखण्यात आला आहे आणि त्यामध्येच एक प्रकारची समृद्धी आहे. महाभारताची रचनात्मक शक्ती, सशक्त कारागिरी आणि त्याची पिंड-प्रकृती ही एखाद्या भारतीय स्थापत्यकाराची आठवण करून देणारी आहे तर, रामायणाच्या रूपरेषेची स्पष्टता आणि त्याची भव्यता, त्यातील रंगाची समृद्धी आणि रामायणाचे तपशीलवार आलंकारिक प्रत्यक्षीकरण यामुळे रामायणातून आत्म्याच्या साहित्याचे सूचन होते आणि भारतीय चित्रकलेच्या शैलीची आठवण येते. (क्रमश: …)
– श्रीअरविंद [CWSA 20 : 349]
- पूर्णयोगासाठी आवश्यक असणारी तयारी - September 16, 2026
- दिव्य-सत्याचा शोध - September 15, 2026
- चैत्य पुरुष खुला होणे - September 12, 2026






