विचारशलाका ४०

 

भाग – ०२

 

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

व्यक्तीने असे लक्षात ठेवले पाहिजे की, तिने त्या अनुभवाच्या तळाशी गेले पाहिजे, ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो अनुभव पुन्हा आठवून पाहिला पाहिजे, त्याची आस बाळगली पाहिजे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा प्रारंभबिंदू असतो; आणि तुम्हाला तुमचा मार्ग कोणता याचे मार्गदर्शन करणारा जो धागा होता, जो संकेत देण्यात आला होता त्याचे प्रयोजन आता येथे संपलेले असते.

ज्यांना स्वत:च्या आंतरिक अस्तित्वाचा, अस्तित्वाच्या सत्याचा शोध लागणार हे ज्यांच्याबाबतीत निर्धारित झालेले असते, त्यांच्या जीवनात एखादा तरी असा क्षण असतो की, जेव्हा ते पहिल्यासारखे राहत नाहीत, वीज चमकून जावी तसा तो क्षण असतो, पण तो तेवढा एखादा क्षणही पुरेसा असतो. व्यक्तीने कोणता मार्ग अनुसरावा हे सुचविण्यासाठी ते पुरेसे असते; हेच ते द्वार असते की जे या मार्गाकडे (चेतनेचे परिवर्तन घडविणाऱ्या मार्गाकडे) उघडले जाते. तेव्हा तुम्ही या द्वारातून प्रवेश केलाच पाहिजे. आणि प्राप्त झालेल्या त्या अवस्थेला उजाळा देण्यासाठी तुम्ही अथक चिकाटीने, सातत्याने आणि अविरत स्थिरपणे प्रयत्नशील राहिले पाहिजे. म्हणजे मग ती अवस्था तुम्हाला अधिक खऱ्याखुऱ्या, अधिक समग्र अशा एका अवस्थेकडे घेऊन जाईल. (क्रमश: ..)

– श्रीमाताजी [CWM 08 : 404]

श्रीमाताजी