विचारशलाका ३९
भाग – ०१
साधक : व्यक्तीने स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन कसे करायचे?
श्रीमाताजी : अर्थातच याचे विविध मार्ग आहेत पण प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आवाक्यातील मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आणि बहुधा उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे त्या मार्गाचा संकेत आपल्याला मिळून जातो. तो मार्ग गवसण्याची पद्धत प्रत्येकाच्या बाबतीत काहीशी वेगवेगळी असते.
उदाहरणार्थ, एखाद्याला पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पसरलेल्या अशा अगदी सामान्य चेतनेचे भान असू शकते; ती एकाचवेळी वस्तुमात्रांच्या पृष्ठवर्ती भागामध्ये कार्य करते. माणसं, वस्तू परिस्थिती यांच्या वरवरच्या बाह्यवर्ती भागाशी तिचा संपर्क असतो आणि कधीतरी अचानक या ना त्या कारणाने – मी म्हटले त्याप्रमाणे, प्रत्येकाबाबत हे कारण वेगळे असते – तुमची चेतना वर उचलली जाते; आणि वस्तुमात्रांकडे त्यांच्याच पातळीवरून म्हणजे क्षितिजसमांतर पद्धतीने पाहण्याऐवजी, तुम्ही अकस्मात इतरांवर प्रभुत्व मिळविता, त्यांच्याकडे वरून पाहता; तुमच्या जवळपास असणाऱ्या छोट्या छोट्या अगणित गोष्टी पाहण्यापेक्षा आता तुम्ही त्यांच्याकडे समग्रतेने पाहता; जणू काही तुम्हाला कोणीतरी वर उचलून घेतलेले असते आणि तुम्ही पर्वतशिखरावरून किंवा विमानातून पाहता. अशा वेळी, त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पातळीवरून न पाहता, आणि प्रत्येक छोटेमोठे बारकावे न्याहाळत न बसता, तुम्ही त्या सर्व गोष्टींमध्ये जणू एकत्व आहे या दृष्टीने आणि खूप उंचावरून पाहता.
हा अनुभव प्राप्त करून घेण्याचे विविध मार्ग आहेत पण बहुधा हा अनुभव एखाद्या दिवशी अचानकपणे योगायोगाने येतो किंवा कधीकधी असेही होते की, या अनुभवाच्या अगदी विरोधी असाही अनुभव येतो पण आपण तेथेच येऊन पोहोचतो. व्यक्ती अचानकपणे चेतनेमध्ये अगदी खोलवर बुडी मारते, आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर जाते; या साऱ्या गोष्टी तिला आता दूरस्थ, वरवरच्या, अगदी किरकोळ अशा भासू लागतात; ती व्यक्ती आंतरिक निरवतेमध्ये, आंतरिक स्थिरतेमध्ये, वस्तुमात्रांच्या आंतरिक दृष्टीमध्ये प्रवेश करते. त्या व्यक्तीला वस्तुमात्रांचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे अगदी अंतरंगातून आकलन होते, एक सखोल जाणीव होते आणि त्यामुळे सर्वांचे मूल्यच बदलून जाते. आणि मग, वरकरणी कितीही बाह्य रुपं असली तरी त्या बाह्य रूपांपाठीमागे असलेल्या एका सखोल एकात्मतेची, एकरूपतेची जाणीव त्या व्यक्तीला होते.
किंवा कधीकधी, अचानकपणे, मर्यादितपणाची जाणीवच नाहीशी होते आणि आदिअंतरहित अशा अनिश्चित काळाच्या, की जो काळ आजवर होता आणि पुढेही कायमच असणार आहे अशा काळाच्या अनुभूतीमध्ये व्यक्ती प्रवेश करते. हे अनुभव तुमच्या आयुष्यात अचानकपणे वीजेप्रमाणे क्षणार्धात येतात; तुम्हाला कळतदेखील नाही ते का आणि कसे आले…
इतरही अनेक मार्ग असतात, अनेक अनुभव असतात. ते अगणित असतात, ते व्यक्तीव्यक्तीनुसार वेगवेगळे असतात, पण, एका क्षणाच्या, निमिषार्धातील या एखाद्या अनुभवामुळे तुम्ही त्या गोष्टीचा धागा पकडू शकता. (क्रमश: ..)
– श्रीमाताजी [CWM 08 : 402-404]
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025