विचारशलाका २६

 

कधीकधी असे होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पाऊलदेखील तिची प्रगती होत नाही. कधी असेही घडते की, एखादी व्यक्ती अतिशय धर्मनिष्ठ असूनही, तिची अजिबात प्रगती होत नाही. अशीही काही माणसं आहेत की, ज्यांनी त्यांचे आख्खे आयुष्य हे ध्यानधारणेमध्ये व्यतीत केले आहे आणि तरीदेखील त्यांना काहीच प्राप्त झालेले नाही. (आणि दुसरीकडे) जुन्या चप्पलबूट शिवण्यासारखी अगदी साधी कामे करणारीसुद्धा काही माणसं आहेत की ज्यांना आध्यात्मिक अनुभव आलेला आहे. व्यक्ती काय विचार करते, काय बोलते यापेक्षा असे अनुभव या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. ती एक देणगी असते. आणि यासाठी काय आवश्यक असेल तर ते म्हणजे – त्या ‘ईश्वरा’शी एकत्व पावण्यामध्ये यशस्वी होणे आणि ‘ईश्वरा’मध्ये जीवन जगणे. कधीकधी तुम्ही पुस्तकातील एखादे वाक्य वाचता आणि तुम्हाला ते वाक्य तेथे घेऊन जाते. तर कधी तुम्ही धर्मग्रंथ किंवा तत्त्वज्ञानाची पुस्तकेच्या पुस्तके वाचूनही काही उपयोग होत नाही. हो, पण अशीही काही माणसं असतात की, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना प्रगती करण्यासाठी काही मदत झालेली असते. पण या सर्व गोष्टी दुय्यम आहेत.

एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची असते : प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण इच्छा, संकल्प; कारण (प्रगती, अनुभव इत्यादी) गोष्टी निमिषार्धात होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने चिकाटी ठेवली पाहिजे.

एखाद्याला जेव्हा असे वाटते की, त्याची प्रगती होत नाहीये, अशावेळी त्याने नाउमेद होता कामा नये. त्याच्या प्रकृतीमध्ये असे काय आहे की, जे या गोष्टींना विरोध करत आहे ते त्याने शोधून काढले पाहिजे; आणि मग त्याने आवश्यक ती प्रगती केली पाहिजे. त्यामुळे व्यक्ती एकाएकी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत जाता तेव्हा तुम्हाला अनुभव येतो.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या माणसांनी परस्परांहून अगदी विभिन्न असे मार्ग अनुसरलेले असतात, ज्यांच्या विभिन्न अशा मनोवृत्ती असतात, त्यांच्यापैकी काहीजण खूप भाविक असतात तर काही अगदी नास्तिक असतात, काही जण तर अगदी जडवादी असतात पण ते सारे एकाच प्रकारच्या अनुभवापाशी येऊन पोहोचतात; तो अनुभव सर्वांना सारखाच येतो. कारण तो ‘सत्य’ असतो – तो खरा असतो, कारण ते एकमेव वास्तव असते. एखादा त्याबद्दल काय बोलतो ते महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ते तुम्ही तुमच्या मार्गाचे अनुसरण करणे, भले मग तो मार्ग कोणताही असो, त्याचे अनुसरण करणे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीमाताजी [CWM 06 : 26-27]

श्रीमाताजी