आध्यात्मिकता ३६

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य-चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे. सत्य-चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे, – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे केवळ एक साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 300)

*

(बडोदा येथील वास्तव्यामध्ये महाराष्ट्रातील योगी विष्णु भास्कर लेले यांनी श्री. अरविंद घोष यांना मन कसे निःस्तब्ध करावे यासंबंधी मार्गदर्शन केले होते. आणि तीन दिवसांच्या साधनेने श्री. अरविंद घोष ‘शांत-ब्रह्मा’च्या साक्षात्काराप्रत जाऊन पोहोचले होते. पुढे त्याच अवस्थेमध्ये ते लेले यांच्यासमवेत (इ. स. १९०८ मध्ये) मुंबई येथे राजकीय दौऱ्यावर गेले होते. लेले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी उपस्थित जनसमुदायाला ईश्वर समजून अभिवादन केले आणि भाषणास सुरूवात केली होती. या सर्व अनुभवमालिकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या, आपल्या साधनेबाबत श्रीअरविंद १९३८ साली सांगत आहेत…)

कलकत्त्याला जाण्यासाठी मी मुंबईहून निघालो होतो, तेव्हा मी लेले यांना विचारले की, “मी माझ्या साधनेबाबत काय केले पाहिजे?”

ते काही काळ शांत राहिले, कदाचित त्यांच्या अंतरंगातून येणाऱ्या आवाजाची ते प्रतीक्षा करत असावेत. आणि मग त्यांनी उत्तर दिले, “दिवसातील एका ठरावीक वेळी ध्यान करत जा आणि अंतःकरणातून येणारा आतला आवाज ऐकत जा.”

मला अंतःकरणातून कोणताही आवाज ऐकू आला नाही पण मस्तकाच्या वरच्या बाजूने एक काहीसा निराळा असा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर मी एका ठरावीक वेळी ध्यान करणे सोडून दिले – कारण माझे ध्यान सदासर्वकाळ चालू असे.

(Talks with Sri Aurobindo – Vol 01 by Nirodbaran : 03)

श्रीअरविंद