भौतिक संभावनांच्या वर उठून, पुरेसे उन्नत कसे व्हायचे हे जर व्यक्तीला माहीत असेल तर, तिला या पार्थिव जीवनाकडे समग्रपणाने पाहता येते. त्या क्षणापासून हे लक्षात घेणे सोपे जाते की, आजवरचे मानवजातीचे सारे प्रयत्न हे एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेले आहेत. सामूहिक रीतीने असू देत वा वैयक्तिक रीतीने असू देत, माणसं तेथपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात हे खरे आहे. त्यातील काही मार्ग हे इतके वेड्यावाकड्या वळणांचे असतात की, कधीकधी प्रथमदर्शनी ते त्या ध्येयाच्या दिशेने जाण्याऐवजी, त्या ध्येयापासून दूर गेल्यासारखेच दिसतात. परंतु सारे मार्ग जाणते वा अजाणतेपणी, कमीअधिक वेगाने एकाच दिशेने चाललेले असतात. तर मग हे ध्येय आहे तरी कोणते? तेच मानवी जीवनाचे प्रयोजन आणि या विश्वातील मानवाचे जीवितकार्य असते. हे ध्येय म्हणजे, मग तुम्ही ‘त्या’ला कोणत्याही नावाने आवाहन करा, कारण प्रज्ञावंतासाठी तो सर्वच नावांचा धारणकर्ता असतो. चिनी लोकांचा ‘ताओ’, हिंदुंचे ‘ब्रह्म’, बौद्धांचा ‘नियम’, हर्मीस लोकांच्या दृष्टीने ‘शुभ’, प्राचीन ज्यू लोकांच्या परंपरेनुसार ‘अनाम’, ख्रिश्चन लोकांचा ‘प्रभु’, मुसलमानांचा ‘अल्ला’, भौतिकतावादी दृष्टिकोन असलेल्या लोकांच्या दृष्टीने ‘न्याय, सत्य’. (अशी ध्येयाची कितीही विविध नावे असली तरी) ‘त्या’च्याबद्दल सचेत होणे हे मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. ‘त्या’चे आविष्करण करणे हे मानवाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 129]