कोणतेही कर्म हे शांततेमध्ये नेहमीच सर्वोत्कृष्ट दर्जाचे होते. काम करण्यासाठीच जर बोलणे आवश्यक असेल तर फक्त त्याचा अपवाद असावा. गप्पागोष्टी फावल्या वेळासाठी राखून ठेवाव्यात. अशावेळी मग काम करत असताना, तुम्ही शांत (गप्पगप्प) असता याबद्दल कोणीही आक्षेप घेता कामा नये. तुम्ही काय केले पाहिजे तर, इतरांबाबत योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि इतर काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे स्वतःला अस्वस्थ, त्रस्त किंवा नाराज होऊ देऊ नये – दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ‘समता’ बाळगावी आणि योगसाधकाला साजेशी अशी वैश्विक सदिच्छा बाळगावी. तुम्ही तसे केलेत आणि तरीही इतर जण अस्वस्थ झाले किंवा नाराज झाले तर, तुम्ही ते मनावर घेता कामा नये; कारण (मग तेव्हा) त्यांच्या चुकीच्या प्रतिक्रियांसाठी तुम्ही जबाबदार असणार नाही.
*
सामान्य मानवी प्राणिक मागण्यांच्या विरोधात जेव्हा साधक स्वतःच्या योगमार्गावर अढळ राहतो तेव्हा ज्यांना त्या साधकाबाबत काही जाण नसते असे लोक नेहमीच (हा दगडासारखा भावशून्य आहे इ.) अशा प्रकारची निंदा करत राहतात. पण त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता कामा नये. सामान्य प्राणिक मानवी प्रकृतीच्या चिखलाने भरलेल्या मार्गावरील हलकी आणि निःसत्त्व माती बनून राहण्यापेक्षा, दिव्यत्वाकडे जाणाऱ्या मार्गावरील दगड होणे परवडले.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 322-323), (CWSA 31 : 315)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १७ - September 24, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १५ - September 22, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १२ - September 19, 2023