बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व
प्रश्न : बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व यामध्ये काय फरक आहे ?
श्रीमाताजी : आत्म्याचे समत्व ही मनोवैज्ञानिक गोष्ट आहे. सर्व घटना मग त्या चांगल्या असोत की वाईट, दुःखीकष्टी न होता, नाउमेद न होता, उतावीळ आणि अस्वस्थ न होता, सहन करण्याची शक्ती म्हणजे आत्म्याचे समत्व. समत्व असले की, काहीही घडले तरी तुम्ही प्रसन्न, शांत राहता.
दुसरे म्हणजे शरीरातील समत्व. हे मानसिक समत्व नसते, तर ते काहीसे भौतिक, शारीरिक समत्व असते; म्हणजे ती अशी एक शारीरिक संतुलनाची स्थिती असते की, ज्यामुळे व्यक्ती कोणताही त्रास न होता, शक्तींचे ग्रहण करू शकते.
व्यक्तीला जर या मार्गावर प्रगत व्हावयाचे असेल तर या दोन्ही समत्वांची सारखीच आवश्यकता असते. आणि त्याशिवाय इतरही काही गोष्टी असतातच. उदाहरणार्थ, मनाची बैठक. सर्व प्रकारच्या कल्पना, अगदी परस्परविरोधी का असेनात, सर्व बाजूंनी येत राहतात आणि तरीदेखील व्यक्तीला त्याचा काही त्रास होत नाही अशी स्थिती म्हणजे मनाची बैठक. व्यक्ती त्या कल्पना पाहू शकते आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्य स्थानी ठेवू शकते. ती असते मनाची बैठक.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)
- परिपूर्ण प्रामाणिकपणा म्हणजे काय? - February 18, 2026
- प्रामाणिकपणा हेच तुमचे एकमेव संरक्षण - February 17, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ३० - February 14, 2026





