कर्म आराधना – ४२

त्या सर्व गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत, ज्या ‘ईश्वरा’कडून आलेल्या असतात, फक्त त्यांचाच स्वीकार तुम्ही केला पाहिजे. कारण छुप्या इच्छावासनांकडून देखील काही गोष्टी समोर येऊ शकतात. या इच्छावासना तुमच्या अवचेतन मनामध्ये कार्यरत असतात आणि जरी तुम्हाला त्या तुमच्या इच्छा म्हणून ओळखता आल्या नाहीत तरीसुद्धा, त्या इच्छावासना तुमच्या समोर अशा गोष्टी आणतात की, ज्या ‘ईश्वरा’कडून आलेल्या नसतात तर छुप्या इच्छांकडून आलेल्या असतात.

एखादी गोष्ट ‘ईश्वरा’कडून आलेली आहे हे तुम्हाला सहजपणे कळू शकते. तुम्हाला मोकळे वाटते, तुम्ही स्वस्थचित्त असता, तुम्ही शांत असता. पण जेव्हा असे होते की, काहीतरी तुमच्यासमोर येते आणि तुम्ही त्यावर झडप घालता आणि ओरडता, “हां, शेवटी मला हवे ते मला मिळालेच,” तेव्हा तुम्ही हे नक्कीच ओळखले पाहिजे की, ती गोष्ट ‘ईश्वरा’कडून आलेली नाही.

– श्रीमाताजी
[CWM 03 : 09-10]

श्रीमाताजी