कृतज्ञता – २२
व्यक्तीच्या आत्मदानामध्ये एक महान शुद्धी आणि एक उत्कटता असली पाहिजे, ‘तसेच आपल्यासाठी काय हिताचे आहे, काय नाही, हे आपल्यापेक्षा ‘ईश्वरा’ला अधिक चांगले कळते,’ असा ईश्वरी ‘कृपे’च्या परमप्रज्ञेविषयी एक प्रगाढ विश्वास व्यक्तीला असला पाहिजे. आणि मग असे सारे असताना, व्यक्तीने स्वतःची अभीप्सा अर्पण करताना, स्वतः ला पुरेशा उत्कटतेने ईश्वराप्रत झोकून दिले तर त्याचे परिणाम अद्भुत असतात. परंतु त्याकडे कसे पाहायचे हे व्यक्तीला उमगलेच पाहिजे. कारण जेव्हा ते परिणाम घडून येतात म्हणजे जेव्हा त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरतात तेव्हा बहुतेक लोकांना त्या अगदी स्वाभाविक वाटतात, त्या गोष्टी का आणि कशामुळे घडल्या याकडे त्यांचे लक्षच नसते आणि ते स्वतःशीच म्हणतात, “हो, हे असेच घडायला हवे होते.” आणि मग ते कृतज्ञतेचा आनंद गमावून बसतात. त्यांचे हृदय जर ईश्वरी ‘कृपे’ विषयी धन्यवाद देण्याच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने कृतकृत्य होऊ शकले तर, त्यामुळे जणू (कुशल चित्रकाराने) अखेरचा कुंचला फिरवावा तसे काहीसे होते आणि मग प्रत्येक पावलागणिक व्यक्तीला जाणवायला लागते की, ‘गोष्टी जशा असायला हव्यात, जशा घडू शकतात, अगदी तशाच, सर्वोत्तम रीतीने त्या घडत आहेत.’
– श्रीमाताजी
(CWM 07 : 239)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025