‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(श्रीअरविंद स्वत: आश्रमाच्या स्थापनेविषयी येथे खुलासा करत आहेत. श्रीअरविंद स्वत:च्या नावाचा उल्लेख, त्रयस्थ व्यक्तीचा उल्लेख करावा त्याप्रमाणे, श्रीअरविंद असाच करत असत, हे कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.)

श्रीअरविंद राजकारण-संन्यास घेऊन, सुरुवातीला पाँडिचेरी येथे चार-पाच शिष्यांसमवेत राहात होते. त्यांच्या आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यासाठी येणाऱ्या साधकांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि ती एवढी वाढली की, उच्चतर जीवनासाठी सर्वस्वाचा त्याग करून आलेल्या या साधकांच्या निर्वाहासाठी आणि त्यांना सामूहिक मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून साधकपरिवाराची रचना करणे अत्यावश्यक ठरले. अशा रीतीने, ‘श्रीअरविंद आश्रमा’ची स्थापना झाली. ती करण्यात आली असे म्हणण्यापेक्षा, श्रीअरविंदांभोवती केंद्र म्हणून त्याची स्वाभाविकपणे वाढ होत गेली, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

सुरुवातीला आश्रम नव्हता. तर काही थोडे लोक श्रीअरविंदांपाशी येऊन राहू लागले आणि साधना करू लागले. कालांतराने जेव्हा श्रीमाताजी जपानहून परतल्या, तेव्हा त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला. श्रीअरविंदांचा किंवा श्रीमाताजींचा तसा काही हेतूही नव्हता किंवा तसे काही नियोजनही नव्हते, पण बऱ्याच साधकांना त्यांचे समग्र आंतरिक व बाह्य जीवन श्रीमाताजींवर मोठ्या विश्वासाने सोपवायचे होते आणि त्यामधून त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला. दरम्यानच्या काळात, श्रीमाताजी फ्रान्स आणि जपानमधील दीर्घ वास्तव्यानंतर दि. २४ एप्रिल १९२० रोजी पाँडिचेरीला परतल्या आणि त्यानंतर मग अनुयायांची संख्या वेगाने वाढू लागली, असे दिसून आले. (१९२६ साली फक्त २४ साधक होते, पण लवकरच ती संख्या वाढत गेली. १९२७ मध्ये ती संख्या ३६ झाली आणि नंतरच्या वर्षांत ती संख्या ८५ झाली.) जेव्हा आश्रम विकसित होऊ लागला तेव्हा त्याची व्यवस्था लावण्याची जबाबदारी श्रीमाताजींवर आली. श्रीअरविंद लवकरच एकांतवासामध्ये निघून गेले आणि आश्रमाची सारी भौतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी श्रीमाताजींवर आली.

श्री. के. आर. श्रीनिवास अय्यंगार त्यांच्या श्रीअरविंद-चरित्रामध्ये नमूद करतात की, “योगाचे स्वामी (श्रीअरविंद) आता दृश्य-पटलाच्या मागे सरकले होते आणि श्रीमाताजींनी शिष्यांच्या साधनेची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती आणि आता ‘श्रीअरविंद आश्रम’ औपचारिकरित्या अस्तित्वात आला होता.” श्रीअरविंदांचा एकांतवास हा अगदी निरपवाद असा नव्हता. कारण ते वर्षातून तीनवेळा साधकांना दर्शन देत असत.

दि. २१ फेब्रुवारी (श्रीमाताजींचा जन्मदिवस),
दि. १५ ऑगस्ट (श्रीअरविंद यांचा जन्मदिवस)
आणि दि. २४ नोव्हेंबर (सिद्धी दिन)

या तीन दिवशी ते साधकांना दर्शन देत असत. आणि १९३९ नंतर, दि. २४ एप्रिल हा दिवसही ‘दर्शनदिन’ म्हणून साजरा व्हायला सुरूवात झाली. (श्रीमाताजी कायमस्वरूपी पाँडिचेरी येथे वास्तव्यास आल्या तो दिवस.)

श्रीमाताजी आणि एकदोन निवडक साधक, श्रीअरविंदांच्या कायम संपर्कात असत. आणि श्रीअरविंद साधकांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पत्रांच्या माध्यमातून देत असत. त्यांची आश्रमीय जीवनामधील आस्था पूर्वीप्रमाणेच कायम होती पण त्याचे रूप मात्र बदलले होते. (क्रमश:)

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)