‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

कैदी म्हणून अलिपूर तुरुंगातील एका वर्षाच्या कारावासानंतर इ. स. १९०९ च्या मे महिन्यामध्ये जेव्हा अरविंद घोष निर्दोष सुटून बाहेर आले तेव्हा त्यांना आढळले की, संघटना विखुरली आहे; तिचे पुढारी तुरुंगावासामुळे, हद्दपार केल्यामुळे किंवा स्वत:हून अज्ञातवासात गेल्यामुळे विखुरले गेले आहेत तरीही पक्ष अजून तग धरून आहे पण तोदेखील मूक व चैतन्यहीन झाला आहे आणि कोणत्याही कठोर कृतीसाठी तो सक्षम राहिलेला नाही. भारतातील राष्ट्रवादी नेत्यांपैकी ते एकमेव नेते शिल्लक उरले होते त्यामुळे त्यांना राष्ट्रीयत्वाच्या पुनरुज्जीवनासाठी जवळजवळ एक वर्ष अगदी एकाकीपणे झगडावे लागले. त्यांच्या या प्रयत्नांना साहाय्य लाभावे म्हणून ते या कालावधीत ‘कर्मयोगिन्’ हे इंग्रजी साप्ताहिक तर ‘धर्म’ हे बंगाली साप्ताहिक प्रकाशित करत असत.

सरतेशेवटी अरविंदांच्या लक्षात आले की, त्यांची ध्येयधोरणे आणि त्यांचा कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्याइतपत राष्ट्राची तयारी झालेली नाही. अलीपूर कारावासातील १२ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी जी पूर्णवेळ योगसाधना केली होती त्याचा परिणाम म्हणून, त्यांचे आंतरिक आध्यात्मिक जीवन, त्यांच्याकडून निरपवाद एकाग्रतेची मागणी करत होते. त्यामुळे त्यांनी निदान, काही काळासाठी तरी राजकीय क्षेत्रामधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

*

ब्रिटिश सरकार अरविंद घोषांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे, याची खबर भगिनी निवेदितांनी त्यांना दिली. आणि आता त्यांनी ब्रिटिश भारतामध्ये राहू नये, असा सल्लाही दिला होता, पण अरविंदांनी तो सल्ला मानला नाही.

पुढे ईश्वरी आदेशानुसार अरविंद फ्रेंच वसाहतीमध्ये असलेल्या चंद्रनगरला निघून गेले, तेव्हा ते संपादन करत असलेल्या ‘कर्मयोगिन्’ या इंग्रजी साप्ताहिकाची जबाबदारी आपल्या पश्चात निवेदितांनी घ्यावी, असा संदेश त्यांनी निवेदितांना पाठविला (आणि निवेदितांनीही ती जबाबदारी या प्रकाशनाच्या अखेरपर्यंत सांभाळली होती.) येथे अरविंदांच्या राजकीय जीवनाची परिसमाप्ती झाली होती. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक