अरविंद घोष – २१
‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
(शांत ब्रह्माची अनुभूती आल्यानंतर, अरविंद घोष यांना अल्पावधीतच आणखी एका अनुभव आला. त्याविषयी ते सांगत आहेत…)
मी मुंबईमध्ये असताना, मित्राच्या घराच्या बाल्कनीमधून मी तेथील व्यग्र जीवनाच्या हालचाली पाहत होतो, त्या मला चित्रपटातील चित्राप्रमाणे आभासी, छायावत् वाटत होत्या. हा वेदान्ती अनुभव होता. अगदी अडीअडचणींमध्ये असतानासुद्धा कधीच गमावू न देता, मी मनाची ती शांती कायम राखली होती. मुंबई ते कलकत्ता या मार्गावर मी जेवढी भाषणे दिली ती ह्याच स्वरूपाची होती, काही भागांमध्ये मानसिक कार्याचे थोडे मिश्रण झाले होते. निरोप घेण्यापूर्वी मी श्री. लेले यांना म्हटले की, “आता आपण एकत्र राहणार नाही, तेव्हा तुम्ही मला साधनेसंबंधी काही सूचना द्या.” दरम्यानच्या काळात माझ्या अंत:करणात आपोआप प्रकट झालेल्या मंत्राविषयी मी त्यांना सांगितले. सूचना देत असताना ते अचानक मध्येच थांबले आणि त्यांनी मला विचारले की, “ज्याने तुम्हाला हा मंत्र दिला त्या ईश्वरावर तुम्ही पूर्णतया विसंबू शकाल का?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी नेहमीच तसे करतो. तेव्हा श्री. लेले म्हणाले की, “मग तुम्हाला सूचनांची आवश्यकता नाही.’’ आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत मग आमच्यात काहीही संभाषण झाले नाही. काही महिन्यांनंतर ते कलकत्त्याला आले. मी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करतो का असे त्यांनी मला विचारले. मी म्हणालो, “नाही.” तेव्हा त्यांना असे वाटले की, कोणी सैतानाने माझा ताबा घेतला आहे आणि म्हणून त्यांनी मला सूचना द्यायला सुरुवात केली. मी त्यांचा अवमान केला नाही पण त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागलोही नाही. ‘मानवी गुरुची आवश्यकता नाही’ असा आदेश मला अंतरंगातून मिळालेला होता. ध्यानाबाबत सांगावयाचे तर – ‘वास्तविक दिवसभर माझे ध्यानच चालू असते’ हे त्यांना सांगण्याइतपत माझी तयारी झाली नव्हती. (क्रमश:)
- प्रास्ताविक - February 15, 2026
- नैराश्यापासून सुटका – ०१ - September 19, 2025
- जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ - August 14, 2025





