‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

इ. स. १९०३ मध्ये कामाचा भाग म्हणून अरविंद घोष बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत काश्मीर दौऱ्यावर गेले होते. तेव्हा श्री शंकराचार्य मंदिराच्या टेकडीवर अरविंदांना अद्वैताचा साक्षात्कार झाला. त्यांचा तो अनुभव पुढे कवितारूपाने अभिव्यक्त झाला. तो असा –

जिथे शंकराचार्यांचे छोटेसे मंदिर उभे आहे त्या,
तख्त-ए-सुलेमानच्या राजमार्गावरून मी चालत होतो.
पृथ्वीचा व्यर्थ प्रणय संपुष्टात आणणाऱ्या
एका उघड्यावागड्या कड्यावरून,
काळाच्या कड्यावरून, मी एकाकीपणे
अनंततेला सामोरा जात होतो.

माझ्या सभोवताली निराकार एकांत पसरलेला होता.
अपरिमित उत्तुंग आणि अथांग
विश्व-नग्न अजन्मा एकमेव अशी ‘वास्तविकता’
येथे चिर-स्थिर झाली होती.
सारे काही एक अनोखे ‘अनामिक’ बनले होते.

‘मौन’ हाच त्या ‘सद्वस्तु’चा एकमेव शब्द होता,
आरंभ अज्ञात होता आणि अंत निःशब्द होता.
क्षणिक पाहिलेल्या वा ऐकलेल्या साऱ्या गोष्टींचा निरास करत,
‘निसर्ग’ रहस्यांच्या मूक शिखरावर
एकाकी ‘प्रशांत’ आणि शून्य अविकारी ‘शांती’ची
सत्ता पसरलेली होती.

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)