अरविंद घोष – ०९
‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
३० एप्रिल १९०१ रोजी अरविंद घोष यांचा विवाह श्री. भूपालचंद्र बोस यांच्या कन्येशी, मृणालिनीदेवी यांच्याशी झाला. परदेशगमन करून आलेल्या अरविंदांचे, तत्कालीन प्रथेनुसार शुद्धीकरण करण्याचा प्रसंग समोर उभा ठाकला, प्रागतिक विचारसरणीच्या अरविंदांनी त्याला साफ नकार दिला. कलकत्ता येथे संपन्न झालेल्या या विवाहप्रसंगी सर जगदीशचंद्र बोस सपत्निक उपस्थित होते. अरविंद घोष तेव्हा २९ वर्षांचे होते.
अरविंद हे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या सचिवालयात कार्यरत होते. कोणते एखादे महत्त्वाचे पत्र, आदेश, खलिता, किंवा ब्रिटिश शासनाशी पत्रव्यवहार किंवा त्यासंबंधी कागदपत्रे असतील तर अरविंदांना बरेचदा बोलावणे धाडण्यात येत असे. काही भाषणे तयार करून देण्यासाठी सुद्धा ते महाराजांना मदत करत असत.
कालांतराने अरविंदांनी सर्व तऱ्हेच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधून स्वत:ला बाजूला केले आणि ते गुप्तपणाने राजकीय कार्यात इ. स. १९०५ पर्यंत कार्यरत राहिले. परंतु क्रांतिकारक पक्षाचा संभाव्य नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल अशा टिळकांशी त्यांनी संपर्क साधला आणि अहमदाबाद काँग्रेस परिषदेमध्ये (इ. स. १९०२) ते लोकमान्य टिळकांना भेटले. टिळकांनी त्यांना मंडपाच्या बाहेर नेले आणि तेथील मैदानावरच त्यांनी, महाराष्ट्रामध्ये त्यांना अभिप्रेत असलेली कार्यपद्धती कोणती त्याविषयी अरविंदांशी एक तासभर चर्चा केली. असे करत असताना, सुधारणावादी वा उदारमतवादी चळवळीविषयीचा तिरस्कारही टिळकांच्या शब्दांमधून अभिव्यक्त होत राहिला. (क्रमश: …)
- प्रास्ताविक - February 15, 2026
- नैराश्यापासून सुटका – ०१ - September 19, 2025
- जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ - August 14, 2025





