साधनेची मुळाक्षरे – ३०
श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील मजकूर –
‘योगसाधने’मध्ये प्रार्थना किंवा ध्यान या दोन्हीचे खूप महत्त्व असते, अगदी खोल अंत:करणातून उदित झालेली प्रार्थना ही भावनांच्या किंवा अभीप्सेच्या शीर्षस्थानी असायला हवी; ईश्वरविषयक आनंद किंवा प्रकाश यांच्या समवेत आतून जिवंतपणे उमलून येणारी बाब म्हणून ‘जप’ किंवा ध्यान व्हायला हवे. जर ह्या गोष्टी केवळ यांत्रिकपणे केल्या आणि केवळ कर्तव्य म्हणून केल्या तर त्या रूक्षपणा आणि निरसता यांच्याकडे झुकतात आणि त्यामुळे त्या प्रभावहीन ठरण्याची शक्यता असते.
तुम्ही अमुक एखादा परिणाम घडून येण्यासाठी, एक साधन म्हणून जरुरीपेक्षा जरा जास्तच प्रमाणात ‘जप’ करत आहात असे मला वाटते, असे जेव्हा मी म्हणालो, तेव्हा मला असे म्हणावयाचे होते की, – तुम्ही विशिष्ट गोष्टी घडून येण्यासाठी एक प्रक्रिया म्हणून, एक साधन म्हणून जपाचा अधिक उपयोग करत आहात आणि म्हणूनच मला तुमच्यामध्ये मानसिक, आत्मिक अशी अवस्था विकसित व्हावी असे वाटत होते, कारण जेव्हा चैत्य पुरुष पुढे आलेला असतो तेव्हा प्रार्थनेमध्ये आनंद आणि जिवंतपणा यांचा अभाव नसतो; तेव्हा त्यामध्ये अभीप्सा असते, एक धडपड, एक आस असते; अशा वेळी भक्तीचा अखंड पाझर चालू राहण्यामध्ये कोणतीही अडचण नसते. मन जेव्हा शांत, स्थिर असते, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख असते तेव्हा ध्यानामध्ये कोणतीही अडचण येत नाही किंवा त्यामध्ये रस वाटत नाही असेही होत नाही. ध्यान ही ज्ञानाभिमुख अशी एक प्रक्रिया आहे आणि ती ज्ञानाच्या माध्यमातूनच प्रगत होते; ती मस्तकाशी संबंधित बाब आहे, हृदयाशी नाही; तेव्हा तुम्हाला जर ध्यान हवे असेल तर, तुम्ही ज्ञानाकडे पाठ फिरविता कामा नये.
हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे ध्यान नव्हे; तर ती आपल्या ‘प्रियकरा’ला, ‘ईश्वरा’ला दिलेली हाक आहे. ‘पूर्णयोग’ म्हणजे केवळ ‘ज्ञानयोग’ नव्हे – ज्ञानयोग हा एक मार्ग झाला; परंतु आत्मदान, समर्पण, भक्ती हा पूर्णयोगाचा पाया आहे आणि अंतिमत: हा पाया नसेल तर काहीच होऊ शकत नाही.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226-227)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५७ - February 19, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५६ - February 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025