विचार शलाका – १३

योगसाधनेद्वारे व्यक्तीला नियतीचा केवळ वेधच घेता येतो असे नाही, तर व्यक्ती तिच्यात फेरफार करून नियतीला जवळपास पूर्णपणे बदलूनही टाकू शकते. सर्वप्रथम, योगशास्त्र आपल्याला असे शिकविते की, आपण म्हणजे एकसंध, साधेसुधे अस्तित्व नसतो; आणि त्यामुळे अनिवार्यपणे, आपली नियती देखील साधीसुधी, तर्कसंगत म्हणता येईल अशी एकच एक असत नाही. उलट आपण हे समजून घेतले पाहिजे की, सर्वसाधारणपणे बहुतांशी माणसांची नियती ही व्यामिश्र (complex) असते, कधी कधी विसंगतही वाटावी इतकी ती टोकाची असते. ह्या व्यामिश्रतेमुळेच आपणाला ती अनपेक्षित, अनिश्चित, आणि परिणामतः असंभाव्य आहे असे भासत नाही का?

हा प्रश्न सोडविण्यासाठी व्यक्तीला हे माहीत असणे आवश्यक आहे की, ….स्वत:च्या सर्वोच्च चेतनेमध्ये स्वत:ला कायम राखणे आणि अशा प्रकारे, स्वतःच्या सर्वोच्च नियतीला कृती व जीवनाच्या इतर भागांवर प्रभुत्व गाजविण्यास अनुमती देणे, यातच जीवनाची कला सामावलेली आहे. तेव्हा चूक होण्याची यत्किंचितही आशंका न बाळगता व्यक्ती असे म्हणू शकते की, कायम चेतनेच्या सर्वोच्च शिखरस्थानी राहा म्हणजे तुमच्या बाबतीत सर्वोत्तम तेच घडेल. पण ते सर्वोच्च शिखर गाठणे इतके सोपे नसते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 77-78)